दक्षिणेतल्या डोंगरवाटा (कोडाईकॅनाल - मुन्नार ट्रेक)

चौकटीच्या बाहेरच्या आयुष्याबद्दल खूपसं कुतूहल, थोडी खोडकर उत्सुकता असतेच की मनाच्या कोपऱ्यात ढकलून ठेवलेली. थोड्या दिवसांसाठी मुक्त, निर्भर जगावं आणि तरतरीत, चकचकीत होऊन पुन्हा आपल्या उबदार, सुरक्षित घरी परत यावं, अशी काहीशी खट्याळ ओढ लागते. मग कोणी थंड हवेच्या ठिकाणी, कोणी देवदर्शनाला जातं. आमच्यासारखे काही जरा जास्त वेडे ट्रेकिंगला जातात. अशाच एका वेडाच्या झटक्याच्या प्रभावाखाली आम्ही यूथ हॉस्टेल ह्या संस्थेने आयोजित केलेल्या 'कोडाईकॅनाल ते मुन्नार' ह्या सात दिवसांच्या ट्रेकला जायचं ठरवलं. हे 'ठरवणं' म्हणजे शास्त्रीय संगीतातल्या 'बड्या ख्याला' सारखं असत, त्याला वेळ लागतो. भावगीतासारखा चार-पाच मिनिटात आवरणारा हा गायनप्रकार नव्हे.

group-1.JPG

Keywords: 

दक्षिणेतल्या डोंगरवाटा (कोडाईकॅनाल - मुन्नार ट्रेक) भाग-१

दक्षिणेतल्या डोंगरवाटा (कोडाईकॅनाल - मुन्नार ट्रेक) भाग-१

group-1.JPG

रोजचं जगणं धोपटमार्गावरून घरंगळत असत. सकाळच्या गजरापासून रात्रीच्या जांभईपर्यंत साधारणपणे सारखंच. ठराविक वयानंतर हे असच असणार, हे आपण कबूलही केलेलं असत. तीच नोकरी, तेच सहकारी, सरावाच झालेलं तेचतेच काम. घरीही तसंच. ठराविक रस्ता, त्यावरचे ठराविक सिग्नल. काही वाईट नसतं ह्यात. असं स्थैर्य मिळावं, म्हणून तर आपण जास्तीत जास्त शिक्षण घेऊन नोकरी-व्यवसाय सुरू करतो. कौटुंबिक, आर्थिक स्थैर्य मिळालं, की स्वतःची पाठ थोपटून घेतो.

पण ह्या चौकटीच्या बाहेरच्या आयुष्याबद्दल खूपसं कुतूहल, थोडी खोडकर उत्सुकता असतेच की मनाच्या कोपऱ्यात ढकलून ठेवलेली. थोड्या दिवसांसाठी मुक्त, निर्भर जगावं आणि तरतरीत, चकचकीत होऊन पुन्हा आपल्या उबदार, सुरक्षित घरी परत यावं, अशी काहीशी खट्याळ ओढ लागते. मग कोणी थंड हवेच्या ठिकाणी, कोणी देवदर्शनाला जातं. आमच्यासारखे काही जरा जास्त वेडे ट्रेकिंगला जातात. अशाच एका वेडाच्या झटक्याच्या प्रभावाखाली आम्ही यूथ हॉस्टेल ह्या संस्थेने आयोजित केलेल्या 'कोडाईकॅनाल ते मुन्नार' ह्या सात दिवसांच्या ट्रेकला जायचं ठरवलं. हे 'ठरवणं' म्हणजे शास्त्रीय संगीतातल्या 'बड्या ख्याला' सारखं असत, त्याला वेळ लागतो. भावगीतासारखा चार-पाच मिनिटात आवरणारा हा गायनप्रकार नव्हे.

साधारणपणे ट्रेकिंग म्हणजे हिमालय, हे समीकरण डोक्यात पक्कं असत. हिमालयाची ती जादू असतेही विलक्षण. पण डिसेंबर महिन्यात तिथे चांगलीच थंडी असणार. बर्फवृष्टी झाली, तर चालायला खूप त्रास होईल, अशी भीती वाटली. ट्रेकिंगला आधी बऱ्याच वेळा जाऊन आलो होतो, त्यामुळे आपल्या धाडस करण्याची वरची पातळी किती आहे हे नीटपणे माहिती झालं होत. उत्कृष्ट शारीरिक व मानसिक फिटनेस असलेले लोकं थंडीतही हिमालयात ट्रेकिंगला जातात. पण आम्ही काही फिटनेसच्या त्या गटात मोडत नव्हतो. दुसरं असही होतं, की मागचा ट्रेक करून अडीच वर्षे झाली होती. आपापल्या व्यावसायिक, कौटुंबिक आणि इतर जबाबदाऱ्यांमधून वेळ काढणं नेहमी नेहमी जमत नाही. इतक्या दिवसांनी काही जमतंय, तर हिमालयात जाऊन पंचाईत करून घेण्यापेक्षा दक्षिण भारतात जाऊन नवीन भाग बघावा, असा निर्णय भरपूर चर्चेनंतर सर्वानुमते झाला. हा आमचा ट्रेक अगदीच कमी दिवसांचा होता. चालायचे दिवस फक्त इनमिन साडेतीन होते. पुणे ते कोडाईकॅनाल आणि मुन्नार ते पुणे ह्या प्रवासाला त्यापेक्षा जास्त वेळ लागणार होता. एक मैत्रीण दिल्लीहून येणार होती. तिचा तर शब्दशः 'आसेतु हिमाचल' प्रवास होणार होता.

एकदा कुठे जायचं, हे ठरल्यावर मग कुठल्या बॅचला जायचं ते ठरलं. जाताना-येतानाची रेल्वे बुकिंग्ज झाली. डळमळीत असलेल्या सदस्यांना जोरदार आग्रह झाला. नवीन बुटांची खरेदी झाली. रोज चालायला जाऊन फिटनेस वाढवण्याचे संकल्प केले गेले आणि प्रथेप्रमाणे मोडलेही गेले! होताहोता आमचा आठ जणांचा ग्रुप फायनल झाला. १६ डिसेंबरच्या पहाटे निघायचं हे नक्की झालं.

ह्या स्टेजपर्यंत सगळं छानच असत. नंतर मात्र हळूहळू काळजी वाटायला लागते. गुढघ्यात, पाठीत येणारी चमक, जिने चढल्यावर वाढलेला श्वासाचा वेग घाबरवायला लागतो. 'आपल्याला जमेल का इतकं चालणं?' टाईप भीती वाटायला लागते. कशाला ह्या भानगडीत पडलो, असही वाटतं. ह्या वेळेला तर निघायच्या थोडंसं आधी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता ह्यांच्या आजारपणाच्या बातम्या येऊ लागल्या. काळजीत भरच पडली. त्यानंतर तामिळनाडूवर चक्रीवादळाचे ढग घोंगावायला लागले. सुदैवाने कै.जयललिता ह्यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतरही तामिळनाडू शांत राहिलं, वादळही थंडावलं आणि आम्ही आठ जण सामान, तिकीट, आवश्यक कागदपत्रे,जेवण, औषधे अशा सतराशेसाठ वस्तू घेऊन पुण्याहून निघालो.

पुणे ते कोडाईकॅनाल

आमचा आठ जणांचा ग्रुप नमुनेदार होता. त्यात आम्ही तिघी शाळामैत्रिणी, आई-बाबा-लेक असं एक कुटुंब आणि दोन कॉलेजकन्यका होत्या. थोडक्यात म्हणजे, समाजातल्या बहुतेक सर्व घटकांना ह्यात प्रतिनिधित्व मिळालं होत! कोडाईकॅनालच्या जवळच्या दिंडीगल नावाच्या स्टेशनपर्यंत पोचायला पुण्यापासून साधारण तीस तास प्रवास करायचा होता. रोजच्या धबडग्यात मैत्रिणींशी बोलायला निवांत बोलायला वेळ मिळतोच कुठे? त्यामुळे ती बाकी भरून काढायचं काम आम्ही अगदी मनापासून पार पाडत होतो. एव्हाना मोबाईल नेटवर्कचा लपंडाव सुरू झाला होता. त्यामुळे घर आणि कामाचे फोन येणं बंद झालं होतं. जबाबदाऱ्या मागे टाकून आता पुढचे सहा-सात दिवस मोकळं - हलकं जगायचं ह्या कल्पनेने छान वाटत होत.

IMG_2017-10-05_13-37-03.JPG

ट्रेनमधील टाईमपास.... क्रोशाचा क्लास!!

गाडी भराभर स्टेशन्स मागे टाकत होती. महाराष्ट्र सोडून आपण लांब आलोय हे जाणवत होत. प्लॅटफॉर्मवर विकायला येणारे पदार्थ बदलले होते. कानांवर वेगळीच भाषा पडत होती. देवनागरी मध्ये लिहिलेल्या पाट्या वाचताना बरंच मनोरंजन होत होतं! चहाच्या आरोळ्यांच्या जागी कॉफीच्या आरोळ्या सुरू झाल्या होत्या. भाताची हिरवीगार शेतं, नारळाची वाऱ्यावर डोलणारी झाडं, वेगळ्याच रंगसंगतीत रंगलेली घरं डोळ्यांना सुखावत होती.

IMG_2017-10-05_13-40-52.JPG

दाक्षिणात्य देवनागरी

होता होता आम्ही दिंडीगल स्टेशनवर उतरलो. केळीच्या पानातला चविष्ट दाक्षिणात्य नाश्ता, फिल्टर कॉफी पोटात गेल्यावर पोटालाही दक्षिणेत आल्याची खात्री पटली. नाहीतर ट्रेनमध्ये सगळ्यांनी भरभरून आणलेलं मराठी जेवणच जेवत होतो! रस्त्याच्या दोन्ही बाजूंना लहान, टुमदार घरं, शेतं, नारळी-सुपाऱ्यांची झाडं होती. जिकडे तिकडे हिरवाई होती. चित्रात शोभून दिसेल अशा रस्त्यावरून, एखाद्या सुरेख, पल्लेदार तानेसारखा रस्ता जात होता. त्यावरून प्रवास करत आम्ही कोडाईकॅनालला पोचलो. कँप शोधला.

हळूहळू सहट्रेकर येऊन पोचत होते. सगळ्यांच्या राहण्याची सोय करणे, कागदपत्रे जमा करून घेणे अशी धावपळ चालू होती. रोजची एक अशा एकूण दहा बॅचेस होत्या. आमची पहिलीच बॅच होती. त्यामुळे पुढच्या कँपच्या सेटअपसाठी आवश्यक असलेल्या सामानाचे ट्रक भरून जात होते. ती गडबड होतीच. त्यात ट्रेन लेट झाल्यामुळे ह्या कँपवरचे स्वैपाकी अजून कोडाईकॅनालमध्ये पोचलेच नव्हते.

पाहुण्यांनी गच्च भरलेल्या लग्नघराचा चार्ज आदल्या दिवशीच लग्न करून आलेल्या नव्या सूनबाईच्या हातात देऊन सासूबाई पसार झाल्या, तर ज्या प्रकारचा गोंधळ होईल, तसा गोंधळ चालू होता. आमची बॅच पहिलीच आणि सगळ्यात मोठी म्हणजे पन्नास लोकांची होती. १२ महिला आणि ३८ पुरुष. इतक्या सगळ्यांची व्यवस्था लावणे आणि सगळ्यांच्या असंख्य शंकांना उत्तरे देता देता यूथ हॉस्टेल च्या लोकांची दमछाक होत होती.

आमच्या खोलीच्या अगदी समोर कँप लीडर सरांचं ऑफिस होतं. पुढच्या कँपच्या स्वैपाक्यांबरोबर रोजच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंतचा मेन्यू ठरवण्यासाठी चाललेल्या त्यांच्या वाटाघाटी आम्हाला ऐकायला येत होत्या. आम्हाला चौघींना हे काम करण्याचा मजबूत अनुभव होता. सगळ्यांना संसार सुरू करून वीस वर्षे होऊन गेली होती. त्यामुळे घरातील सर्व सदस्यांच्या आवडीनिवडी आणि आपली पाकमर्यादा लक्षात घेऊन पदार्थ ठरवणे, ही लढाई काही नवीन नव्हती. कँप लीडर सरांनी आमच्या हातात हे काम दिल असतं, तर दहा मिनिटात नक्की उरकलं असत!

पण त्या गडबडीतही कामं पार पडली. सगळ्यांना सॅक मिळाल्या. जास्तीच सामान जमा झालं. सर्वांना ओळखपत्रे मिळाली. ट्रेकच्या दिनक्रमाची रूपरेखा कळली. अंघोळीला गरम पाणी मिळालं. कल्याण येथून आलेल्या श्री.किरण आपटे ह्याची ग्रुपलीडर म्हणून नेमणूक झाली.

उद्यापासून चालायला सुरवात करायची होती. प्रवास-खाणे-गप्पा-टप्पा-हास्य-विनोदात मी 'काळजी' ह्या सखीला विसरले होते. रात्री आडवं होताच तिचं अस्तित्व जाणवलं! आता हिची सोबत मुन्नारला पोचेपर्यंत असणार, हे नक्की.

Keywords: 

दक्षिणेतल्या डोंगरवाटा (कोडाईकॅनाल - मुन्नार ट्रेक) भाग-२

कोडाईकॅनाल ते वेल्लाकवी

ट्रेकमध्ये 'शिट्टी' हे सर्वस्व असते. सगळा दिनक्रम शिट्टीच्या तालावर चालतो. सकाळी बेड टी, व्यायाम, ब्रेकफास्ट, चहा, पॅक लंच इतक्या शिट्ट्या आणि कँपवर पोचल्यावर वेलकम ड्रिंक, चहा, नाश्ता, सूप, जेवण आणि बोर्नव्हिटा एवढ्या (तरी!) शिट्ट्या वाजायच्या!!

आम्ही एका खोलीत सात जणी होतो. वयोगट पंचेचाळीस ते तेरा! त्यामुळे कपड्यांपासून गप्पांच्या विषयापर्यंत खूप व्हरायटी होती. आज अंघोळीला गरम पाणी मिळणार होतं. पुढे चार दिवस अंघोळीच्या गोळ्यांवर भागवायचं असल्याने समस्त महिलावर्गाने झटाझट अंघोळी उरकल्या. इथेतिथे पसरलेल्या सामानाच्या मुसक्या आवळून ते सॅकच्या भव्य उदरात गडप करण्यात आलं. नाश्ता झाला. दुपारच्या जेवणाचा डबा, पाण्याच्या बाटल्या भरल्या गेल्या. चालायचे बूट, टोप्या चढल्या. जड सॅक पाठीवर लावल्या आणि आमच्या बॅचने पहिले पाऊल टाकले.

20161218103823_IMG_1778.JPG

आजचा रस्ता १४-१५ किलोमीटर आहे आणि उताराचा आहे, अशी माहिती मिळाली होती. सुरवातीचा रस्ता कोडाईकॅनाल शहरातून होता. टूरिस्ट, मधुचंद्रीय मंडळींच्या त्या भाऊगर्दीत मळके कपडे, पाठीला सॅक अशा अवतारातली आम्ही पन्नास मंडळी अगदीच विसंगत दिसत होतो. 'न जाने कहाँ कहाँसे आते है मुँह उठाके' असे त्यांच्या मनातले विचार त्यांच्या चेहऱ्यावर वाचता येत होते!

20161218104720_IMG_1787.JPG

थोडा रस्ता चालून गेल्यावर आम्ही जंगलात शिरलो आणि गर्दीपासून सुटका झाल्यामुळे हुश्श झालं. उताराचा रस्ता म्हणजे सोपा असेल, दमायला होणार नाही, असं वाटलं होतं. पण हा उतार इतका जोरदार होता, की एकेक पाऊल जपून, दाबून टाकायला लागत होतं. थोडं जरी इकडेतिकडे झालं, तर कपाळमोक्ष होईल अशी भीती वाटत होती. मुंबई, पुणे, नाशिकहून आलेल्या लोकांमुळे बॅच मध्ये मराठी लोकांची मेजॉरिटी होती. चेन्नईहून इंजिनीरिंगच्या मुलांची एक गँग आली होती. बाकी जनता गुजराथ, तामिळनाडू, केरळ वाली होती. सुरवातीला सगळे आपल्या लोकांबरोबर असतात. नंतर हळूहळू हे बदलत जातं. चालायच्या वेगाप्रमाणे सोबतचे भिडू बदलतात. अजिबात परिचय नसलेलेही चालताना हात देणे, दमल्यावर धीर देणे, वेळप्रसंगी सॅक उचलणे अशी सगळी मदत करतात.

wellakavi.jpg

चालता चालता आमचा त्या दिवशीचा लंच पाॅइंट आला. यूथ हॉस्टेलचा स्टॅण्डर्ड मेनू म्हणजे बटाट्याची भाजी आणि पुऱ्या. 'जंगलमें भालू और वाय.एच.ए. में आलू होतेही होते है!' अस तत्त्वज्ञान त्या मागे आहे. प्रथेला जागून पुरी-भाजी खाल्ली, फोटो काढले आणि मार्गस्थ झालो.

part 2-2.jpg
साधारण ९.३० ते ३.३० इतकं चालल्यावर वेल्लाकवी गाव आलं एकदाच. हे गाव अगदी लहानसं आहे. चाळीस-पन्नास घरं असतील आणि तेवढीच देवळंही! कोडाईकॅनालच्या सरांनी ह्या गावात चपला/बूट घातलेले चालत नाहीत, ह्याची कल्पना दिली होती. गावाच्या सीमेवर बूट उतरवून अनवाणी चालत कँपवर पोचलो.थोडा शीण गेल्यावर गावात चक्कर मारून आलो. ओसरी-माजघर पद्धतीची घरं होती. प्रत्येक दारासमोर मोठ्या रांगोळ्या काढलेल्या. अगदी लहान रस्ते. रस्ते कसले गल्ल्या-बोळच. सगळ्यांच्या कॉफी, संत्र्याच्या बागा. कौतुकाची गोष्ट म्हणजे, इतक्या लहान, आड जागी वसलेल्या गावातही वीज होती. पाईपलाईनने पाणी पुरवठा होत होता. चेन्नई गँगमधल्या एकाला पकडून त्याला दुभाषक बनवून गावातल्या लोकांशी थोड्या गप्पा मारल्या.

part 2-3.JPG

रात्री जेवणानंतर जोरदार कँपफायर झालं. लाकूड जाळण्यावर असलेल्या निर्बंधामुळे आता कँपफायर मध्ये शेकोटी नसते. पण गाणी-नाच सगळं यथासांग झालं. मराठी आणि तमिळ पब्लिकला येणारं 'कोलावेरी डी' हे गाणं आमचं बॅचसाँग झालं. पुढचं एकही कँपफायर ह्या गाण्याशिवाय पार पडलं नाही!

भाग-४ वेल्लागवी ते कुरुंगनी

part 2-4.JPG

कालच्यापेक्षा आज चालायचं अंतर कमी आहे, असं समजलं होतं. उताराचाच रस्ता होता. एका धबधब्याजवळ चालणं संपणार होतं. तिथून पुढे काही अंतर जीपमध्ये बसून जायचं होतं. आज तामिळनाडू राज्याची वेस ओलांडून केरळ राज्यात प्रवेश करायचा होता.
सकाळी थोडे स्ट्रेचिंगचे प्रकार झाले. नंतर आवरून सगळे तयार झाले. निघताना डब्याबरोबर जवळच्या बागेतील ताजी, चविष्ट संत्री प्रत्येकाला मिळाली. त्या चिमुकल्या खेड्याचा निरोप घेऊन आम्ही मार्गस्थ झालो. पुन्हा 'जपून चाल, पोरी जपून चाल' चा पुढचा अंक सुरू झाला. दहा-पंधरा मिनिटे चालत नाही, तोवर एक काका आपली सॅक कँपवर विसरून आल्याचे कोणालातरी लक्षात आलं! झालं. हसण्या-खिदळण्याला ऊत आला. कँपवर स्लीपर्स, कपडे इत्यादी गोष्टी विसरणारे शूरवीर मी पाहिलेले आहेत. पण ट्रेकमधली आपली संपूर्ण संपत्ती असलेली सॅकच विसरून येणे महान होते! पुढचे सगळे दिवस सगळेजण त्यांना 'सॅक घेतली का?' ही आठवण न विसरता करायचे!

part 2-5.JPG

रोज आमच्या बरोबर एक गाईडदादा असायचे. हिमालयातल्या गाईडदादांशी बोलताना भाषेचा अडसर येत नाही. राष्ट्रभाषेत संवाद होऊ शकतो. इथे तो प्रश्न फारच भेडसावत होता. हावभाव आणि खाणाखुणा जोरात चालू असल्याने सगळे सारखे डंबशेराट्स खेळत आहेत नाहीतर कथ्थकच्या मुद्रा करत आहेत, असं वाटायचं! तरी नशीब की चेन्नई गँगमधली तरुण मंडळी दुभाष्याच काम अंगावर घेत होती. ह्या आमच्या गाईडदादांना शाळेत बहुतेक तीन पर्यंतच अंकओळख झाली असावी. कारण अजून किती वेळ लागेल?, किती किलोमीटर राहिले ह्या लोकप्रिय प्रश्नांना ते कायम १/२/३ ह्याच आकड्यात उत्तरं द्यायचे!! कमी नाही, जास्त नाही.

सुरवातीला अत्यंत खतरनाक असलेला उतार हळूहळू मवाळ होत गेला. त्या जंगलात मोठ्या प्रमाणात चिंचांची झाडं होती. चिंचांचे आकडे अगदी सहज हाताला येतील, इतक्या खाली होते. संत्री, चॉकलेट, चिंचा, चिक्की, खजूर असे एकमेकांशी काहीही ताळमेळ नसलेले पदार्थ खाऊन पोटाला कन्फ्युज करण्याचं काम नेटाने चालू होतं.

part 2-6.JPG

पुष्कळ वेळ चालल्यावर वन खात्याच्या पाऊलखुणा दिसायला लागल्या. वर छप्पर असलेले बाक, 'टाळा प्रदूषण- करा निसर्गाचे रक्षण' टाईपचे तमिळ बोर्ड वगैरे. आता आपण लोकवस्तीच्या जवळ आलो, हे लक्षात आलं. अर्ध्या तासातच धबधब्याजवळ येऊन पोचलो. आता पुढे जीपने जायचं होत. त्यामुळे चालायचे बूट उतरवून मी नदीच्या थंडगार पाण्यात पाय बुडवून बसले. एकदम 'अहाहा' असं फिलिंग आलं. ही असली काही सुखं मिळवण्यासाठी आधी दहा-बारा किलोमीटर पायी तुडवावे लागतात. तीच त्या सुखाची किंमत. तिथे रुपये-पैसे कामाला येत नाहीत.

आमच्या ग्रुपला मागे टाकून मी बरीच पुढे आले होते. चालताना नाही तर निदान जेवायला तरी थांबावं म्हणून सहट्रेकर्सच्या जेवून घ्यायच्या आग्रहाला नकार देत मी तिथल्या खडकावर उन्हात आडवी झाले. झोपले नव्हते पण छान ग्लानी येत होती. बाकीच्यांचे गप्पांचे, हसण्याचे आवाज येत होते. मन अगदी शांत झालं होतं. बराच वेळ कोणाशी अक्षरही न बोलता मी मस्त पडून राहिले.
थोड्या वेळाने बाकी मंडळी येऊन पोचली. कोण कुठे पडलं, उतरताना किती वाट लागली, पाय कसे दुखताहेत अशा गप्पा, जेवण झालं. जवळच्या नदीवर सगळी पुरुष मंडळी कधीपासून डुंबत, मजा करत होती. त्यांचा फार हेवा वाटत होता. पण कपडे बदलायला जागा, ओले कपडे बाळगणे हे प्रश्न येतात, त्यामुळे नको वाटत होतं.

पण मोह नाहीच आवरला. सगळ्या पुरुष मंडळींना पाण्यातून बाहेर काढून आम्ही आत शिरलो. एका फाॅरेस्ट गार्ड काकू आमच्यावर लक्ष ठेवायला काठावर बसल्या. त्यांच्या कडक नजरेखाली आम्ही धमाल करायला सुरवात केली. सुरवातीला थंडगार वाटणार पाणी नंतर सुखद वाटायला लागलं. हा आमचा नैसर्गिक आणि फुकटचा स्पा होता. दोन दिवस चालल्याचा शीण पार निघून गेला. शरीर अगदी हलकंहलकं वाटत होतं.

थोड्याच वेळात मिनी बस आल्या. अंघोळ करून फ्रेश वाटत असलं, तरी पाय आखडलेले होते. त्या बसच्या पायऱ्या उतरताना नवीन चालायला लागलेली लहान मुलं जशी प्रत्येक पायरीवर दोन्ही पाय ठेवत उतरतात तसे सगळे उतरत होते. बस निघाल्या. आम्ही केरळच्या रस्त्याला लागलो. एरवी अशा प्रवासात पाट्या वाचण्याची करमणूक असते. इथे मात्र काहीही वाचता येत नव्हतं. कळायला लागण्याआधीच आपण वाचायला शकतो. त्यामुळे अशिक्षित माणसांना पाट्या पाहून कस वाटत असेल, हे तिथे नीटपणे कळत होतं.

माझी शाळेमध्ये बरोबर असलेली, पण आता दिल्लीत स्थायिक झालेली एक मैत्रीण बरोबर होती. आधी आम्ही लांब-लांब बसलो होतो. पण आमच्या गप्पांनी बाकीच्यांची झोपमोड व्हायला लागल्याने त्यांनी आम्हाला जवळ जागा दिल्या! मग कल्याणची शाळा, माहेर-सासर, भावंड, राजकारण, मुलं, पाककृती, मराठी साहित्य, ऑफिसेस अश्या सर्वसमावेशक विषयांवर गप्पा झाल्या.
अम्मांचे फोटो दिसेनासे होऊन आता केरळच्या मुख्यमंत्र्यांचे फोटो दिसायला लागल्यामुळे आता आपण केरळात आलो, हे लक्षात आलं. हिरव्यागार जगातून प्रवास करत कँपवर येऊन पोचलो. पुन्हा वेलकम ड्रिंक- नाश्ता - सूप- जेवण - बोर्नव्हिटा- कँपफायर हे झालं. दोन दिवसांनी चार्जिंगची सोय मिळाली होती. त्यामुळे सगळ्यांनी नंबर लावून चढाओढीने फोन / कॅमेरे चार्ज केले. स्वतःला चार्ज करण्यासाठी सगळे गुडुप झोपून गेले.

art 2-6.JPG

दक्षिणेतल्या डोंगरवाटा (कोडाईकॅनाल - मुन्नार ट्रेक) भाग-३ (अंतिम)

भाग-3 कुरुंगनी ते सेंट्रल स्टेशन

ट्रेकला यायचं ठरवणं, तयारी ह्या सगळ्यातून पार पडत इथे आलो. ही आत्ताच तर सुरवात झाली आहे, असं म्हणता म्हणता अर्धा ट्रेक संपला सुद्धा. आता फक्त आज आणि उद्या. मग परत जीप, बस, ट्रेन आणि घरी परत.

आजचा दिवस सगळ्यात कठीण आहे, असं सगळे सांगत होते. त्यामुळे थोडी काळजी वाटत होतीच. त्यात पावसाची लक्षणं दिसत होती. सॅकमधलं सामान प्लास्टिक पिशव्यांमध्ये असल्याने ते भिजायची भीती नव्हती. सर्व मंडळींनी रेनकोट चढवले. रेनकोट घालून चालताना खूप घाम येतो. पावसापासून बचाव करावा, तर घामेघूम होऊन भिजायला होतच.

नारळी-पोफळीच्या बागा बघत सगळे चालत होते. थोड्याच वेळात जंगलात शिरलो. जरा कठीण चढ सुरू झाला. श्वासाचा वेग वाढला आणि चालायचा कमी झाला. तरुण आणि तडफदार मंडळी आम्हाला न थांबता चालत राहा, असे सल्ले न कंटाळता देत होती. ह्या सगळ्यांना सात वेळा पळत पळत डोंगर चढायला लावला पाहिजे, मग कळेल; असे दुष्ट विचार मनात येत होते. पण बोलणं शक्य नसल्यामुळे मुगासारखे हे विचार गिळून टाकले.

20161220073130_IMG_1961.JPG

सगळ्या जलद गाड्यांना पुढे जाऊ दिल्यानंतर आमच्या स्लो गाड्या प्रत्येक स्टेशनवर (आणि अधल्यामधल्या सिग्नललाही!!) थांबत हळूहळू सरकायला लागल्या. एकेका पावलाने प्रगती चलू होती. वेग कमी असल्याने आसपास बघायला भरपूर वेळ मिळत होता. तामिळनाडू, केरळ ह्या दक्षिणेकडच्या राज्यांवर पावसाचा वरदहस्त आहे. मोसमी पाऊस इथे वर्षातून दोन वेळा येतो. त्यामुळे जिथे पाहू, तिथे हिरव्या रंगाच्या निरनिराळ्या छटा दिसत होत्या. आपल्या मराठी डोळ्यांना 'राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा' ची सवय. इथे हा हिरवा रंग बघून डोळे तृप्त होत होते.

20161220103834_IMG_1976.JPG

20161220122100_IMG_1977_0.JPG

आज पावसाचा रंग असल्याने तर खालपर्यंत उतरत येणारे ढग, धुक्याचीही मेजवानी होती. प्रश्न फक्त एकच होता, तो म्हणजे चढाचा रस्ता. बराच वेळ असं चालल्यावर जेवायची जागा आली. एका प्रचंड मोठ्या वटवृक्षाच्या आडोशाने सगळे जेवायला बसले. 'अरेवा, आज तुमच्याकडेही बटाटा भाजी का? आमच्याकडेही तीच आहे!' इत्यादी प्रत्येक ट्रेकमध्ये होणारे विनोद इथेही झालेच. थोडा वेळ पाउस थांबला होता, तो आमची जेवण झाल्यावर परत पडायला लागला. त्यामुळे सगळे पुन्हा रेनकोट चढवून चालायला सज्ज झाले.

आता परत चढाचाच रस्ता होता. पण सकाळचा चढ खूपच सोपा वाटेल, असा भयंकर चढ होता. अगदी अंगावर येणारा, खडा चढ होता. हात, पाय, आजूबाजूची झाडं-झुडपं, काठी, सहप्रवाशांची मदत इतकी सगळी आयुधं वापरून हळूहळू पुढे जाऊ लागलो. इथे एक वेगळंच आश्चर्य आमची वाट बघत होतं. ह्या संपूर्ण डोंगरावर जंगली गवती चहा होता. त्याचा वास वातावरणात भरून राहिला होता. प्रत्येक श्वासाला त्या वासाने मजा येत होती. सव्वा तास आम्ही त्या भयानक चढ असलेल्या रस्त्याने चढत होतो. धाप लागत होती. पाठीवरच ओझं जड होऊन खांद्यांना काचांत होतं. पावसाने घसरड्या झालेल्या रस्त्यावरून पाय घसरून आपण दरीत पडलो तर? अशी भीतीही वाटत होती. काही जागा तर इतक्या अवघड होत्या, की गाईड दादांना आधी आमच्या सॅक आणि नंतर आम्ही, अश्या फेऱ्या करून मुद्देमाल जागेवर पोचवावा लागला.

IMG-20161224-WA0018.jpg

हा भयानक चढाचा रस्ता संपल्यावरही पुढे चालणं शिल्लक होतं. पण आधीच्या मानाने सोपा रस्ता होता. गवती चहा, पाऊस, जंगली झाडे आणि फुले ह्याच्या मिश्रणाने तयार झालेला वास गुंगी आणत होता. तासभर चालल्यावर कॉफीच्या बागा दिसायला लागल्या. चाणाक्षपणे आम्ही गाव / वस्ती / कँप जवळ आल्याचे ओळखले.

20161221113858_IMG_2053 (1).JPG

पाऊस आणि घामाच्या धारांनी चिंब भिजायला झालं होतं. थंडी वाजत होती. कोरडे कपडे चढवल्यावर जीवात जीव आला. कँपलीडर सरांनी चहा तयारच ठेवला होता. स्वर्गातून डायरेक्ट पृथ्वीवर आलेले अमृत प्यायला मिळाल्यावर होईल, अशा आनंदाने सगळे चहा पीत होते. मी चहा पीत नसल्याने मी कॉफीच्या झाडांकडे पाहून समाधान मानले!

पावसामुळे आज कँपफायर होणार नाही, असं वाटत होतं.. मग आम्ही आमच्या खोलीत मजा केली. एव्हाना बरोबरच्या लोकांशी ओळख झाली होती. मग सतत आर्मी प्रिंटचे कपडे घालणाऱ्या दोघांच 'कमांडो', अजून एकाच त्याच्या शरीरयष्टीमुळे 'थंगबली' असं नामकरण झालं आणि त्यावरून अमर्याद खिदळूनही झालं.

सुदैवाने जेवणानंतर पाउस थांबला. आजचं कँपफायर ह्या ट्रेकमधलं शेवटचच कँपफायर. त्यामुळे पाय दुखत होते, तरी गेलो. आमचे ग्रुप लीडर श्री.आपटे हे शास्त्रीय नृत्य शिकत होते. त्यामुळे त्यांनी उत्तम असं नृत्य केलं. एक मुलगी शास्त्रीय संगीत शिकणारी होती. तिने खूप छान गाणी ऐकवली. आपटेंचा नाच आणि त्या तरुण मैत्रिणीने गायलेलं 'आज जानेकी जिद ना करो' कायमचं लक्षात राहिल.

इतक्या करमणुकीनंतर दिवसभराचा शीण निघून गेला. उद्या ट्रेक संपणार. रात्री आपण कोचीच्या हॉटेलमधल्या स्वच्छ बेडवर झोपणार, अशी स्वप्न पडत होती!

भाग-६ सेंट्रल स्टेशन - टॉप स्टेशन - मुन्नार - कोची - पुणे

आज ट्रेकचा शेवटचा दिवस. शेवटच्या दिवशी नेहमी मिश्र भावना असतात. आपल्या शहरी, सुखसोयींच्या जगात जायचं, घरच्या उबदार वातावरणात परतायचं म्हणून आनंद होत असतो. पण ही निखळ मजा संपणार म्हणून वाईटही वाटतं. बरोबरच्या लोकांशी जुळलेल्या मैत्रीचा बंध हळूहळू विरतो. सुरवातीला प्रत्यक्ष भेटी, फोन, सोशल मिडीया आणि नंतर काही नाही, असे टप्पे असतात. हे अपरिहार्य असत. पण तो निरोपाचा क्षण तितकाच त्रासदायक असतो.

आज मुन्नार पर्यंत चालायचं. नंतर जीपने मुन्नार स्थलदर्शन असा दिनक्रम होता. मात्र आम्हाला घाई असल्याने आम्ही स्थलदर्शन टाळून डायरेक्ट कँप गाठणार होतो. ट्रेक पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र घेणे, आम्ही कोडाईकॅनालला जमा केलेलं सामान हातात पडलं की बसने थेट कोची गाठायचं होतं. कालच्या पावसानंतर आजचा दिवस मात्र छान सोनेरी उन्हाचा होता. रस्ता ट्रेकला आदर्श म्हणता येईल, असा होता. पुरेसा रुंद, वर्दळ अजिबात नाही. हलकासा न दमवणारा चढ. आजूबाजूला छान झाडी. नजरेला सुखावणार निसर्गसौंदर्य. गवतीचहाचा भन्नाट वास. मधूनमधून लागणारी चिमुकली गावं. एखाद्या निसर्गचित्रात शोभून दिसेल, अशी झाडाफुलांची, रंगांची उधळण.

20161221114611_IMG_2055.JPG

flowers_original (1).jpg

मी आणि माझी एक मैत्रीण बरोबर चालत होतो. बहुतेक सगळे पुढे निघून गेले होते. त्यामुळे सगळीकडे अगदी शांत होतं. अशी शांतता आता परत मिळणार नाही, म्हणून ती कानात-मनात साठवून घेत होतो. तीनेक तास चालल्यावर गाड्यांचे आवाज ऐकू येऊ लागले. ट्रेक संपला. सगळे आमची वाट बघतच होते. सगळ्यात शेवटी पोचायचा मान मिळवल्याबद्दल आमचं टाळ्यांच्या गजरात स्वागत झालं. सगळ्यांचा निरोप घेतला. ह्या मंडळींचा ऋणानुबंध इतकाच. आता पुन्हा भेट होईल, नाही होईल कोण जाणे?

Trek_friends_web-large.jpg

आम्ही आठ जण डायरेक्ट मुन्नारला जाणाऱ्या जीपमध्ये बसलो. पुन्हा एकदा टूरिस्टी, मधुचंद्रीय मंडळी दिसायला लागली आणि आपण शहरी संस्कृतीकडे चाललोय ह्याची जाणीव झाली. कँपवर पोचल्यावर भराभर पुढच्या कामांना लागलो. ट्रेक संपल्यावर काही फॉर्म भरावे लागतात. चेक-आऊट फॉर्म, फीडबॅक फॉर्म वगैरे. त्यानंतरच ट्रेक पूर्ण केल्याचं प्रमाणपत्र मिळत. सरकारी नोकरीत असलेल्यांना ह्या ट्रेकसाठी विशेष रजा मिळू शकते, त्यासाठी ते आवश्यक असत.

हे काम झाल्यावर आमचं जमा केलेलं सामान मिळालं. कँपलीडर सरांचे आम्ही त्यांच्या सहकार्याबद्दल मनापासून आभार मानले. मुन्नार-कोची बसमध्ये आमचं प्रचंड सामान चढवलं आणि कोचीच्या रस्त्याला लागलो. बस 'हात दाखवा गाडी थांबवा' तत्त्वावर आधारीत होती. त्यामुळे घरोघरी थांबत होती. पण आम्ही सगळेच इतके थकलो होतो की बराचसा वेळ झोपलोच होतो. लहान-मोठी गावं मागे जात होती. नाताळ आणि नव्या वर्षांसाठी सज्ज झालेली, दिव्यांच्या माळा आणि आकाशकंदिलांनी नटलेली घर-दुकानं बघताना उत्सवी, उत्साही वाटत होतं.

कोचीच्या हॉटेलमधले कर्मचारी आमचे आणि आमच्या सामानाचे अवतार बघून नक्कीच हादरले असतील. बहुतेक वेळा शेवटच्या कँपवर जरा बरे कपडे घालायला, आवरायला वेळ मिळतो. आज इतके धावपळ झाली, की हे काही जमलंच नाही. सकाळी चालताना जे कपडे घातले होते, तेच कपडे अंगावर होते. केस पसरलेले, चेहरे सुकलेले! खोलीतल्या स्वच्छ नॅपकीन, बिछान्यांना हात लावायची हिंमत होईना. अंघोळी करून आम्ही जेवायला गेलो. आज आपलं ताट, वाटी धुवायला लागणार नाही हे सुख वाटत होतं! पोटभर सुग्रास जेवण झाल्यावर ट्रेक संपला, व्यवस्थित पार पडला, ह्या आनंदात आइसक्रीमही खाल्लं. जड पोटाने आणि हलक्या मनाने तरंगत तरंगत खोलीत परत आलो.

उद्या परतीचा प्रवास करायचा होता. काही तासांमध्ये घरी जायचं होतं. घरची ओढ जाणवत होतीच. पण मैत्रिणीबरोबरची फाटाफूट होणार होती, ती नकोशी वाटत होती. दिल्लीची मैत्रीण सकाळीच विमानाने आणि आम्ही उरलेले सात जण दुपारच्या ट्रेनने पुण्याला जाणार होतो.

समारोप

ट्रेक किंवा पदभ्रमणाचे दिवस हे शहरी, सुखवस्तू लोकांना कठीणच जातात. राहण्याच्या जागा, जेवण्याची सोय, प्रसाधनगृहे ही सोय जेमतेमच असते. चैनीचा, आरामाचा लवलेशही त्यात नसतो. रोज बारा-पंधरा किलोमीटरचे चढ-उताराचे अवघड रस्ते चालून पाय दुखतात, सॅकच्या ओझ्याने खांदे भरून येतात, पावलाला झालेले ब्लिस्टर्स टोचतात. वेगवेगळ्या घरांमधून आपापल्या वावरण्याच्या, स्वच्छतेच्या सवयी घेऊन आलेल्या मंडळींबरोबर जुळवून घ्यावं लागतं. 'मग इतक्या गैरसोयी सोसून ट्रेकिंगला जाणारे आपला सुखाचा जीव दुःखात घालतातच का? असं कोणाला वाटलं', तर आश्चर्य वाटायला नको.

पण जे लोकं ट्रेकिंगला जातात, त्यांना मात्र इतर कुठल्याही आरामदायी प्रवासांपेक्षा ट्रेकमध्येच जास्त मजा येते ह्याबद्दल ठाम असतात. त्या मजेची जातकुळी मात्र पूर्णपणे वेगळी असते. इथे पोशाखीपणाला पूर्ण सुट्टी मिळते. त्याबरोबरच इलेक्ट्रॉनिक विश्वालाही. मोबाईल, इंटरनेट, टी.व्ही. ह्यातलं का_ही_ही नसतं. भोवताली असतात माणसं आणि अस्पर्श्य असा निसर्ग. कँपच्या जागा बहुतेक वेळा गर्दीपासून लांब असतात. सकाळीची जाग गाड्यांच्या, गाण्यांच्या आवाजाने न येता, शांततेच्या आवाजाने, फार तर पक्ष्यांच्या सुरेल शीळेने येते.

ट्रेकचे मार्ग बहुतेकवेळा शहरापासून लांब असतात. त्यामुळे पैसे खर्च करून काही वस्तू खरेदी करणे अशक्य असते. ट्रेकहून येताना आणल्या जातात त्या आठवणी. एखाद्या ट्रेकमधली नदीच्या आवाजाची आठवण, एखाद्या ट्रेकमध्ये ऐकलेलं गाणं. ह्या ट्रेकची माझी आठवण आहे गवती चहाच्या वासाची. डोंगरच्या डोंगर गवती चहा. आता कुठेही अगदी लहानशा कुंडीतही गवती चहा बघितला, की माझ्या डोळ्यासमोर ते डोंगर येतील आणि त्याबरोबर बाकीही सगळं आठवेल. बरोबरचे लोकं, त्यांच्याबरोबरचे हास्यविनोद, लहानशा तंबूत केलेल्या गप्पाटप्पा. सगळंच.

खूप चालून आल्यावर पायाचे तुकडे पडलेले असताना '*** कँपवर तुमचं स्वागत' असा बोर्ड दिसल्यावर जे 'हुश्श' होतं, ते अमूल्य असतं. असे असंख्य अमूल्य क्षण आपल्या झोळीत ह्या दिवसात पडतात. परत आल्यावर पुन्हा आपलं नेहमीच आयुष्य सुरू होतच. कामधंदा, स्वैपाकपाणी, रुपये-पैसे. ते काही बदलत नाही आणि तशी गरजही नसते. पण त्याचत्या रुटीनची गोडी काहीशी वाढते. आनंदाने आपलं मन भरून उतू जात असत, त्यामुळे. लहान-सहान कुरकुरीला आता मनात जागाच उरत नाही.

ह्या ट्रेकला आमचा आठ जणांचा ग्रुप होता. बॅच पन्नास जणांची होती. त्यामुळे ओळखीची कंपनी तर होतीच, पण त्या बरोबर नवनवीन लोकांशी ओळखी करून घ्यायची संधीही होती. घरून मात्र मी एकटीच गेले होते. असं एकट्याने ट्रेकला जायची ही काही माझी पहिली वेळ नव्हती. ह्या आधीही कितीतरी वेळा एकटी गेले होते आणि मला खात्री आहे, की पुढेही जाईन.

ट्रेकच्या संदर्भात मला ज्या शंका विचारल्या जातात, त्यात 'एकटीच जाणार का?' हा प्रश्न बहुमताने निवडून येईल. नवरा किंवा मुलगा बरोबर असले, तर छान वाटतच. पण मला एकटीने जायलाही आवडतं. आता कामाच्या निमित्ताने कितीतरी स्त्रिया एकट्याने प्रवास करतात. पण सुट्टीसाठी, मजा करायला जाताना मात्र बऱ्याच जाणीन थोडंसं अपराधी वाटतं. 'तू नसताना मग स्वैपाक / घरातील ज्येष्ठ नागरिक / मुले हे सगळं कोण करणार?' असे प्रश्न त्या अपराधीपणाला अजून वाढवतात.

एकट्याने सुट्टीला जायचं, म्हणजे आपल्या घरच्या / बाहेरच्या कामांची ओळ तर लावावी लागतेच. आपल्या जबाबदाऱ्या थोडे दिवस बाजूला ठेवायच्या असतात, टाळायच्या नसतात. बेजबाबदार नसतं व्हायचं. माझा अनुभव असा आहे, की आपण जर हे सगळं नीट समजावून सांगितलं, तर फार काही प्रश्न येत नाही. घरची मंडळी आपली ओढ समजून घेऊन व्यवस्थित सहकार्य करतात.

आपण रोज जी कामं रोज बिनबोभाट करतो, ती कुटुंबातल्या इतर सदस्यांना करावी लागली, की त्यांना त्या कामांची जाणीव होते आणि त्यातली थोडी (तरी) त्यांच्या अंगावर ढकलता येतात. शिवाय ह्या जबाबदाऱ्या फक्त मीच सांभाळू शकते, माझ्याशिवाय काही म्हणजे काही होणार नाही, हा समज आपण करून घेतलेला असतो, त्याला धक्का बसतो.

माझ्या मनासारखं मला वागता येत नाही, ह्या विचारात सदैव खंतावत जगणाऱ्या स्त्रीपेक्षा जमेल तेव्हा स्वतःसाठी वेळ काढणारी, आपलं स्वतंत्र विश्व असलेली आनंदी, समाधानी स्त्री कुटुंबाला जास्त हवीशी वाटते. कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांच्या आवडीनिवडी एकसारख्या नसतात. त्यामुळे एकमेकांच्या आवडींचा सन्मान करायला हवा, हे मुलांना कळायला लागतं. 'आई' ला गृहीत न धरता, तिच्याकडे एक माणूस म्हणून सगळेच बघायला लागतात. आपल्या आवडी-निवडी मोकळेपणाने सांगायला लागतात. आपणच स्वतःला महत्त्व दिलं नाही, तर बाकीचे देतील ही अपेक्षा करणं चूक नाही का? दुसऱ्यावर अन्याय करू नये, पण स्वतःवर कशाला करायचा?

एकट्याने प्रवास करताना अनिश्चिततेचा सामना करावा लागतो, अडचणी आल्या तर आपल्यालाच त्यातून मार्ग काढावा लागतो. आपण अनोळखी लोकांशी संवाद साधायला लागतो. मदत करायलाही लागतो आणि कमीपणा वाटून न घेता मदत स्वीकारायलाही लागतो. आपल्या हिमतीवर आपली मुक्कामाची जागा गाठली, की मिळणारा आत्मविश्वास आपल्या व्यक्तिमत्त्वात किती बदल घडवून आणतो, हे स्वतःच अनुभवायला हवं.

ही एकटेपणाची मजा घ्यायला ट्रेकिंगलाच जायला हवं असं काही नाही. सिनेमा - नाटक बघायला जाणे, गाण्याच्या कार्यक्रमाला जाणे, गेला बाजार बाजारात मनमुराद फिरणे ह्यातही खूप मजा येते. विशेषतः बाजारात फिरताना 'काही घ्यायचं नसेल, तर कशाला उगीच फिरायचं?' असे अरसिक उद्गार काढणारी व्यक्ती बरोबर नसल्यावर अपार आनंद मिळतो!

सगळी व्यसनं वाईट नसतात. शरीराचं, कुटुंबाचं आणि पर्यायाने समाजाचं नुकसान करणारी व्यसनं नक्कीच वाईट. पण ट्रेकिंग सारखी निसर्गाच्या जवळ नेणारी, शारीरिक क्षमता वाढवणारी, भौतिक गोष्टींच्या पलीकडची मजा करायला शिकवणारी व्यसनं ज्याला असतील, त्यांच्यासारखे नशीबवान व्यसनी तेच!