कैरीचं आंबट गोड पन्हं

कैरीचं आंबट गोड पन्हं

चैत्र वैशाख महिन्यात होणारी उन्हाची काहिली आणि थंडगार पन्हं यांचं अगदी जवळच नातं आहे. पूर्वी शेजारी पाजारी सगळ्यांकडे चैत्र गौरीच हळदीकुंकू केलं जायचं आणि वेगवेगळ्या चवीच पन्हं खुप वेळा प्यायला मिळायचं. हल्ली हे हळदी कुंकू फार ठिकाणी होतं नसलं तरी गुढी पाडवा, रामनवमी किंवा एखादा खास रविवार अश्या निमित्ताने अजून ही घरोघरी चैत्रात पन्हं आवर्जून केलं जातं.

लहानपणी उन्हाळा सुरू झाला की लिंब गायबच व्हायची बाजारातून. क्वचित कधी मिळाली तर महाग एकतर असायची आणि वर रस ही नसायचा अजिबात त्यात. उलट उन्हाळ्यात कैऱ्या भरपूर मिळायच्या बाजारात. किंवा आवारात असलेल्या आंब्याच्या खाली पडलेल्या कैऱ्या तर फुकटच मिळत असत. त्यामुळे उन्हाळ्यात लिंबाचं सरबत फारस होत नसे , आई कैरीच पन्हंच करत असे.

तेव्हा असलेल्या साखरेच्या अभूतपूर्व टंचाईमुळे पन्ह्यासाठी साखर वापरणं अशक्य कोटीतली गोष्ट होती. आई पन्हं गुळ घालूनच करत असे. त्यामुळे त्याला नैसर्गिकच केशरी रंग येत असे. चांदीच्या फुलपात्रात ते पिण्यासाठी काढलं की तो रंग आणखीनच चमकून उठे. कधीतरी साखर असली घरात तर कच्च्या कैरीच साखर घालून सरबत ही करत असे आई. ते लिमिटेड असायचं. अर्थात असं सरबत क्वचित् होई त्यामुळे त्याची खुप अपूर्वाई वाटत असे.

पन्हं जनरली माठातल्या पाण्याचंच करत असे आई. किंवा कधी कधी विहिरीच्या ताज्या पाण्याची कळशी खास पन्ह्यासाठी आणली जाई. तुम्हाला माहित नसेल म्हणून सांगते , हवा जेव्हा थंड असते तेव्हा विहिरीचं पाणी उबदार असतं आणि हवा जेव्हा गरम असते तेव्हा ते पाणी थंड असतं. उन्हाळ्यात माठातलं पाणी संपलं असेल तर आम्ही जेवायच्या वेळी ताज्या पाण्याची कळशी भरून आणत असू. एकदम चवदार लागत ते पाणी.

लहानपणी फ्रीज आम्ही फक्त चित्रातच बघितला आणि पुस्तकातच वाचला असल्याने बर्फ ही फारच स्वप्नवत गोष्ट होती आमच्यासाठी. हळदी कुंकवाच्या दिवशी मात्र पन्ह्यात घालायला आईस फॅक्टरी मधून बर्फ आणला जाई. लाकडी भुश्यामध्ये लपेटलेला तो बर्फ भावाने सायकल वरून घरी आणला की नुसतं चैतन्य पसरत असे घरात. अर्धा बर्फ तर आम्ही नुसताच खाऊन संपवत असू. तो गारेगार बर्फ चोखत चोखत मिटक्या मारत खाताना जणू स्वर्ग सुख मिळत असे आम्हाला.

आज ही पन्हं केलं की हळदी कुंकवाच्या अनेक आठवणी मनात गर्दी करतात. आईने तिच्या तरुणपणी वर आयसिंगचे पक्षी, घरटे, फुलं अशी सजावट असलेला, कोणीतरी खाऊ म्हणून आणलेला केक एकदा गौरीच्या सजावटीत ठेवला होता. Lol alt="20240418_170828.jpg" /> कारण असा केक असू शकतो हेच तिला माहित नव्हते. तिला तो काहीतरी शोपीस वाटला होता आणि म्हणून त्याला त्या वर्षीच्या गौरीच्या सजावटीत मानाचे स्थान मिळाले होते. नंतर काही दिवसांनी जेव्हा समजलं की तो अंड्याचा केक होता तेव्हा आईने कपाळावर हात मारून घेतला होता. आणि आजीने त्या सदगृहस्थांचा उद्धार तर केला होताच पण देवीची क्षमा मागण्यासाठी पाच शुक्रवार ही केले होते. दरवर्षी सजावट करताना ही गोष्ट आई आम्हाला सांगत असे आणि आम्हाला ही ऐकताना दरवर्षी तितकीच मजा येत असे.

थंडगार पन्हं, केळीच्या पानावर दिलेली आंबा डाळ, गौरीची सजावट, आईचं आवडत खस अत्तर, गार गुलाब पाण्याचे अंगावर उडालेले तुषार, दुसऱ्या दिवशी केले जाणारे चटपटीत चणे, ठेवणीतल्या कपड्यात सुंदर दिसणाऱ्या शेजारच्या काकू आणि मैत्रिणी, खुप जणी एकदम आल्या तर सगळ्यांना सगळं देताना होणारी धांदल, मोठ्ठ्या आवाजात रंगलेल्या गप्पा अश्या अनेक आठवणी असल्या तरी सर्वात जास्त लक्षात राहिली आहे ती आई. दिवसभर एवढं काम करून ही ती दमत कशी नसे ह्याच आज आश्चर्य वाटत. तिचा चेहरा अगदी आनंदी आणि उत्साही दिसत असे. अंगावर जरीच फिक्या पिवळ्या रंगाचं लुगडं ( तिचं ठरलेलं होत, संक्रांतीच्या हळदीकुंकवाला काळी साडी आणि चैत्र गौरी च्या फिकी पिवळी ) नाकात नथ, कानात तिची रोजचीच मोत्याची ठसठशीत कुडी , अंबाड्या वर गजरा, कपाळावर छोटंसं कुंकू, गळ्यात हार, मंगळसूत्र घालून सजलेली, उत्साहाने आणि अधिकाराने घरात वावरणारी ती अजून ही स्पष्ट आठवते.

तिच्या परिचयातील नवरा नसलेल्या स्त्रिया, प्रौढ कुमारिका ह्यांना हळदी कुंकवाला न बोलावणे खरे म्हणजे तिला पटत नसे . त्यांनी ही ह्या आनंद सोहळ्याचा भाग व्हावे असे तिला मनापासून वाटत असे. पण इतर सुवासिनींबरोबरच त्यांना ही बोलावण्याची त्या काळी तिची हिम्मत नव्हती. ह्यासाठी तिने काढलेला मधला मार्ग म्हंजे आमच्याकडे हळदी कुंकू बॅचेस मध्ये होई. अश्या स्त्रियांना थोड उशिरा येण्याचं आमंत्रण ती देत असे. आणि त्यांचा ही डाळ, पन्हं , भिजवलेले हरभरे हे सगळ देऊन सन्मान करत असे. रात्री जेवणं झाली की वडील शेजार घरातल्या पुरुष मंडळींना पन्हं घेण्यासाठी बोलावत. रात्री अंगणात बसून डाळ पन्ह्याचा आस्वाद घेत त्यांच्या ही गप्पा रंगत असत.

तेंव्हा ह्यातलं वेगळेपण मला जाणवलं नव्हतं पण आज विचार करता आई किती काळाच्या पुढे पहाणारी, त्यांचा ही किती सह्रदयतेने विचार करणारी होती हे जाणवतं आणि तिच्या बद्दलचा आदर कैक पटीने वाढतो. ती खरं तर एक अगदी सामान्य स्त्री होती पण तिचं हे असामान्यत्व आणि ते निभावून नेण्याचं तिच्याकडे असलेलं धैर्य मला आज जास्तच स्तिमित करतात. तिची तीव्रतेने आठवण येते आणि एवढ्या वर्षा नंतर ही तिच्या आठवणीने गळ्यात हुंदका दाटून येतो.

हेमा वेलणकर

Attachmentमाप
Image icon 20240418_170828.jpg913.67 KB

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle