आसाममधील वीरांगना - मूला गाभरु

मूला गाभरु

शाळेत भारताचा इतिहास शिकलो पण उत्तर पूर्व राज्यांचा इतिहास, तिथले राजे ह्याबद्दल शिकल्याचं काही आठवत नाही. आसामच्या इतिहासाबद्दलची माहिती साधारण इ.स. चवथ्या शतकानंतरची उपलब्ध आहे. आसाममध्येही भारतातील इतर राज्याप्रमाणे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष राज्यकर्त्या व योध्या अनेक स्त्रिया होऊन गेल्या पण त्यांच्याबद्दल फारशी माहिती आढळत नाही. अश्याच एका अपघाताने, बदलेच्या भावनेने बनलेल्या लढवैय्या स्त्रीची कहाणी.

ही आहे मूला गाभरु ! सेनापती फ्रांचेंमुं बरगोहाईंची पत्नी! त्याकाळी आसाममध्ये आहोम वंशाचा राजा चुहुंमुं (इ.स. १५३२)राज्य करत होता. गौर(बंगाल) चा नवाबाला आसामवर राज्य करायचे होते त्यासाठी त्याने सेनापती तुर्बकला मोहिमेवर पाठवले होते. ही खबर राजा चुहुंमुं ला लागली तसे त्याने पराक्रमी सेनापती फ्रांचेंमुंला तुर्बकशी लढण्याचे आदेश दिले. फ्रांचेंमुं शूर, वीर, पराक्रमी होता. त्याने प्रतिज्ञा केली की शत्रुला संपवल्याशिवाय परतणार नाही आणि लढण्यासाठी सज्ज झाला. घरी येऊन त्याने ही वार्ता आपल्या पत्नीला सांगितली. ती एका वीर सेनापतीची वीर पत्नी होती.

आहोम वंशात एक परंपरा अशी होता की जर कोणी पुरुष युध्दावर जात असेल तर त्याची पत्नी किंवा बहीण एका रात्रीत सूत कातून एक वस्त्र विणून देत असे व ते घालून तो योध्दा युध्द करायला जात असे. त्या वस्त्राला ' कवच' म्हणतात. त्यांची अशी श्रध्दा होता की हे कवच योध्याला सुरक्षा देतं, त्यांना इजा होत नाही व युध्दात हमखास विजय मिळतो. अर्थात मूला गाभरुला पण 'कवच' विणायचे होते. पण अडचण अशी आली की ती रजस्वला होती त्यामुळे तीन
दिवस ती विणू शकणार नव्हती. तिने आपल्या पतीला तीन दिवस थांबायची विनंती केली. पण देशावर संकट चालून आलेले असताना तो कसं काय थांबणार होता. तीन दिवसात सर्वनाश झाला असता. त्याने तिला आपली अडचण सांगितली. तिचं श्रध्दाळू मन विचलीत झालेलं पाहून तो म्हणाला, 'अग, वेडे! असं काही नसतं. ही एक खुळी, भाबडी श्रध्दा आहे. ही एक फक्त परंपरा आहे, जय-पराजयाचा ह्याच्याशी काही संबंध नाही. घाबरू नको मी विजयी होऊनच परतीन.' आणि तो युध्दासाठी सज्ज झाला.

मूला मात्र अस्वस्थ होती. तिच्या मनात वाईट साईट विचारांच काहूर माजलं असतानाच बारगोहाईच्या वीर मरणाची बातमी पोचली. शोकाकुल मूला स्वत:ला कोसू लागली,कवच विणून दिले नाही म्हणूनच बारगोहाईचा मृत्यु झाला. तिने आपल्या पतीच्या मृत्युचा बदला घेण्याचे ठरवले. तिने तसे राजाला सांगितले. त्यांना शंका होती की एक स्त्री हे धाडस कसं काय करु शकेल. पण तिने निर्धारपूर्वक सांगितले, 'मला वीर मरण आलं तरी बेहत्तर पण मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत लढीन. देशाची सुरक्षा करणं हे माझेही कर्तव्य आहे, मला परवानगी द्यावी, महाराज.'

मूलाचा दृढनिश्चय बघून राजा चुंहुंमुंने परवानगी तर दिली त्याचबरोबर हाथीदळ, कनचें बरपात्र सारखा लढाऊ सेनापती व सैनिकांची फौज दिली. मूला सैनिक वेश धारण करुन लढायला सज्ज झाली, ही बातमी वाऱ्यासरशी देशभर पसरली. मूला लढू शकते तर आम्ही का नाही? म्हणत अनेक स्त्रिया सहभागी झाल्या. सैनिकांमध्येही जोश आला. दिकराई नदीकाठी मूलाचा सामना तुर्बकशी झाला. मूला व तिच्या नारीसेनेने अशी काही मारकाट केली की तुर्बकची सेना मागे हटू लागली तेव्हा खुद्द तुर्बक मैदानात उतरला. हजारो सैनिकांना मारुन मारुन मूला दमली. शेवटी जखमी होऊन धारातिर्थी पडता पडता तिने सैनिकांना ललकारले, "बहादूर जवानांनो तुर्बकच्या सेनेचा फडशा पाडा, मातृभूमीचं रक्षण करा." सैनिक अधिक त्वेषाने तुर्बक सेनेवर तुटून पडले. तुर्बकची हार झाली. सेनापती कनचें बरपात्र गोहाईंने तुर्बकला मारुन मूलाने केलेला संकल्प पूर्णत्वास नेला. मूलाचं बलिदान व्यर्थ गेले नाही.

अशा प्रकारे, वीरांगना मूला गाभारूने आपल्या राज्यावरचं मुघलांचं परकीय आक्रमण स्वतःच्या दुर्दम्य इच्छाशक्ती परतावून लावलं, सूडाच्या आगीचा असा योग्य उपयोग इतिहासात फारच कमी वेळा झालाय. तिचे देशप्रेम, पतीवरची निष्ठा, आणि तिचा त्याग तरूण आसामी पिढीसाठी स्फूर्तीदायक आहेत.

रेफरंस : Assamese Women in Indian Independence Movement
Mula_Gabharu

Keywords: 

लेख: 

आसाममधील वीरांगना: कनकलता

वयच काय होतं तिचं! खेळण्या-बागडण्याचे दिवस होते तिचे! पण थोरामोठ्यांनी तोंडात बोट घालावं, असं तिने अभूतपूर्व साहस अजाणत्या वयात करुन दाखवलंय, व आज ती कित्येकांची प्रेरणास्थान बनली आहे. तिच्या धाडसाचं वर्णन भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरलं गेलंय.

kanaklata

ही घटना आहे १९४२ची! महात्मा गांधीजींच्या 'चले जाव' चळवळीने जोर धरला होता. लाखो लोक ह्या आंदोलनात सहभागी झाले होते. आसामातील जनताही ह्या चळवळीत सक्रीय सहभागी झाली होती. ठिकठिकाणी सभा, मोर्चे, सत्याग्रह होत होते.

ही घटना आहे दरंग जिल्ह्यातील शोनितपूरची. पोलिस चौकीवर कब्जा करायला सत्याग्रही निघाले होते व त्यात सर्वात पुढे होती अवघी १७ वर्षीय 'कनकलता'! हातात तिरंगा घेतलेली ही बाला जोशात व उत्साहात घोषणा देत मोर्चात सहभागी झाली होती. जणू रणचंडिकाच बनली होती!

जनसमुदाय चौकीवर आला. कनकलता बंदुकधारी पोलिसांना विदेशी सरकारची नोकरी सोडण्यास व पोलिस चौकी जनतेला स्वाधीन करण्याची विनंती करत होती. पण ते बधले नाहीत, हे बघून ती त्वेषाने ओरडून, लोकांना निडर बनून चौकीवर कब्जा करायला सांगू लागली. लोक झपाटलेली होती.

'मागे फिरा नाहीतर गोळी घालू', जमावाला पोलिस धमकावत होते. कनकलताच्या अंगात महिषासुरमर्दिनी संचारली होती. हातातल्या तिरंग्यासह न डगमगता, घोषणा देत, पुढे सरसावत असतानाच ठो-ठो आवाज करत गोळ्यांनी कनकलताचा ठाव घेतला. कुठल्याश्या हिंदी सिनेमात शोभावा असा मेलोड्रामा काही क्षणात रिटेकविना प्रत्यक्षात घडला. रक्तबंबाळ कनकलताच्या हातातील तिरंगा जमिनीवर पडणार तोच 'मुकुंद काकोटी' नामक साहसी तरुणाने पुढे सरसावून झेंडा हातात धरला; पण गोळ्यांनी त्याचाही वेध घेतला. या तरूणांसाठी 'करो या मरो', हे तोंडातून निघालेले बुडबुडे नव्हते! पोलीसांच्या निर्दयतेने झालेल्या त्या गोळीबारात पन्नास-साठजण मृत्युमुखी पडले.

sculpture_kanaklata_sacrifice
तेजपूर, आसाममधील कनकलता उद्यानातील (रॉक गार्डन) कनकलताच्या बलीदानाचे शिल्प!

आज आपण स्वातंत्र्य उपभोगतोय, ते अशा कित्येक काळाच्या पडद्याआड गेलेल्या निर्भय लोकांच्या बलीदानांमुळे!

क्रिश्नकांत व कनकेश्वरी बरुआंची ही स्वाली (मुलगी) - कनकलता! २० सप्टेंबर १९२४ साली जन्मली. ज्योतिप्रसाद अग्रवाल व बिष्णुप्रसादरावांची स्फुर्तीगीते व देशभक्ती गीते ऐकून तिच्या कोवळ्या ह्रदयात देशप्रेमाचं बीज अंकुरलं होतं पण अवघ्या १७व्या वर्षी तिने देशासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली.

आज आसामी भाषेत रचलेल्या काव्यांतून व गीतांमधून कनकलता अजरामर झाली आहे. ही गीते आजही भावभक्तीने गायली जातात. आज २० सप्टेंबर म्हणजे तिची जयंती! तिला भावपूर्ण विनम्र आदरांजली!

संदर्भ : https://en.wikipedia.org/wiki/Kanaklata_Barua

Keywords: 

लेख: 

आसाममधील वीरांगना : सती जयमती

केंद्र वर्गात मिनु बायदेव आसामीत एक गाणं गाऊ लागली अन अंगावर सरकन काटा आला .... आसामी भाषेतलं मला ओ की ठो कळत नाही, पण ज्या आर्ततेने ती म्हणत होती ......ते थेट मनाला भिडलं होतं.... गाणं संपल्यावर मोडक्या तोडक्या हिंदीत तिने गाण्याचा भावार्थ सांगितला..... त्यातला मला किती कळला? पण एवढचं लक्षात आलं की प्रत्येक अखमीया स्त्रीच्या मनात जिच्याविषयी हे गाणं आहे तिच्याबद्दल - 'जयमती'बद्दल, अपार माया व श्रध्दा आहे. तेव्हापासून माझ्याही मनात कुठेतरी 'जयमती' रुतुन बसली व ती स्वस्थ बसू देईना. धेमाजीतली पुस्तक-दुकाने, वाचनालय शोधले, पण कुठे काही साहित्य मिळेना. मग गुवाहाटीला गेले असताना श्री. मधुकर लिमयांचं डाॅ. शरद राजिमवालेंनी इंग्रजीत अनुवादित केलेलं पुस्तक हाती लागलं, त्यातून आणि इतर काही स्त्रियांकडून मिळालेल्या माहितीतून मला उमगलेली ही 'जयमती'!

Sati_Joymoti

मादुरी गावात लायथेपेना बारगोहाई काही दिवसांपूर्वी घडलेल्या विसंगत घटनांनी अस्वस्थ व भयभीत झाला होता. तो विचारमग्न अवस्थेत एकटाच बसला होता. ज्या मातीत लाचित बारफूकान, राजा स्वर्गदेव यांच्यासारखे योध्दे जन्मले होते, त्याच मातीत कुठे हा स्वार्थी चुलिकफा राजा जन्मला? एकीकडे लायथेपेनाला राज्याची काळजी होती आणि दुसरीकडे त्याच्या पत्नीला त्यांची स्वाली (मुलगी) जयमतीच्या लग्नाची काळजी लागून राहिली होती. लायथेपेनाला विश्वास होता की, त्यांचा जुंवाई (जावई) चालत घरी येईल, शोधायची गरज पडणार नाही आणि त्यांचा विश्वास खराही ठरला. जयमतीला राजकुमार गदापाणी*कडून मागणी आली. त्यांच्या लाडक्या स्वालीला योग्य जोडीदार मिळाल्याने दोघंही नवरा-बायको खूप आनंदित होते. लग्नाचा दिवस उजाडला. मंगलाष्टकं झाली. अंतरपाट दूर झाला. जयाने नवरदेवाला हार घालायला मान वर केली, अन् तिच्या आनंदाला व आश्चर्याला पारावार राहिला नाही. काही दिवसांपूर्वी एक पांथस्थ त्यांच्याकडे येऊन, जेवून गेला होता आणि पाहताक्षणीच ती ज्याच्या प्रेमात पडली होती, तिने ज्याला मनोमन वरले होते - तोच तिचा नवरा म्हणून तिच्यासमोर उभा होता! तिला तिच्याच भाग्याचा हेवा वाटला. जया नवीन घरात , संसारात रममाण झाली होती. तिच्या दोन - लोरा लाय व लेचईच्या बाललीलांनी घराचं गोकुळ झालं होतं. दिवस सरत होते..... पण नियतीला त्यांच सुख पाहवलं नाही. त्यांच्या सुखी संसाराला दृष्ट लागली.

तेव्हा आसाममध्ये आहोम वंशाचा दुष्ट, क्रुर राजा चुलिकफा राज्य करत होता. आहोम राज्यपरंपरेप्रमाणे फक्त अव्यंग व्यक्तीच राजा बनू शकतो. एखादं छोटंस व्यंग किंवा जखमी किंवा जखमेचा व्रण असलेली व्यक्ती राजगादीवर बसण्यास अपात्र ठरते. चुलीकफाच्या मनात सदोदीत भीती असे की, उद्या माझं हे राजसिंहासन इतर आहोम वंशज हिसकावून तर घेणार नाही ना! त्यासाठी अव्यंग व पात्र व्यक्तींना शोधून त्यांना अपात्र करण्याची जबाबदारी त्याने लालुक सोला बारफूकानवर सोपवली. लालुक संधीसाधु व स्वार्थी सेनापती होता. आता तर माकडाच्या हाती कोलीतच मिळालं होतं. लालुक ताबडतोब कामाला लागला. त्याने कोवळ्या, तरुण राजकुमारांना पकडून आणून त्यांचे हात, पाय, नाक, कानांपैकी एखादा अवयव कापायचा सपाटा लावला.

ही बातमी जयमतीच्या कानावर आली. ह्या विषयी ती गदापाणीला म्हणाली,"मला ह्यात काही काळंबेर दिसतंय. आपण सावध राहायला हवे. लाय व लेचाईला कुठेतरी अज्ञात जागी पाठवायला हवे."
गदाधर कुंवर विचार करु लागला. तो म्हणाला' " आपण मुलांना नागाचांगला पाठवू तिथे माझा विश्वासू मित्र राहतो. तिथे ते सुरक्षित राहतील." जयमतीलाही ही कल्पना पटली.

उजाडण्यापूर्वीच गदापाणी मुलांना नागाचांगला घेऊन निघाला आणि इकडे सैनिक घरी येऊन ठेपले व चौकशी करु लागले..
"कुठेय गदापाणी?"
"का?"
"राजाच्या आज्ञेप्रमाणे आम्ही मुलांना घेऊन जायला आलोय."
जयमतीची भीतीने गाळण उडाली, पण चेहऱ्यावर दिसु न देता ती शांत स्वरात म्हणाली, "मुलं मामाच्या गावाला गेली आहेत."
"कोणत्या गावाला?"
"भाती" (कामरुपच्या दक्षिणेला)
"केव्हा येणार परत?"
"एखाद्या महिन्यात.."
"परत आल्याबरोबर लगेच कळवा व राजदरबारी हजर करा."
ही संकटाची चाहूल तर नाहीये ना, घाबरलेल्या जयाच्या मनात विचार आला. तो वाईट विचार तिने झटकून टाकला व कामाला लागली.

संध्याकाळी मुलांना पोचवून गदाधर परतला. तिने सकाळी घडलेला प्रसंग त्याला सांगितला. तो विचार करु लागला, नेमके कारण काय असावे बरे? तेवढ्यात जयमतीला सैनिकांची टोळी हातात मशाली घेऊन येताना दिसली. तिने गदाधरला सावध केले व मागच्या अंगणात लपायला सांगितले.

"कुठेय गदापाणी?"
"तो तर मुलांबरोबर त्यांच्या मामाच्या गावाला गेलाय आणि महिन्याभरात परतेल." आपला कापरा स्वर कसाबसा लपवत ती उत्तरली.
"हे बघ, खोटं बोलू नकोस, आम्हाला खबर मिळाली आहे की तो आज परत आलाय."
"तुम्हाला विश्वास नसेल तर घराची झडती घ्या."
सैनिकांनी संपूर्ण घर शोधलं पण त्यांना गदाधर सापडला नाही.
ते परत गेले, तसे जया गदाधरला म्हणाली,"वाईट दिवस आले आहेत, राजाला वेड लागलंय. तुम्ही ताबडतोब निघा. इथे राहू नका. तुमच्या जीवाला धोका आहे."
"जया, तुला एकटीला सोडून कसा काय जाऊ?"
"ही वेळ चर्चा करण्याची नाहीये. जनतेला ह्या दृष्ट राजाच्या तावडीतून सोडवण्यासाठी काहीतरी केले पाहीजे. माझी काळजी करु नका. आपण दोघंही गेलो तर त्यांना शंका येईल. देव आपल्या पाठीशी आहे, तो आपलं रक्षण करेल."
नागा लोकांचा वेश परिधान करुन गदाधर नागालॅंडला गेला.

सैनिक गावोगावी गदापाणीचा शोध घेत होते, पण अपयशी होऊन परतत होते. अखेर जयमतीला अटक करून ते तिच्याकडे गदापाणीची चौकशी करु लागले. गोडीगुलाबीने विचारुन झाले, ती आपल्या उत्तरावर ठाम होती. नंतर साम, दाम, दंडही वापरले, पण जया बधली नाही. मारझोडीमुळे तिच्या अंगावर जखमा झाल्या. त्या ठसठसत असतानाच तिच्या जखमी शरीरावर बांदर केकवाची पाने चोळली. ही खाजरी पाने चोळल्यामुळे अंगाची आग आग होऊ लागली. दिवसेंदिवस छळाची सीमा वाढत चालली...... तिचं अन्नपाणी बंद करण्यात आलं..... छळाचा कळस म्हणजे तिच्या अंगावर मध टाकला व त्यावर लाल मुंग्या सोडल्या. पण तिने तिचे मनोबल ढळू दिले नाही.

जयमतीवर होणाऱ्या अत्याचाराची वार्ता सर्वदूर पसरली. लोकांना तिची दया यायची, व त्यांना वाटायचे इतका छळ सोसण्यापेक्षा तिने नवऱ्याचा ठावठिकाणा सांगून द्यावा. पण जया ठाम होती. ही बातमी गदापाणीपर्यंतही पोचली. तो नागा आदिवासींच्या वेशात पत्नीला भेटायला आला. अर्धमेल्या अवस्थेतही तिने नवऱ्याचा आवाज ओळखला. लाचित बारफुकानचा (आसाममधला बहादुर पराक्रमी राजा) प्रताप आठवा व जा, जनतेला ह्या क्रुर राजाच्या तावडीतून मुक्त करा, असे तिने क्षीण आवाजात पण निक्षून सांगितले.

जवळपास चौदा दिवस ती अनन्वीत छळाला सामोरी गेली, पण तिने तिचा मनोनिश्चय ढळू दिला नाही..... अखेर (मार्च/एप्रिल १६७९) 'इथे ओशाळला मृत्यू' !

तिकडे गदापाणीने नागा पासून कामरुपपर्यंत लोकांना संघटित करुन सैन्य उभारले. चुलिकफाशी गडगांव येथे दोन हात करुन आपलं साम्राज्य उभं केलं, सुशासन स्थापित करुन पत्नीची अंतीम इच्छा पूर्ण केली. ह्या यशस्वी राजाच्या पाठीमागे आहे कथा एका धैर्यवान स्त्रीच्या बलिदानाची व त्यागाची!

Sati_Joymoti

  • वीरांगना जयमतीच्या साहसाच्या व धैर्याच्या गाथा आजही आसामात गायल्या जातात.
  • तिच्या नातवाने शिवसिंगने शिवसागर येथे भारतातला माणसाने घडवलेला सर्वांत मोठा तलाव - 'जयासागर' बांधला आणि या रुपाने जयमतीच्या स्मृती जतन केल्या आहेत.
  • तिच्या प्रेमाच्या आणि देशासाठी केलेल्या उत्तुंग त्यागाच्या स्मृतीप्रित्यर्थ तिला 'सती जयमती' म्हणून ओळखले जाते.
  • आसाममध्ये दर वर्षी २७ मार्च हा दिवस 'सती जयमती दिवस' म्हणून साजरा केला जातो. शिवाय आपआपल्या क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या स्त्रियांना दरवर्षी 'सती जयमती पुरस्कार' दिला जातो.
  • तिच्यावर आधारीत जयमती (१९३५) आणि जयमती (२००६) हे सिनेमेही बनवले गेले आहेत.

* गदापाणीला लांगी गदापाणी किंवा गदाधर सिंह या नावांनी ओळखले जाते. त्याच्याविषयी अधिक माहिती इथे मिळेल.

अधिक संदर्भ : https://en.wikipedia.org/wiki/Joymoti_Konwari

काही फोटो माझ्या कॅमेरातून :

जयसागर :
Jayasagar.JPG

जयदोल :
Jaydol.JPG

जयदोल आणि जयसागर :
Jayasagar and jaydol.JPG

कारेंगघर :
Karengaghar.JPG

जयसागरातले कमळे :
Lotus_in_Jyasagar.JPG

रंगघर (समोरून) :
Rangaghar front.JPG

रंगघर (मागून) :
Rangaghar back.JPG

Keywords: 

लेख: