माझी कैलास-मानस सरोवराची यात्रा


ॐ नमः शिवाय...

२०११ सालच्या जून-जुलै महिन्यात कैलास- मानस सरोवराची पवित्र यात्रा करण्याचा शुभयोग आला. एकाच वेळी नितांतसुंदर आणि रौद्रभीषण असणाऱ्या त्या अनुभवाचं मी माझ्या तोकड्या भाषेत केलेलं हे वर्णन..

DSC_5587.jpg

Keywords: 

माझी कैलास-मानस सरोवराची यात्रा भाग -१ (पूर्वतयारी)

ॐ नमः शिवाय...
२०११ सालच्या जून-जुलै महिन्यात कैलास- मानस सरोवराची पवित्र यात्रा करण्याचा शुभयोग आला. एकाच वेळी नितांतसुंदर आणि रौद्रभीषण असणाऱ्या त्या अनुभवाचं मी माझ्या तोकड्या भाषेत केलेलं हे वर्णन..

DSC_5587.jpg

बऱ्याच वर्षांपूर्वी म्हणजे मी कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असताना एका मित्राच्या मावशीकडे कैलास-मानस सरोवर यात्रेचा स्लाइड शो बघितला होता. हा स्लाइड शो बघितल्यावर अक्षरशः भारावून गेले. त्या काळात मी जमेल तेव्हा गिर्यारोहण करायचे. हिमालयातही एकदा जाऊन आले होते. पण हे सगळं गिर्यारोहणापेक्षा वेगळाच प्रकार फारच वेगळं होतं. कैलास पर्वताचा तो गूढ, अद्भुतरम्य आकार, मानस सरोवराची अथांग निळाई !! वा!!

तेव्हा मी शिकत होते. माझ्या शिक्षणासाठी, गिर्यारोहणाच्या छंदांसाठी आई-वडील आनंदाने पैसे, पाठिंबा, उत्तेजन देत होते. पण कैलासच्या महागड्या यात्रेसाठी पैसे मागायची माझी हिंमत झाली नाही. शिक्षण पूर्ण करून आपल्या पैशांनी जायचं नक्की ठरवलं होत. पण नेहमीप्रमाणे ‘दात आणि चणे’ न्याय मध्ये आला. शिक्षण संपल्यावर एका वर्षात ‘दोनाचे चार’, मग अजून दोन वर्षात ‘चार हातांचे सहा हात’ झाले!! गृहकृत्य, बालसंगोपन, नोकरी-व्यवसायाची धावपळ, देशी-विदेशी घरं वसवणे ह्यात बारा-पंधरा वर्षे कुठल्या कुठे उडून गेली.

ह्या दरम्यान कुठे कैलास-मानस सरोवर यात्रे बद्दल काही वाचलं, बघितलं की मनात एक कळ यायची. पण ‘घरच्या तसेच कामाच्या जबाबदार्याक आहेत. सध्या नाही जमणार. पुढे कधीतरी जमेल’ अशी मी माझीच समजूत घालत होते. माझ्या ओळखीतले एकजण तीन वर्षांमागे ह्या यात्रेला जाऊन आले. त्यांचे वर्णन ऐकून, फोटो बघून मात्र ती दबलेली इच्छा अगदी उफाळून आली. मग मी पद्धतशीर चौकश्या सुरू केल्या.

ही कैलास मानसची यात्रा दोन प्रकारे करता येते. पहिला प्रकार म्हणजे विदेश मंत्रालय (भारत सरकार) ही यात्रा दरवर्षी आयोजित करते. चीन सरकारबरोबर झालेल्या करारानुसार, भारत सरकार दरवर्षी ९६० यात्री तिबेट मध्ये पाठवू शकते. मेच्या शेवटच्या आठवड्या पासून साधारण सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत सहा-सहा दिवसांच्या अंतराने १६ ग्रुप जातात. ह्या यात्रेमध्ये आपण तिबेटमध्ये जाण्याआधी जवळ-जवळ पाच-सहा दिवस चालत किंवा घोड्यावर रस्ता कापून चीनच्या हद्दीत प्रवेश करतो. नंतर पुढच्या बारा दिवसात कैलास पर्वताची तसेच मानस सरोवराची परिक्रमा पूर्ण होते. त्यानंतर मायदेशी परतून आल्या वाटेने घरी! ह्याला एकूण एक महिना लागतो.

दुसरा प्रकार म्हणजे, प्रवासी कंपन्यांबरोबर जाणे. ह्याच्या जाहिराती सर्वांनी वाचल्या असतीलच. ह्या कंपन्या नेपाळमार्गे जीपमधून तिबेटमध्ये नेतात. परिक्रमा झाल्या की पुन्हा नेपाळमार्गे परत.

दोन्ही प्रकारात खर्च साधारण सारखाच येतो. सरकारतर्फे गेल्यास एक महिना लागतो. नेपाळमार्गे गेल्यास वीस दिवस. मात्र भारतातून गेल्यास आपण हळू-हळू वरच्या उंचीला जातो. त्यामुळे कैलास-मानसच्या समुद्र सपाटीपासून ४५५६ मीटर इतक्या उंचीवर कमी त्रास होतो. शिवाय मी अस ऐकलंय की, नेपाळमधून तिबेटमध्ये नेऊ शकणाऱ्या संस्था ठरलेल्या आहेत. ते लोक ‘हवा खराब आहे’, ‘तुम्हाला झेपणार नाही’ असं काहीतरी सांगतात. आधीच तिथल्या विरळ हवेने माणूस गळाठून गेलेला असतो. त्यात असं काहीतरी ऐकलं की 'कैलास दर्शन होतंय ना, मग झालं तर.' असा विचार करून कैलास परिक्रमेचा विचार सोडून देतात.
ही झाली प्राथमिक माहिती! आता मी माझे स्वतःचे अनुभव सांगते.

मनाने जायचं नक्की केलं तरी ते घडवून आणण्यात अक्षरशः कैलास पर्वता एवढ्याच मोठ्या अडचणी होत्या. वृद्ध सासू-सासरे, लेकाची दहावी, माझा स्वतःचा वास्तू-विशारदाचा व्यवसाय, इत्यादी, इत्यादी. ह्या यात्रेआधी एकदम जोरदार मेडिकल असते. बाकी तसा प्रश्न नाही पण माझं हिमोग्लोबिन कायम गरजेपेक्षा कमी, आणि वजन गरजेपेक्षा जास्त!!! ( साधारणपणे लग्नाला प्रत्येक वाढदिवसाला एक-एक किलो ह्या प्रमाणात वजन वाढलं होतं!!) ह्या सगळ्याची काळजी होतीच नाहीतर एवढी जाहिरात करून, अश्रू ढाळून, समारंभाने जायचं आणि ‘आवा चालली पंढरपुरा, वेशीपासून आली घरा’ अस म्हणत मी दिल्लीहून परत!!

पण प्रश्न येतात तसे सुटतातही.

ऑफिस स्वतंत्रपणे सांभाळू शकेल, अशी एक असिस्टंट शोधली. ती जानेवारीपासून यायला लागली. ती चांगल्यापैकी रुळल्यावर मार्चमध्ये तिला ‘जून-जुलैत महिनाभर तुलाच ऑफिस सांभाळायचंय बरं का’ अस सांगितल्यावर एकदम उडालीच. लेकाने सुरवातीला ‘आई, इतर मुलांच्या आया दहावी म्हणून नोकऱ्या सोडतात. तू महिनाभर ट्रीपला कसली जातेस’ अशी कुरकूर केली. पण नंतर त्यालाही तो ज्वर चढला. ‘ मी अठरा वर्षांचा झालो की मी पण जाणार’ अश्या बोलीवर आमची माय-लेकांची मांडवली झाली. माझ्या क्लाएंटस् पैकी काहीजण जरा नाराज झाले पण काहींनी ‘जाऊन या हो. महिना काय असातसा जाईल’ अशी समजूत घातली. नवरा माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणारा. सतत देशी-विदेशी दौरे चालूच असतात. यात्रेच्या काळात तसे काही दौरे ठरलेले तरी नव्हते. त्यामुळे घरची आघाडी सांभाळायला तो पुण्यात असायची शक्यता बरीच होती.

हे सगळं चालू असताना एकीकडे दिल्लीशी पत्र-व्यवहार सुरू होता. साधारण जानेवारीत विदेश मंत्रालयाची जाहिरात सर्व भाषांमधील प्रमुख वृत्तपत्रात येते. तो फॉर्म, पारपत्राची प्रत आणि स्वतःच्या पत्त्याचे पोस्ट-कार्ड असा जामानिमा पाठवला. मग दोन महिने फक्त वाट बघणे. ती अवस्था म्हणजे पु.ल.देशपांडेंच्या ‘नारायण’ मधल्या मुलगी बघायला आलेल्या मुलासारखी! ‘यात्रेला जाण्याची स्वप्नं बघावी की नको?’, ‘फिटनेस साठी सिंहगडाला रविवारची साखर झोप मोडून जावे की नाही?’,’ज्याला-त्याला मी कैलास-मानसरोवर यात्रेला जाणार असल्याचे सांगून नको करावे की नाही’ इत्यादी इत्यादी प्रश्न पडत होते.

एकदाचे दिल्लीचे पत्र आले. त्यात माझा १० जूनच्या, म्हणजे तिसऱ्या बॅचमध्ये प्रतीक्षायादीत १३वा क्रमांक असल्याचे शुभवर्तमान कळले! पुन्हा मी लटकलेली. हो-नाही धड कळलेलं नाही, अशी अवस्था फार वाईट. पण लवकरच विदेश मंत्रालयाचे निवड झाल्याचे पत्र आले. आता एकदम चित्रच बदलले. विदेश मंत्रालयाकडून माहितीपुस्तक आले. एका काकांनी त्यांच्या जवळचे ‘अपूर्ण परिक्रमा कैलास-मानस सरोवराची’ हे श्री.मोहन बने ह्यांचं पुस्तक वाचायला दिल. ह्या दोन्ही पुस्तकांचा माहिती मिळवायला खूपच उपयोग झाला. त्यातले फोटो बघून कधी एकदा हे सगळं प्रत्यक्ष बघतोय अशी घाई झाली.

आता तयारीला चांगलाच वेग आला.

माझे सासू-सासरे नणंदेकडे काही महिन्यांकरता गेले आणि आई-बाबा पुण्यात जावई आणि नातवासाठी आले. एरवी ते भावाकडे असतात. दिवसभर भाची त्यांच्याजवळ असते. तिला बघायला वाहिनीची आई नाशिकला गेली. असे कौटुंबिक पत्ते पिसून झाले!! घर आणि ऑफिसचे प्रश्न झाले.

आता प्रश्न सामान जमवणे आणि भरणे!!

हे फार मोठे काम होते. काही कळत नव्हत, काय न्यावं ते. खरं तर काय नेऊ नये हा मोठा प्रश्न होता. कारण मला सगळं कपाटच उचलून न्यावंसं वाटत होत!! किंवा जमल्यास सगळं घरच!! मी ह्या आधी यूथ हॉस्टेलच्या ट्रेकना जाऊन आले होते. पण ही यात्रा महिन्याची. त्यातही दिल्लीच्या कडक उन्हाळ्यापासून ते तिबेटच्या हाडे गोठवणाऱ्या थंडीपर्यंत व्हरायटी!! हिमालयात कधीही जायचं म्हणजे पाऊस जमेला धरावाच लागतो. विदेश मंत्रालयाकडून आलेल्या माहिती-पत्रका प्रमाणे २० किलो पर्यंत समान न्यायला परवानगी होती. त्यातच सगळं बसवायचं होतं.

भरीत भर म्हणून मिळणारे असंख्य सल्ले. माझ्या वडिलांचे एक स्नेही ह्या यात्रेला जाऊन आले होते ( नेपाळमार्गे. त्यांचीही फक्त मानस सरोवराची परिक्रमा झाली, कैलासाची नाही.) मी आणि बाबा जाऊन त्यांचं मार्गदर्शन घेऊन आलो. ‘भरपूर सुका मेवा घेऊन जा’ ह्या त्यांच्या सल्ल्यानुसार बाबा प्रचंड प्रमाणात सुका मेवा घेऊन आले. मग आम्ही तो छोट्या-छोट्या प्लास्टिक पिशव्यांमधून भरला.

गरम – गार आणि पावसाचे कपडे काय घ्यावे हा विचार करण्यात मी पुष्कळ दिवस घालवले. शेवटी हे दोन १२-१५ दिवसांचे ट्रेक लागोपाठ करतोय असा विचार करून समान जमवलं. एका ओळखीच्यांची भव्य सॅक आणली. त्याच्या मानाने सामान भरायला सुरवात केली. एक बेताची सॅक, पुणे-दिल्ली-तिबेट सीमा ह्या सामानाची केली. सगळे जड गरम कपडे दुसऱ्या सॅकमध्ये भरले. ही परिक्रमा सॅक. दिल्लीत आणि काही पुढच्या काही मुक्कामाच्या ठिकाणांवर सामान ठेवता येते असे कळले. वापरून झालेले आणि येताना घालायचे कपडे तिथे ठेवायचे ठरवले.

कैलास- मानस म्हणले की आठवतो तो मालपा येथे १९९८ साली दरड कोसळून झालेला अपघात. ह्यात सुप्रसिद्ध नृत्यांगना प्रोतिमा बेदी ,त्यांची पूर्ण ६० जणांची बॅच, तेवढेच पोर्टर, पोनीवाले, व्यवस्थेतील लोक, स्थानिक नागरिक असे जवळ जवळ २०० लोक ठार झाले होते. ह्या अपघाताचे एक अप्रत्यक्ष दडपण मनावर होतेच. (लेकानेही ,’आई, ती जागा पार केलीस की फोन कर बरं का.’ अस सांगून ठेवलं होतं) विदेश मंत्रालय सुद्धा ‘तिबेटमध्ये काही बरं-वाईट झाल्यास ‘अवशेष’ परत भारतात आणले जाणार नाहीत ‘ अस लिहून घेते!!

अशी सगळी प्रतिज्ञापत्रे, डिमांड ड्राफ्ट, विमानाची जाण्या-येण्याची तिकिटे इत्यादी तयारी झाली. आणि वर्षानुवर्ष मी ज्याची स्वप्न पाहत होते, त्या यात्रेसाठी, मी घर-ऑफिस-कुटुंब सर्वांची काळजी करत आणि सर्वांना माझ्या काळजीत टाकत एकदाची निघाले.

Keywords: 

माझी कैलास-मानस सरोवराची यात्रा (भाग-२) दिल्ली मुक्काम

दिनांक ९ जून २०११

मला जाताना प्रवासाच्या अनुभवांबद्दल जशी उत्सुकता वाटत होती, तशीच उत्सुकता आपले सहयात्री कोण-कोण असतील ह्याचीही वाटत होती. एकतर मी मुळात देवधर्म, यात्रा, पुण्य कमावणे वगैरे पंथातली नाही. पण सिंहगड चढणाऱ्या लोकांच्या गप्पा जशा ट्रेकिंग संदर्भातल्या असतात, तशा यात्रेला गेल्यावर देवदेव-यात्रा ह्याबद्दल गप्पा होणार, हे स्वाभाविकच होतं. पण आपल्याबरोबरचे सगळेच लोक अगदी किरकोळ गोष्टीचा संबंधही जर ‘भोले बाबाकी कृपा’ ला लावणारे असतील तर काही खरं नाही, अशी भीती वाटत होती. एक जरी मैत्रीण मनासारखी मिळाली तरी सगळ्या प्रवासात मजा येईल. तसं झालं तर काय मजा येईल! असा विचार आणि नाही मिळाली, तर एक महिना कसा रेटायचा? असे परस्परविरोधी विचार मी पुणे - दिल्ली प्रवासात. ही मुख्य आणि इतर लहान-मोठ्या असंख्य काळज्या आणि समजा कैलास-मानसच्या ऐवजी परस्पर दक्षिण-उत्तर ध्रुवाची सहल करावी लागली तरी पुरेल इतके समान घेऊन मी दिल्लीत पाय ठेवला.

विदेश मंत्रालयाकडून आलेल्या सूचनांप्रमाणे यात्रींची राहण्याची सोय दिल्लीत, सिव्हिल लाइन्स येथील गुजराथ समाज सदन येथे केली होती. मी विमानाने दिल्लीत आणि टॅक्सीने राहण्याच्या जागी पोचले. गुजराथ समाज सदन म्हणजे भलामोठा पसारा आहे. दिल्ली आणि परिसरात फिरायला येणारे बरेच गुजराथी लोक इथे राहतात. गुजराथ समाज सदनात अक्षरशः उघड्यावर झोपणे ते वातानुकूलित खोल्यांपर्यंत व्हरायटी आहे. कैलास यात्रींची सोय सुदैवाने वातानुकूलित डॉर्मिटरीमध्ये होती. कारण पुण्याच्या पावसाळी हवेनंतर दिल्लीचा कडकडीत उन्हाळा भाजत होता. डॉर्मिटरीमध्ये पोचून स्थिरस्थावर झाले.

1-DSC_4617.jpg

गुजराथ समाजमधील डॉर्मीटरी (फोटो क्रेडीट श्री. शरद तावडे)

एकापाठोपाठ एक यात्री येऊन धडकत होते. मेडिकलसाठी दिल्ली किंवा जवळपास राहणारे लोक परस्पर येऊ शकतात. बाहेरगावच्या लोकांना मात्र आदल्या दिवशीच पोचावं लागतं. महाराष्ट्र, गुजराथ, झारखंड, मध्य प्रदेश, कर्नाटक, केरळ, पश्चिम बंगाल सगळीकडची मंडळी येत होती. महाराष्ट्राचे एकूण ११ लोक होते. आजची ब्रेकिंग न्यूज एक फार आनंदाची गोष्ट होती. मला लगेचच एक छानशी मैत्रीण मिळाली. 'भगवान देता है, तो छप्पर फाड के' ह्याचा अनुभव आला. पुण्याची, आर्किटेक्ट, एकटी आलेली!!! मी खूश! आता आपला प्रवास मस्त होणार ह्याची खात्री वाटायला लागली. थोड्या थोड्या ओळखी झाल्यावर सगळ्यांच्या बोलण्यात ही मेडिकल परीक्षा आपण पास होऊ का? ही काळजी व्यक्त होत होती.

1-DSC_4618.jpg

चर्चा आणि सल्लामसलत! (फोटो क्रेडीट श्री.शरद तावडे)

गुजराथ सदनात पोचल्यापासून जो भेटेल तो एकमेकांना ‘ॐ नमः शिवाय’ म्हणत होतं. रोजच्या व्यवहारात वापरले जाणारे ‘नमस्ते’, ‘गुड मॉर्निंग, थॅन्क यू , सॉरी’ हे शब्द खालसा करून सगळीकडे, सगळ्यासाठी ‘ॐ नमः शिवाय’!! सुरवातीला असं म्हणायला जरा संकोच वाटत होता. चुकून जरी थॅन्क यू, सॉरी म्हटलं, की समोरून 'अरे बेहेनजी, अब थॅन्क यू, सॉरी छोडीये. बस ‘ॐ नमः शिवाय’ कहिये' असं उत्तर यायचंच. मग मीसुद्धा ती सवय लावून घेतली. एक महिन्यात ती सवय अगदी हाडीमाशी भिनली. पुण्यात आल्यावरही सुरवातीला आपण रिक्षावाले, भाजीवाले सगळ्यांना सवयीने आपण दोन्ही हात जोडून 'ॐ नमः शिवाय' म्हणणार, अशी भीती वाटायची! अजूनही यात्रींपैकी कोणी भेटलं किंवा फोन आला, तर 'ॐ नमः शिवाय' म्हटलं जातच.

ह्या यात्रेसाठी अगदी कडक वैद्यकीय परीक्षा घेतात. भारतात असेपर्यंत वैद्यकीय मदत नीटपणे मिळते. सुरवातीला कुमाऊँ मंडळ विकास निगम आणि नंतर भारत सीमा तिबेट पोलीस हे व्यवस्थित मदत करतात. प्रत्येक कँपवर डॉक्टर असतात. प्रश्न असतो तो तिबेटामध्ये गेल्यावर. तिथे चीन सरकार कुठलीही वैद्यकीय मदत देत नाही. ह्या यात्रेत समुद्रसपाटीपासून १८६०० फूट इतकी उंची गाठायची असल्याने हृदय, फुफ्फुसे तेवढा ताण घेऊ शकतील का, हे काटेकोरपणे तपासले जाते. त्याचबरोबर हिमोग्लोबिन, लघवी, रक्त, छातीची क्ष किरण तपासणी, स्ट्रेस टेस्ट, पल्मनरी फंक्शन टेस्ट अशा तपासण्या केल्या जातात. ह्यात पास होणाऱ्या यात्रीनाच पुढे जायची परवानगी मिळते. (यात्रेतल्या ‘गुंजी’ ह्या कॅम्पवर पुन्हा तपासणी होते. तेथूनही परत पाठवू शकतात.)

मी आधी म्हटल्याप्रमाणे भारत सरकार दरवर्षी सोळा बॅचेस यात्रेला पाठवते. प्रत्येक बॅच साठ लोकांची असते. प्रत्येक बॅचंबरोबर एक लायझन ऑफिसर असतात. हे ऑफिसर भारत सरकारचे अंडर सेक्रेटरी किंवा त्यावरील पदांवर काम करणारे असतात. हे सर किंवा मॅडम त्या-त्या ग्रुपचे नेतृत्व करतात तसंच ते भारत सरकारचे प्रतिनिधीत्वही करतात. ग्रुपमध्ये शिस्त ठेवणे, सर्वांची काळजी घेणे, काही बरी-वाईट परिस्थिती उद्भवल्यास त्या वेळेला परिस्थिती पाहून योग्य असे निर्णय घेणे अश्या भरगच्च जबाबदाऱ्या त्यांच्यावर असतात.

एख्याद्या यात्रीचे वर्तन योग्य नसल्यास ते त्याला परतही पाठवू शकतात. आमच्या बॅचचे एल.ओ. कोण असतील ह्याची खूप उत्सुकता होती. मेडिकलच्या वेळेला ते भेटतीलच, असे लोकांचे म्हणणे होते. आलेल्यांपैकी कोण पुढे जाणार आणि कोण घरी? ही एक काळजी होती. मला माझे हिमोग्लोबिनचे आणि वजनाचे आकडे डोळ्यासमोर आले की पोटात गोळा येत होता. दुसऱ्या दिवशी ह्यातल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळतील अशी आशा होती.

दिनांक १० जून २०११

एक चांगली गोष्ट म्हणजे एकदा गुजराथ सदनला पोचलात की प्रत्येक गोष्टीची सोय कुमाऊँ मंडळवाले करतात. जेवण, चहा-पाणी, राहणे, वैद्यकीय तपासणीसाठी जाता-येता बसची सोय सगळं. अनेक स्वयंसेवी संस्थादेखील यात्रींची उत्तम सोय व्हावी म्हणून प्रचंड काम करतात. आम्ही सर्व लोक तयार होऊन, न खाता-पिता (मेडिकलमुळे) दिल्ली हार्ट लंग इंस्टिट्यूटला पोचलो. त्या सगळ्या तपासण्यांसाठीची रक्कम आणि चीनच्या व्हिसासाठी पारपत्र असे जमा करून घेतल्यावर तपासण्यांची फैर सुरु झाली. निरनिराळ्या तपासण्यांसाठी फिरताना सहयात्रींची ओळखही होत होती. आमच्या बॅचमध्येच दोन डॉक्टर आहेत अस कळल्यावर बरं वाटलं.

अजिबात हिंदी-इंग्रजी न येणारी काही गुजराथी मंडळी होती, तर केरळचे एक डॉक्टर फक्त इंग्रजी येणारे होते! अश्या सगळ्या जनतेची मोट आमचे एल.ओ. बांधणार होते. एक महिना हेच मित्र-मैत्रिणी, हेच कुटुंब.

एक-एक करून सगळ्या तपासण्या संपल्या. नंतर त्या हॉस्पिटलच्या प्रेक्षकगृहामध्ये सगळ्यांना बसवून ‘यात्रा आणि त्या दरम्यान घेण्याची काळजी’ अशी माहिती देण्यात आली. आपण समुद्रसपाटीपासून जसे वर वर जातो, तशी ऑक्सिजनची पातळी कमी होते. त्याचा आपल्या मेंदूवर, डोळ्यांवर, पचनसंस्थेवर, स्वभावावर सगळ्यावरच परिणाम होऊ शकतो. हाय अल्टीट्यूड सिकनेसच्या ,अक्युट आय माउंटन सिकनेस, हाय अल्टीट्यूड सेरेब्रल एडीमा आणि हाय अल्टीट्यूड प्लमनरी एडीमा अश्या पायऱ्या असतात. ह्यात मृत्यूही ओढवू शकतो.

image1

image2

यात्रेत घ्यायच्या काळजीची माहिती

ही सर्व माहिती प्रथमच मिळत असल्याने सगळे जण मन लावून ऐकत होते. नंतर तिबेटमध्ये पोचेपर्यंत इतक्यावेळा ही माहिती दिली गेली, की ते सगळं पाठ झालं. सुरवातीला ऐकताना खूप भीती वाटली होती. नंतर काही वाटेनास झालं. प्रथमच विमान प्रवास करताना नाही का, पट्टा असा बांधा आणि ऑक्सिजन मास्क तसा लावा, वगैरे माहिती मनापासून ऐकली जाते. सरावलेले प्रवासी तिकडे बघतही नाहीत. तसंच हे झालं.

आमचे एल.ओ. श्री.मनमीतसिंग नारंग हे गृह खात्यात काम करणारे आय.पी.एस. ऑफिसर आहेत असे कळले. ते मेडिकल दरम्यान काही जणांना भेटून गेले. पण माझी भेट होऊ शकली नाही.

माझा एक शाळेतला मित्र दिल्लीत राहतो. संध्याकाळी त्याच्याबरोबर फिरून, गप्पा मारून मस्त मजा केली. शाळेतल्या दिवसांच्या आठवणी काढून भरपूर हसलो, खिदळलो. मेडिकलच सगळं दडपण निघून गेलं. आता दुसऱ्या दिवशी भारत सीमा तिबेट पुलीसच्या इस्पितळात मी यात्रेला जाणार की परत घरी, हा निर्णय होणार होता.

दिनांक ११ जून २०११

आम्ही सर्व लोक तयार होऊन, आणि आज व्यवस्थित नाश्ता-पाणी करून भारतीय तिबेट सेना पोलीस हॉस्पिटला पोचलो. आज सगळेजण ‘किस्मत का फैसला’ मोड मध्ये होते. एव्हाना माझी आणि नंदिनीची (पुण्याची मैत्रीण) मस्त मैत्री झाली होती. तेवढे सूर बॅचमधल्या कोणाशी जुळतील अस वाटत नव्हत. दोघीतल्या एकीला जर परत जायला लागलं तर दुसरीची फारच पंचाईत होणार होती. कारण बाकीच्या सगळ्याच बायका नवऱ्याबरोबर आल्या होत्या. दोघींना जायला मिळावं नाहीतर दोघींना परत तरी पाठवावं अस वाटत होत. नेहमीप्रमाणे तिथेही यात्रेत घेण्याची काळजी, पाळावयाची शिस्त, नियम, हवामान ह्या विषयांवर माहिती दिली.

नंतर एकेकाला बोलावून फैसला सुरु झाला. आम्ही सगळे मिळून ६२ लोक होतो. प्रत्येकाला बोलावून त्यांचे सर्व रिपोर्ट्स तीन डॉक्टर मिळून बघत होते. आपण जास्त उंचीवर जाऊ, तसा बऱ्याच जणांचा रक्तदाब वाढतो. त्यामुळे आधीच जास्त रक्तदाब असलेल्यांना परत-परत तपासत होते. निरनिराळ्या कारणांमुळे एकूण दहा लोक नापास झाले. दोन लोक काठावर पास, किंवा नापास होते. दुर्दैवाने त्यात नंदिनी होती. तिचा इ.सी.जी. नीट नव्हता, अस डॉक्टरांच म्हणणं होत. पण हे सांगणाऱ्या डॉक्टर मॅडम चक्क प्रसुतीतज्ञ होत्या! हृदयविकार तज्ज्ञ नव्हत्याच! मग त्यांनी नंदिनी आणि अजून एकीला जवळच्या बात्रा हॉस्पिटलमध्ये जाऊन परत इ.सी.जी. काढायला सांगितला. त्या दुसऱ्या यात्रीचा नवरा स्वतः डॉक्टर होता. त्याच्या म्हणण्याप्रमाणे काहीही प्रश्न नव्हता. बात्रा हॉस्पिटलमधल्या हृदयविकार तज्ज्ञाने पुन्हा तपासणी करून कुठलीही अडचण नसल्याचं लिहून दिलं. पुन्हा आमची वरात भा.ति.से.हॉस्पिटलला आली. अशी सगळी सव्यापसव्य करून दोघींनाही परवानगी मिळाली! हुश्श!

गुजरात सदनामध्ये संमिश्र वातावरण होत. नवरा-बायकोच्या जोडीतील कुठे नवरा तर कुठे बायको नापास झाली होती. त्यांची रडारड, समजावणे चालू होते. मला आणि नंदिनीला मात्र आता गुंजीपर्यंत नक्की जाणार ही खात्री वाटायला लागली. ह्याच खुशीत झोपून गेलो.

Keywords: 

माझी कैलास-मानस सरोवराची यात्रा (भाग - ३) दिल्ली ते सिरखा

दिनांक १२ जून २०११ (दिल्ली मुक्काम)

आज तसा फार गडबडीचा दिवस नव्हता. सकाळी निवांत १० वाजता साऊथ ब्लॉकला विदेश मंत्रालयाच्या कार्यालयात कार्यक्रम आणि हाय टी साठी जायचं होतं यात्रेची माहिती, यात्रेत खासकरून तिबेटमध्ये असताना घ्यायची काळजी ह्याची माहिती मिळणार होती. भारतातील यात्रेसाठी २२००० रुपयांचा डिमांड ड्राफ्ट, इंडेमिनीटी बॉन्ड तसेच इतर कागदपत्रेही द्यायची होती. त्या कार्यक्रमातच नारंग सर सगळ्यांना भेटून ओळखी करून घेणार होते.

हे सगळं झालं, की तिबेटमध्ये गेल्यावर जे विदेशी चलन लागत ते घेण्यासाठी सेंट्रल बँकेत जायचं होतं. मी आणि नंदिनी डॉलर पुण्याहून घेऊन आलो होतो. उद्यापासून प्रवास सुरु करायचा होता. ठराविक वेळेला, ठरलेल्या कार्यक्रमानुसार वागायचं होतं. सगळे खातील, तेच जेवायचं होतं. आजचा दिवस आम्हाला आमचा वेळ घालवायला मिळाला होता. आता अशी संधी यात्रा संपवून परत आल्यानंतरच मिळणार होती. हे लक्षात आल्यावर आम्ही बिलकुल वेळ न दवडता सरोजिनी मार्केटला भटकायला गेलो. उगीच इकडेतिकडे करणे, मनाला येईल ते अबर-चबर खाणे अशी जीवाची दिल्ली केली.

1-DSC_4625.jpg

बिदाई समारोह (फोटो : श्री. शरद तावडे)

संध्याकाळी दिल्ली सरकारतर्फे ‘बिदायी’ कार्यक्रम असतो. भजन, भाषण, पूजा, जेवण असत. त्याच बरोबर दिल्ली सरकारकडून एक भली मोठी सॅक, रेनकोट, पूजा साहित्य, टोपी, ट्रॅक सूट, टॉर्च अस भेट म्हणून देतात. दिल्लीच्या नागरिकांना तर रोख वीस हजार रुपये पण मिळतात. गुजराथ, कर्नाटक, झारखंड अशी काही राज्य पण मदत देतात. महाराष्ट्र सरकार मात्र काही देत नाही.

1-DSC_4632.jpg

बिदाई समारोह (फोटो : श्री. शरद तावडे)

आतापर्यंत निरनिराळ्या व्यक्ती आणि संस्थांकडून भेटवस्तूंचा अक्षरशः वर्षाव चालू होता. वैद्यकीय अहवाल ठेवायला मोठी प्लास्टिक पिशवी, लहान सॅक , कमरेचा पाऊच, पारपत्र जवळ ठेवण्यासाठीचा पाऊच, जमा करायचं सामान ठेवायला पोती, त्यांना गुंडाळायला दोऱ्या, चालताना आधाराला काठ्या, लोकरी मोजे, बिस्किटं !! आधीच्या भव्य सामानाला अतिभव्य रूप येत चाललं होत. दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता निघायचं होत. कसबस सामान कोंबलं. बरोबर नेण्याच आणि गुजराथ सदनला जमा करायचं सामान वेगळं करून झोपून गेलो.

दिनांक १३ जून २०११ (दिल्ली ते अल्मोडा)

delhi bidai

delhi bidai2

दिल्लीतील हृद्य निरोप

सकाळी ठरलेल्या वेळेला आम्ही सर्व जण आवरून, सामान जमा करून बाहेर पडलो. बाहेर आलो तर काय, आम्हाला निरोप द्यायला मोठा जमाव जमला होता!! दिल्लीतल्या यात्रींचे कुटुंबीय, कुमाऊँ मंडळाचे लोक, खूप गर्दी होती. सगळे यात्रीन्च्या पाया पडत होते,. हातात खाऊ, पाण्याच्या बाटल्या कोंबत होते, अगदी डोळ्यात पाणी आणून ‘ ठीकसे वापस आना’ असा निरोप देत होते. लोकांच प्रेम, श्रद्धा पाहून सगळ्यांनाच भरून येत होत. समारंभाने हार-तुरे घालून, गंध लावून दिल्लीच्या लोकांनी आम्हाला निरोप दिला. आज आम्हाला दिल्ली ते काठगोदाम असा ३६० की.मी.चा प्रवास वातानुकूलित बसने आणि पुढे अल्मोड्यापर्यंतचा प्रवास साध्या बसने करायचा होता.

इतके दिवस सगळे विखुरलेले असायचे. दिल्ली आणि आसपासची मंडळी वैद्यकीय चाचण्यांसाठी घरून येऊन परत घरी जात होती. कोणी नातेवाईकांकडे राहात होते. आपल्या नातेवाईकांना सोडायला म्हणून आलेले काही जण गुजराथ समाजमध्ये राहात होते. त्यामुळे आपल्या बॅचमध्ये नक्की आहे कोण? हा अंदाज काही येत नव्हता. आता बसमध्ये बसल्यावर आपले सहयात्री कोण आहेत, ते कळायला लागलं. बस निघाल्यानंतर, एल.ओ. सरांनी सगळ्या यात्रींना आपापला परिचय करून द्यायला सांगितला. आमच्या पन्नास जणांच्या बॅचमध्ये ३८ पुरुष आणि १२ बायका होत्या. सर्वात लहान यात्री १८ आणि सर्वात मोठे यात्री ७० वर्षांचे होते. नवरा बायको, आई-मुलगा, भाऊ-भाऊ अश्या जोड्या होत्या.

kathgodam

काठगोदाम येथील स्वागत

दिल्लीत झाला, तसाच कौतुक समारंभ गाझियाबादमध्ये नाश्त्यासाठी थांबलो तिथे, जेवणाला काठगोदाम थांबलो तिथे सगळीकडे झाला. प्रत्येक ठिकाणच आदरातिथ्य, श्रद्धा, यात्रींना सगळ्या प्रकारची मदत करण्याची धडपड बघून भारावून जायला होत होत. अस करत करत रात्री अल्मोड्याला मुक्कामाला पोचलो.

दिनांक १४ जून २०११ (अल्मोडा ते धारचूला)

आज अल्मोडा ते धारचूला असा ११ तासांचा बस प्रवास होता. त्यामुळे लवकरच निघालो. आता हिमालयात आल्याची जाणीव होत होती. रस्ता वळणा-वळणांचा होता. प्रत्येक वळणानंतर नवीन नयनरम्य दृश्य दिसत होत. आमच्या नशिबाने हवा छान होती. मजा येत होती. असा सुंदर प्रवास करत आम्ही पिथोरगढला दुपारच्या जेवणाला पोचलो.

महाराष्ट्रात कैलास-मानस बद्दल फार लोकांना माहिती नाहीये. मी जाण्याचे ठरवल्यावर बऱ्याच जणांनी ‘ म्हणजे अमरनाथ का?’ ‘हे चारधाम जवळ आहे का?’, ‘ तिथे मोठं देऊळ असेल ना?’ वगैरे प्रश्न विचारले होते. इथे उत्तराखंडामध्ये मात्र स्थानिक वर्तमानपत्रातून, निरनिराळ्या वाहिन्यांवरही यात्रेच्या बातम्या येतात.

pithoragad

मिडीयाची गर्दी

पिथोरगढ पासून काही अंतरावर मीरथी येथे भारत सीमा तिबेट पोलीस ह्याच कँप हेडक्वार्टर आहे. ह्या यात्रेची सुरक्षा, वैद्यकीय मदत, काही वाईट परिस्थिती ओढवल्यास तशी मदत ही सगळी जबाबदारी भा.ती.से.पोलीस घेतात. तिथला कौतुक समारंभ सगळ्यात भारी होता. बसमधून उतरल्यावर दोन्ही बाजूंना जवान स्वागताला उभे, नाचणारे लोक, उत्तम अल्पोपाहार, शाळेच्या विद्यार्थ्यांचे कार्यक्रम अशी बडदास्त होती.

mirthi1

1-DSC_4695.jpg

1-DSC_4691.jpg

1-DSC_4711.jpg

मीरथी येथील बिदाई समारोह (फोटो : श्री. शरद तावडे)

तिथल्या कमांडंटसाहेबांनी चीनमध्ये गेल्यावर सुरक्षिततेची कशी काळजी घ्यायची हे सांगितले. तिबेटी भाषेतले रोज लागणारे शब्द असणारी पुस्तिका सर्वांना दिली. पूर्ण बॅचचा एक फोटो काढून त्यांनी आम्हाला निरोप दिला. हे सगळं स्वागत बघून जरा संकोचच वाटत होता. आम्ही काही एवरेस्टवर स्वारी करणार नव्हतो किंवा एखादं युद्धही लढणार नव्हतो. ज्या सैनिकांच आपण स्वागत करायला हवं, ते आमच्या सोयींसाठी केवढीतरी धडपड करत होते. तिथे नागपूरचा एक मराठी जवान भेटला. त्याच्याशी मराठीत गप्पा मारून पुन्हा एकदा तो दमवणारा बसप्रवास सुरू केला.

1-DSC_4647.jpg

1-DSC_4678.jpg

आता पाऊस सुरू झाला होता. मोबाइलवर गाणी ऐकत पावसाची मजा घेत होतो. घर सोडून आता चार दिवस झाले होते. हा मोबाइलचं शेवटचा दिवस. नंतर जर एस..टी.डी.ची सोय असेल तरच घरी बोलता येणार.

धारचूला गावात संध्याकाळी उशीरा पोचलो. हे गाव नेपाळच्या सीमेवर आहे. काली नदीच्या अल्याड नेपाळ आणि पल्याड भारत. धारचूलाला गेल्यावर दिल्लीत दिलेलं मोठं सामान तीन दिवसांनी मिळाल. पुन्हा सगळ्या खोल्यांमधून सामानाशी झटापट सुरू झाली. आपल्याला पोर्टर तसंच पोनी हवा असेल तर इथे सांगावं लागत. मला मिळालेल्या सल्ल्यानुसार मी दोन्ही करणार होते. ह्यांचे दर तेथील सोसायटी ठरवते. त्यामुळे घासाघीस करायला काही वाव नव्हता!!

ह्या यात्रेत सामानाची पद्धत अशी असते की, वीस किलो सामान वाहून नेण्याची जबाबदारी कुमाऊँ मंडळ घेते. जिथपर्यंत वाहन जाऊ शकत तिथपर्यंत ट्रकने आणि नंतर खेचरांवर लादून सामान नेतात. हे मोठं सामान भिजू नये म्हणून ते तरटाच्या गोण्यांमध्ये घालून, दोरी बांधून, त्यावर आपलं नाव घालून द्यावं लागायचं. आमच्या नंतरच्या बॅचमधल्या एका यात्रीच सामान नदीत पडून हरवलं. पण बाकी यात्रीनी मदत केल्यामुळे त्यांची यात्रा पूर्ण झाली.

पण ह्या सामानाची रोज भेट होण्याची खात्री नसते. त्यामुळे एका लहान सॅक मध्ये थोडे कपडे, थोडा खाऊ,रेनकोट अस सामान ठेवायचं. आपलं पारपत्र, रोख पैसे, डॉलर हे सदैव आपल्या अंगावर वागवायचे. शिवाय कॅमेरा, टोपी इत्यादी असतच. अश्या बऱ्याच लेव्हलच सामान असल्याने पुढे कँप वर एखादी वस्तू आपल्याच सामानात शोधणे म्हणजे गवतात सुई शोधण्यासारखं असायचं. त्यातही साबण शोधताना मेणबत्ती, रुमाल शोधताना पेन असे गमतीदार प्रकार व्हायचे. (पुढे पुढे आपली वस्तू शोधण्यापेक्षा दुसऱ्याची मिळत असेल तर वापरून मोकळे व्हायचो!! ट्रेकमध्ये एक वस्तू सातच काय पण पन्नास लोकही वाटून घेऊ शकतात!!)

road1

आता उद्यापासून खरी खरी यात्रा सुरू होणार. व्होल्व्हो बस, साधी बस, जीप अश्या पायऱ्या उतरत उतरत आता चालायला सुरवात करायची होती. वर्षानुवर्ष मी ह्या यात्रेची स्वप्न बघितली होती. पण आत्ता मात्र डोक्यात असंख्य शंका आणि प्रश्न होते. हवामान, आपली तब्येत, चालायला जमेल ना, सामानाची गडबड तर नाही ना होणार? बापरे. किती काळज्या, शंका आणि चिंता! पण बसच्या प्रवासाचा एव्हाना खूप कंटाळा आला होता. हात-पाय आंबून गेले होते. उद्यापासून चाललं की मोकळं वाटेल ह्या विचाराने छान वाटत होत. घरी सगळ्यांशी पोटभर गप्पा मारून घेतल्या आणि कैलासाची स्वप्न बघायला लागले!!

दिनांक १५ जून २०११ (धारचूला ते सिरखा)

सकाळी नाश्ता-पाणी उरकून आणि मोबाईल, आंतरजाल, वर्तमानपत्र, टी.व्ही., रेडिओ अशा सगळ्या आधुनिक यंत्राचा पुढच्या २०-२२ दिवसांसाठी निरोप घेऊन निघालो. जीपने साधारण ४० किलोमीटर प्रवास केल्यावर ‘वाहन’ ह्या सोयीलाही रामराम करायचा होता. आता पुढचा प्रवास एक तर चालत किंवा घोड्यावर. शक्यतो घोड्यावर बसायचं नाही, अस ठरवलं तर होत. पण त्या बाबतीत फार हट्ट करायचा नाही, असही ठरवलं होत. शेवटी आपण हाती-पायी धड परत येणं हे सगळ्यात महत्त्वाच. कारण,‘आपण सलामत तो परिक्रमा पचास!!’

1-DSC_4689.jpg

हिमालयात दरडी कोसळणे हा रोजचाच खेळ. त्यामुळे यात्रेचा रस्ता ठरवताना पाऊस, रस्त्याची कामे आणि दरडी कोसळल्याने बंद असलेले रस्ते, असा सगळा विचार करून ठरवतात. पहिल्या बॅचचा रस्ता शेवटच्या बॅचपर्यंत बदलला जाऊ शकतो. आमच्या माहिती पुस्तकात दिल्याप्रमाणे आमची पायी वाटचाल पांगूपासून सुरू होणार होती. पण आम्ही सुरवात केली ती नारायण आश्रम येथून. त्यामुळे आमचे चालण्याच अंतर जवळ-जवळ ८-९ किलोमीटरने कमी झालं. वा! सुरवात तर छान झाली!

narayan ashram1

नारायण आश्रम

धारचूलापासून जीपने प्रवास करून नारायण आश्रमला पोचलो. नारायण आश्रमची उंची समुद्र सपाटी पासून साधारण ९००० फूट आहे. दिल्लीपासूनच नारायण आश्रमच्या सृष्टीसौंदर्याविषयी ऐकले होते. २८ मार्च १९३७ रोजी कर्नाटकातील नारायण स्वामींनी कैलास मानससरोवर यात्रींसाठी एक विश्रांतिस्थळ आणि स्थानिक लोकांसाठी शिक्षण आणि आरोग्यासाठी उपक्रम सुरू केले.

1-DSC_4735.jpg

आता त्यांचा इस्पितळ, महाविद्यालय, प्राथमिक शाळा असा बराच विस्तार झाला आहे. तिथे गेल्यावर डोळ्यात भरली ती त्यांची शिस्त, व्यवस्था आणि स्वच्छता. जिकडे नजर जाईल तिथे आता हिमशिखरे दिसत होती. पाऊस नव्हता. हवा छान होती. आकाशाची निळाई, शिखरांचा शुभ्रधवल रंग आणि त्या पार्श्वभूमीवर आश्रमातील काळजीपूर्वक जोपासलेली रंगीबेरंगी फुले! वा! तिथे दर्शन घेऊन, आणि त्यांनी दिलेला गरम शिरा आणि चहा हा प्रसाद घेऊन सगळे पुढे निघाले.

इथला अजून रोमांचकारी एक कार्यक्रम बाकी होता. तो म्हणजे आपला पोर्टर व पोनीवाला ह्यांची ओळख करून घेण्याचा! आश्रमातून खाली उतरलो तर पोर्टर, घोडे आणि घोडेवाले ह्यांची ही तुंबळ गर्दी झाली होती. त्यांचा ठेकेदार हजर होता. त्याच्याकडेच आम्ही आदल्या दिवशी धारचुलाला पैसे दिले होते. तो प्रत्येकाला एक-एक पोर्टर आणि पोनीवाला देत होता. मी ह्या आधीही हिमालयात ट्रेक केले आहेत. पण कधी पोर्टर केला नव्हता. बहुतेक ठिकाणचे पोर्टर फक्त आपले सामान नेऊन पुढच्या कँपवर पोचवतात. इथे मात्र पद्धत वेगळी असते. तो पोर्टर पूर्ण वेळ आपल्या बरोबर आणि आपल्या वेगाने चालतो. मला माझ्या अप्रतिम(?) वेगाची नीटच माहिती असल्याने मी ठेकेदाराला तशी कल्पना दिली होती. त्याने सुरेश नावाचा पोर्टर, रमेश नावाचा पोनीवाला (आणि लकी नावाचा घोडा) ह्यांच्याकडे मला सुपूर्त केले.

n ashram2

यात्री आणि पोर्टर-पोनीवाले-पोनी यांची गाठभेट

सुरेशभाईने लगेच माझ्याजवळची छोटी सॅक आपल्या पाठीला लावली आणि शिवशंकराच्या गजरात आम्ही चालायला सुरवात केली. आजचा रस्ता तसा फार लांबचा नव्हता. फक्त ५ किलोमीटर चालायचं होत. पण यात्रेतील ही पहिलीच वाटचाल ( किंवा चालवाट!!) त्यामुळे त्याचा वेगळाच रंग होता. एकत्र सुरवात केली तरी प्रत्येकाच्या वेगाप्रमाणे ग्रुप्स पडत होते. बाकी ट्रेकमध्ये एकटा मेंबर मागेपुढे झाल्यास रस्ता चुकण्याचा संभव असतो. इथे मात्र जवळ-जवळ प्रत्येकाबरोबर पोर्टर असल्याने, ती भीती नव्हती.

n ashram2

माझे यात्रेतील साथीदार - सुरेशभाई, रमेशभाई

1-DSC_4744.jpg

यात्रेची सुरवात

हे पोर्टर पोनीवाले लोक अतिशय प्रामाणिक आणि कष्टाळू असतात. आपण हाशहुश करत कधीतरी यात्रेला जातो. हे लोकं मात्र दर वर्षी ७-८ वेळा तरी हा रस्ता तुडवतात. बॅचेसच वेळापत्रक अस जुळवलेलं असत की पहिली बॅच परिक्रमा संपवून भारतात परत येते तेव्हा तिसरी तिकडे जाते. अश्या एकाआड एक बॅचेस सीमेवर भेटतात. त्यामुळे हे पोर्टर एका बॅचचा यात्री सीमेवर सोडतात आणि दुसऱ्याला परत नारायण आश्रमापर्यंत आणतात. त्याच्या पुढच्या बॅचबरोबर पुन्हा जातात. म्हणजेच १६ बॅचेसपैकी ७ ते ८ बॅचेसबरोबर हे पोर्टर-पोनीवाले हा सगळा प्रवास करतात. हा सगळा भाग, सृष्टीसौंदर्याने समृद्ध आहे. पण उद्योग धंदे नसल्याने फार गरीब आहे. यात्रेच्या काळात इथले लोक कष्ट करून पैसे मिळवतात.

sirkha1

आजच रस्ता तसा सोपा होता. त्यामुळे त्रास वाटत नव्हता. दोन तास चालल्यावर सुरेशभाईने लांबून दिसणारा कुमाऊँ मंडळाचा कँप दाखवला. कँपकडे जाताना सिरखा गाव लागलं. इथल्या सगळ्या घरांना छान कोरीव काम केलेले दरवाजे-खिडक्या असतात. थंडी भरपूर असल्याने सगळ्या बायका लोकरीचे विणकाम करत असतात. मी व्यवसायाने आर्किटेक्ट आहे आणि विणकाम मनापासून आवडतं. त्यामुळे बांधकामे आणि विणकाम बघून माझ्या तोंडाला पाणी सुटत होते. ह्या गावात एस.टी.डी.फोनची सोय होती. मोबाइलच्या प्रसारानंतर खूप दिवसांनी रांग लावून फोन केला. घरी फोन करून खुशाली कळवली. उरलेलं अंतर भराभर कापून सिरखा कँप गाठला. कँपच्या जवळ १९९८ साली झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या यात्रींसाठी एक स्मारक बांधले आहे.

sirkha2

यादगारी

यूथ हॉस्टेलच्या ट्रेकना राहायला तंबू आणि बाकी सोयींसाठी ‘होल वावर इज आवर’ ची सोय असते! इथे मात्र पलंग, गाद्या, बाथरूम, शौचालये सगळी अगदी पंचतारांकित सोय होती. बहुतेक ठिकाणी सहा-सात जणांना मिळून एक खोली असायची. काही कँपवर दहा-बारा जणांचा बंकर असायचा.कँपवर पोचल्यावर सगळेजण आपल्या आपल्या उद्योगांना लागले. बऱ्याच जणांचे अंघोळी, कपडे धुणे हे आवडते छंद होते. आमच्या बरोबरचे तावडे, चित्रकार होते. ते चित्र काढायला लागल्यावर बघायला ही गर्दी झाली.

sirkha3

आमच्या बॅचचे कलाकार श्री. शरद तावडे

मी आणि नंदिनी गप्पा मारणे आणि मजा करणे ह्या महत्त्वाच्या कामाला लागलो. ह्या गप्पात असं लक्षात आलं की ती पौर्णिमेची रात्र होती. त्या रात्री चंद्रग्रहणही होत. रात्री गजर लावून उठायचं अस पक्कं करून टाकलं.

sirkha4

तेवढ्यात कँप समोर सुरेख बर्फाच्छादित शिखरे दिसायला लागली. मावळणाऱ्या सूर्याची किरणांनी त्या शिखरांना पिवळी-तांबूस झळाळी दिली होती. सगळे भान हरपून ते दृश्य बघत राहिले. ती ‘अन्नपूर्णा रेंज’ आहे, अशी बातमी आली.

ठरल्याप्रमाणे रात्री बारा वाजता उठलो, पण आकाशात ढग होते. त्यामुळे ग्रहण काही दिसू शकल नाही.

Keywords: 

माझी कैलास-मानस सरोवराची यात्रा (भाग-४) सिरखा ते गुंजी

दिनांक १६ जून २०११ (सिरखा ते गाला)

p41

यात्रेतलं रोजच वेळापत्रक साधारण सारखंच असायचं. आम्ही सकाळी ५.०० ला उठायचो. लगेच चहा / कॉफी. प्रातर्विधी उरकून ६.०० ला नाश्ता. त्याबरोबर बोर्नविटा. तोपर्यंत पोर्टर यायला लागायचे. सामान त्यांच्याकडे सोपवून चालायला सुरवात. कँपवर पोचल्या पोचल्या स्वागताला सरबत किंवा ताक! मग जेवण. जर चालण्याच अंतर जास्त असेल तर रस्त्यात एखाद्या ठिकाणी जेवायची सोय केलेली असायची. दुपारी पुन्हा चहा/ कॉफी. संध्याकाळी सूप. रात्री ७ वाजता जेवण आणि झोप.

p42

यात्रेत सगळीकडे कांदा-लसूण विरहित जेवण देतात. प्रत्येक जेवणात हिरव्या पालेभाज्या असतातच. रात्री झोपण्याआधी त्या कँपचे व्यवस्थापक ‘सबने खाना खा लिया? कोई भूखा-प्यासा तो नही है? बीना खाना खाये मत सोना.’ अशी चौकशी करून जायचे. इतकी काळजी घेतल्यामुळे आपण कोणीतरी विशेष व्यक्ती झालो आहोत अस वाटायचं!

बहुतेक सगळ्या कँपवर सौर ऊर्जेवर चालणारे दिवे आहेत. सकाळी /संध्याकाळी थोडा थोडा वेळ दिवे चालवतात. तसेच फोन किंवा कॅमेऱ्याच्या बॅटरी चार्ज करताकँ येतात. हिमालयात जसा दिवस चढेल तशी हवा खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे सकाळी लवकर निघून दुपारपर्यंत पुढच्या पपर्यंत पोचणे उत्तम असते. प्रत्येक बॅचच्या एल.ओ.ना सेंटेलाईट फोन दिलेला असतो. ते रोज बॅचची खबरबात दिल्लीला पोचवतात. तिथे आम्ही दिलेल्या इ-मेल आय.डी. वर ही ‘ताजा खबर’ पोचते. ही छान सोय होती. घरी नवऱ्याला रोजच्या रोज हवामानापासून, कधी निघालो, कधी पोचलो सगळी बातमी असायची. आय.टी.बी.पी. वाले तर फोटो पण वेबसाइटवर टाकतात.

p43

सिरखाला मिळालेल्या माहितीनुसार आजचा रस्ता १४ किलोमीटरचा आणि कालच्यापेक्षा थोडा अवघड होता. रुंगलिंग टॉपची अतिशय खडकाळ अरुंद पायवाट चालायची होती. सगळ्या यात्रींचा ‘ओम नमः शिवाय’चा जप चालू होता.कँप सोडल्यावर थोडा वेळ उतार होता. काही यात्री चालत तर काही घोड्यावर स्वार झाले होते. सामुरे गावाजवळ आमचा नाश्ता झाला. इथे आल्यापासून छोले किंवा राजमा आणि पुरी असा नाश्ता बऱ्याच वेळा असायचा. रोज उठून पुऱ्या खायची सवय नसलेल्यांना जरा वैताग यायचा. पण काही इलाज नव्हता.

सामुरे गावापासून चढण सुरू झाली. गर्द वनराईतून, छोट्या छोट्या झऱ्यातून, चिखलातून चालताना थंडी कुठच्या कुठे पळून गेली. तास-दीड तास चढून गेल्यावर रुंगलिंग टॉप आला. पायवाटेच्या दोन्ही बाजूला अक्रोडाची उंच झाडे होती. अक्रोडाच्या झाडांवर लहान लहान फळ लागली होती. सुरेशभाईच्या म्हणण्याप्रमाणे शेवटच्या बॅचेसना अक्रोड खायला मिळतात. पण तेव्हा पावसाचा त्रास होतो असही ऐकलं होत. त्यामुळे ‘पावसाच्या त्रासापेक्षा अक्रोड विकत घेऊ’ अशी चर्चा अक्रोडाच्याच सावलीत केली!

p44

आता पुढे होती ती पाय दुखावणारी सरळ उताराची वाट. पाऊस पडून निसरड्या झालेल्या वाटेवरून तोल सांभाळत चालणे म्हणजे कसरत होती. अर्थात सुरेशभाई हात पकडायला होताच. हे लोक आपली इतकी सेवा करतात की त्याचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. चिखलाच्या रस्त्यावरसुद्धा ते स्वतः चिखलातून चालतात आणि यात्रींना चांगल्या रस्त्यातून चालवतात. सगळा उतार संपल्यावर सिमखोला नदीजवळ आलो. ह्या भागात अजून मोसमी पाऊस सुरू झाला नव्हता. नदीला अगदी थोडेसेच पाणी होते. त्यामुळे फार त्रास न होता नदी पार केली.

ह्या भागात बिच्छूघास नावाचे झुडूप असते. दिसायला अगदी नाजूक आणि सुंदर. हात लागला की मात्र विंचू चावावा तश्या झिणझिण्या येऊन वेदना होतात. रस्त्यात कुठल्याही अनोळखी झाडांना हात लावू नका, हे आम्हाला खूपवेळा सांगितलं होत. पण आमच्यापैकी एकाचा हात त्या झाडाला चुकून लागला. मग कैलास जीवन पासून ते खोबरेल तेलापर्यंत सगळे उपचार झाले. पण दोनेक तासांनीच त्याच्या वेदना कमी झाल्या.

1-DSC_4749.jpg

दिल्ली सोडल्यापासून लेकाशी बोलणं झालं नव्हत. तो पावणेबाराला शाळेत जातो. त्या आधी फोन पर्यंत पोचता यावं म्हणून अधेमधे न रेंगाळता सरळ गाला कँपला पोचलो. पण....... तिथला फोन बंदच होता! घर सोडून आता आठवडा झाला होता. आई-बाबा, नवरा ह्यांची आठवण येत होतीच. पण सगळ्यात जास्त मुलाची येत होती. त्याच्या वयाचे मुलगे बघितले की फारच जाणवायचं. पण आता त्याच्याशी बोलण्यासाठी अजून एक दिवस वाटबघायला लागणार होती.

आता चालता चालता हळूहळू सहयात्रींची ओळख होऊ लागली होती. प्रत्येकाची पार्श्वभूमी, स्वभाव, विचार करायची पद्धत, यात्रेला येण्याचा उद्देश, सगळंच वेगळं. एका अर्थाने हे महिनाभर ‘बिग बॉस’ च्या घरात राहण्यासारखं होत. काही जण अगदी जेवणाच्या रांगेतही ढकला-ढकली करत होते. ह्या उलट काही जण चालताना कोणी दमलं तर धीर देऊन, थोडं बोलून पुढे जायचे. सुरवातीला सगळे आपल्या प्रांतातल्या, आपली भाषा बोलणाऱ्या लोकांबरोबर असायचे. हळूहळू ही प्रांतांची, भाषांची बंधने ढिली होत होती. एकदा कँपवर पोचल्यावर दुसरी काही करमणूक नसायची. त्यामुळे एकमेकांशी गप्पा मारणे, उद्याच्या मार्गाबद्दल चर्चा करणे हा एकच वेळ घालवायचा मार्ग होता.

जे यात्री आधी ही यात्रा करून आलेले असतात. त्यांना अशा वेळेला खूप महत्त्व मिळत. आमच्यातले दोन-तीन जण असे अनुभवी होते. गुजराथचा परेशभाई तर आठव्यांदा आला होता. एक मध्य प्रदेशचे अशोकजी ह्या आधी ९८ साली जाऊन आलेले होते. त्यामुळे सगळे त्यांना दुसऱ्या दिवशीच्या रस्त्याबद्दल विचारायला जायचे. ते जी माहिती द्यायचे, त्याची सुरवात नेहमी ‘ सुनो, मै जब ९८ में यात्राके लियेआया था..........’ अशी व्हायची. शेवट ‘ कैसे गये थे, कुछ याद नहीं आ राहा’ असाही व्हायचा!! गुजराथ समाज मध्ये माझी आल्या आल्या ह्यांच्याशी आणि नंदिनीशी ओळख झाली होती. थोडी ओळख झाल्यावर त्यांनी मला ‘ देखो, प्लीज मुझे अंकल मत कहना’ अशी मजेदार विनंती केली. माझ्या डोळ्यासमोर अनेक हेयर डायच्या जाहिराती आल्या.(खरंतर त्यांना केसच नव्हते. त्यामुळे हेयर डायचाही तसा काही उपयोग झाला नसता!!)

मग मी त्यांना ‘नंदिनीके अंकल’ म्हणायला सुरवात केली. सगळ्या बॅचमध्ये हे नाव आणि त्याच कारण पसरल्यावर ते असले वैतागले की बस रे बस. ‘अब फिरसे नंदिनीके अंकल बोला तो एक चाटा पडेगा.’ पण सगळ्यांच्या हातात हे कोलीतच पडलं होत. पूर्ण यात्रा संपेपर्यंत सगळे त्यांना ‘नंदिनीके अंकल’ असच म्हणायचे!!

कँपवर रोज संध्याकाळी भजन व्हायचं. त्यानंतर दुसऱ्या दिवशीच्या मार्गाबद्दल सूचनाही मिळायच्या. आमचे एल.ओ. नारंग सर चालताना, जेवताना सगळ्यांच्या ओळखी करून घ्यायचे. हळूहळू त्यांच्यासकट सगळ्या पन्नास लोकांची नाळ जुळत होती. चेष्टामस्करी बरोबर एकमेकांना मानसिक धीर देणे, मदत करणे हे सगळं एका कुटुंबासारखं चालू झालं होत.

दिनांक १७ जून २०११ (गाला ते बुधी)

आजचा टप्पा जवळजवळ १९ किलोमीटरचा आणि चांगलाच खडतर होता. जे लोक हिमालयात ट्रेकिंग करून आले आहेत, त्यांना माहिती असेलच की, ट्रेकिंगचे आणि शहरातले किलोमीटर वेगवेगळे असतात!! तिथले १९ किलोमीटर संपता संपत नाहीत!

1-DSC_4748.jpg

१९९८ च्या आधी मालपा इथेही कँप असायचा, पण १९९८ च्या दुर्घटनेनंतर तिथे कँप नसतो. त्यामुळे चालायला जास्त अंतर आहे. माहिती पुस्तका नुसार हे अंतर चालायला ७ ते १२ तास लागू शकतात. आजचा टप्पा झाला की तुमची यात्रा झालीच अस समजतात. आम्हाला निरनिराळ्या ठिकाणी दिलेल्या सूचनांमध्ये सगळ्यात जास्त सूचना ह्याच मार्गाबद्दल होत्या.

p45

रस्त्याच्या अवघडपणाची एवढी प्रसिद्धी ऐकल्यामुळे सगळ्यांच्या चेहऱ्यावर ताण दिसत होतं. सकाळची प्रार्थना जोरात झाली. गालाचा कँप सोडल्यावर पहिले ७ ते ८ किलोमीटर फार अवघड आहेत. कँपनंतर एक किलोमीटर साधासरळ रस्ता आहे. मग सुरू होते टी ४४४४ पायऱ्यांची अत्यंत अवघड उतरंड!! ४४४४ पायऱ्या? ऐकूनच पाय थरथरत होते. त्यातून डोंगरात उभ्या-आडव्या कशाही बसवलेल्या त्या वेड्यावाकड्या पायऱ्या, त्यात भर म्हणूनझऱ्यांचं पाणी वाहत होत, उजव्या हाताला खोल दरीत सुसाट वाहणारी काली नदी, कठडे इतके कुचकामी की चुकूनही कठडा पकडू नका अस आम्हाला सांगितलं होत.

p46

चालत असतानाच घोडे, खेचर वर-खाली करत होते. तरी आमच्या आमच्या नशिबाने आणि परमेश्वराच्या कृपेने पाऊस नव्हता. नाहीतर अश्या अडचणीच्या रस्त्यावर आणखीन वरून पाऊस आल्यावर काय होत असेल ह्याची कल्पनाच भयंकर होती. सगळं वातावरण भीती वाटेल असच होत. प्रत्येक पायरी अक्षरशः तोलून मापून उतरत प्रवास चालू होता. एक पाऊल जरी इकडे-तिकडे पडलं तरी कपाळमोक्ष ठरलेला आणि खालून रौद्ररूप धारण करून वाहणाऱ्या कालीच्या उदरात यात्रा समाप्त!

1-DSC_4900.jpg

हा सगळा रस्ता, सुरेशभाईने माझा हात घट्ट धरून ठेवला होता. खूप काळजीपूर्वक आणि सावकाश चालत तो कठीण रस्ता पार केला. हातातल्या काठीने तो मी कुठे पाय ठेवायचा, ते दाखवायचा. बरोबर तसंच चालल्यामुळे कुठेही न घसरता, धडपडता मी नीटपणे चालू शकले. सगळ्या पायऱ्या उतरून झाल्यावर लखनपूर इथे नाश्त्याची सोय केली होती. एक-एक यात्री येऊन थोडं थांबून, पोटपाणी उरकून पुढच्या रस्त्याला लागत होते. पुढे रस्ता तसा सोपा होता. पण अरुंद होता. डोंगरात बांधलेला रस्ता असल्याने बऱ्याच ठिकाणी उंची कमी होती. काली नदी आता अगदी जवळ होती. कालीच्या प्रवाहाचा ध्रोन्कार ऐकू येत होता. त्या आवाजात एकमेकांशी बोलणंही कठीण होत.

मागच्या वर्षी एक महाराष्ट्रातले यात्री परिक्रमा संपवून परत येत होते. तेव्हा फोटो काढण्यासाठी नदीच्या बाजूला उभे राहिले, आणि सामान वाहून नेणाऱ्या खेचराने त्यांना धक्का दिला. ह्या अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, पण कालीच्या प्रवाहामुळे त्यांचा मृतदेहसुद्धा हाती लागला नाही. त्यांच्या पत्नी त्यांच्यासोबत होत्या. त्यांनी हा धक्का कसा सहन केला असेल देव जाणे.

ह्या प्रसंगामुळे आम्हाला वारंवार ‘डोंगराच्या बाजूला थांबा, नदीच्या कडेला उभे राहू नका.’ अस बजावलं होत. मला फोटो काढावेसे वाटले तर सुरेशभाई मला डोंगराला पाठ टेकून उभं राहायला लावायचा. ह्या रस्त्यावर स्थानिक लोक तसेच मिलिटरीचे जवान ये-जा करत असतात. सगळे जण ‘ओम नमा शिवाय’ च्या गजराने आमचा उत्साह वाढवत होते. रस्त्यातल्या घोडे, खेचरांकडे सुरेश बारीक लक्ष ठेवून होता. फार अरुंद वाट असेल तर तो त्याच्या स्थानिक भाषेत बोलून त्यांना थांबवायचा, हातातल्या काठीने त्यांना बाजूला करायचा.

काही अंतर चालून गेल्यावर जरा बरा रस्ता आला. एक लाकडी पूल पार केल्यावर आम्ही मालपाला पोचलो. भारत सरकार आणि १९९८ च्या दुर्घटनेत मरण पावलेल्या यात्रींचे नातेवाईक ह्यांनी मिळून तिथे एक शंकराचे मंदिरबांधले आहे. तिथे नतमस्तक होऊन आणि मृतात्म्यांना श्रद्धांजली वाहून पुढे वाटचाल सुरू केली.

p47

1-DSC_4924.jpg

रस्त्यात लमारी ह्या छोट्या गावात आय.टी.बी.पी.चा कँप आहे. तिथे चहा आणि चिप्सने स्वागत झाले. महत्त्वाचे म्हणजे इथे फोनची सोय होती. सगळ्यांनी घरी फोन करून आपापली खुशाली कळवली. आम्ही आजच्या दिवसाबद्दल जे एकाला होत, ते त्या ४४४४ पायऱ्या आणि मालपापर्यंतचा अवघड रस्ता ह्याबद्दलच. त्यामुळे मालपा आल्यावर वाटलं की झालं आता. पण पुढे जवळ जवळ ८ किमी अंतर बाकी होत. ते चालण्याची मानसिक तयारीच नव्हती. आता ते सगळे चढ-उतार प्रचंड वाटायला लागले. अंतर संपता संपेना. देवाच नाव घेत मी एक एक पाऊल टाकत होते. जवळच्या बाटलीतलं पाणी पीत, सुका मेवा खात चालत होते. आजचा रस्ता म्हणजे हिंदीत ‘ नानी याद आई’ म्हणतात तसा होता. पाय ओढत चालल्यावर बऱ्याच वेळाने कँप दिसायला लागला!! एक पूल पार करून शेवटचा अर्ध्या किलोमीटरचा चढ चढून कशीबशी कँपवर पोचले. पण सगळं अंतर चालत पार केल्याच समाधान वाटत होत.

सर्व यात्रींची अवस्था अशीच झाली होती. सगळे प्रचंड थकल्यामुळे रात्री भजन म्हणायला कोणाच्या अंगात त्राण नव्हत. जेवून सगळे गुडुप झाले.

दिनांक १७ जून २०११ (बुधी ते गुंजी)

आज गुंजीपर्यंत पोचलं की उद्या आराम! गुंजी समुद्रसपाटीपासून साधारण १२००० फुटांवर आहे. इथपासून पुढे विरळ हवेचा त्रास होऊ शकतो. ह्या कँपपर्यंत सगळी व्यवस्था कुमाऊ निगम विकास मंडळ करते. गुंजीपासून पुढे आय.टी.बी.पी. व्यवस्था करते. त्यांची इथे परत एकदा मेडिकल होते. विरळ हवेची शरीराला सवय होण्यासाठी इथे दोन रात्री थांबवतात.

पण ह्या सगळ्यासाठी १९ किलोमीटर चालायचं होत!

p48

सकाळी निघाल्यावर पहिल्या तीन-चार किलोमीटर मध्येच ९५०० फुटांपासून १२००० फुटांपर्यंतची छीयालेखची चढण होती. मला निघायला जरा उशीर झाला होता. आज पोनीवाला रमेश मागेच लागला. ‘दीदी, घोडेपे बैठं जाइये. नहींतो बहोत पिच्छे रहोगे’ असा आग्रह झाला. शेवटी मी माझा चालण्याचा पण सोडून त्याच्या ‘लकी’वर स्वार झाले. ‘लक्की एक्सप्रेस’ मुळे भरभर वर पोचले. घोड्यावर बसायचे एक तंत्र असते. ते तंत्र समजून घेईपर्यंत चढण संपली. आता आमच्या बॅचमधल्या बायकांमधली अजिबात घोड्यावर न बसलेली अशी नंदिनीच होती! ती रोज हेवा वाटण्यासारख्या वेगाने चढत होती.

1-DSC_4822.jpg

छीयालेख घाटी आणि त्याचा अपूर्व सौंदर्याने नटलेला परिसर पाहून मन मोहरत होते. हा परिसर ‘फुलोंकी घाटी’ म्हणून प्रसिद्ध आहे. उंचच उंच पाईन वृक्ष आणि रंगीबेरंगी असंख्य फुलांनी फुललेला घाटीचा सपाट प्रदेश आतापर्यंतची दमछाक विसरायला लावत होता. हिरव्यागार मखमली गवताच्या गालिच्यावर सुंदर रंगीबेरंगी फुले आणि त्यावर पडलेल्या पावसाच्या थेंबांवरून परावर्तित होणारी पावसाची किरणे... सगळा प्रदेश देहभान विसरायला लावणारा होता.

1-DSC_4828.jpg
ही सुरेख वाट संपल्यावर आय.टी.बी.पी. ची पहिली चौकी आली. चहा-बिस्किटे देऊन जवानांनी आमचे स्वागत केले. पारपत्र तपासणी झाल्यावर व जाणाऱ्या यात्रेकरूंची नोंद केल्यावर आम्हाला पुढे गर्ब्याल गावाकडे जायची परवानगी मिळाली.

p49

सुंदर नक्षीकाम केलेल्या घरांनी नटलेले हे एक टुमदार पण दुर्दैवी गाव आहे. गर्ब्याल गावाला पूर्वी ‘छोटा विलायत’ म्हणत असत. सन १९६२ च्या भारत-चीन युद्धापूर्वी गर्ब्याल ही मोठी बाजारपेठ होती. युद्धानंतर तसेच तिबेट चीनच्या ताब्यात गेल्यावर व्यापारी हालचालींवर निर्बंध आले. इथली बाजारपेठ उद्ध्वस्त झाली. अजून दुर्दैव म्हणजे पृथ्वीच्या पोटातील घडामोडींमुळे आणि प्रचंड वृक्षतोडीमुळे इथल्या निसर्गाचे संपूर्ण संतुलन पार बिघडून गेले. इथली जमीन खचू लागली. सुंदर कलाकुसर असलेली घरे चक्क जमिनीत गाडली जाऊ लागली. जिवाच्या भितीने गाव रिकामे झाले. आताही काही माणसे तिथे राहतात, पण बरीच घरे रिकामी, उदासवाणी वाटली.

1-DSC_5089.jpg

p4 50

इथल्या सगळ्या गावांमधून जाताना सर्व स्थानिक लोक हात जोडून ‘ओम नमा शिवाय’ म्हणून स्वागत करायचे. कुठून आले वगैरे चौकशी व्हायची. चहाचा आग्रह व्हायचा. मी अजिबातच चहा पीत नसल्याने सगळ्यांना नाराजकरावं लागायचं.
गोड, गोंडस छोटी मुले आपल्या बोबड्या भाषेत ‘ओम नमा शिवाय’ म्हणून हक्काने गोळ्या-चॉकलेट मागायची. ही कल्पना आधीच असल्याने मी रोज खिशात गोळ्यांची पिशवी ठेवायचे. त्या मुलांच्या चेहऱ्यावरचे हसू बघून छान वाटायचं!

1-DSC_4777.jpg

गर्ब्याल गावानंतर दोन-अडीच तास चालल्यावर गुंजी कँप दिसायला लागला. आय.टी.बी.पी.चा कँप असल्याने तिरंगा झेंडा डौलात फडकत होता. कँप खूप आधी दिसायला लागतो, पण नदीच्या पलीकडच्या काठाला! ‘ मेरा कँप हैउसपार, मै इसपार, ओ मेरे सुरेशभैय्या ले चल पार, ले चल पार’ अस म्हणावंसं वाटत होत!! एकदा कँप दिसायला लागला की चलण्याच मीटर संपतच. पुढची वाट चालायला नको वाटते.

1-DSC_5120.jpg
पण चालल्याशिवाय गत्यंतर नव्हते. बराच वेळ पाय ओढल्यावर एकदाचा तो नदीवरचा पूल आला. पुन्हा अर्धा तास चालल्यावर आधी पोचलेल्या यात्रींची ‘ओम नमः शिवाय’ ही आरोळी ऐकून जीवात जीव आला. कँपवर सरबत पिऊन ताजेतवाने झाल्यावर गुंजी कँपचा परिसर दिसायला लागला. सगळ्या बाजूंनी उंचच उंच निरनिराळ्या रंगांचे डोंगर दिसत होते. कधी पिवळे-शेंदरी, कधी कोंकणातल्या जांभ्या दगडासारखे, कधी चमकदार शिसवी तर कधी राजस्थानातल्या सारखा दिसणारा संगमरवरी. निसर्गाने रंगांची अगदी मुक्त उधळण केली होती.आमच्या बरोबरचे चित्रकार तावडे ह्यांना किती निसर्गचित्र काढू अस होत होत!

1-DSC_5145.jpg

1-DSC_5150.jpg

सगळ्या कँपवर बायका आणि पुरुषांची राहण्याची वेगवेगळी सोय असते. एका कुटुंबातून आलेल्या लोकांची बरीच पंचाईत होते. कितीही वेगवेगळं ठेवायचं ठरवलं तरी काही सामायिक सामान असतच. मग त्या लोकांच्या सारख्या फेऱ्या सुरू व्हायच्या. काही पतीसेवापरायण बायका सगळी सेवा करायच्या. आमच्या बरोबरची गुजराथची पायल नवऱ्याला अगदी पेस्ट लावून ब्रश हातात द्यायची. सकाळ झाली की तिचा नवरा संकेतभाई ‘ पायल, जरा ब्रश आपोतो’ करत दारात हजर!! एकदा हे लक्षात आल्यावर, तो दिसला की मी आणि नंदिनीच ‘पायल, जरा ब्रश आपो तो’ अस ओरडायला लागलो!!

1-DSC_5160.jpg

जवळच्या आय.टी.बी.पी. कँप मध्ये एक छोटंसं देऊळ होत. रोज संध्याकाळी तिथे भजन होत. आम्ही सर्व यात्री मिळून तिथे गेलो. सर्व जवान स्त्रिया व पुरुष मिळून अगदी जोषपूर्ण भजन म्हणत होती. पेटी, ढोलकी, खंजिरी आणि सगळ्यांचे टीपेला भिडलेले सूर!! यात्रीनीही त्यांच्या सुरात सूर मिसळून बरीच भजन म्हटली. त्या तरतरीत, उत्साही ,चुस्त जवानांची ऊर्जा आपल्याला मिळाली आहे अस वाटत होत.

1-DSC_5158.jpg

दुसऱ्या दिवशी विश्रांती आणि मेडिकल होती. विरळ हवेमुळे बऱ्याच जणांचा रक्तदाब वाढतो. थोडी विश्रांती झाल्यावर आमच्या बॅचमधले डॉ.शहा सगळ्यांचा रक्तदाब तपासून गेले. सगळे एकदम ओ.के!

आता उद्या काय होतंय, ही थोडी काळजी होतीच. पण दिल्लीतल्या मेडिकलमध्ये नापास होऊन परत जाण्यापेक्षा मला गुंजीतून परत जायला चाललं असत. अल्मोड्यापासून गूंजीपर्यंतचा प्रवास खूप सुंदर होता. नाहीतरी विठ्ठलाच्या दर्शनापेक्षा वारकऱ्यांचा सहवास आणि पंढरपूर पर्यंतचा प्रवास लोभसवाणा असतो, नाही का?

Keywords: 

माझी कैलास-मानस सरोवराची यात्रा भाग-५ (गुंजी ते लीपुलेख पास)

दिनांक १८ जून २०११ (गुंजी मुक्काम)

part5-01.jpg

गुंजी कँपला पोचल्यापासून चर्चेचा मुख्य विषय 'मेडीकल टेस्ट' हाच होता. त्याच्या जोडीला, दुसऱ्या दिवशी दोन कँपच अंतर पार करायचं होतं, ह्याची काळजीही होती. गुंजीनंतरचा कँप कालापानी आहे. आमच्या कार्यक्रमाप्रमाणे तिथे न थांबता नबीढांग ह्या भारतातील शेवटच्या कँपपर्यंत पोचायचं होत. मेडिकल जर लवकर आटोपली तर कालापानीपर्यंतचे नऊ किलोमीटर अंतर आजच पार करावे, असा सगळ्यांचा खल चालला होता. त्यामुळे लवकर लवकर मेडिकल संपवावी असे सगळ्यांचे प्रयत्न चालू होते.

सकाळी १० वाजता सगळ्यांना आपापले मेडिकल रिपोर्ट घेऊन तयार राहायला सांगितलं होत. दिल्लीतून निघताना ज्या तपासण्या झाल्या होत्या, त्यातील क्ष-किरण तपासणी आणि अन्य सर्व वैद्यकीय रिपोर्ट जवळ ठेवायला आम्हाला किमान सतरा वेळा तरी बजावून सांगितलं होतं. पुढे यात्रेदरम्यान एखाद्या यात्रीला काही त्रास होऊ लागल्यास आधीचे रिपोर्ट डॉक्टरांना तुलना करायला उपयोगी पडतात.

part5-02.jpg

सकाळची सगळ्यात मोठी आणि अत्यंत मजेदार बातमी म्हणजे, आमच्या नारंग सरांनीच त्यांचे सगळे रिपोर्ट आणले नव्हते!! क्ष-किरण फोटो फार मोठा होता म्हणून त्यांनी दिल्लीतच ठेवला होता. बाकीचे रिपोर्टही सगळे न आणता, थोड्याच रिपोर्टची प्रत ते घेऊन आले होते. एल.ओ. सरांना पूर्ण यात्रेत अग्रपूजेचा मान असतो. त्यांनीच अशी गंमत केल्यावर आय.टी.बी.पी.वाले डॉक्टर चांगलेच वैतागले. त्यांचा सगळा सैनिकी खाक्या. कोणीही त्यांची शिस्त मोडलेली ते खपवून घेत नाहीत. इथे आमच्या एल.ओ. सरांशीच त्याचं वाजल्यावर त्यांनी दणादणा लोकांना नापास करायला सुरवात केली. कोणाला न्युमोनियाची शंका, कोणाचा रक्तदाब जास्त तर कोणाच कोलेस्टरॉल जास्त. अर्धी बॅच परत पाठवतात की काय अशा विचाराने कँपवर वातावरण एकदम तंग झालं.

माझं हिमोग्लोबिन सदैव कमी असतं. त्यामुळे मला ती काळजी होती, तर नंदिनीला तिच्या इ.सी.जी. प्रश्नाची. माझी मेडिकल झाली तेव्हा माझ्या हिमोग्लोबिनच्या त्या सुरेख आकड्यांकडे डॉक्टर बराच वेळ बघत बसले होते. मी एकदम गॅसवर. पण शेवटी त्यांनी फक्त ‘चालण्याचा हट्ट न करता, जास्त चढ असेल तिथे घोड्यावर बसा. काळजी घ्या’ असा आपुलकीचा सल्ला दिला. हिमोग्लोबिन कमी असल्याने, विरळ हवेचा जास्त त्रास होऊ शकतो, अस त्या डॉक्टरांच म्हणणं होत. एकूण काय, मला वरच्या वर्गात ढकलले होते! पुष्कळ झालं.

नंतर हळूहळू करत त्यांनी सगळ्यांनाच पास केलं! हुश्श! आता मेडिकल नाही. पण ह्या सगळ्या भानगडीत इतका वेळ गेला, की आमचा कालापानी गाठायचा बेत कुठल्या कुठे उडून गेला. संध्याकाळी भजन झालं. आपली सगळीच्या सगळी बॅच पुढे जाणार, ह्या आनंदात भजनाला आज चांगलाच जोर चढला.

part5-03.jpg

part5-04.jpg

गुंजी कँपला फोनची सोय होती. ह्यानंतर तिबेटपर्यंत फोन नाही. त्यामुळे घरी फोन करून सगळ्यांशी गप्पा मारल्या. शनिवार असल्याने लेक घरी होता! त्याच्याशी बोलून खूप बरं वाटलं. माझ्या गप्पांमुळे त्याचा यात्रेचा गृहपाठ चांगला झाला होता. त्यामुळे त्याने सगळी बारीक-सारीक चौकशी केली. बरोबरचे लोकं कसे आहेत, किती चालते आहेस, जेवायला काय असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरी कधी येणार आहेस!

दिनांक १९ जून २०११ (गुंजी ते नबीढांग)

आज पुन्हा १८ किलोमीटर चालायचं होत. नबीढांग कँपवरून ‘ॐ पर्वताचे’ दर्शन होते. डोंगरात पडलेल्या बर्फामुळे त्या पर्वतावर ‘ॐ’ चा आकार निर्माण होतो. दिवस चढेल अशी हवा खराब होते. दर्शन होण्याची शक्यता कमी कमी होते. त्यामुळे लवकरात लवकर पोचण्यासाठी सगळे उत्सुक झाले होते. इतके दिवस चालताना पावसाने अजिबात त्रास दिला नव्हता. गुंजीची सकाळ मात्र पावसाची उजाडली होती. आय.टी.बी.पी. च्या प्रमुख अधिकाऱ्यांनी त्या पावसातच उभं करून पुढच्या प्रवासाची माहिती दिली. शस्त्रधारी जवानांचे फोटो काढू नका. भारतातले फोटो तिकडे चिन्यांना दाखवू नका, अश्या स्वरूपाच्या सूचना दिल्या.

part-06.jpg

रोज सकाळी माझं आवरून होण्याआधीच हजर असणारी सुरेश-रमेशची जोडी आज मात्र गायब होती. थोडा वेळ त्यांची वाट बघितली, पण सगळ्यांनी चालायला सुरवात केली. अशी किती वाट बघणार? त्यामुळे त्यांना मनात शिव्या देत सॅक उचलून चालायला सुरवात केली. खरंतर रस्ता तसा सोपा होता, पण विरळ हवा आणि पाठीला सॅक असल्यामुळे माझी अवस्था वाईट होत होती. गुंजीपासून नबीढांगपर्यंतच्या रस्त्याचे काम चालू आहे. अजून काही वर्षांनी यात्रेचा हा भाग वाहनाने करता येईल. ह्या क्षणी मात्र मी त्या रस्त्याशी झुंजत होते. तेवढ्यात नंदिनीचा घोडेवाला आला. त्याने माझी सॅक घेतली. अजून एक तासभर चालल्यावर सुरेश उगवला. ‘दिदी माफ करना. अलार्म ही नही बजा’ वगैरे सारवासारव करून माझे सामान उचलून चालायला लागला.

part5-07.jpg

part5-8.jpg

आज आमच्याबरोबर सगळ्यात पुढे-मागे दोन-दोन संगीनधारी आणि एक वायरलेसधारी जवान, एक लष्करातील डॉक्टर, लष्करी अधिकारी असा लवाजमा होता. महिला यात्रींच्या सोयीसाठी काही महिला सैनिकसुद्धा ह्या तुकडीत असतात. आता इथून पुढची सगळी वाटचाल अशा लष्करी शिस्तीत आणि देखरेखीत होणार होती.

part5-09.jpg

चालताना उजव्या हाताला खूप दूर बर्फाच्छादित डोंगर दिसत होता. तो म्हणजे छोटा कैलास किंवा आदी कैलास. तिबेटामधील कैलासाची भारतातील प्रतिकृती. तिबेटमध्ये गौरी कुंड आहे. आदी-कैलासच्या पायथ्याशी पार्वती सरोवर आहे. असे एकूण पाच कैलास आहेत. तिबेटामधील महा-कैलास, आदी कैलास, मणी-महेश, किन्नोर कैलास आणि श्रीखंड कैलास. ह्या सगळ्या कैलासांचं दर्शन घेऊन आलेल्या भक्तांना ‘पंचकैलासी’ असं म्हणतात.

आता इतके दिवस सोबत करणारे उंचच उंच वृक्ष आणि हिरवळ विरळ होत असल्याचे जाणवू लागले होते. डोंगरमाथ्याचे हिरवेपण सरत चालले होते. जिकडे बघावे तिकडे हिमाच्छादित पर्वत दिसत होते. वातावरणातील थंडी चांगलीच जाणवत होती. थंडीपासून बचावासाठी सतत हाताचे पंजे, पावले, कान आणि नाक झाकून ठेवा. एकच जड कपडा न घालता पातळ कपड्यांचे एकावर एक थर घाला, अश्या सूचना आम्हाला वारंवार मिळाल्या होत्या.

part5-11.jpg

साधारण तीन तास चालल्यावर दूरवर डोंगरात कालापानी कँप दिसत होता. इथेच ‘व्यास गुहा’ दिसते. ह्याच गुहेत बसून महर्षी व्यासांनी महाभारत लिहील अस म्हणतात. म्हणून ह्या डोंगराला ‘महाभारत पर्वत’ म्हणतात. आज मात्र पावसाची हवा असल्याने हे दर्शन आम्हाला झाले नाही. कालापानी कँपमध्ये कालीमातेचे मंदिर आहे. इथूनच काली नदीचा उगम होतो. ही नदी भारत-नेपाळची सीमा निश्चित करते. कालीमातेच्या दर्शनानंतर आय.टी.बी.पी.च्या जवानांनी सर्वांना गरमागरम चहा दिला. सगळ्या कँपमध्ये स्वच्छता, टापटीप जाणवत होती. एका बंकरमध्ये बसलेल्या अधिकाऱ्यांकडे सर्वांनी आपले पारपत्र सुपूर्द केले आणि इमिग्रेशन फॉर्म भरून दिला. भारतातून बाहेर जाण्याचा शिक्का मारून त्यांनी आमची पारपत्र आम्हाला परत केली.

part5-12

आता उत्सुकता होती ती ‘ॐ पर्वताच्या’ दर्शनाची. पण अजून साधारण दोन हजार फूट चढाई बाकी होती आणि नऊ किलोमीटर अंतर. अजूनही उन्हाचा पत्ता नव्हता. जवान लोक ‘हौसला रखो. अभी मोसम खुला जायेगा.’ असा धीर देत होते. एव्हाना पाऊस थांबला होता पण कडक थंडीचा तडाखा जाणवत होता. विरळ होत चाललेली झाडे, पाने, फुले ह्यांच्याकडे लक्ष देण्याची फार कोणाची मन:स्थिती नव्हती. तरीही सभोवतालचे निरनिराळ्या आकाराचे, रंगांचे डोंगर तसेच इटुकली रंगीबेरंगी फुले लक्ष वेधून घेत होती.

part5-13.jpg

नारंग सर सगळ्यांशी गप्पा मारून मनावरचे दडपण कमी करायचा प्रयत्न करत होते. ते उगीच शिस्तीचा बागुलबोवा करणाऱ्यातले नव्हते. ‘सगळे यात्री वयाने मोठे, समजदार आहेत. आपली आपली जबाबदारी ओळखून चाला', अश्या विचारांचे एल.ओ. मिळाल्यामुळे कोणतीही जबरदस्ती नव्हती.

ज्याच्या दर्शनाची आस घेऊन सगळे धडपडत, घाईघाईने नबीढांग कँपपर्यंत आलो होतो, तो ॐ पर्वत काळ्याकुट्ट ढगांच्या आड गेला होता. थंडगार वारा सुटला होता. ‘जोराच्या वाऱ्याने मळभ जाऊन आता तुम्हाला दर्शन होईल. धीर धरा’ असे जवान, पोर्टर सांगत होते. सगळे कितीतरी वेळ त्या भयंकर थंडीत बाहेर दर्शनाची वाट बघत थांबले होते. पण आज निसर्ग आमच्यावर रुसला होता. काळोख झाला तरी ॐचे दर्शन काही झाले नाही.

part5-15.jpg

दुसऱ्या भल्या पहाटे तीन वाजता चालायला सुरवात करायची होती. इथे जमा केलेले सामान एकदम तिबेटमध्ये मिळणार होत. होते नव्हते ते गरम कपडे चढवून आणि सुरेशभाईला पहाटे वेळेवर येण्यासाठी दहादा बजावून रात्री आठ वाजता झोपायचा प्रयत्न सुरू केला होता. दुसऱ्या दिवशीचा प्रचंड थंडीतला प्रवास कसा झेपणार ह्याची खूप काळजी वाटत होती. खूप वर्ष मी ज्या यात्रेची स्वप्न बघितली, त्या यात्रेचा मोठा टप्पा उद्या संपणार होता. पण त्या विचारांनी आनंद होण्याऐवजी मला आतापर्यंत केलेल्या ट्रेकमध्ये झालेले सगळे त्रासच डोळ्यासमोर येत होते. ‘कशाला ह्या भानगडीत पडलो, उगाच सुखातला जीव दुःखात टाकला’ असे सगळे बिच्चारे विचार मनात येत होते. नंदिनीसुद्धा आज खुशीत नव्हती. आत्ता जर कोणी एकानी रडायला सुरवात केली असती, तर सगळ्यांनी एकमेकांच्या साथीने रडून घेतलं असतं!! पण सुदैवाने तसं काही झालं नाही.

दिनांक 20 जून २०११ (नबीढांग ते लीपुलेख पास)

प्रचंड थंडीमुळे झोप काही फार चांगली लागली नाही. पण पहाटे १.३० वाजता चहा आला. सगळे खडबडून उठले. कसेबसे तोंड धुऊन, प्रातर्विधी उरकून तयार झालो. काल झोपताना बरेचसे गरम कपडे अंगावर चढवून झोपले होते. उरलेसुरले आता चढवले. हातमोजे, कानटोपी, पायात लोकरी मोज्यांच्या दोन जोड्या असा जामानिमा केला. एवढे कपडे थंडीला तोंड देण्यासाठी गरजेचेच होते. पण आधीच हवा विरळ, त्यात हे जाडजूड कपडे घातल्यामुळे श्वास कोंडल्यासारखे वाटत होते. शरीर जागे झाले तरी अजून मेंदू झोपलेला आहे, अशी भावना होत होती.

part5-16.jpg

२.३० वाजता थोडा बोर्नव्हीटा घशाखाली ढकलला. २.३० ही वेळ घरी असताना साखरझोपेची. पण इथे मात्र सगळे कुडकुडत पुढच्या प्रवासासाठी तयार झाले होते. यात्रेत खूप वेळा ५.३०-६.०० वाजता नाश्ता केला होता. पण ही वेळ अगदीच विचित्र होती. यात्रेतील प्रत्येक दिवसागणिक यात्रींचे शरीर आणि मन तेथील प्रदेश, हवामान, वारा, पाऊस, थंडी सगळ्याला तोंड द्यायला तयार झाले होते. यात्रेची सुरवात धारलापासून केली होती. तिथली समुद्रसपाटीपासूनची उंची ३००० ते ४००० फूट आहे आणि आता नबीढांगला जवळजवळ १४००० फुटांवर होतो. आता शेवटच्या चढाईची परीक्षा द्यायची होती.

लीपुलेख खिंड म्हणजे १८००० फुटांच्या वर पसरलेले विस्तीर्ण पठार. भारत आणि तिबेट ह्यांना जोडणारा प्रदेश. त्याच्या दोन्ही बाजूंना आंतरराष्ट्रीय नियमांप्रमाणे सैन्याच्या पहाऱ्याच्या चौक्या सोडल्या तर सगळा निर्मनुष्य प्रदेश आहे. आपल्या बाजूला नबीढांगपर्यंत आणि तिबेटमध्ये सहा किलोमीटरपर्यंत काहीच नाही. बर्फाच्छादित प्रदेशामुळे साधे गवताचे पातेदेखील उगवत नाही. हा अतिशय लहरी हवामानाचा प्रदेश आहे. सकाळी दहानंतर कधीही सोसाट्याचा वारा सुटून हिमवादळाला सुरवात होऊ शकते. जर त्या वादळात कोणी सापडले तर जीवाशीच खेळ. त्यामुळे आपले जवान भारतातून तिबेटकडे जाणाऱ्या आणि तिकडून परत येणाऱ्या बॅचेसना सकाळी साडेसातची वेळ देतात. म्हणजे बॅचेस् सुखरूप तिबेटमध्ये तकलाकोट आणि भारतात नबीढांगला पोचतात. लीपुलेख खिंडीच्या भयंकर थंडीत अर्धा ताससुद्धा थांबणं अतिशय कठीण असत. त्यामुळे दोन्ही बॅचेसनी वेळ पाळणे हे फार महत्त्वाचे असते.

काळोखाचे साम्राज्य सगळीकडे पसरले होते. आकाशात तारे लुकलुकत होते. लष्कराने चालण्याच्या वाटेवर लावलेले दिवे दिसत होते. डोळ्यात बोट घातले तरी दिसणार नाही, अश्या मिट्ट काळोखात चालायला सुरवात केली. प्रचंड हा शब्द कमी पडेल इतकी प्रचंड थंडी होती. लष्कराचे जवान ‘चलिये, भले शाबास, बोलिये ॐ नमः शिवाय’ अस प्रोत्साहन देत होते. थोडं अंतर चालल्यावर पावले हळूहळू जड वाटायला लागली. हृदयाचे जलद गतीने पडणारे ठोके माझे मलाच ऐकू येत होते. पोटातील मळमळ आणि डोकेदुखी जोर धरत होती.

part5-20.jpg

नबीढांग ते लीपुलेख हा यात्रेतील सर्वात कठीण, अवघड प्रवास असे ऐकले-वाचले होते. पण तो इतका अवघड असेल अस वाटलं नव्हत. शेवटी मी फार धोका न पत्करता घोड्यावर बसले. थोड्या चालण्याने थंडीतही घाम फुटला होता. घामावर वारा लागून जास्तच थंडी वाजायला लागली. रात्रीची वेळ, थंडी आणि थकव्याने डोळे मिटू लागले. रमेशभाई सारखा मला उठवत होता. ‘ दिदी, सोना मत. आंखे खुली रखो. ॐ नमः शिवाय' का जाप करते रहो’ अस म्हणत होता. अस पेंगत, उठत असताना हळूहळू उजाडायला लागले. आता झोप उडली. सगळीकडे बर्फच बर्फ दिसत होते. नजर जाईल तिथपर्यंत सगळे डोंगर फक्त बर्फाने झाकलेले होते. सृष्टीतील जिवंतपणाची काही खूण नव्हती.

part5-21.jpg

त्या विरळ हवेची थोडी सवय व्हावी म्हणून बऱ्याच वेळा सगळी बॅच मधूनमधून थांबवत होते. काही वेळात आम्ही भारत आणि चीनमधल्या ‘नो मॅन्स लॅण्ड’ मध्ये प्रवेश केला. जवानांनी आपल्या जवळची शस्त्रे एका जागी ठेवून दिली. एक जवान तिथे थांबला. आमचा काफिला पुढे चालू लागला. एखाद्या चित्रपटात शोभून दिसेल असच दृश्य होत. परदेशात जाण्याचा हा वेगळाच मार्ग होता. निर्वासितांची टोळी पळून चालली आहे असाच ‘सीन’ वाटत होता.

part5-22.jpg

यात्रेसाठी निघण्याआधी मी पुण्यात बँकेत डॉलर घ्यायला गेले होते, ती आठवण आली. डॉलरसाठी अर्ज करताना त्या बरोबर विमानाच्या जाण्या-येण्याच्या तिकिटाची प्रत जोडावी लागते. मी ती अर्थातच जोडली नव्हती. मी त्या अधिकाऱ्याला म्हटलं, ’अहो, पण मी चालत चीनला जाणार आहे!’ त्यांचा चेहरा बघण्यासारखा झाला होता! माझ्याकडे यात्रेसंदर्भातलं विदेश मंत्रालयाचं पत्र होत. तेवढ्यावर त्यांनी मला डॉलर दिले.

part5-23.jpg

साधारण सातच्या सुमारास आम्ही चीनच्या हद्दीवर पोचलो. सुरेश-रमेशच्या जोडीला त्यांचे ठरलेले पैसे व थोडी बक्षिसी दिली. त्यांच्या कष्टांची, सहकार्याची किंमत पैशात करणे अशक्य होते. त्यांनी ‘दिदी, संभालकर जाना. पहाड गिरता है. उपर-नीचे ध्यान रखना. घोडेपे ना बैठनेकी जिद मत करना. ठीकसे वापस आना.’ अश्या खूप आपुलकीच्या सूचना दिल्या. तसं पाहता आमचं अगदी व्यावहारिक नात. पण गेल्या काही दिवसांच्या सहवासानंतर मैत्र जुळले होते. त्यांचा, तसेच आय.टी.बी.पी.चे अधिकारी, जवान, डॉक्टर सगळ्यांचा भरल्या मनाने निरोप घेऊन आम्ही तिबेटकडून येणाऱ्या पहिल्या बॅचेसची वाट बघू लागलो.

part5-30.jpg

थोड्याच वेळात पहिली बॅच आली. आम्ही सर्व यात्रीनी त्याचं ‘ॐ नमः शिवाय’ च्या गजरात स्वागत केले. हे सगळे लोक अतिशय कठीण समजली जाणारी कैलास-मानसची यात्रा यशस्वीरीत्या पूर्ण करून आले, ह्याच कौतुक वाटत होते. सगळे एकमेकांच्या पाया पडत होते. भक्ती आणि भावनांना पूर आला होता. माझ्यासारख्या नास्तिक व्यक्तीलाही ते भारलेलं वातावरण स्पर्श करत होत.

part5-35.jpg

पहिल्या बॅचबरोबर चीनचे लष्करी अधिकारी आले होते. त्यांनी आमची पारपत्रे ताब्यात घेतली. आम्ही डोक्यावरच्या टोप्या, स्कार्फ काढून ओळख पटवण्यासाठी उभे राहिलो. त्यांच्याकडची कागदपत्रे, आमची पारपत्रे सगळं दहा वेळा बघून त्यांनी ‘मी’ खरंच ‘मी’ असल्याची खात्री पटवली आणि आम्ही तिबेटमध्ये पहिले पाऊल टाकले!!

Keywords: 

माझी कैलास-मानस सरोवराची यात्रा भाग-६ (लीपुलेख पास ते दारचेन)

दिनांक २० जून २०११ (लीपूलेख पास ते तकलाकोट)

6-01.jpg

लिपूलेख खिंडीचा खडतर प्रवास संपवून आम्ही चीनच्या हद्दीत आलो होतो. चीनचे काही लष्करी अधिकारी, हिंदी बोलू शकणारे दोन गाईड व त्यांचे मदतनीस आम्हाला चीनमध्ये घेऊन जायला आणि पहिल्या बॅचला भारताच्या सीमेपर्यंत सोडायला आले होते. पहिल्या आणि आमच्या तिसऱ्या बॅचची देवाणघेवाण करताना त्या अडनेड्या जागी चांगलीच गडबड होत होती. चीनच्या अधिकाऱ्यांकडे हातात धरण्यासारखे ध्वनिवर्धक होते. ह्या लहानश्या गोष्टीमुळे त्यांना सगळ्यांना सूचना देणे फार सोपे होत होते.

यात्रींची देवाणघेवाण पूर्ण झाल्यावर आम्ही चालायला सुरवात केली. दोन देशांमधील सीमारेषा तर मानवनिर्मीत आहे. निसर्गाचे दोन भाग तर असूच शकत नाहीत. त्यामुळे ह्याबाजूलाही तसाच बर्फ, तशाच अवघड पायवाटा होत्या. मनात मात्र आपण आपला देश सोडून परक्या देशात आलो आहोत, ही भावना वारंवार येत होती.

असं थोडा वेळ चालल्यावर चांगलीच खोल दरी आली. ती बघून सगळ्यांच्या उरात धडकी भरली. आधीच कालचे जागरण,लीपूलेखपर्यंतचा सगळ्यात खडतर दमछाक करणारा प्रवास आणि प्रचंड थंडीमुळे सगळे अर्धमेले झाले होते. त्यात ती दरी बघून आणखीनच बेजार झाले. पाय गुढघ्यापर्यंत बर्फात रुतत होते. ज्येष्ठ यात्रींची हालत वाईट झाली होती. त्यांचा सारखा तोल जात होता,पडायची भीती वाटत होती, हातातल्या काठीचा आधार पुरत नव्हता. गेले काही दिवस ज्यांच्या भरवशावर यात्रा नीट झाली ते पोर्टर-पोनीवाले मागे राहिले होते. आमच्यातले तरुण-तंदुरुस्त यात्री सगळ्यांना जमेल ती सगळी मदत करत होते. आताचे गाईड व त्यांचे मदतनीस ह्याच भागातले होते. त्यांना बर्फात चालायची सवय होती. परिस्थिती लक्षात आल्याबरोबर त्यांनी महिला, ज्येष्ठ नागरिकांचे हात धरून त्यांना अगदी नीटपणे उतरवायला सुरवात केली. व्यावसायिक सफाईने यात्रींशी गप्पा मारून ते त्यांच्या मनावरचा ताण कमी करत होते.

6-02.jpg

सर्वदूर बर्फ पसरले होते. निळेभोर आकाश, शुभ्र धवल बर्फ आणि लाल, निळे, काळे कपडे घालून त्यावरून धडपडत चालणारे पन्नास यात्री. नजरेत साठवून ठेवावं असच दृश्य होत ते! सगळा प्रदेश निष्पर्ण होता. आजूबाजूला असलेले विस्तीर्ण,तांबूस राखाडी रंगाचे डोंगर लक्ष वेधून घेत होते. काठगोदामला हिमालयातील प्रवास सुरू झाल्यापासून, हिमालयाची वेगवेगळी रूपे दृष्टीस पडत होती. तिबेटमधील लालसर किरमिजी राखाडी रंगाचे उंचच उंच डोंगर हे अजून एक आकर्षक आणि अपरिचित रूप आज दिसत होते.

6-03

मी दोन वर्षांमागे हिमालयात ‘सार पास’ च्या ट्रेकला गेले होते. तिथे बऱ्याच वेळा अशी बर्फाची घसरगुंडी करायला लागते. सुरक्षित उतार दिसल्यावर आम्ही बरेच जण चालणं सोडून बर्फावेरून घसरायला लागलो. मस्त मजा आली. बर्फाचे गोळेही एकमेकांना मारून झाले! दुरूनच यात्रींसाठी असलेल्या जीपगाड्या दिसल्यावर आजची पायपीट संपल्याच जाणवलं. ह्या चार चाकांवर चालणाऱ्या यंत्राशी बऱ्याच दिवसांनी भेट होत होती! आपण पाय न हालवतंसुद्धा आपण पुढे जाऊ शकतो, हा चमत्कारच वाटत होता! लगेचच आम्ही आमच्या बसपाशी पोचलो. आमचं मोठं सामान टपावर चढवून त्यावर ताडपत्री आवळली गेली. सगळे जागा पकडून बसले आणि ‘जेकारे वीर बजरंगी, हर हर महादेव, ’ बोलो ‘ॐ नमः शिवाय, ’ ह्या गजरात बसप्रवास सुरू झाला.

माझ्याकडे असलेल्या श्री. मोहन बने ह्याच्या पुस्तका प्रमाणे आणि विदेश मंत्रालयाच्या माहितीपुस्तकाप्रमाणे हा रस्ता अतिशय खराब,हाडं खिळखिळी करणारा होता. मी आणि नंदिनी ह्या अपेक्षेने सीटसमोरची समोरची दांडी घट्ट पकडून बसलो. पण काय आश्चर्य! तसलं काही झालंच नाही! हाडांचाच काय, हातात धरलेला खुळखुळासुद्धा वाजणार नाही, इतका छान गुळगुळीत रस्ता होता. डोंगरदऱ्यांतून थोडा वेळ प्रवास केल्यावर सपाट प्रदेश आला. दूरवर छोटी छोटी कुरणे, शेती आणि घरे-माणसे दिसायला लागली. घरे जुनाट मातीने माखलेली, बसकी पण बंदिस्त वाटत होती. प्रत्येक घराच्या खिडक्या सुशोभित केलेल्या होत्या.

6-04.jpg

थोड्या वेळात चीन सरकारचे कस्टम ऑफिस आले. तिथे आमचे सगळे सामान क्ष-किरण यंत्रातून तपासले गेले. एखाद-दुसऱ्या यात्रीचे सामान बाहेर काढून तपासले गेले. तिथेच सर्व यात्रींची अंगातल्या तापासाठी तपासणी झाली. हे सगळे सोपस्कार उरकेपर्यंत एक एकदम ‘ब्रेकिंग न्यूज’ आली. प्रत्येक बॅचचा चीनचा ‘ग्रुप व्हिसा’ दिल्लीत होतो. त्याची मूळ प्रत एल. ओ. सरांकडे आणि प्रती प्रत्येक यात्रींकडे असतात. आमच्या एल. ओ. सरांकडे ही प्रतच नव्हती!! ते सगळ्यांना त्यांच्या कडची प्रत बघायला सांगत होते. त्यांना वाटत होत की चुकून मूळ प्रत कोणाला दिली गेली आहे की काय? मी आणि नंदिनी फार म्हणजे फार हुशार! आम्ही आमच्या प्रती दिल्लीत जमा केलेल्या सामानात ठेवून दिल्या होत्या. आता काय होणार आम्हाला काळजी वाटायला लागली. नंदिनी तर म्हणाली, ‘ बहुतेक यात्रेच्या इतिहासातली आपली पहिलीच बॅच असणार आहे, की जी बॅच तिबेटमध्ये आली, बारा दिवस तकलाकोटलाच राहून परत गेली. व्हिसा नसल्याने परिक्रमा नाहीच!!’

6-05.jpg

कस्टमचे सोपस्कार झाल्यावर परत बसमध्ये बसून तासभर प्रवास केल्यावर कर्नाली नदीवरचा पूल ओलांडून आम्ही तकलाकोटला पोचलो. तकलाकोट हे पश्चिम तिबेटमधील पहिले मोठे शहरवजा गाव आहे. कदाचित भारताच्या सीमेवरचे पहिले मोठे गाव असल्यामुळे असेल पण तिथे सरकारी कचेऱ्या, हॉस्पिटल्स, बँका, पोस्ट ऑफिसच्या मोठ्या आणि आधुनिक इमारती दिसत होत्या. रस्ते अगदी प्रशस्त होते.

6-06.jpg

आमच्या राहण्याच्या जागी बस पोचल्यावर बसमध्ये परत एकदा शंकराचा जोरदार जयजयकार झाला. नबीढांगला अपरात्री सुरू झालेला प्रवास तकलाकोटच्या हॉटेलमध्ये संपला होता. प्रत्येक खोलीत दोन यात्री अशी व्यवस्था होती. मला आणि नंदिनीला एक खोली मिळाली. ती खोली अगदी सुसज्ज होती. टॉयलेट, पलंग सगळं काही होत. आम्ही दोघींनी आमचं सगळं सामान पसरून लवकरच त्या खोलीला धर्मशाळेची कळा आणली! कालपासूनच्या प्रवासाचा शीण आता जाणवत होता. बर्फात, पाण्यात भिजलेले दमट कपडे नको झाले होते. गरम गरम पाण्याने मस्त अंघोळी करून आम्ही ताणून झोपलो.

संध्याकाळी बाहेर चक्कर मारायला म्हणून निघालो तर दारात पोलिसांनी अडवलं. ‘व्हिसाचा प्रश्न सुटल्याशिवाय तुम्हाला बाहेर जाता येणार नाही, ’ असं जरा जोरातच बजावलं. सुदैवाने आतच फोनची सोय होती. तिथेच गुपचूप थोड्या डॉलरचे युआनमध्ये धर्मांतर करून घेतले आणि घरी पोचल्याचा फोन केला.

दिनांक २१ जून २०११ (तकलाकोट मुक्काम)

6-07.jpg

चीनच्या आणि भारताच्या वेळेत अडीच तासांचा फरक आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे ‘माउंटन लॅग’ मुळे (मग, आम्हाला जेटलॅग कसा येणार ना? ) पहाटेपासून उठून बसले होते. चहाप्रेमी लोक सारखे किचनकडे खेपा मारत होते, पण त्या आघाडीवर अजून शुकशुकाट होता. अश्या अडनेड्या जागी आपली कॉफीची सोय होणार नाही, हे मी गृहीत धरलेलं होतं. चहावाल्यांची पंचाईत बघून मला आसुरी आनंद होत होता!!

6-08.jpg

6-09.jpg

बऱ्याच वेळाने सर्वांना चहा-नाश्ता मिळाला. आम्ही आता फिरायला बाहेर जाऊ शकतो, असं सांगितल्यामुळे सगळ्यांना हुश्श झालं. आमचा हा ग्रुप व्हिसा फक्त परिक्रमा मार्गापुरता मर्यादित असतो त्यामुळे अर्थातच तकलाकोटच्या बाहेर जायला आम्हाला परवानगी नव्हती. आम्ही १०-१२ जण उत्साहाने बाहेर पडलो. तकलाकोटच्या रुंद, प्रशस्त रस्त्यांवरून रमतगमत चालताना मजा येत होती. भाजी बाजार, निरनिराळी दुकान सगळं फिरलो. एका दुकानावर सलमान खानच पोस्टर पाहून सीमापार असलेली बॉलीवूडची ताकद जाणवली! बाकीच्या किरकोळ खरेदीबरोबर मानसचे पवित्र तीर्थ आणण्यासाठी बऱ्याच जणांनी प्लास्टिक कॅन घेतले.

6-10.jpg

6-11.jpg

6-12.jpg

रस्त्याकडेला पूलची टेबल्स ठेवलेली होती. तिथले तिबेटी तरुण कामाचा वेळ दारू पीत, पूल खेळत वाया घालवीत होते. इथे सगळीकडे पाण्याच्या बाटलीपेक्षा बिअरची बाटली स्वस्त होती. तिबेटची संस्कृती नष्ट करण्याचे हे पद्धतशीर प्रयत्न आहेत की काय, अस वाटत होत. मानसिकदृष्ट्या उद्ध्वस्त, बेकारीमुळे वैफल्यग्रस्त लोकांच्या मनावर ताबा मिळवणे सोपं असणार. तिथे पोस्ट, बँका सगळीकडे चिनी व्यक्तीच कामाला होत्या. त्यांचे कपडे, गणवेश आधुनिक, रुबाबदार होते. तिबेटी लोक मात्र कश्यातरी कपड्यात होते. तिबेटी किंवा चिनी लोकांशी बोलताना ‘दलाई लामा’ ह्या विषयी तिथे चकार शब्द काढू नका, अशी तंबी आम्हाला भारतात दिलेली होती.

6-13.jpg

बराच वेळ फिरून, फोटो काढून, भरपूर खिदळून आम्ही जेवायच्या वेळेला परत आलो. बघतो तर काय, सगळ्या यात्रींनी आज स्वयंपाकघर ताब्यात घेतलं होत. भारतात आधी कुमाउँ निगमच्या लोकांनी आणि नंतर आय. टी. बी. पी. वाल्यांनी आमचे जेवणाचे फारच लाड केले होते. चीनमध्ये इतकी खातिरदारी कोण करणार? तकलाकोटला निदान चीन सरकारची मंडळी जेवण-खाण पुरवतात. पुढे परिक्रमा मार्गात यात्रींना आपली सोय करावी लागते. भारतात असताना सगळीकडे यात्रींना कांदा-लसूण नसलेलं जेवण देतात. इथे आमच्यासाठी जरी शाकाहारी बेत असला, तरी एरवी किचन चिन्यांच्या ताब्यात होत, तेव्हा ते काय काय शिजवत असतील कोण जाणे? जेवण देत होते तेसुद्धा भात, सूप, न्युडल्स अस. ज्यांनी कधीच चायनीज जेवणाची चव घेतली नव्हती, त्या लोकांची फारच पंचाईत होत होती. किचनमधली स्वच्छताही अशीतशीच होती. आमच्यातल्या कट्टर शाकाहारी लोकांना काही ते सहन होईना. त्यांनी चक्क भाजी, भात, पोळ्या करायचा बेत केला होता. सगळे मिळून काम करत होतो, त्यामुळे हसतखेळत स्वैपाक तयार झाला. नंतर जेवायलाही मजा आली.

6-14.jpg

6-15.jpg

6-16.jpg

6-17.jpg

परिक्रमेतील व्यवस्थेसाठी चीन सरकार ७५० अमेरिकन डॉलर्स घेते. त्यांचे ते देणे दिले. परिक्रमांसाठी पोर्टर, पोनीवाला आणि वरखर्चाला लागणारे यूआन घेण्याचे काम केले. पुढच्या कँपवर पूर्ण बॅचची राहण्याची सोय होऊ शकत नाही. मग मोठ्या बॅचेस् दोन ग्रुपमध्ये विभागतात. आता सगळ्या बॅचची छान एकी झाली होती. ताटातूट नको होती. नारंग सरांच्या मध्यस्तीने आणि ५० जणांचीच बॅच असल्याने, सगळ्या ग्रुपने एकत्र परिक्रमा करायच्या ठरल्या. त्या आनंदात विश्रांतीचा दिवस संपला.

दिनांक २२ जून २०११ (तकलाकोट ते दारचेन)

सकाळी सगळे लवकर उठून नाश्ता आटोपून वेळेवर बसमध्ये जाऊन बसले. आयुष्यात कधीतरीच येणाऱ्या अनुभवाला आपण सामोरे जाणार आहोत, ही उत्सुकता सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होती. सगळ्यांनाच हुरहूर लागली होती. कैलासाची परिक्रमा कशी होईल? पुढचा प्रवास झेपेल का? डोल्मापासची १९,५०० फुटांची चढण आपण पार करू शकू ना? विरळ हवेचा त्रास होऊन काही वाईट परिस्थिती उद्भवली तर? असे असंख्य विचार मनात येत होते.

बसच्या खिडकीतून सगळे बाहेर बघत होते. तिथले ते काहीसे उजाड पण अत्यंत सुंदर दृश्य डोळ्यात, कॅमेऱ्यात साठवून घेत होते. तेवढ्यात बाहेर गर्द निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर उठून दिसणारा, खूप उंचच उंच शुभ्रधवल पर्वत सकाळच्या कोवळ्या उन्हात चमकताना दिसला. तो गुर्लामांधाता पर्वत असल्याचे आमचा गाईड टेम्पाने सांगितले. तिबेटी राजा मांधाता ह्याने मानससरोवराच्या काठाशी शंकराची अत्यंत खडतर तपश्चर्या केली, म्हणून त्या पर्वताला गुर्लामांधाता पर्वत म्हणतात, असे कळले. हा पर्वत २५००० फूट उंच आहे.

6-18.jpg

हे अवर्णनीय दृश्य डोळ्यासमोरून हालत नाही, तोच दूर क्षितिजापर्यंत पसरलेला निळ्याशार पाण्याचा प्रचंड जलाशय दिसू लागला. आधी आम्हाला वाटलं की हेच ‘मानस सरोवर’, पण हा होता राक्षसताल! बर्फाच्छादित पर्वतांच्या पार्श्वभूमीवर एखाद्या नीलमण्यासारखा चमकणारा राक्षसताल अप्रतिम सुंदर दिसत होता. हा प्रचंड तलाव रावणाच्या हृदयापासून झाला अस म्हणतात. ह्याचे पाणी मानससरोवरापेक्षा थंड आहे. म्हणून ह्याला ‘रावणहृदय’ आणि ‘अनुतप्त’ अशीही नाव आहेत. राक्षसतालचे पाणी विषारी आहे,असा समज आहे. त्यामुळे इथले पाणी पीत नाहीत किंवा इथे स्नानाची प्रथा नाही. काही जणांच्या म्हणण्याप्रमाणे हे पाणी मानसिक रोगांवर उपयोगी असते. राक्षसतालच्या काठावर आणि इतर अनेक ठिकाणी दगडांवर दगड ठेवून घर बांधलेली दिसतात. इथे असं घर बांधलं तर आपलंही घर होतं असं समजतात.

6-19.jpg

6-20.jpg

राक्षसतालच्या काठाशी त्या नितांत सुंदर पाण्याकडे बघत शांत बसून राहावेसे वाटत होते. पण आमचे गाईड घाई करायला लागल्यावर बसमध्ये बसलो. कैलास पर्वताचे दर्शन अजून झाले नव्हते. अनुभवी यात्रींनी आम्हाला कैलासाची दिशा दाखवली. सगळे नजर ताणून तिकडे बघत होते. पण अजून ढगांचा पडदा होता. आमच्या सुदैवाने हळूहळू तो पडदा हालला! काही वेळातच कैलास पर्वताचे सुरेख दर्शन होऊ लागले! माझा तर डोळ्यांवर विश्वास बसेना. ह्याच कैलास पर्वताचे कितीतरी फोटो, व्हिडिओ मी बघितले होते. यात्रेवरची जी पुस्तकं मिळतील ती हपापल्यासारखी वाचली होती. तो कैलास पर्वत मी खरंच बघत होते?

6-21.jpg

सर्व यात्रींनी मनापासून हात जोडले. पहिल्याच दिवशी उत्तम दर्शन झाल्यामुळे आता परिक्रमाही नीट होईल अशी उभारी वाटू लागली.

राक्षसताल आणि कैलास पर्वताच्या दर्शनाची धुंदी उतरण्याआधीच आम्ही मानस सरोवराजवळ पोचलो. बरेचसे यात्री लगेचच स्नानाला पाण्यात उतरले. तिथे कपडे बदलण्याची काहीच सोय नव्हती. पुढे परिक्रमेत तीन-चार दिवस मानसच्या काठाशी राहायचं होतच. तेव्हा करू अंघोळ, असा विचार करून मी आणि नंदिनी काठाकाठाने फिरू लागलो. नितांत सुंदर सरोवर आणि निरव शांतता.

6-22.jpg

मानस सरोवर समुद्रसपाटीपासून १५००० फूट उंचीवर आहे. हे जगातील सर्वाधिक उंचीवरचे गोड्या पाण्याचे हे सरोवर, हिंदूंचे तसेच तिबेटी लोकांचे पवित्र तीर्थस्थान आहे. ह्यात अंघोळ केल्याने गेल्या १०० जन्मांची पापे नष्ट होतात व माणूस जन्म-मृत्यूच्या फेऱ्यांमधून मुक्त होतो, असे समजले जाते. हे सगळं खरं असलं, तरी चिनी लोकांसाठी मात्र हे फक्त एक सहलीचे ठिकाण असावे,ह्याचा पुरावा काठावर पडलेल्या बिअरच्या बाटल्यांच्या ढिगावरून मिळत होता.

6-23.jpg

6-24.jpg

सर्वांची स्नान-पूजा आटोपल्यावर आम्ही सगळे दारचेनच्या रस्त्याला लागलो आणि थोड्या वेळात तिथे पोचलोही. तकलाकोटचा कँप तर छान होता. दारचेनचा तेवढा छान नाही, पण फार वाईटही नव्हता. एकेका खोलीत तीन-चार यात्रींची सोय सगळ्यांनी समजुतीने करून घेतली. राहण्याची जागा नवीन बांधलेली दिसत होती. प्लास्टरचा ओला वास येत होता. नेपाळमार्गे किंवा भारतातून, कुठूनही यात्रेसाठी आलात, तरी दारचेनपासूनचा पुढचा रस्ता एकच असतो. त्यामुळे यात्रींच्या नव्या हंगामाआधी बांधकाम भराभर संपवलेलं दिसत होत. कुठल्याही प्रकारच नुकसान झाल्यास भरून द्यावं लागेल, अशी सज्जड तंबी मिळाली होती. एका यात्रींनी त्यांची खिडकी ‘युवानं’ मध्ये फोडल्यामुळे, चीनमध्ये काचांचा व कामगारांचा खर्च किती आहे, हे सगळ्यांना नीट आणि सुस्पष्ट कळलं! बाकी कोणी नंतर खिडक्यांना हात लावायचीही हिंमत केली नाही.

6-25.jpg

बाहेर फोन करायला गेलो, तर काय! बाहेर तिबेटी तुळशीबाग भरली होती. बऱ्याच तिबेटी बायका आपल्या पारंपरिक वेषात आल्या होत्या. सगळ्यांजवळ मण्यांच्या माळा, चाकू आणि इतर तिबेटी वस्तू होत्या. भाषेचा मोठा प्रश्न होता. पण सगळ्यांकडे कॅलक्युलेटर होते. त्यावर ती अक्का लिहायची ‘१००’, लोक लगेच ‘३०’ पुन्हा अक्का ‘९५’! शेवटी सौदा ५० युआनवर तुटायचा!

6-26.jpg

दिल्लीत यात्रींच्या वेगवेगळ्या समित्या करतात. त्यात किचन कमिटी, लगेज कमिटी, हिशेब कमिटी असे प्रकार होते. लगेज कमिटीवाले सामानाचे नग मोजून देतात आणि घेतात. सगळ्यांकडून काही रक्कम सामायिक खर्चासाठी घेतली होती. त्यात भाज्या फळांची खरेदी, स्वैपाकी इत्यादींचे पगार, व्यवस्थेतील लोकांची बक्षिसी व्हायची. ते हिशेब ठेवायचं काम, हिशेब कमिटीकडे होत. किचन कमिटीवाले स्वैपाकाला लागणारा शिधा काढून देण्याचं काम करतात. मी, नंदिनी ‘उनाडक्या कमिटीत’ होतो. एकट्या आलेल्या बायकांना कुठलंही काम सांगणं, पब्लिकला आवडत नव्हत! उत्तम! आम्ही उनाडक्या करायला मोकळ्या!

6-27.jpg

ह्या कँप पासून जेवणाची व्यवस्था यात्रींना आपली आपण करावी लागते. त्या साठी लागणारा कोरडा शिधा , दिल्लीतल्या काही स्वयंसेवी संस्था नाममात्र किमतीला देतात. भाजी वगैरे तकलाकोटला खरेदी केली होती. दोन नेपाळी स्वैपाकी आणि दोन मदतनीस बरोबर घेतले होते. पहिल्याच दिवसापासून आमच्या स्वैपाक्याने आपले रंग दाखवायला सुरवात केली. पुढे तकलाकोटला परत येईपर्यंत त्याने कधी हळद जास्त, कधी तिखट जास्त. रोज वेगळी चव! आजची कल्पना तो उद्याला वापरत नसे. एकूण सगळ्या अवधीतल्या त्याच्या स्वैपाकाची बेरीज केली तर स्वैपाक उत्तम होता. पण रोजचा स्वैपाक ‘कभी जादा, कभी कम’ ह्या तत्त्वावर असायचा.

6-28.jpg

6-29.jpg

आमच्या खोल्यांना पडदे नव्हते. अमावास्या जवळ येत होती. रात्री खिडकीतून बाहेर बघितलं की अक्षरशः आभाळात चांदण्याचा सडा पडल्यासारखा वाटत होता. इतकी स्वच्छ हवा, निरभ्र आकाश आणि सुरेख चांदणं! हात लांबवला तरी चांदण्या हाताला येतील अस वाटत होत. आम्ही कितीतरी उशीरापर्यंत भान हरपून ते दृश्य पाहत होतो! पुण्याहून निघाल्यापासून आतापर्यंतचे वाटणारा एकटेपणा,मुलाला सोडून आल्याची बोच सगळं सगळं ह्या चांदण्याचा शांत प्रकाशात पार विरघळून गेलं!!

Keywords: 

माझी कैलास-मानस सरोवराची यात्रा भाग-७ (परिक्रमा महाकैलासाची)

दिनांक २३ जून २०११ (दारचेन ते डेरापूक)

7-01

आज आमची कैलास परिक्रमा सुरू होणार होती. परिक्रमा मार्गावर फोनची सोय नाही. त्यामुळे सगळ्यांनी घरी फोन करून आपापली खुशाली कळवली. परिक्रमा संपवून पुन्हा दारचेनला आलो, की नंतरच घरच्यांचा आवाज ऐकायला मिळणार होता. तीन दिवसांनी पुन्हा ह्याच कँपवर येणार होतो. त्यामुळे परिक्रमेच्या तीन दिवसाकरता लागेल तितकेच सामान लहान सॅकमध्ये घेतलं होत. बाकीचं सामान इथे दारचेनला ठेवलं होतं.

7-02.jpg

२०,२१,२२ जून तीन दिवस आराम झाला होता. आता परत चालायला सुरवात करायची होती. हे चालणं साधं-सरळ नव्हतं, खूप कठीण होतं. तीन दिवसांच्या आणि ५४ किलोमीटरच्या परिक्रमेला दारचेन ह्या १५५५० फुटांवर असलेल्या कँपपासून सुरवात होते. परिक्रमेचा पहिला मुक्काम २२ किलोमीटर दूर फुटांवरील डेरापुक ह्या ठिकाणी असतो. त्या जागेची समुद्रसपाटीपासून उंची १६३०० आहे.परिक्रमेतील सगळ्यात उंच ठिकाण म्हणजे ‘डोल्मा पास’ किंवा ‘पार्वती शीला’ १८६०० फुटांवर आहे. एव्हरेस्ट बेस कँपची उंची १७,६०० फूट आहे. म्हणजे आम्ही एव्हरेस्ट बेस कँपपेक्षाही जास्त उंची गाठणार होतो. दारचेनच्या आधीपासूनच कैलासपर्वताचे दर्शन व्हायला सुरवात होते.

7-03.jpg

दारचेन कँप गाठेपर्यंत आमच्या बॅचमधील सर्व यात्रींची तब्येत उत्तम होती. किरकोळ खरचटणे किंवा पायाला चालून-चालून फोड येणे ह्याव्यतिरिक्त कोणाला काही झाले नव्हते. आमच्या बॅचमध्ये दोन डॉक्टर होते. पण अजून त्यांना आपले कौशल्य दाखवायला काही संधी मिळत नव्हती. पण देवाला सगळ्यांची काळजी असते! दारचेनला आल्यापासून डॉक्टरांना भरपूर काम मिळायला लागलं. तकलाकोट कँपचं अस्वच्छ स्वयंपाकघर, गाठलेली उंची, विरळ हवा ह्या सगळ्या कारणांनी एक-एक भिडू गारद होऊ लागला. सगळ्यात पहिला मान आमचे चित्रकार तावडेजी ह्यांनी मिळवला. दारचेनला रात्री त्यांचं पोट भयानक दुखायला लागलं. सगळे काळजीत. डॉक्टर, एल.ओ.सर सगळ्यांची पळापळ. त्यांना खूपच त्रास होत होता. पण त्यांनी जिद्दीने परिक्रमेला येण्याचं ठरवलं. बाकीचे यात्री मदतीला होतेच. मलासुद्धा खूप अशक्तपणा जाणवत होता. अगदी थोडंसं अंतर चाललं, तरी भलामोठा डोंगर चढल्यासारखा थकवा येत होता. परिक्रमेचे ५७ किलोमीटर चालणं अशक्य वाटत होतं. जिथे घोड्यावर जाता येईल तिथे घोड्यावरून जायचं असं मी मनाशी ठरवून टाकलं. अती विरळ हवेचे फार भयानक परिणाम होऊ शकतात. तो धोका पत्करण्यात काही अर्थ नव्हता.

दारचेन कँपचा नियम असा होता, की खोलीच्या किल्ल्या हव्या असतील, तर १०० युवान डिपॉझिट ठेवायला लागणार होत. ‘कुठे एक रात्रीसाठी उपद्व्याप,’ असा विचार करून आम्ही काही किल्ल्या घेतल्या नव्हत्या. पण आमच्या नारंग सरांनी घेतल्या आणि रीतसर हरवल्या सुद्धा!! सरांची मजामजा चालली होती. पण अश्या त्यांच्या गमतीशीर वागण्यामुळे संपूर्ण यात्रेत ते आम्हाला आमच्यातलेच एक वाटले. सगळ्यांबरोबर गप्पा करणारे, फिरायला जाणारे, गोंधळ घालणारे! ते कोणीतरी मोठे ऑफिसर आणि आम्ही यात्री, अस वातावरण नव्हतं.

सकाळी कसली तरी संशयास्पद भाजी आणि पुऱ्या खाऊन आम्ही दारचेन कँप सोडला. कैलास परिक्रमा संपवून आम्ही इथे एक रात्र राहणार होतो. नंतर मानसची परिक्रमा करून तकलाकोटला परत जाणार होतो. बसमधून साधारण अर्धा-एक तास गेल्यावर ‘यमद्वार’ ही जागा आली. ह्या जागेपासून परिक्रमा सुरू होते. ह्याचा शब्दशः अर्थ ‘यमाचा दरवाजा’ असा होतो. इतर अनेक ठिकाणी दिसलेल्या तिबेटी-बौद्ध धर्मात महत्त्वाच्या असलेल्या पताका यमाद्वार येथेही होत्याच. त्या पताकांना ‘तारबोचे’ असा शब्द आहे. ह्या पताका उंच काठीवर असतात किंवा मग एका जागी सुरू होऊन लांबलचक पसरतात. त्यांचे रंग आणि क्रम ठरलेला असतो.निळा, पांढरा, लाल, हिरवा आणि पिवळा असे रंग ह्याच क्रमाने असतात. त्यांचा संदर्भ आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी ह्या पंचमहाभूतांशी असतो.

7-04.jpg

यमद्वारला सर्व यात्रींनी प्रदक्षिणा घातल्या. थोडी पूजा-अर्चा झाली. इथून बस परत जाणार होती. आमचे दोन गाईड ‘तेम्पा’ आणि ‘डिंकी’ मात्र आमच्यासोबत होते.

7-05.jpg

तिथेच पोर्टर आणि पोनीवाले गोळा झाले होते. सगळ्यांना पोर्टर-पोनी मिळाल्यावर वाटचाल सुरू झाली. हवा अगदी स्वच्छ होती. आभाळ निळेभोर दिसत होते. डाव्या बाजूला लांछू नदी आणि उजव्या बाजूला कैलास पर्वताचे सतत दर्शन होत होते. लांबपर्यंत रस्ता दिसत होता.

7-05.jpg

7-06.jpg

माझी तब्येत ठीक नसल्याने मी घोड्यावर बसले होते. भारतातले आमचे पोर्टर-पोनीवाले फार आपुलकीने, प्रेमाने वागायचे. इथे तसं चित्र नव्हतं. एक तर भाषेचा मोठा अडसर होता. त्यातून एकूण मामला तीनच दिवसांचा. नंतर कोण तुम्ही कोण आम्ही? त्यामुळे पोर्टर-पोनीवाल्यांकडून घोड्यावर बसताना-उतरताना मदत न करणे, यात्रींना घोड्यावर बसायचं असेल तेव्हा गायब होणे, पाण्याची बाटली भरून आणायलाही नकार देणे, असले प्रकार वारंवार होत होते. चालताना घोड्यांची आपसात आपटा-आपटी झाली, तरी पोनीवाले थंड! ह्या सगळ्यात यात्रींची मात्र घाबरगुंडी व्हायची.

7-07.jpg

सगळा वाळूचा, दगडधोंड्यांचा प्रदेश होता. जागोजागी जुन्या बौद्ध गुहांचे भग्न अवशेष विखरून पडले होते. मोठ्या झाडांच्या अनुपस्थितीत सगळा भाग काहीसा वैराण, रुक्ष वाटत होता. आपल्या डोळ्यासमोर सृष्टीसौंदर्याची एक ठाशीव कल्पना असते. घनदाट झाडी, समृद्ध जंगल असं काहीही नसतानासुद्धा हा सगळा प्रदेश कल्पनातीत सुंदर होता. स्तब्ध, शांत सौंदर्य! प्रदूषण, धूर ह्या शब्दांचा अर्थही विसरायला होईल इतकी स्वच्छ हवा होती. त्या अनुभूतीच वर्णन शब्दात करणं, मला खरंच शक्य नाही. ती ज्याची त्याने अनुभवायची अशी गोष्ट आहे.

7-08.jpg

7-09.jpg

आजचा रस्ता ८ किलोमीटरचा होता. साधारण दोन-अडीच तासानंतर कँप दिसायला लागला. रस्त्यात एक छोटासा झरा होता. थोडं पाणी साठलं होतं. त्याच्या अलीकडे पोनीवाल्याने उतरवलं. तिथून कँपपर्यंत जेमतेम पंधरा मिनिटांचा रस्ता होता. तेवढाही मला जड झाला. पाय ओढत, धापा टाकत कशीतरी कँपपर्यंत पोचले. ह्या कँपपासून चार किलोमीटर गेल्यावर ‘चरणस्पर्श’ ही जागा आहे. कैलास पर्वताच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याची ही जागा. इथे पोनीवाले येत नाहीत. मला अजिबात चालण्याचे त्राण नव्हते. त्यामुळे जीवावर दगड ठेवून मी न जायचा निर्णय घेतला. आमच्यापैकी वीस लोक जाऊन आले. त्यांचे फोटो पाहून अजूनही काळजात एक कळ येतेच. पण त्या संध्याकाळपासून माझं पोट पारच बिघडलं. चरणस्पर्शला जाऊन कदाचित अजून त्रास झाला असता, अशी स्वतःची समजूत करून घेण्यापलीकडे आता काही करू शकत नाही. असो.

7-10.jpg

उद्या ह्या यात्रेतला सर्वात उंच भाग ‘डोल्मा पास’ किंवा ‘पार्वती शीला’ गाठायची होती. त्याची खूप काळजी वाटत होती. भरीत भर म्हणून पोटाच्या त्रासाने सारखं उठावं लागत होतं. अशी ती रात्र कशीबशी ढकलली.

दिनांक २४ जून २०११ (डेरापूक ते झोंगझेरबू)

पहाटे पहाटे आमचे पोर्टर-पोनीवाले आले. भाषा येत नसल्याने सगळा खाणाखुणांचा मामला! सगळे तिबेटी चेहरे सारखेच वाटतात, त्यामुळे पहाटेच्या अंधुक प्रकाशात धमाल उडाली होती. शेवटी यात्री आणि त्यांचे मदतनीस ह्यांची जुळवाजुळव होऊन सगळे मार्गस्थ झाले.

अजूनपर्यंतच्या यात्रेतील लीपूलेख खिंडीचा रस्ता सगळ्यात अवघड असे वाटत होते. पण डोल्मापास हा त्याहूनही कठीण असे अनुभवी यात्री सांगत होते. सगळ्या प्रवासातील उंच म्हणजे १८६०० फूट आणि सगळ्यात दूरचा पल्ला २५ किलोमीटर आज पार करायचा होता. त्यात भरीला भर म्हणून ह्या सर्व प्रदेशातील लहरी हवामानाचा प्रदेश म्हणूनदेखील ह्या डोल्मापासची ख्याती आहे. बघता बघता कधी हिमवादळ आणि हिमवर्षाव सुरू होईल ह्याचा काही नेम नसतो. अनेक भाविकांना ह्या लहरी वातावरणाचा फटका बसल्याने आपली परिक्रमा अर्धवट टाकून परत फिरावे लागल्याची अनंत उदाहरणे आहेत. रस्ता तर चालायला अवघड आहेच, त्यात विरळ हवा आणि वादळ-वाऱ्याची टांगती तलवार असल्याने सर्वात कठीण प्रवास समजला जातो.

7-11

कडाक्याची थंडी पडली होती. त्या प्रचंड थंडीत, बोचऱ्या वाऱ्यात कोणी पायी चालत तर कोणी घोड्यावर बसून मार्गस्थ झाले. चालणाऱ्या लोकांना थोडी ऊब तयार होते. घोड्यावर बसणारे मात्र काकडून जातात. थंडीने मग झोप येते, डोळे मिटायला लागतात. त्याच्यावर उपाय म्हणून सगळे ‘ॐ नमः शिवाय’चा जप करत राहतात. डोल्मापासचे उंचच उंच कडे पार करताना सगळ्यांची दमछाक होत होती. एकामागून एक डोंगर-दऱ्या आम्ही पार करत होतो. रस्ता काही संपत नव्हता. रस्ता अतिशय खडकाळ, डोंगराळ, उभ्या चढणीचा असल्याने श्वास फुलत होता. कापराचा वास घेत घेत श्वास काबूत आणायचा प्रयत्न सगळेच करत होते.

हवा आजही छान होती. त्याबाबतीत आम्ही अगदी नशीबवान होतो. यात्रा सुरू झाल्यापासून हवा बहुतेक दिवशी चांगली होती. रेनकोट वापरायची वेळ फारशी आली नव्हती.

7-12.jpg

पुण्यात फिरताना जिकडे तिकडे पर्वती दिसते, तसंच डोंगरांच्यामधून कैलास पर्वताचे दर्शन होत होते. परिक्रमेत सगळ्या बाजूंनी कैलास पर्वताचे दर्शन होते. अर्थातच ही कैलासाची प्रदक्षिणा असते. आपण त्यावर चढाई करत नाही. बऱ्याच वर्षांपूर्वी काही परदेशी गिर्यारोहकांनी हा पर्वत पादाक्रांत करायचा प्रयत्न केला होता. पण त्यांना त्यात यश आलं नाही. आता मात्र पर्वताचे पावित्र्य लक्षात घेऊन चीन सरकार त्यावर चढायची परवानगी नाकारते.

माझी तब्येत ठीक नव्हती, पोट पारच बिघडलं होत. विरळ हवेमुळे हा त्रास इथे बऱ्याच जणांना होतो. थंडी, अशक्तपणा आणि श्वास घेताना होणारा त्रास ह्याने मी अगदी मेटाकुटीला आले होते. मला माझ्याच श्वासोच्छ्वासाचा आवाज येत होता. पाठीतून कळा येत होत्या. इच्छाशक्तीच्या जोरावरच मी आणि माझे सहयात्री चाललो होतो.

7-13

पुढे जाता जाता आजूबाजूला सर्वत्र जुन्या कपड्यांचा खच पडलेला दिसायला लागला. आपल्याकडील जुन्या वस्तू इथे टाकल्या की आपले दारिद्र्य इथे राहते आणि पुढील आयुष्यात आपल्याला समृद्धी येते असा तिबेटी लोकांचा समज आहे, त्यामुळे ते आपल्या वस्तू इथे टाकतात. कोणाच्या काय चालीरीती, समज असतील ते सांगता येत नाही. पण ह्या सगळ्यातून तिथले प्रदूषण, कचरा मात्र वाढतो आहे हे नक्की.

कैलास पर्वताच्या उत्तर भागाचे दर्शन होत होते. दिवस वर आल्यामुळे आता शिखर चांदीने मढवलेले वाटत होते. पुढे काही अंतर गेल्यावर डोंगरावर सर्वत्र लहान-मोठे दगड एका विशिष्ट आकारात रचलेले दिसत होते. बरोबरचे तिबेटी लोक तिथे प्रार्थना करत होते. तिथे आपल्या पूर्वजांचे स्मरण करून, त्यांना सद्गती मिळावी अशी प्रार्थना केल्यास त्यांच्या आत्म्याला शांती मिळते अशी समजूत असल्याचे कळले.

7-14.jpg

ह्या सगळ्या जागांना महाभारतातील संदर्भ आहेत अस म्हणतात. मी तिथे ऐकलेल्या गोष्टीप्रमाणे, सर्व पांडव द्रौपदीसह ह्या परिक्रमेसाठी आले होते. यमाद्वार येथे द्रौपदीचा मृत्यू झाला. भीमाने विचारले,’ ही का पडली?’ युधिष्ठिराने सांगितले,’ तिने मनापासून प्रेम फक्त धनंजयावर केले म्हणून. तू पुढे चल’. असे एक-एक पांडव कैलास परिक्रमेत मृत्यू पावले. उरला फक्त युधिष्ठिर आणि त्याच्या बरोबर सुरवातीपासून चालणारा कुत्रा. परमेश्वराने कुत्र्याला स्वर्गात येता येणार नाही, असे सांगितल्यावर धर्मराजाने एकट्याने स्वर्गात जायला नकार दिला. शेवटी दोघेही स्वर्गात पोचले.

7-15

लवकरच आम्ही डोल्मापासला पोचलो. त्या शीळेला असंख्य रंगीबेरंगी पताका लावल्या होत्या. तिथल्या निळ्याभोर आकाशाच्या पार्श्वभूमीवर त्या पताका, समोर दिसणारा पांढराशुभ्र कैलास पर्वत! ते सगळं दृश्य इतकं विलोभनीय होत, की अजूनही ते आठवून अंगावर रोमांच उभे राहतात. सर्व यात्रेकरू, तिबेटी लोक तिथे भक्तिभावाने प्रार्थना करत होते. आम्ही मराठी यात्रींनी मिळून तिथे ‘दुर्गे दुर्घट भारी, तुजविण संसारी’ ही आरती जोरात म्हणून मराठी आवाज घुमवला!

7-d

ती शिळा म्हणजे पार्वतीने शंकराला प्रसन्न करण्यासाठी जिथे बसून प्रार्थना केली होती, तेच स्थान. पूजाअर्चा झाल्यावर सगळे तिथे शांत बसले होते. पण अजून बराच पल्ला बाकी होता. तिथे हवा अत्यंत विरळ असल्याने आणि हवामानाचा भरवसा नसल्याने फार वेळ थांबणं धोक्याच होत. नारंग सर ज्यांची पूजा झाली, त्यांना पुढे पाठवत होते.

7-16

पुढचा रस्ता उताराचा होता. तो चालतच पार करायचा होता. इतक्या वळणांच्या, खडकाळ रस्त्यावर घोड्यावर बसणं, फार धोक्याच होतं. त्या उतरणीच्या रस्त्यावर पांढरा-वीस मिनिटे चालल्यावर एका दरीमध्ये पाचूसारख्या चमकत्या हिरव्यागार रंगाचे ‘गौरी कुंड’ दिसायला लागले. मी उभी होते, तिथून त्या दरीची खोली एक-दीड हजार फूट तरी असेल. आकाराने साधारण दोनेक किलोमीटरचा परिसर असेल. चारही बाजूंनी उंच, भव्य पर्वत होते. हे सरोवर उमेसाठी शंकराने निर्माण केले अशी आख्यायिका आहे.

7-17

सगळे यात्रेकरू गौरीकुंडाचे पाणी पवित्र तीर्थ म्हणून घरी घेऊन जातात. पण तिथपर्यंत पोचण्याचा रस्ता खोल जाणारा, खडकाळ आणि वितळलेल्या बर्फामुळे अजूनच निसरडा झालेला होता. बरोबरचे पोर्टर-पोनीवाले पाच युआन घेऊन तीर्थ आणून देत होते. आमच्या बॅचमधले काही हौशी लोक आणि नारंग सर खाली उतरून गेले. बाकी आम्ही जनरल पब्लिक पुढे चालायला लागलो. उताराचा रस्ता असला तरी चांगलाच थकवा जाणवत होता. नदी काठाला कोरडा भाग बघून सगळे थांबले. जवळचा सुका मेवा, बिस्किटे असं थोडं खाऊन घेतल्यावर जरा तरतरी आली. थोडी विश्रांती आणि पोटात पडलेलं अन्न ह्यांनी जरा ताजेतवाने होऊन झोंगझेरबूकडे चालायला सुरवात केली.

7-18

7-19

थोड्याच वेळात पोनीवाले येऊन पोचले. घोड्यावर बसून आरामात इकडे तिकडे बघत सरळ-सपाट रस्त्यावरून जाऊ लागले. नदीच्या किनाऱ्याने, कधी खडकाळ पायवाट, कधी चिखल, कधी झरे असा रस्ता होता. चालताना कितीही जपलं तरी बूट ओले झालेच होते. पायांना संवेदनाच नव्हती. एका जागी दोन यात्री थांबले होते.

त्यांनी हात केल्यावर मीही त्यांच्याजवळ जाऊन बसले. सुरवातीचं, आता सवयीचं झालेलं 'ॐ नमः शिवाय' झाल्यावर त्यातले एकजण म्हणाले, 'कलसे देख रहा हुं, आप घोडेपे जा रहे हो, क्या हुआ? लीपूलेखतक तो आप अच्छेसे पैदल चल रहे थे?' मी तब्येतीचं कारण सांगितल्यावर ' अरे, सबका यही हाल हैI कोई नहीं, आप तो बडे बहादूर हो, अकेले इतनी दूर आये होI अभी हमारे साथ चलियेI' त्यांच्या ह्या आश्वासक बोलण्यावर खूष होऊन मी त्यांच्याबरोबर चालायला लागले. थोडं चालल्यावर त्यांनी 'महाराष्ट्रकी लेडीज तो झासी की रानीयाँ होती है, बडी बहादूर!' असं म्हणून मला फार म्हणजे फार म्हणजे फारच खूष केलं! त्या वाक्यावर मी उरलेलं अंतरही चालू शकले!

ह्याच रस्त्याने येताना आमच्या बॅचमधले ७० वर्षांचे कालरा अंकल घोड्यावरून चांगलेच जोरात पडले, अशी वाईट बातमी कँपवर पोचल्यावर पोचली. जवळचे यात्री, पोनीवाले सगळेच मदतीला धावले. तिघा-चौघांनी मिळून त्यांना परत घोड्यावर बसवलं. उत्साही, सर्वांशी मिळून-मिसळून वागणाऱ्या काकांची अवस्था केविलवाणी झाली होती. त्यांच्या कमरेला चांगलाच मार लागला होता. वेदनाशामक गोळ्या दिल्या, स्प्रे मारला.

असा हा आमचा अक्षरशः तोंडाला फेस आणणारा प्रवास दुपारी एकदाचा संपला.

दिनांक २५ जून २०११ (झोंगझेरबू ते दारचेन)

7-20.jpg

आधीच्या रात्रीसुद्धा मला पोटाचा त्रास होत होताच. माझ्यामुळे नंदिनी आणि इतर बरोबरच्या मैत्रिणींचीही वारंवार झोपमोड झाली होती. आजचा चालायचा रस्ता त्यामानाने सोपा होता. फार चढ-उताराचा नव्हता. अंतरही आठ किलोमीटरचेच होते. माझ्या तब्येतीमुळे तेही मला मोठे वाटत होते. त्यातल्या त्यात आनंदाचा भाग म्हणजे तेवढे आठ किलोमीटर पार केले की बसमध्ये बसून दारचेनला जायचं होत. पुढची मानसची परिक्रमा चालत करावी लागत नाही. थेटपर्यंत बस जाते. थोडे दिवस विश्रांती मिळाली असती.

7-21.jpg

7-22.jpg

झोंगझेरबू हे पूर्वी तिबेटी संस्कृतीचे मोठे माहेरघर होते. पण कालच्या वाटचालीत सगळीकडे उद्ध्वस्त अवशेष दिसत होते. कदाचित काही वर्षांपूर्वी इथे लेणी, गुंफा, मंदिरे असतीलही. आज मात्र फक्त भग्नावशेष, माती, दगड दिसत होते. कँपच्या आसपास असलेल्या डोंगरांवर सुरेख निळसर झाक होती. ह्या कँपचा परिसर अतिशय सुंदर होता. मोठा सपाट मैदानी प्रदेश, त्यातला लांबवर दृष्टीस पडणारा रस्ता आणि सोबत नदीचा प्रवाह. हा सगळा प्रवास फार आल्हाददायक होता. डोल्मापास पार करण्याचा ताण संपला होता. बॅचमधल्या पन्नासही यात्रींची परिक्रमा नीट पार पडली अश्या समाधानात मजा मस्ती करत सगळे चालले होते. दोनेक तासात आम्ही बसपाशी पोचलो. स्वप्नवत वाटणारी ही खडतर परिक्रमा पूर्ण झाल्याच्या आनंदाने बहुतेकांच्या डोळ्यात पाणी आलं होत. पंढरीच्या वारकऱ्यांसारखे सगळे एकमेकांच्या पाया पडत होते.

7-23.jpg

जरा वेळाने आम्ही बसमध्ये बसून दारचेनला रवाना झालो. दारचेनला हवा थोडी खराब होती. जवळच्या अष्टपद गुहा बघायला जायचं होतं. ‘हवा सुधारली तर ६-६ जणांना घेऊन जाऊ. तोपर्यंत आराम करा’ अस आमचा आता मित्रच झालेला गाईड ‘तेम्पा’ ह्याने सांगितलं. दुपारी चारच्या सुमारास हवा थोडी स्वच्छ झाली. लगेच आम्ही ६ जण जीपमध्ये बसून निघालो. रस्ता जेमतेमच होता. वाळू पसरली होती. वळण भयानक होती. आमचा चालक मात्र द्रुतगती मार्गावर असल्यासारखा जोरात गाडी चालवत होता. चाक पंक्चर होणे हा एक नेहमीचा यशस्वी कार्यक्रम पार पाडून आम्ही तासाभरात अष्टपदला पोचलो. तिथून कैलासाचे छान दर्शन होत होते. डोंगराच्या टोकाला परंपरागत तिबेटी पताका दिसत होत्या. इतक्या निसरड्या डोंगराच्या टोकाला पताका लावणाऱ्याच्या हिमतीला आणि दूरवरून दिसेल अशी जागा निवडणाऱ्याच्या सौदर्यदृष्टीला दाद द्यावीशी वाटली.

7-24.jpg

अष्टपद येथील गुंफा बौद्ध आणि जैन धर्मीयानं फार महत्त्वाच्या वाटतात. ह्या गुंफांमध्येच जैन धर्मातील पहिले तीर्थंकर आदिनाथ वृषभ देवांनी तपश्चर्या केली. इथेच त्यांना निर्वाणप्राप्ती झाल्याचा जैन ग्रंथात उल्लेख आहे, असं म्हणतात. नंदिनी आणि इतर जणांनी जवळचा एक छोटा डोंगर चढून कैलासाचे अजून जवळून दर्शन घेण्याचा प्रयत्न केला. मी आणि अजून एक यात्री तिथेच बसून राहिलो. त्या अती उंचीवरच्या गुंफांजवळ शांत वाटत होत. आपल्या मनातल्या विचारांचा आवाजही गोंगाटासारखा वाटत होता. इथल्या ह्या नीरव शांततेची मला आता चटक लागली होती.

7-26

7-25

हळूहळू पुन्हा ढग आले. हवा खराब होऊ लागली. सगळे आल्यावर जीपमध्ये बसून आम्ही परत दारचेनला आलो. घरी फोन करून परिक्रमा नीटपणे पूर्ण झाल्याची बातमी दिली. दुसऱ्या दिवशी उठायची घाई नव्हती. बारा तास झोपता येईल, ह्या सुखद विचारात सगळे यात्री आपापल्या खोल्यांत गुडुप झाले! सगळे स्वप्नात बहुधा माझ्यासारखीच मानसच्या परिक्रमेची स्वप्न बघत असतील!!

Keywords: 

माझी कैलास-मानस सरोवराची यात्रा भाग-८ (मानस सरोवराची परिक्रमा)

दिनांक २६ जून २०११ (दारचेन ते किहू)

8-01

पूर्ण बॅचपैकी थोडेच यात्री आदल्या दिवशी अष्टपदला जाऊन आले होते. उरलेले आज जाणार होते. आजचा प्रवास बसने करायचा होता, तोही फक्त दोन तासांचाच. त्यामुळे सकाळी आरामात उठलो. दोन-तीन दिवस घेतलेली औषधे, कैलास परिक्रमा झाल्यामुळे मनावरचा गेलेला ताण आणि कालपासूनची विश्रांती, ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून मला पुष्कळच हुशारी वाटत होती. गेले तीन-चार दिवस अंघोळीचा पत्ता नव्हता. त्यामुळे आमच्यातले काही लोक फारच अस्वस्थ होते. ‘बिना नहाये – धोये खाना कैसे खाये?’ असे प्रश्न त्यांना पडत होते. आम्ही मराठी लोक मिळून त्यांची ‘महाराष्ट्रमें नहानेकी टॅबलेट (त्याच त्या आपल्या सुपरिचित अंघोळीच्या गोळ्या!) मिलती है, एक गोली खा ली सुबह, तो दिनभर एकदम फ्रेश लगता है ! आपके यहां कैसे नहीं मिलती?’ अशी फिरकी घेत होतो. रोज एखादा तरी बकरा मिळायचाच!

दारचेन गावात गरम पाण्याच्या (विकतच्या) अंघोळीची सोय होती. मी आणि नंदिनी ती प्रत्येकी २० युआनची अंघोळ करून आलो. अंघोळ छान झाली, पण पैसे अगदी शब्दशः पाण्यात गेले! कँपवर पुन्हा सगळे सामानाची उलथापालथ करत बसले होते.

8-02

आता खरंतर सगळं सामान बरोबरच राहणार होत. मानस परिक्रमा संपवून आम्ही तकलाकोटला जाणार होतो. पण सामान उपसणे आणि पुन्हा कोंबणे हा यात्रेतला अत्यंत आवडता उपद्व्याप असतो. ‘लगेज देना है’ किंवा ‘लगेज आ गया’ ह्या आरोळ्या सारख्या ऐकायला येत असतात. पण एक मात्र आहे, प्रत्येकाजवळ भरपूर सामान असूनही, शोधायला इतका कंटाळा येत असे, की लक्ष मात्र दुसऱ्याच्या सामानावर जास्त असायचं!

8-03

आमचा नाश्ता उरकल्यावर आम्ही १५ लोक छोट्या बसमध्ये जाऊन बसलो. उरलेले लोक अष्टपद करून मग येणार होते. कैलास यात्रेत घोड्यावरून पडलेल्या कालरा अंकलची अवस्था अजूनही वाईटच होती. त्यांच्या कंबरेला मार लागला होता. बसच्या दोन-तीन पायऱ्या उतर-चढ करतानासुद्धा त्यांना अक्षरशः ब्रह्मांडं आठवत होत. त्यांना वाटत होत की विमानाने दिल्लीला जाता आलं तर उत्तम. नारंग सरांची त्यासाठीची खटपट चालू होती. पण आमचा ग्रूप व्हिसा असल्याने ती शक्यता धूसर होती. नशिबाने आता पुढचे काही दिवस चालायचं किंवा घोड्यावर बसायचं नव्हत.

8-04

बसमधून जाताना ह्याच विषयावर गप्पा चालू होत्या. खिडकीतून बाहेर बघताना एकामागून एक सुंदर दृश्य दिसत होती. भाजी-पाला व इतर सामान घेण्यासाठी थोडावेळ ‘होरे’ नावाच्या गावात थांबलो. छान रुंद रस्ते, नटून थटून फिरायला तयार असलेल्या दुचाक्या आणि अर्थातच बियरच्या बाटल्यांचा खच.....असं दृश्य होत. ८० फुटांच्या खालचे रस्ते बांधायला बहुधा कायद्याने बंदीच असावी. थोड्याच वेळात आम्ही मानस सरोवराच्या काठावरच्या ‘किहू’ ह्या कँपला येऊन पोचलो. हा कँप अगदी दृष्ट लागण्यासारख्या जागेवर आहे. अगदी मानस सरोवराच्या काठावर! माझा तर विश्वासच बसत नव्हता. नजरेच्या आवाक्यात न मावणारा, क्षणोक्षणी रंग-रूप बदलणारा तो प्रचंड जलाशय.

8-05

मानस सरोवर म्हणजे पावित्र्याचे दुसरे नाव. हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे, इथे अंघोळ केलेल्या व्यक्तीला मोक्ष मिळतो. ह्या सरोवराची निर्मिती प्रथम ब्रम्हदेवाच्या मनात झाली, नंतर ते पृथ्वीवर अवतरले. म्हणून ह्याचे नाव मानस (ज्याची निर्मिती मनात झाली असे) सरोवर (तळे) असे आहे. स्वर्गीय असे राजहंस उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये इथे राहतात,असं म्हणतात. राजहंस हे विद्वत्ता आणि सौंदर्याचे प्रतीक मानले जाते. हे सरोवर समुद्र सपाटीपासून ४५५६ मीटर उंचीवर आहे. जगातले सगळ्यात उंचावरचे हे गोड्या पाण्याचे तळे म्हणजे एक नैसर्गिक चमत्कारच आहे. ह्याचा परिघ ८८ कि.मी., खोली अंदाजे ९० मीटर आणि क्षेत्रफळ ३२० कि.मी.वर्ग इतके आहे. ब्रह्मपुत्रा, सिंधू, सतलज आणि कर्नाली ह्या भारत आणि तिबेट समृद्ध करणाऱ्या नद्यांचे उगम इथे होतात.

8-06

हिंदू, बौद्ध तसेच जैन धर्मात ह्या सरोवराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. बौद्ध ग्रंथांमध्ये ह्याचे नाव ‘अन्वतप्त’ तर तिबेटी भाषेत ‘माफम युत्सो’ असे आहे. बौद्ध धर्मात असे मानले जाते की राणी मायाला ह्या सरोवराच्या काठावर गौतम बुद्धांची गर्भधारणा झाली. काठावर अनेक बुद्ध मंदिरे आहेत. यात्रींना यज्ञ करण्यासाठी एक चौथरा उभारला आहे. काही काळ चीन सरकारने चीनबाहेरच्या लोकांना इथे यायला बंदी घातली होती. भारत सरकारच्या मध्यस्तीनंतर ही यात्रा परत सुरू झाली. महात्मा गांधींच्या अस्थींचे इथे विसर्जन करण्यात आले होते.

8-07

आम्ही किहूला पोचलो ती एकादशी होती. पोचल्यावर लगेचच सगळ्यांनी मानस सरोवरातल्या स्नानाचा मुहूर्त साधला. पाणी चांगलंच थंड होत. अंगाला मोहरीच तेल लावलं की गारठा कमी लागतो, हे चातुर्य मिळवण्यासाठी मला मानस सरोवरापर्यंतचा प्रवास करावा लागला! दिल्लीत मिळालेल्या सूचनांमध्ये ‘फार वेळ अंघोळ करू नका. सहन होईल इतकंच पाण्यात थांबा’ अशी सूचना मिळाली होती. ती लक्षात ठेवून मी थोड्या(च) डुबक्या मारल्या. आभाळात ढग होते. पण ढगांचा पडदा जरासा विरळ झाल्यावर कैलासचे अविस्मरणीय असे दर्शन झाले! मी यात्रेला निघाल्यापासूनच्या झालेल्या प्रवासात झालेला त्रास, गैरसोयी, सगळं ओवाळून टाकावा असा हा सर्वोच्च अनुभव होता. आपण मानस सरोवरात स्नान करत असताना समोर कैलासाचे दर्शन होणे, हे दृश्य आणि ती अनुभूती मी ह्या आयुष्यात विसरू शकणार नाही. त्या दिवशी हिंदू पंचांगाप्रमाणे एकादशी होती. एकादशीच्या दिवशी मानस सरोवराचे स्नान झाल्याने आम्हा १५ लोकांना छटाकभर जास्तीच पुण्य मिळाल! हात-पाय गार पडायला लागल्याची जाणीव होऊ लागली. मी त्या अलौकिक क्षणाबद्दल कृतज्ञतेने परमेश्वराला हात जोडले आणि डोक्यावरची पापे कमी झाल्याच्या आनंदात कँपवर परत आले!

8-08

हा आमचा कँप म्हणजे बुद्ध मंदिराजवळच्या खोल्या होत्या. प्रत्येकाला पलंग आणि ढीगभर पांघरूण अशी भक्कम सोय होती. मानसची स्वच्छता आणि पावित्र्य राखण्यासाठी साबण लावायला किंवा कपडे धुवायला बंदी आहे. त्यामुळे आमच्यातला ‘कपडे धुणे’ हा आवडता छंद असलेल्या लोकांना इथे हात चोळत बसावं लागत होत.

8-09

राहण्याच्या जागी बाकी सगळ्या सोयींबरोबरच टॉयलेट पण आवश्यक असतात, ही बाब मात्र तिथले लोक विसरले असावेत. कैलास परिक्रमेत वाईट का होईना पण निदान टॉयलेटचा आडोसा तरी होता. इथे मात्र तेवढीही सोय नव्हती. तिबेटमधली अडचण म्हणजे इथे झाडांचाही आडोसा नाही. दिवस लवकर उजाडून उशिरा मावळत होता. हे सगळं कमी म्हणून कँपला लागूनच बांधकाम चालू होत. त्याच्या पहिल्या मजल्यावर उभं राहील की, लांबवरच आसमंत नजरेत येत होता!! सगळ्या महिलावर्गाची प्रचंड कुचंबणा झाली. सोयीचा भाग बाजूला ठेवला तरी, पर्यावरणाच्या दृष्टीनेही सगळ्या यात्रींनी नैसर्गिक विधी मानस सरोवराच्या काठावर करणे योग्य वाटत नाही. पुढच्या वर्षीपर्यंत नवा कँप तयार होईल. त्यात तरी टॉयलेटची सोय असेल अशी आशा करूया!

यात्रेला निघाल्यापासून मानसमध्ये ब्रह्म मुहूर्तावर म्हणजे रात्री ३ ते ५ मध्ये देव अंघोळ करायला येतात, अश्या स्टोऱ्या ऐकत होतो. ह्या स्टोऱ्या सांगणारे लोक ‘हमने अमरनाथमें पाच फडावाले, नागमणीवाले नागराजके एकदम बढिया दर्शन किये थे|’ असही सांगत होते. माझा काही ह्या सगळ्यावर विश्वास नव्हता. पण उत्सुकता नक्कीच होती.

8-10

रात्री मरणाची थंडी होती. गरम कपडे घालून, खंडीभर पांघरुणे घेऊन आम्ही झोपलो होतो- नव्हतो, इतक्यात ‘अरे, बाहर चलो, दर्शन हो रहे है|’ असा आरडाओरडा सुरू झाला. सगळे पळत-पळत बाहेर. मानसच्या काठावर आमची बस उभी होती, त्यात काही यात्रींनी चाणाक्षपणे जागा मिळवली. तिथे त्यांना नीटपणे बसता येत होतं आणि थंडी-वाऱ्यापासून आडोसाही मिळत होता. उरलेले आमच्यासारखे लेट-लतीफ अर्धवट बांधून झालेल्या खोल्यांमध्ये शिरले.

समोर मिट्ट काळोख होता. चांदण्या सुरेख दिसत होत्या. थोड्याच वेळात उल्का उडताना दिसावी, तसं काहीतरी दिसलं! मात्र उल्केचा उजेड संपतो. हा उजेड मात्र पाण्यापर्यंत येऊन थांबत होता. असे दोन उजेड थोडं अंतर सोडून बराच वेळ स्थिर दिसत होते. ‘ये पेहेरेदार है| अभी भगवान आने शुरू हो जायेंगे|’ अशी बातमी आली. जवळपास एक तास आम्ही तिथे होतो. कमी-जास्त तीव्रतेचे उजेड येत होते, कधी परत आकाशाच्या दिशेनेही जात होते. दुसऱ्या कोणाकडून हे सगळं ऐकलं असत, तर मी आजिबात विश्वास ठेवला नसता. पण मी हे स्वतः पाहत होते. देव अंघोळीला येत असतील, हे मला अजूनही पटत नाही. देवांना माणसांच्या भाव-भावना, व्यवहारांशी जोडून मानवी पातळीवर का आणायचं हे कळत नाही! असो....काही लोकांच्या म्हणण्याप्रमाणे हा सगळा विद्युत-चुंबकीय ऊर्जेचा परिणाम असावा. असेलही. अनुभव मात्र वेगळाच होता. माझ्या तर्क सुसंगत विचार करणाऱ्या मनाला धक्का देणारा!

भिंतीवर मारलेलं पाणी डोक्यावर टपकत होतं, त्यामुळे वाढीव थंडी वाजत होती. खूपच काकडायला झाल्यावर मी आणि नंदिनी कँपवर येऊन गुमान झोपून गेलो.

दिनांक २७ जून २०११ (किहू मुक्काम)

8-11

कैलास-मानस सरोवराची ही यात्रा अगदी अनादि काळापासून चालू आहे. पूर्वी वानप्रस्थाश्रमानंतर संन्यासाश्रमात ही यात्रा करीत. यात्रेला कुटुंबातील घरचा कोणी निघाला म्हणजे त्याचा शेवटचाच प्रवास असे समजून ती व्यक्ती घरच्यांचा निरोप घेऊन निघत असे. हजारो मैलांची यात्रा चालत करायची. विरळ हवेबद्दल पूर्णपणे अनभिज्ञता, प्रचंड थंडी असे संपूर्ण वेगळे वातावरण. समजा दहा-पंधरा जण यात्रेला बरोबर निघाले तरी खाणे-पिणे, उबदार कपडे, पैसा-अडका किती दिवस पुरत असेल? यात्रेत रस्ता चुकल्याने कितीजण भरकटत असतील. असे अनेक अडथळे, जीवावरचे प्रसंग पार करून कोणी सुखरूप परत आलाच तर तो त्याचा पुनर्जन्म मानीत आणि लोक,समाज त्याला देवत्व बहाल करीत.

8-12

आता तो काळ राहिला नाही. सगळं जग अगदी हाकेच्या किंवा संगणकाच्या क्लिकच्या अंतरावर आले आहे. कुठलीही माहिती झटकन मिळू शकते. येणाऱ्या प्रत्येक अडचणींवरील उपाय, मार्ग आपल्याला आधीच माहिती करून घेता येतात. ही यात्रा आता भारत सरकारच्या नेटक्या आयोजनामुळे अगदी सुलभ झाली आहे.

तरीदेखील निसर्गापुढे, लहरी हवामानापुढे माणसाचे काही चालत नाही. असे असले तरीदेखील थोडा अडचणीचा प्रसंग आला तरी वयाने मोठी, उच्च-विद्याविभूषित, बाहेरच्या जगात खूप मोठ्या पदावर काम करणारी, उद्योग धंदा यशस्वीरीत्या करणारी माणसे सहयात्रींच्या चुका काढताना, असभ्य भाषेत बोलताना-वागताना पाहून वाईट वाटायचं. आपण एका मोठ्या आणि कठीण यात्रेला आलो आहोत, त्या यात्रेचा अर्धा आणि अत्यंत महत्त्वाचा प्रवास परदेशात. तिथे किती सोयी-सुविधा मिळणार? याचा विचारही काही जण करत नाहीत. इथे संडास-बाथरूम नाही, जेवण वेळेवर नाही, जे जेवण असेल ते अर्धेकच्चे.

8-13

दिल्लीला घेतलेल्या एकत्र वस्तूंचे वाटप नीट झाले नाही, जेवण-कमिटीचे लोक काम नीट करत नाहीत अश्या अनेक तक्रारी सुरू झाल्या. आम्हाला अनेक ठिकाणी दिलेल्या माहितीत, चीनमधली परिस्थिती, तिथल्या गैरसोयी, होऊ शकणाऱ्या कुरबुरी, भांडण.. सगळं सांगितला होत. विरळ हवेचा हादेखील एक परिणाम असतो. कारण काही का असेना, पण इतक्या दिवसाच्या खेळीमेळीच्या वातावरणात आता थोडा तणाव आला.

8-14

आमच्या समजुतीप्रमाणे मानस परिक्रमेत दोन कँपवर राहायचं होत. पण तिथे गेल्यावर कळलं की ह्या एकाच कँपवर चार दिवस राहायचं आहे. १ जुलैला अमावस्या होती. आमच्यातल्या काही मंडळींना अमावास्येपर्यंत तिथेच राहायची इच्छा होती. बाकीच्यांना लवकर तकलाकोटला जायचं होत. इथून वेगवेगळ्या प्रांतातून आलेल्या लोकांमध्ये ठिणग्या उडायला लागल्या.

एकतर ह्या कँपवर ‘मानस सरोवराकाठी फिरणे’ एवढाच करमणुकीचा कार्यक्रम होता. ते सुद्धा हवा चांगली असेल तरच. आलो त्या दिवशी हवा बरी होती. दुसऱ्या दिवसापासून मात्र पाऊस, वारा अखंड सुरू झाला. आता काय? खोल्यांमध्ये बसून वेळ जाता जाईना. थंडीमुळे सारखे जड जड गरम कपडे घालावे लागायचे. त्याचा कंटाळा आला होता. मी एक पुस्तक घरून नेलं होत. त्या पुस्तकासाठी बरेच नंबर लागले. वीज नसल्यामुळे मोबाईल चार्जिंग शक्य नव्हतं. त्यामुळे गाणी ऐकणेही बंद झालं मोबाइलचा उपयोग फक्त गजराच घड्याळ एवढाच राहिला होता!

दिनांक २८ जून २०११ (किहू मुक्काम)

8-14

आज आमच्यातल्या काही लोकांनी आपल्या पूर्वजांचे श्राद्ध करायचे ठरवले होते. ते लोक घरून येताना हे सगळं ठरवून आले होते. त्यासाठी लागणार सगळं सामानही ते मोठ्या प्रमाणात घेऊनही आले होते. बॅचमधले बाकी काही लोकसुद्धा त्यांच्याबरोबर श्राद्धविधी करणार होते. ‘ज्या विधींची आपल्याला नीट माहिती नाही, त्या वाटेला जा कशाला?’ असा विचार करून मी काही त्यांच्यात नव्हते.

सुदैवाने आज हवा चांगली होती. त्यामुळे तो वेळ मानसच्या काठावर असलेल्या बुद्ध मंदिरात जाऊन सत्कारणी लावायचा, अस मी आणि नंदिनीने ठरवून टाकलं. इथल्या बुद्ध मंदिराच्या दारावर एक विशिष्ट चिन्ह होत. ते चिन्ह म्हणजे दोन बाजूंना दोन हरणे आणि मध्ये चक्र, अस असायचं. ह्याचा संबंध गौतम बुद्धांच्या सारनाथ येथील प्रथम प्रवचनाशी आहे. गौतम बुद्धांचं दर्शन आणि वाणी इतकी शांतिपूर्ण असायची, की तिथली हरणेसुद्धा प्रवचन ऐकायला यायची, अशी कथा सांगतात. तिबेटातील ज्या मंदिरांवर हे चिन्ह असेल तिथे काही विशिष्ट ग्रंथ ठेवलेले असतात, असा काहीतरी संकेत आहे. बौद्ध धर्मात चक्र, मत्स्य, कुंभ, पद्म, शंख, श्रीवत्स, ध्वज, धर्मचक्र अशी आठ शुभचिन्हे आहेत. ह्यातले श्रीवत्स हे चिन्ह सगळ्या घरांच्या-दुकानांच्या पडद्यावर असायचं. अतिशय सुंदर अर्थ असलेली ही शुभचिन्ह बघताना छान वाटायचं.

8-15

8-16

बुद्ध मंदिराची जागा फारच सुरेख होती. अगदी मानस सरोवराच्या काठावरच! आत शिरल्यावर प्रार्थनेची चक्र होती. सगळ्या भिंतींवर बुद्ध जीवनातली चित्र. चित्रातले काही प्रसंग ओळखीचे वाटायचे. आत गाभाऱ्यात मंद आणि शांत प्रकाशात बुद्ध मूर्ती चमकत होती. काही वेळ तिथे शांत बसून आम्ही बाहेर आलो.

8-17

8-18

8-19

अजून श्राद्ध-विधी चालूच होता. दाराजवळ बसूनच हे विधी चालू होते,त्यामुळे कँपमध्ये जाण शक्य नव्हत. आम्ही मानसच्या काठावर फिरायला निघालो. त्या भटकंतीत मानसच्या पाण्याची क्षणाक्षणाला पालटणारी रूपे, समुद्राला येतात तश्या लाटा, त्या लाटांचा धीरगंभीर आवाज कानात साठवत चालत होतो. किनाऱ्यावरील वाळूत अनेक रंगीबेरंगी दगड लक्ष वेधून घेत होते. त्या शांत, पवित्र वातावरणात फिरताना ना थंडीची जाणीव झाली, ना वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याची ना जवळजवळ १६ हजार फूट उंचीवर असूनही चटके देणाऱ्या उन्हाची. सर्व वातावरण अगदी निर्मळ, स्वच्छ, पवित्र वाटत होते. आसमंतात देवत्व पसरल्यासारखे वाटत होते.

8-20

8-21

दोन तास फिरून, आभाळात काळे ढग दाटी करायला लागल्यावर, त्या दर्शनाने तृप्त होऊन आम्ही परत आलो. तोवर ह्या मंडळींचं आटोपलं होत. सगळे मानस सरोवरात अंघोळ करायला गेले. इथे आल्यापासून सगळ्यांच्या अंधश्रद्धांना उत आला होता. ‘दिल्लीत झालेल्या मेडिकलमध्ये नापास झाल्यामुळे येऊ न शकलेल्या नवऱ्याच्या कपड्यांना मानसच्या पाण्यात अंघोळ घालणे’, ‘घरातल्या स्वर्गवासी झालेल्या नातेवाइकांचे फोटो मानसच्या पाण्यात अर्पण करणे’, असं काहीही. कोणालातरी त्या पाण्यात काही नाणी आणि शंकराची पिंडी मिळाली! मग तर बघायलाच नको. ‘कोणीतरी आधी पाण्यात अर्पण केलं असेल, इतकं काही आश्चर्यचकित होण्याची आवश्यकता नाही’ अस सांगून आम्ही काही लोक त्यांना समजवायचा निष्फळ प्रयत्न करत होतो.

8-22

8-23

तिथल्या थंडीचा आणि विरळ हवेचा काही जणांना फार त्रास होत होता. कालरा अंकलचा त्रास आहे तसाच होता. त्यांना जेवण आणून देणे, हात धरून टॉयलेटला नेणे, अशी मदत सगळे करत होते. पण वेदना त्यांच्या त्यांनाच सहन कराव्या लागत होत्या. त्यांना क्ष-किरण तपासणीची आवश्यकता होती. उर्वरीत मंडळींमध्ये रोज रात्री झोपेत छातीवर दडपण आल्यासारखं वाटून झोपेतून दचकून उठणे, नाकातून रक्त येणे, श्वास घुसमटणे, हे प्रकारही लोकप्रिय होते.

शेवटी नारंग सरांनी संध्याकाळी सगळ्यांची सभा बोलावली. बहुमताने, दुसऱ्या दिवशीच दुपारनंतर तकलाकोटला जायला निघायचं अस ठरलं. १ तारखेच्या अमावास्येला ज्यांची इच्छा असेल, त्यांनी यायचं, असं ठरलं. सगळा महिलावर्ग, उद्या आपली कुचंबणा संपणार, ह्या आनंदात झोपी गेला!!

दिनांक २९ जून २०११ (किहू ते तकलाकोट)

8-24

आजचा दिवस गडबडीचा होता. सकाळी सगळे यात्री मिळून यज्ञ करणार होते. मग काही यात्री स्वतः स्वयंपाक करून सगळ्या यात्रींना जेवण देणार होते. दुपारनंतर तकलाकोटला जायला निघायचं होत. दोन दिवस नुसते इथे-तिथे करण्यात घालवल्यावर, आज सगळे उत्साहात दिसत होते. सकाळी आम्ही परत एकदा मानस सरोवरात अंघोळ केली. त्या शांतगंभीर, गर्द निळ्या जलाशयाकडे कितीही वेळ बघत राहील, तरी कमीच वाटत होत. निळसर किरमिजी रंगाच्या मानस सरोवरात हलके तरंग उठत होते.

स्नान झाल्यावर सर्वजण बरोबर आणलेले प्लास्टीकचे कॅन, बाटल्या भरून मानसच्या पवित्र पाण्याने भरून घ्यायला लागले. परत गेल्यावर आपल्या परिचयातील लोक, नातेवाईक सर्वांना हे तीर्थ वाटण्यासाठी घेऊन जातात. इथेही गंमत होती! आमच्यातल्या काही जणांनी चक्क २०-२० लीटरचे कॅन भरून घेतले. शेवटी तावडेजी त्यांना म्हणालेही, ‘अरे, आगेवाले बॅचके लिये थोडा पानी बचाना, नही तो वो लोग इतना दूर आने के बाद उनको सुखा मानस देखना पडेगा!!’

बऱ्याच यात्रींनी यज्ञासाठी नवीन कोरे कपडे घातले. इतके दिवस मळक्या, चुरगळलेले कपड्यातले लोक आता एकदम चकाचक दिसत होते. यज्ञासाठी तिथे एक मोठा चौथरा बांधून ठेवला आहे. बॅचमधल्या ज्या लोकांना ह्या विधींची माहिती होती, त्यांनी पुढाकार घेऊन सगळी तयारी केली. आज पाऊस नव्हता, पण ऊनही नव्हत. यज्ञाचा अग्नी धडधडून पेटला. मंत्रांच्या घोषात आहुती पडायला लागल्या. काही दिवस होत असलेल्या कुरबुरी, भांडण सगळं विसरून आजचे विधी सुरळीत चालू होते.

8-25

8-26

8-27

8-28

ज्या साठी एवढा अट्टहास केला, तो यात्रेचा महत्त्वाचा भाग आज संपणार, म्हणून मनाला हुरहूर लागली होती. आता तकलाकोटला तीन दिवस राहायचं, तीन तारखेला लीपुलेख पार करून मायभूमीत परत, १० तारखेला घरी पोचणार होतो. पण आजपासून तसा परतीचा प्रवास सुरूच. घरची ओढ तर लागली होती, पण येण्याआधीचे काही महिने मन ह्या भावी विलक्षण अनुभवांच्या कल्पनेने थरारून गेलं होत. आता ही लाट अत्युच्च बिंदूला स्पर्श करत होती. इथून लाटेचा प्रवास अटळपणे खाली-खाली होणार होता!

यज्ञ सुरळीत पार पडला. सगळ्यांनी एकमेकांना नमस्कार करून आशीर्वाद घेतले. मी आणि नंदिनी ‘बहेन-बेटी’ गटात मोडत असल्याने, आम्हाला कोणालाही नमस्कार करायला बंदी होती. उत्तरेकडे मुली लक्ष्मीचे रूप मानतात. लग्न होईपर्यंत त्या कोणालाही नमस्कार करत नाहीत. 'बेटीयाँ पैर छुने लगी, तो नरकमेंभी जगा नहीं मिलेगी' अशी समजूत आहे.

आज आमच्यातले काही यात्री सगळ्यांसाठी शिरा, भजी, डाळ-भात अस जेवण करणार होते. त्यासाठीचा शिधा ते दिल्लीपासून घेऊन आले होते. बऱ्याच दिवसांनी आमच्या सर्वांगसुंदर स्वयंपाक करणाऱ्या नेपाळी स्वैपाक्यापासून सुटका होणार म्हणून सगळे खुशीत होते! सगळ्या कँपभर भाजलेल्या रव्याचा, भज्यांचा खमंग वास सुटला होता. जेवण तयार झाल्यावर सगळ्यांनी अक्षरशः आडवा हात मारला. ज्या यात्रींनी एवढी खटपट केली, त्यांना सगळ्यांनी तृप्त होऊन भरपूर आशीर्वाद दिले.

सगळ्यांनी आपलं सामान आवरून बसवर चढवून टाकलं. कालरा अंकल, डॉ.पिल्ले आणि नारंग सर वेगळ्या गाडीतून पुढे रवाना झाले. पाठोपाठ बसेस निघाल्या. रस्त्यात एका जागी चार दिशांना कैलास पर्वत, मानस सरोवर, राक्षस ताल आणि गुर्लामांधाता पर्वत दिसतो. पण त्या दिवशी ढग असल्याने कैलास दर्शन झाले नाही. इथे सगळ्यांनी भरपूर फोटो काढले. जड मनाने त्या गूढ, पवित्र सौंदर्याचा निरोप घेऊन आम्ही पुन्हा बसमध्ये बसलो.

8-29

8-30

8-31

दोन्ही परिक्रमा, यज्ञ सगळं नीट पार पडल्याने सगळे खुशीत होते. बसमध्ये गाण्याबजावण्याला उत आला. अंताक्षरी खेळताना सगळ्यांनी आपले घसे साफ केले. मजा चालू होती.

8-32

आमच्या बसचा चिनी चालक आमचे सुरेल आवाज ऐकून त्या रात्री नक्की दचकून उठला असणार! अचानक बाहेर सुरेख इंद्रधनुष्य दिसलं! ह्या परिक्रमांचा अनुभव तर सुंदरच होता, शेवटही असा सुंदर झाल्याने आम्ही सगळे थरारून गेलेल्या मन:स्थितीत तकलाकोटला पोचलो.

8-33

Keywords: 

माझी कैलास-मानस सरोवराची यात्रा भाग-९ (तकलाकोट मुक्काम)

दिनांक ३० जून २०११ (तकलाकोट मुक्काम)

9-01

गेल्या कितीतरी दिवसांपासून चीन हद्दीपर्यंत पोचणे आणि नीटपणे दोन्ही परिक्रमा पार पडणे, ह्याचा (कोणाजवळ कबूल केलं नाही तरी) ताण होताच. यात्रेला येण्याच नक्की ठरवलं, तेव्हापासून जो तो बाकी कोणा-कोणाला आलेल्या अडचणींचा पाढा वाचायचा. व्यवस्थापन, निसर्ग आणि प्रकृती हे तीन प्रमुख खलनायक असायचे! दिल्लीपासून ते गुंजीपर्यंतच्या माहिती आणि सूचना सत्रांनी ही काळजी व्यवस्थित वाढवली होती.

9-02.jpg

आता हा सगळा ताणाचा भाग पार पडला होता. आता कँपवर उन्हाळ्याच्या सुट्टीसारखं निवांत वातावरण तयार झालं होतं. सगळ्यांच्या ओळखी होऊन तीन आठवडे झाले होते. आम्ही सर्वांनी एकाच वेळी घाबरवणारे आणि कल्पनातीत रौद्रसुंदर असलेले अनुभव घेतले होते. त्या धाग्यांनी सगळे यात्री जोडले गेले होते. आमच्या ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे तीन तारखेला लीपुलेख पार करून, आल्या मार्गाने परतून नऊ तारखेला दिल्लीत पोचायचं होतं. सगळ्यांच्या बोलण्यात आता ‘दिल्लीहून कोण कसा जाणार, कोणाच कधीच रिझर्वेशन आहे,’ हे विषय येत होते. घर सोडून इतके दिवस झाल्याच आता चांगलंच जाणवत होतं. परतीच्या प्रवासात एखादा दिवस कमी करता येईल का? अशी चर्चांच्या फेऱ्या नारंग सरांबरोबर चालू होत्या.

9-03.jpg

आमच्या नारंग सरांनी का कोणास ठाऊक, त्यांच्या पत्नीला ते एक तारखेला दिल्लीत पोचणार आहेत, अस सांगितलं होतं!! ते सगळ्यांना सांगायचे, ’कोई बात नही| मै फोनपे बोल देनेवाला हूं, की वेदर खराब हो गया, इसलिये अटक गये!!’ ते म्हणजे धन्यच होते.

आज आम्हाला तकलाकोटच्या जवळच जनरल जोरावरसिंग ह्यांची समाधी आहे, ती बघायला जायचं होत. त्यांच्या पराक्रमाबद्दल बहुतेक कोणालाच धड माहिती नव्हती. कोणी ते १९६२ च्या युद्धात हुतात्मा झाले अस सांगत होते. पण शेवटी आमच्यातल्याच एकाने ते गैरसमज दूर केला.

9-04

जोरावरसिंग हे काश्मीरचे राजे गुलाब सिंग ह्यांचे सेनापती होते. जनरल जोरावरसिंग म्हणजे पराक्रमाचा धगधगता अंगार होता. त्यांनी आपल्या अचाट पराक्रमाने लडाख, बाल्टीस्थान, गिलगिट हे प्रदेश पादाक्रांत केले होते. तिबेटचा कैलास-मानस सरोवराचा हा प्रदेशही त्यांनी आपल्या भीमपराक्रमाने काश्मीरला जोडला होता. काश्मीरच्या राजानेदेखील त्यांना ‘जनरल’ ही पदवी देऊन आपल्या सेनापतीचा मान ठेवला होता.

त्या वेळी तिबेटच्या राजाने इंग्रजांचे मांडलिकत्व पत्करले होते. अर्थातच इंग्रजांनी त्यांचे बळ तिबेटी राजाच्या मागे उभे केले. धूर्त असे डाव टाकत, प्रचंड हिमवर्षाव होत असताना इंग्रजांनी जोरावरसिंग ह्यांच्या सैन्यावर हल्ला केला. त्या अनोळखी प्रदेशात निसर्गाने उलटे दान टाकले असताना देखील काश्मिरी सैन्याने आपल्या उमद्या नेत्याच्या आदेशाप्रमाणे प्रयत्नांची शिकस्त केली. भाऊबंदकीचा शाप तर भारताला आहेच. तिबेटी आणि इंग्रजी सैन्याच्या कैचीत सापडलेल्या, थंडीने बेजार सैन्यासह लढणाऱ्या ह्या शूरवीराला शेवटी इंग्रजांनी सैन्यात फूट पाडून कपटाने १८४१ च्या लढाईत ठार मारले.

तिबेटी जनतेने आपल्या शत्रूच्या ह्या सेनापतीच्या पराक्रमाची कदर केली. तकलाकोटपासून ८-१० किलोमीटरवर जनरल जोरावरसिंग ह्यांची त्यांच्या इतमामाप्रमाणे भव्य समाधी बांधली. आज त्याचे फक्त भग्नावशेष शिल्लक आहेत. आम्ही तिथे थांबलो. सगळ्यांनी मनापासून जनरल जोरावरसिंग ह्यांना श्रद्धांजली अर्पण केली. आपले राष्ट्रगीत आणि ‘ए मेरे वतन के लोगो’ म्हटले.

9-05.jpg

यात्रेला जाण्याआधी मी श्री.मोहन बने ह्यांचे ‘अपूर्ण परिक्रमा’ हे पुस्तक वाचले होते. त्यांनी ही यात्रा १९९८ मध्ये केली होती. त्यानंतर १३ वर्षांमध्ये सर्वच बाबतीत बराच फरक पडलेला जाणवत होता. त्यांनी केलेल्या तिबेटामधील रस्तांच्या, कँपच्या अवस्थेत फारच चांगला बदल झाला होता. त्यांच्या बसच्या चालकाने त्यांना ही समाधी ‘कार्यक्रमात नाही’ ह्या कारणामुळे बघू दिली नव्हती. आता मात्र आम्ही तिथे ‘जन गण मन’ गाऊ शकत होतो. हा बदल कसा झाला कोण जाणे? सगळे जग आता जवळ आले म्हणून, की भारताचे आणि चीनचे संबंध सुधारले म्हणून? आमच्या बरोबरचे तिबेटी गाईडसुद्धा आमच्याशी मोकळेपणाने गप्पा मारत होते, खेळीमेळीने वागत होते.

समाधीला भेट देऊन आम्ही परत आलो. जेवलो. लगेच सगळेच्या सगळे यात्री खरेदीच्या दिशेने जवळजवळ पळतच सुटले!! तसं बघितलं, तर तकलाकोट हे सीमेवर असलेलं एक लहान गाव आहे. ते काही शॉपिंग सेंटरसाठी प्रसिद्ध असलेलं शांघाय किंवा बीजिंग नाही. पण ‘जातीच्या खरेदीप्रेमींना काहीही सुंदर’ दिसत असावं! मुलांचे, मोठ्यांचे कपडे, दागिने, तिबेटी पद्धतीच्या शोभेच्या वस्तू, मोबाईल हँडसेट, चामड्याची जाकिटे इतकंच काय पण ब्लँकेट्सची सुद्धा खरेदी लोकांनी केली!

9-06.jpg

9-07.jpg

अगदी खरं सांगायचं तर ह्यातल्या बऱ्याचशा चिनी किंवा नेपाळी बनावटीच्या वस्तू काही आंतरराष्ट्रीय पातळीच्या दर्जाच्या नव्हता. त्याच तोडीच्या वस्तू सगळीकडे मिळतात. पण ‘इतकं लांब आलोय, काहीतरी न्यायला पाहिजे’, अश्या विचाराने की काय पण यात्रींनी अगदी चढाओढ लावून, हिरीरीने जाकिटे व ब्लँकेट्सची खरेदी केली. बाकीच्यांबरोबर दुकानात फिरताना माझ्या सामानाचा ढीग डोळ्यासमोर येत असे! त्यात अजून भर घालायची हिंमत होत नव्हती. सामान खेचराच्या पाठीवर बांधून नेलं जातं. त्यामुळे नाजूक-साजूक गोष्टीं नक्कीच तुटल्या असत्या. असा सगळा शहाण्यासारखा विचार करून मी काहीच घेतलं नाही.

दिनांक १ जुलै २०११ (तकलाकोट मुक्काम)

9-08.jpg

ज्या अमावास्येच्या अंघोळींवरून मानससरोवरच्या काठावर वादावादी झाली होती, ती अमावस्या आज होती. बॅचमधले ८-१० लोक जीपने मानसच्या स्नानासाठी जाणार होते. ते आल्यावर दुपारी सगळ्यांनी मिळून तिबेटमधील सुप्रसिद्ध आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या खोजरनाथ मंदिराच्या दर्शनाला जायचे होते.

9-09.jpg

आज आमचा नेपाळी स्वैपाकी बहुधा चांगल्या मूडमध्ये असावा. त्याने आज नाश्त्याला ‘आलू पराठे’ करायचा घाट घातला होता. बऱ्याच दिवसांनी काहीतरी छान चविष्ट खायला मिळणार, म्हणून सगळे घाईघाईने डायनिंग हॉलमध्ये पोचले. पण, त्याचा पराठे बनवायचा वेग आणि ५० यात्रींचा खाण्याचा वेग ह्यात फारच फरक पडायला लागला. पुष्कळ दिवस चालण्याचा व्यायाम झाल्याने सगळ्यांच्या भुकांमध्ये चांगलीच वाढ झाली होती. त्या बनवणार्‍याची बिचाऱ्याची तिरपीट होऊ लागली.

आम्ही दोन-दोन पराठे खाऊन उठलो. पण सगळे थोडीच हार मानणार होते. त्या जेवणाच्या हॉलमध्ये पराठ्यांवरून युद्ध सुरू झालं. बोलाचाली, शिव्यागाळीपर्यंत गोष्टी आल्या. बघताना लाज वाटत होती, पण मध्ये पडण्याची हिंमत झाली नाही. शेवटी दुसऱ्या काही यात्रींनी मध्यस्थी केली आणि वाद शमला.

9-10.jpg

आजची सकाळ मोकळीच होती. आम्ही रिकामे लोक परत तकलाकोट दर्शनाला आणि लोक काय खरेदी करताहेत ते बघायला जाऊन जेवायच्या वेळेपर्यंत परत आलो. तोपर्यंत मानसला गेलेले यात्रीसुद्धा परत आले होते. जेवणाआधी नारंग सरांनी सगळ्यांची सभा बोलावल्याचा निरोप मिळाला.

9-11.jpg

इतके दिवस सगळ्यांच्यात मिळून-मिसळून वागणाऱ्या, विसरभोळेपणा करणाऱ्या सरांचा आज वेगळा रंग बघायला मिळाला. कोणावरही दोषारोप न करता, किंवा आक्रस्ताळेपणा न करता, त्यांनी सकाळच्या प्रकाराबद्दल स्पष्ट नाराजी व्यक्त केली. ‘आपण यात्रेला आलो आहोत, सहलीला नाही. पूर्वी उपाशीपोटीसुद्धा यात्रा कराव्या लागायच्या, आता तशी परिस्थिती नाही. पण थोडीशी अडचण झाल्यावर, परक्या देशात आपण अन्नावरून मारामारी करणे अत्यंत अयोग्य आहे. जर कोणाचे वर्तन चुकीचे वाटले, तर मी त्या यात्रीला परत पाठवू शकतो किंवा त्याला विदेश मंत्रालयाच्या काळ्या यादीत टाकू शकतो. काळ्या यादीत टाकल्यावर त्या व्यक्तीला पुन्हा कधीही ह्या यात्रेचा विचारही करता येणार नाही. मला तसं करायला भाग पडू नका. इतके दिवस मजेत चाललेला हा प्रवास तसाच चालू द्या,’ अस सगळ्यांना बजावलं.

त्यांच्या ह्या संयत पण कठोर बोलण्याने सगळे सटपटलेच! सकाळी भांडण करणाऱ्यांनी एकमेकांची आणि बाकी यात्रींची माफी मागितली. त्या भांडणावर पडदा पडला, पुन्हा एकदा समजुतीच वातावरण कँपवर तयार झालं. जेवण झाल्यावर आम्ही खोजरनाथ मंदिराकडे जायला निघालो. हे बौद्ध मंदिर १२०० वर्षे जुने आहे. तकलाकोट पासून साधारण ३० किलोमीटरवर आहे. तकलाकोट सोडल्यापासून रखरखीत, धुळीने भरलेल्या आणि दुतर्फा डोंगर असलेल्या चढ-उताराच्या रस्त्यावरून आमची बस चालली होती. फक्त आम्ही ‘बस’लेलो असल्याने चढ-उताराची काळजी वाटत नव्हती!

9-12

9-13

हा मठ नेपाळच्या हद्दीपासून अगदीच जवळ आहे. इथला पुरातन मठ चिनी आक्रमणात उद्ध्वस्त केला होता. नंतर त्याचा जीर्णोद्धार करण्यात आला. खोजरनाथचा भव्य मठ अतिशय आकर्षक आहे. गाभाऱ्यात मेणबत्त्यांच्या मिणमिणत्या प्रकाशात तीन भव्य मूर्ती अजूनच तेजःपुंज दिसत होत्या. ह्या मूर्ती अष्टधातुपासून बनवलेल्या आहेत व कमळावर आरूढ झालेल्या आहेत. डावीकडे अवलोकितेश्वर, मध्यभागी मंजुघोष आणि उजवीकडे वज्रपाणी अश्या तीन मूर्ती आहेत. काही जणांच्या मताप्रमाणे ह्या तीन मूर्ती राम, लक्ष्मण व सीतेच्या आहेत व ते रामाचेच मंदिर आहे. पण सगळ्या रचनेवर बौद्ध धर्माची छाप दिसत होती. त्याबरोबरीने, हिंदू धर्माचाही प्रभाव जाणवत होता.

9-14

उदबत्त्यांचा सुगंध, समयांचा मंद प्रकाश आणि साधकांच्या ध्यानधारणेसाठी मांडून ठेवलेली आसने, तिथली शांतता आणि शिस्त ह्या सगळ्यामुळे पावित्र्याची जाणीव होत होती. मठाच्या भिंतींवर बुद्ध जीवनावरची मोठमोठी रंगीत चित्रे काढली होती. बुद्ध मंदिराचे वैशिष्ट्य असलेली लहानमोठ्या आकाराची चक्रे, बाहेरील भिंतीला लागून होती.

9-15

लाल-किरमिजी अश्या सहसा न दिसणाऱ्या रंगसंगतीच्या ह्या मंदिरात आम्ही भरपूर फोटो काढून घेतले. बाहेर तिबेटी लोक त्यांच्या पारंपरिक वेषात आले होते. त्यांच्या बरोबरही फोटो झाले. पुन्हा बसमध्ये बसून आम्ही तकलाकोटला परतलो.

दिनांक २ जुलै २०११ (तकलाकोट मुक्काम)

9-16

म्हणता म्हणता आमचा तिबेटमधल्या मुक्कामाचा शेवटचा दिवस उजाडला. आज तकलाकोट जवळच्या एक बौद्ध गुहा बघायला जायचं होत. बसची सोय होणार नाही. साधारण दोन किलोमीटर चालव लागेल, अशी कल्पना आमच्या गाइडने दिली होती. उद्या लीपुलेखला चालायचं होतं. परिक्रमा झाल्यापासून चालणं झालं नव्हत. तेवढेच पाय मोकळे होतील, ह्या उद्देश्याने सगळे यात्री वेळेच्या आधीच बूट चढवून तयार झाले होते.

9-17

तकलाकोटला एकाच वेळेला कडक थंडीही असायची आणि उन्हाचे चटकेही बसायचे. सगळ्या यात्रींचे चेहरे, विशेषतः नाक बघण्यासारखी झाली होती. सनस्क्रीन लावूनही चेहरे काळे पडले होते. पण त्यामुळे तरी घरी गेल्यावर घरचे लाड करतील, अशी मी आणि नंदिनी एकमेकांची समजूत घालत होतो!

9-18

9-19
आजही हवा छान होती. पाऊस नव्हता. त्याबाबतीत आम्ही नशीबवान होतो. यात्रा सुरू केल्यापासून पावसाने फार त्रास दिला नव्हता. आता उद्याही अशीच हवा असली, तर नबीढांगवरून ‘ओम पर्वताचे’ येताना राहून गेलेले दर्शन होईल, अशी चर्चा चालताना चालू होती. थोडक्यात सगळ्यांना आता मातृभूमीचे जोरदार वेध लागले होते. कैलास परिक्रमा झाल्यापासून एकूण यात्रेचा वेग तसा थंडावला होता. तिबेटमधले चौदा दिवसांचे वास्तव्य थोडे कमी केले तर चांगलं होईल, अस सगळ्यांनाच वाटत होत. अर्थात आम्हाला कुठेही निसर्गाच्या कोपाला तोंड द्यावं लागलं नव्हत. तशी काही परिस्थिती उद्भवली, तर घाई होऊ नये म्हणून कदाचित दोन दिवस जास्तीचे ठेवत असतील.

9-20

साधारण तासभर चालल्यावर आम्ही कर्नाली नदीवरचा पूल ओलांडून त्या गुहांजवळ पोचलो. वाळूने बनले असावेत अश्या डोंगरात त्या गुहा होत्या. माझ्या मराठी डोळ्यांना ‘राकट, कणखर, दगडांचे’ डोंगर बघायची सवय, हे ठिसूळ डोंगर पाहून भीतीच वाटत होती. जोरात हाक मारली, तरी हे सगळं प्रकरण कोसळेल, अस वाटत होतं.

9-21

गुहा बघायला जाण्यासाठी एक शिडी चढून जायचं होत. वर गर्दी होईल, म्हणून १२ लोक एकावेळी सोडत होते. आमच्या बॅचचं एक माहितीपुस्तक करायचं, अशी एक कल्पना होती. खाली गप्पा मारत बसलेल्या यात्रींचे तावडेंनी त्यासाठी प्रत्येकाचे स्वतंत्र फोटो काढले. (यात्रेहून परत येऊन महिने, वर्ष लोटली, तरी अजून ते पुस्तक तयार होतच आहे!!)

9-22

आमचा नंबर लागल्यावर आम्ही वर गेलो. वरून तकलाकोटचे विहंगम दर्शन होत होते. लांबवर दिसत असलेले डोंगर बघून उद्या आपल्याला असेच डोंगर ओलांडायचे आहेत, हे लक्षात येऊन काळजी वाटत होती. थंड वाऱ्यावर थोडा वेळ थांबून आम्ही आत शिरलो. आत मंद दिव्याच्या प्रकाशात बुद्ध मूर्ती चमकत होती. शांत-स्तब्ध वातावरणात सगळे तिथे थोडावेळ बसलो. गेल्या काही दिवसात आलेल्या विलक्षण अनुभवांची उजळणी सगळे आपल्या मनात करत होते.

9-23

परत कँपवर आल्यावर सगळे परत आपापल्या सामानाला भिडले. उद्या सामान दिल्यावर ते एकदम कालापानीला मिळणार होत. मानस सरोवराचे आणि गौरी कुंडाचे पानी सगळ्यांनी वेगवेगळ्या कल्पना लढवून पॅकबंद केलं.

लीपुलेखच्या अवघड प्रवासात लागणारे, थंडीपासून बचाव करणारे कपडे, थोडा खाऊ, रेनकोट वगैरे आवश्यक गोष्टी जवळच्या लहान सॅकमध्ये भरल्या. मी सोबत बुटांचे दोन जोड आणले होते. त्यापैकी एक जोड तिबेटमध्ये येतायेताच फाटल्यामुळे फेकून दिला होता. काही कपडेही टाकून दिले होते. (बरेचसे ट्रेकर ट्रेकला जाताना जुने कपडे नेतात, आणि परत आणत नाहीत.) घरून आणलेलं खाण्याचं सामानही संपलं होतं. ह्या सगळ्यामुळे माझी मोठी सॅक थोडी हलकी झाली होती. तरटाच्या पोत्यात सहज जात होती. ती तशी कोंबून वर ठळक अक्षरात नाव घालून आम्ही आमचं सामान वेळेआधीच जमा केलं. खोली एकदम सुबक, सुंदर, देखणी दिसायला लागली! ज्या यात्रींच्या सामानात थोडी जागा शिल्लक होती, ते नव्या उत्साहाने शेवटची खरेदी करून आले. सगळ्यांची पारपत्रे आणि सामान जमा करून घेऊन नारंग सर आणि आमचे तिबेटी गाईड काही सोपस्कार पूर्ण करायला गेले.

ज्या यात्रींकडे चिवडा, खाकरा, फरसाण असा खाऊ शिल्लक होता, त्यांनी ते सगळा एकत्र केला. त्यात टोमॅटो, चटण्या घालून भेळ बनवली. (कांदा अजूनही निषिद्ध होता) सगळ्यांनी त्या भेळीवर दुष्काळातून आलेल्या माणसांच्या थाटात आडवा हात मारला!

संध्याकाळी एका छोट्या कार्यक्रमात आम्हाला दोन्ही परिक्रमा पूर्ण केल्याची प्रमाणपत्रे मिळाली. आम्ही सगळ्यांनी आमच्या दोन्ही गाइडचे मनापासून आभार मानले. आमच्या व्यवस्थेसाठी त्यांनी खूप कष्ट घेतले. कालरा अंकलना दोन-तीन दिवस दवाखान्यात सलाईन लावून ठेवलं होत. आता ते पूर्ण बरे झाले होते. रात्रीच्या कार्यक्रमात ते सामील झाल्यामुळे सगळ्यांना खूप बरं वाटलं. नंतर हिंदी गाण्यांच्या तालावर मनसोक्त नाचून सगळे आपापल्या खोल्यांत शिरले.

दिनांक ३ जुलै २०११ (तकलाकोट ते गुंजी)

9-24

आज आपल्या देशात परत जायचं, ह्या कल्पनेमुळे सगळ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह दिसत होता. वेळेच्या आधीच चहा आणि जुजबी नाश्ता उरकून सगळे यात्री तयार होते. कँपच्या बाहेर सगळ्या बॅचचा, आमच्या तिबेटी गाईड व व्यवस्थापकांबरोबर फोटोचा कार्यक्रम झाला. जी थोडीफार गैरसोय, वादावादी झाली होती, त्याबद्दल कटुता न ठेवता, त्यांचे आभार मानून ‘जेकारे वीर बजरंगी, हर हर महादेव, ॐ नमः शिवाय’ च्या गजरात आम्हाला कैलास-मानस सरोवराचे दर्शन घडवणाऱ्या तिबेटचा निरोप घेऊन लीपू खिंडीकडे निघालो. बसच्या दार-खिडक्या बंद असल्या तरी तकलाकोटची थंडी अंगाला बोचत होती.

9-25

बाहेर आता परिचित वाटणारे दृश्य दिसत होते. हळूहळू उजाडू लागले होते. सगळे यात्री ते निर्मनुष्य अनोखे सौंदर्य डोळ्यात साठवून घेत होते. तेथील पिवळे, लालसर रंगांचे उंचच उंच डोंगर सूर्याच्या सोनेरी उजेडात जास्तच खुलून दिसत होते.

9-26.jpg

घोडेवाले यात्रींची वाट पाहत उभे होते. आमच्या सामानाची मोजदाद होऊन ते खेचरावर लादले गेले. चिनी अधिकाऱ्यांच्या ताब्यात आमची पारपत्रे कालच दिली होती. पुन्हा एकदा त्यांनी आमचे व्हिसाच्या कागदपत्रांवरचे आमचे फोटो, पारपत्रावरचे फोटो आणि प्रत्यक्ष व्यक्ती निरखून, ताडून बघितल्या. ज्या व्यक्ती तिबेटात गेल्या त्याच परत जात आहेत, ही खात्री पटल्यावर त्या अधिकाऱ्यांनी आम्हाला जायला परवानगी दिली.

9-27.jpg

पायीच जावे की काय, असा विचार होता. पण समोर असलेल्या बर्फाच्छादित उंच लीपुलेखकडे नजर गेल्यावर बहुतेक सगळ्यांनी घोड्यावर मांड टाकली. आतापर्यंतची यात्रा निर्विघ्नपणे झाली, आता हा परतीचा प्रवास तसाच होऊदे, अशी देवाची प्रार्थना करून प्रवास सुरू केला.

9-28.jpg

बघावं तिथे बर्फच बर्फ दिसत होते. त्या बर्फावरून एक काळी रेघ मारल्यासारखी पायवाट दिसत होती. त्या पायवाटेवरून आमचे घोडे एकमेकांच्या मागून आस्ते कदम चालू लागले. त्यातील काही द्वाड जनावरे वाटेतील घोड्यांना ढुशी मारून तर कधी बाजूने वाट काढत पुढे सरकू लागली, की सर्वच घोड्यांची चाल बिघडत होती. माझा घोडादेखील वेग वाढवू लागल्याने मी त्याचा लगाम जोरात ओढू लागताच दुखल्याने तो जास्तच वेगाने पळू लागला, आणि माझी अक्षरशः पाचावर धारण बसली. सुदैवाने वाटेत एक उंच चढण लागल्याने सगळ्यांचा वेग मंदावला आणि मला हायसे झाले. भारतातले पोनीवाले आपल्या सोबत चालतात. घोड्यांची टक्कर होऊ नये, म्हणून व्यवस्थित लक्ष ठेवतात. हे तिबेटी पोनीवाले मात्र एकीकडे बिड्या ओढत आमची तारांबळ बघत हसत होते.

आम्ही तिबेटमध्ये गेलो त्या दिवशीपेक्षा आज बर्फाच प्रमाण जास्त वाटत होत. घोड्यांचे पाय बर्फात रुतत होते. ओठ आवळले तरी दातावर दात आपटून आवाज येत होता. थोडं अंतर पार केल्यावर पोनीवाले आम्हाला उतरायचा आग्रह करू लागले. हो-नाही करत शेवटी बरेचसे यात्री उतरले. काही यात्री मात्र नाहीच उतरले. बॅचमधल्या ज्येष्ठ किंवा आजारी यात्रींना घोड्यावर बसू द्यावे, आणि जे चालू शकतात त्यांनी चालावे, हा साधा संकेतही लोक धुडकावून लावत होते. नारंग सर सगळ्यांच्या शेवटी होते. ते बिचारे ओरडून त्या यात्रींना ‘ आप प्लीज उतर जाईये, लेडीजको बैठने दिजीये|’ असं सांगत होते. काही जणांनी ते ऐकलं, पण काही जण हट्टाने नाही म्हणजे नाहीच उतरले. मूळचा मनुष्यस्वभाव कैलास-मानसच्या दर्शनाने बदलेल, अशी आशा ठेवणे, चुकीचंच होतं...

9-29.jpg

एक-एक पाऊल कष्टाने उचलावे लागत होते. श्वासाचा वेग आणि पावलांचा वेग व्यस्त प्रमाणात वाढत होते. अंगावर घातलेले यच्चयावत गरम कपडे आणि खांद्यावरच्या सॅकचा वजन जाणवत होत. कोणालाच एकमेकांशी बोलणं शक्य नव्हत. एरवी सगळ्यांची चेष्टामस्करी करणारेही शहाण्या मुलांसारखे एका रांगेत चालले होते.

लीपूखिंडीच्या उंच टोकावर काही काळ्या आकृत्या हालताना दिसल्यावर मागून कोणीतरी ओरडले, ‘हौसला रखो, अपना देश आ गया, वो देखो अपने जवान दिखाई डे रहे है|’ सगळ्यांच्या अंगात उत्साहाची नवी लाट आली. चिंचोळ्या वाटेची शेवटची जीवघेणी चढण आम्ही धापा टाकत चढत असताना पाचव्या बॅचचे यात्री, पोर्टर-पोनीवाले, आय.टी.बी.पी.चे जवान, अधिकारी सगळे ‘ॐ नमः शिवाय, भोलेबाबा की जय’ अश्या घोषणा देऊन आमचा उत्साह वाढवत होते. माझे पोर्टर-पोनीवाले सुरेश-रमेश ‘दिदी-दिदी’ हाका मारून मला हात करत होते. त्या सगळ्याचे आनंदी-उत्साही चेहरे पाहून आताच घरी आल्यासारखं वाटायला लागलं.

त्या संचारलेल्या मन:स्थितीत मी शेवटची पावले टाकली आणि एकवीस जून ते तीन जुलै एवढ्या दिवसांनंतर मायभूमीत प्रवेश केला.

9-30.jpg

Keywords: 

माझी कैलास-मानस सरोवराची यात्रा भाग-१० (लिपूलेख पास ते गाला)

दिनांक ३ जुलै २०११ (लीपूलेख खिंड ते गुंजी)

10-51.jpg

लीपूलेखची शेवटची चढण कशीबशी चढून मी भारताच्या सीमेत पाय टाकला. सुरेशभाई लगेच धावत पुढे आला. माझ्या पाठीवरची सॅक घेतली, हात धरून जिथे मी नीट उभी राहू शकेन, अश्या जागी थांबवलं. सगळे जवान, अधिकारी, पोर्टर, पोनीवाले हसऱ्या चेहऱ्याने आमच्याकडे पाहत होते. माझा पोनीवाला येऊन ‘ कैसे हो दिदी, परिक्रमा ठीक रही? ’ अशी चौकशी करून गेला.

पाचव्या बॅचचे यात्री तिबेटमध्ये जाण्यासाठी उभे होते. तिबेटमध्ये जाताना आम्ही ज्या कौतुकाच्या नजरेने पहिल्या बॅचच्या यात्रींकडे बघितलं होत, तसेच हे यात्री आमच्याकडे बघत होते. ‘काही त्रास झाला का, हवा कशी होती?’ अश्या चौकश्या करत होते.

10-52

माझ्या परिचयातले पुण्याचे श्री. व सौ. रायकर ह्या बॅचमध्ये होते. त्या दोघांनी आधीही यात्रा केली होती. यात्रेची तयारी करण्यासाठी त्यांची दोघांचीही खूप मदत झाली होती. आमच्या बॅचेस् लीपूलेखला भेटतील, असं लक्षात आलं होतं. तेव्हाच, इथे भेटल्यावर त्यांनी मला चॉकलेट द्यायचं, असंही ठरलं होतं! त्याप्रमाणे त्यांनी मला चॉकलेट दिलं. त्या आपुलकीने आणि नेहमीच्या परिचयाचे चेहरे बघून मला अगदी भरून आलं. तीन आठवड्यानंतर घरच कोणीतरी भेटल्यासारखं वाटलं.

10-40.jpg

आमच्या आणि पाचव्या बॅचच्या लगेज कमिटीचे लोक सामान मोजून देण्यात गर्क होते. इथेही आसमंतात बर्फाच साम्राज्य होतच. पाचव्या बॅचला धारचूलापासून पुढे नबीढांगपर्यंत पाऊस लागला होता. त्यामुळे पुन्हा एकदा आमच्या बॅचच्या लोकांनी एकमेकांना ‘कित्ती बै आपण नशीबवान नै’ अस पटवून दिलं!`

10-34

हा सगळा दंगा आवरल्यावर आणि आमचे पासपोर्ट आमच्या ताब्यात दिल्यावर नारंग सरांनी आम्हाला पुढे निघायला सांगितले. तिबेटमध्ये जाणाऱ्या यात्रींना सुखरूप यात्रेसाठी मनापासून शुभेच्छा देऊन आम्ही मार्गक्रमण सुरू केले. माझ्या पाठीवर होती ती सॅक खरंतर जड नव्हती. पण विरळ हवा आणि उभ्या चढणीवर गळ्यातल्या माळेचे, हातातल्या घड्याळाचेसुद्धा ओझं वाटत, तिथे सॅकची काय कथा! ती सॅक सुरेशच्या पाठीवर गेल्यामुळे शरीरावरचं, आणि ‘आता आपण आपल्या देशात आलो’, ह्या विचाराने जीवाला अगदी हलकंहलकं वाटत होत.

हवेत थंडी होती, पण पाऊस नव्हता. वारा मात्र खूपच जोरात वाहत होता. त्या वाऱ्यामुळे माझ्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहत होत. माझा पोनीवाला सुरेश जवळ येऊन म्हणाला, ’दिदी, अब तो अपने मुलुख मे आ गये, अब क्यू रो रहे हो? ’ मी हसून त्याला म्हटलं, ’नही भाई, हवा जो इतनी जोरसे चल रही है’ तिबेटचे पोनीवाले यात्री खाली पडले, त्यांना दुखापत झाली, तरी पर्वा करत नव्हते, त्यांच्या त्या कोरड्या अनुभवानंतर हा आपुलकीचा अनुभव मनाला फार सुखकारक वाटत होता. ‘थंडी-वाऱ्यासाठी टोपी घाला, कान झाका. ’ असा सल्ला सगळे देत होते. थोडं खाली उतरल्यावर आय. टी. बी. पी. च्या जवानांनी शेकोटी पेटवून वयस्कर यात्रेकरूंमध्ये थोडी धग निर्माण केली.

10-41

२१ जूनच्या रात्री दोन-अडीचला सुमारास आम्ही नबीढांगवरून लीपूकडे रात्रीच्या अंधारात ती जीवघेणी, जवळजवळ तीन हजार फूट आणखी उंचीवर नेणारी चढण चढावयास सुरवात केली होती. दगडगोट्यांच्या, छोट्या-मोठ्या ओहोळातून ठेचा खात, धापा टाकत, अडखळत, पोर्टरचा हात पकडून चालत होतो. हात-पाय थंडीने आखडलेले, डोळ्यावरच्या झोपेने काही सुचत नाही, अशी विचित्र अवस्था होती. किती चालायचं आहे, किती उंचीवर आलोय, काही कल्पना येत नव्हती. साधे गवताचे पातेही नसलेली ती ‘नो मॅन्स लॅण्ड’ कशीतरी पार केली होती. आता खाली नबीढांगकडे उतरताना त्याची कल्पना येत होती. तीव्र उतार असलेली ती काहीशी निसरडी पायवाट सगळे भराभर उतरत होते. तिबेटकडे जाताना अधेमधे मी घोड्यावर बसले होते. आता मात्र उताराचाच रस्ता होता. परतीच्या प्रवासात अजिबात घोड्यावर बसायचं नाही, असा निश्चय केला होता. नाहीतर माझा माझ्या चालण्याच्या शक्तीवरचा विश्वास उडाला असता.

10-33.jpg

आज आम्हाला कालापानी कँपपर्यंत जायचं होत. तिथे यात्रींच्या स्वागतासाठी ‘बडा खाना’ असतो. ती १७ किलोमीटरची वाटचाल आहे. दुसऱ्या दिवशीचा पल्ला लांबचा म्हणजे २७ किलोमीटरचा होता. गुंजी कँपला दुपारचं जेवण करून बुधीपर्यंत पोचायला संध्याकाळ झाली असती. नारंग सरांना उद्याच्या ऐवजी आजच गुंजीला गेलो तर चांगलं होईल असं वाटत होत. हे जुळवून आणायचं, म्हणजे बरीच कसरत होती. सरांनी त्याबद्दलचे प्रयत्न तकलाकोटपासूनच चालू होते. गुंजीला वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत. कालरा अंकलना तिथे उपचार मिळू शकले असते.

10-32.jpg

तासभर चालल्यानंतर वाटेत एका ठिकाणी तीन-चार जवान वाटेत उभे राहून ‘ॐ नमः शिवाय’ चा गजर करत येणाऱ्या यात्रींना पाणी देत होते. लगेच गरमागरम चहाचा ग्लास हातात देत होते. त्यांचे औपचारिक आभार मानले तर त्यांचा त्या अगत्याचा अपमान होईल, अस वाटत. म्हणून त्यांच्या ‘ॐ नमः शिवाय’ला जोरात ‘ॐ नमः शिवाय’ म्हणून आम्ही पुढे निघालो. तेवढ्यात नारंग सर आलेच. त्यांनी आजच गुंजीपर्यंत जायचं नक्की झाल्याचसांगितलं. अजून बराच रस्ता बाकी होता. त्या काळजीने आणि ॐ पर्वताचे दर्शन घेण्याच्या ओढीने मी अजून पटापट पाय उचलायला लागले. माझ्यासोबत अक्षरशः सावलीसारखा चालणारा सुरेशभाई, नबीढांग कँप जवळ आल्यावर मात्र पुढे पळत गेला. ॐ पर्वताचे दर्शन होतंय हे बघून पुन्हा मागे येऊन ‘ आरामसे चलो दिदी, बढिया दर्शन हो जायेगा’ अशी बातमी आनंदाने हसत दिली. नबीढांगचा कँप हळूहळू दृष्टिपथात आला.

10-31

कँपच्या अगदी समोर ‘ॐ पर्वत’ दिसत होता. सगळ्या यात्रींचे भान तिकडे बघताना हरपले होते. डोंगरामध्ये अगदी स्पष्ट अशी ॐ ची आकृती दिसत होती. स्पष्ट म्हणजे वरच्या चंद्रबिंदीसकट! असा हा चमत्कार निसर्गात कसा घडला असेल, ह्याचं आजदेखील आश्चर्य वाटत. कँपवरचे लोक आम्हाला जेवून घ्यायचा आग्रह करत होते. तकलाकोटला केलेल्या जुजबी नाश्त्यानंतर पोटात काहीच गेलं नव्हत. साध्या आणि रुचकर जेवणाच्या वासाने भूक जागी झाली. पंधरा दिवसांच्या अंतराने चवीचे जेवण मिळत होते. ताटे हातात घेऊन सगळे समोर ॐ पर्वताकडे बघत जेवले. नबीढांगपासून कालापानी ९ किलोमीटर आणि तिथून गुंजी ९ किलोमीटर आहे. ते सगळं अंतर आजच पार करायचं होत. त्यामुळे एकदा डोळे भरून निसर्गाच्या त्या आविष्काराकडे बघून घेतलं, आणि पुढे निघालो. आजचा बहुतेक सगळा रस्ता उताराचा होता. फारशी चढण नव्हती. त्यामुळे चालताना दम लागला नाही, तरी पाय भरून येत होते. जाताना ह्याच रस्त्यावर आपल्याला किती प्रश्न पडले होते, किती काळजी वाटत होती हे आठवून मनातल्या मनात हसायला येत होत.

10-30.jpg

यात्रेच्या महितीपुस्तकात चालायच्या बुटांचे दोन जोड आणायला सांगितले होते. बूट आपल्या पावलाच्या मापापेक्षा एक माप मोठे आणावे, म्हणजे थंडीत उबेसाठी पायमोजांचे दोन जोड घातले, तरी बूट घालायला त्रास होत नाही, असं पुस्तकात सांगितलं होत. मी जे माझे नेहमीच्या वापराचे बूट जाताना घातले होते, ते जाताना नबीढांगपर्यंत फाटून गेले होते. दुसरे मोठ्या मापाचे बूट आता पायात होते. उतरताना पावलांवर, पायाच्या बोटांवर चांगलंच प्रेशर येत होतं. बूट मोठ्या मापाचे असल्याने पाऊल आतल्या आत सरकत होते. आजच्या पहिल्याच दिवशी उजव्या अंगठ्याच नख काळनिळ झालं होत. पायांना फोड यायला सुरवात झाली होती. तशीच दाटून चालत होते.

10-29

असंच बरंच अंतर चालल्यावर कालापानी कँप दिसायला लागला. कँपवर कालीमातेचे दर्शन घेऊन लगेच पुढे निघायचं, असं ठरलं होतं. सुरेशभाई मला विचारून चहा-पाण्यासाठी कँपच्या आधीच्या टपरीवर थांबला. कँपवर थंडगार सरबताने सगळ्यांचे स्वागत होत होतं. आम्ही तिथे मुक्काम करणार नसल्याने तिथले लोक आमच्यावर जरा नाराज झाले.

10-28

त्या कँपमध्ये एका बंकरमध्ये इमिग्रेशनचे सोपस्कार करायचे असतात, हे मी विसरून गेले होते. माझा पासपोर्ट तर सुरेशजवळचं सॅकमध्येच होता! मी सुरेशची वाट बघत त्या बंकरच्या बाहेर बसून राहिले. सगळेजण मी का थांबले आहे, ते विचारत होते. मी प्रत्येकाला तीच स्टोरी सांगत होते. येणाऱ्या सगळ्या पोर्टरांना सुरेशला पाठवायला सांगत होते, तेवढ्यात स्वतः नारंग सर बाहेर आले. मला पाहून म्हणाले, ’ऐसे क्यू बैठी हो?’ मी पुन्हा माझी ष्टोरी ऐकवली. 'अरे, मेरा भी यही हाल है| सुनोभाई, मॅडमका फॉर्म भरवा लो, बाकी का काम पोर्टर करवायेगा|’ अस म्हणत त्यांनी माझी सुटका केली! आमचे सर म्हणजे एक नंबर होते. कोणत्याही प्रकारचा गोंधळ केला, तरी कंपनी द्यायला सर हजर असायचे. तिथली लिखापढीपूर्ण करून मी आणि सर पुढे सटकलो.

10-27.jpg

कालीमातेच्या मंदिरात दर्शन घेतल्यावर पुढे आमच्यासाठी चहा-बिस्किटे, खीर असा सरंजाम मांडला होता. सगळे त्याच्यावर तुटून पडले! आमचा अल्पोपाहार होईपर्यंत सुरेशभाई पासपोर्टवर शिक्का घेऊन आला. त्या सॅकमध्ये ज्या पिशवीत पासपोर्ट होता, त्यातच माझे उरलेले डॉलर्स पण होते. पण हे पोर्टर इतके प्रामाणिक असतात, की त्याने त्या नोटांना हातही लावला नव्हता. ह्या सगळ्या भानगडीत बराच वेळ मोडला होता. बहुतेक सगळे यात्री चालत किंवा घोड्यावर स्वार होऊन कधीचेच पुढे निघून गेले होते. शेवटच्या ग्रूपचे मेंबर गप्पा मारत, फोटो काढत निवांत चालत होते. मीही त्यांच्याबरोबर चालायला लागले.

10-26

कालापानी ते गुंजीचा रस्ता जीपसारख्या वाहनासाठी बनवला आहे. त्या रस्त्याच्या बाजूने काली नदी वाहताना दिसत होती. आता ही नदी आम्हाला मालपा पार करेपर्यंत सोबत करणार होती. वाहनाचा रस्ता असल्याने फारसे चढ-उतार नव्हते. रुंद रस्त्यावरून गप्पा मारत चालता येत होत. पण सकाळी तकलाकोटपासून सुरू केलेला प्रवास चांगलाच जाणवत होता. कधी एकदा कँपवर पोचतोय अस झालं होत. शेवटी मी गप्पा मारणारा ग्रुप मागे टाकून पुढे सटकले. आता अक्षरशः पावलं मोजून चालत होते. प्रत्येक वळणानंतर ‘आता आलाच कँप’ अस वाटत होत. सुरेशभाईला विचारलं की तो ‘ अभी तो दूर है| तीन किमी चलना है|’ अस सांगून माझा थकवा द्विगुणित करत होता. असं पाय ओढत चालताना तिरंगा फडकताना दिसला! झालं! मला वाटलं आला कँप. पण....., तो कँप सीमा सुरक्षा दल (border security force) चा होता. आणखी एक तास चालल्यावर आमचा आय. टी. बी. पी. चा कँप आला.

दिवसभरात जवळपास २८ किमी चालून पायाचे तुकडे पडले होते. बसण्याची सुद्धा ताकद नव्हती. कँपवर जाऊन लगेच आडवी झाले. तिथल्या माणसाने जागेवरच कॉफी आणली. जवळपास दोन आठवड्यानंतर कॉफी पिऊन अंतरात्मा तृप्त झाला. जरा वेळ आराम केल्यावर मग माणसात आले. घरी फोन करून सगळ्यांशी पोटभर गप्पा मारल्या. चालायची आजिबात शक्ती नव्हती, तरी तिथल्या देवळातल्या भजनाचा मोह आवरला नाही. तशीच खुरडत खुरडत भजनाला जाऊन बसले. तिथल्या त्या शक्तीचा, जोषाच्या वातावरणात सगळा थकवा, वेदना विसरायला झाल्या. कँपवर जेवतानाच डोळे झोपेने मिटत होते. तिथल्या लोकांच्या प्रेमळ आग्रहापोटी चार घास जास्तीचे खाऊन पाच मिनिटाच्या आत सगळे झोपून गेले.

दिनांक ४ जुलै २०११ (गुंजी ते बुधी)

10-25

आमच्या ठरलेल्या कार्यक्रमातले, कालापानी ते गुंजी हे नऊ किलोमीटरचे अंतर आम्ही कालच चालून संपवलं होत. काल चालताना अवस्था वाईट झाली होती. पण आजची चाल त्यामुळे सुखकर वाटत होती. आज गर्ब्यांग,छीयालेखचं पुष्पपठार असा नयनरम्य रस्ता होता. पूर्ण यात्रेच्या मार्गातला हा सगळ्यात सुंदर भाग आहे. गुंजीच्या कँपजवळ भुसभुशीत मातीचे डोंगर आहेत. ते अगदी जपून, पोर्टरचा हात पकडून सगळे उतरत होते. मग कालीनदीचा पूल पार केल्यावर बुधीचा रस्ता सुरू झाला. आता आम्ही १२००० फुटांच्या खाली जात होतो. विरळ हवेमुळे होणारे त्रास होण्याची भीती संपली होती. मोठी झाडे, हिरवळ डोळ्यांना सुखावत होती. निसर्गातला बदल जाणवत होता. लहान झुडपे, रखरखीत डोंगर मागे पडले होते. सगळीकडे हिरवाई होती.

10-24.jpg

सगळ्यांना आता घराची आस लागली होती. परतीच्या प्रवासातला एखादा दिवस कमी करता येईल का, असे सरांचे जोरात प्रयत्न चालू होते. ते जमलं असत, तर आम्ही ९ जुलैच्या ऐवजी ८ जुलैला दिल्लीत पोचलो असतो. त्या त्या कँपवर राहण्याची, शेवटच्या दोन दिवसांच्या प्रवासासाठी बसची व्यवस्था होऊ शकली, तरच हे शक्य होत. आता रोज चालताना किती दिवस राहिले आणि किती किलोमीटरची चाल राहिली, हा हिशेब चालू असायचा. हे आणि असे विचार करत आणि सभोवतालचे सृष्टीसौंदर्य डोळ्यात, मनात साठवत मी माझ्या थकलेल्या शरीराला, फोड आलेल्या पायांवर दामटवत होते. ज्या रस्त्याने गेलो, त्याच रस्त्याने परतताना वेगळीच मजा येत होती. फक्त येताना जे उतार भराभर, एका दमात पार केले होते, ते आता कण्हत-कुंथत चढावे लागायचे. आपण नसताना काहीतरी जादू होऊन त्या डोंगरांची उंची वाढली की काय, अशी शंका बऱ्याच वेळा येत होती. आजच्या रस्त्यावर सुरेख हिरवी पठारे, दूरवर दिसणारी नदी अस दृश्य असल्याने चालण्याचे श्रम काहीसे कमी होत होते.

10-23

काही वेळ चालल्यावर एका लहान झोपडीवजा हॉटेलात नाश्त्याची सोय होती. जाताना आम्हाला आवर्जून प्रत्येक जेवणात हिरवी पालेभाजी खाऊ घालायचे. आता मात्र रोज छोले-राजम्याशी गाठ होती. पण आज आमचं नशीब जोरावर होत! त्याच्याकडे समोसे विकायला होते. ते कुस्करून त्यावर गरमागरम छोले, पुदिन्याची चटणी, शेव.... असा अप्रतिम बेत जमला. सुरवातीच्या यात्रींनीच सगळे समोसे संपवून टाकले. उरलेल्या लोकांना फक्त वर्णनच ऐकावं लागलं!!

10-21

10-22

जेवून पुढे निघाल्यावर एक मोठा चढ स्वागताला उभा होता. भरल्या पोटी तो दुप्पट मोठा वाटत होता. बरेच भिडू घोड्यावर स्वार झाले. पण मी निश्चयाने एक एक पाऊल टाकत चढत राहिले. चांगली तासाभराची दमछाक झाल्यावर शिखर गाठलं. आता गर्ब्याल गाव जवळ दिसत होत. त्याआधी पुन्हा एकदा आमचे पासपोर्ट तपासले. अश्या प्रत्येक चौकीवर सगळ्या यात्रींची चहा-पाणी देऊन आस्थेने विचारपूस होते. ‘कुठून आले, परिक्रमा कशी झाली, हवा चांगली होती का? ’ अशी प्रश्नोत्तरे होतात.

10-20

10-19.jpg

गर्ब्याल गावात थोडं थांबून, तिथली ती सुंदर नक्षीकामाची घरे, निरागस पहाडी लोक सगळं एकदा डोळ्यात साठवून घेतलं. हे सगळं पाहताना माझ्या मनात काहीतरी तुटायचं. अजून काही दिवसांनी ही सगळी गंमत संपणार, ही जाणीव मनाला कुरतडायची. असो. जरा वेळाने आम्ही छीयालेखच्या पुष्पपठारावर आलो. जातानापेक्षा आता बऱ्याच प्रकारची फुल उमललेली दिसत होती. निरनिराळ्या रंगांची नुसती उधळण झाली होती. ते बघून डोळे अगदी तृप्त झाले. एका चौकीवर शेवटची पासपोर्ट तपासणी झाली. हसऱ्या-उत्साही जवानांचा निरोप घेऊन पुढे निघालो.

10-18.jpg

10-19.jpg

पठारानंतर खडकाळ आणि लांबलचक उतरण होती. आजही पावसाने कृपा केली होती. नाहीतर पाऊस पडत असताना, ह्या खडकांवरून उतरताना किती दंडवत घातले असते, कोणास ठाऊक. नंदिनी चढण्यात पटाईत, कितीही उंच चढ असला, तरी न थांबता चढायची. उतरताना मात्र आमच्या ह्या ‘घाटाची राणीची’ वाट लागली. माझ्यासारख्या वजनी लोकांना उतरताना गुरुत्वाकर्षणाचा जोरदार फायदा मिळतो! सूपरफास्ट वेगाने खाली! संपूर्ण यात्रेत पहिल्यांदाच तिच्याबरोबरच कँपवर पोचले.

संध्याकाळी चहा पिताना न ठरवताच सगळे बाहेर जमले. गाण्याची मस्त मैफिल जमली. सगळ्या हौशी कलाकारांनी आपापले घसे साफ करून घेतले.

10-17.jpg

दिनांक ५ जुलै २०११ (बुधी ते गाला)

10-16.jpg

पडत्या पावसातच सुरेशभाईच्या सोबतीने चालायला सुरवात केली. ‘आज पाऊस फार आहे. हवा सुधारेल, अशी शक्यता वाटत नाही. अश्या हवेत दरडी कोसळण्याची शक्यता असते. त्यामुळे आज कॅमेरा आत ठेवून द्या. आज फोटो नाही, ’ अशी तंबी त्याने मला कँपवरच दिली होती. इथे ‘सुरेशवाक्यं प्रमाणम्’ मानून, मी अजिबात फोटो काढले नाहीत. काही यात्रींच्या मते, आदल्या दिवशी कँपवर सगळ्यांनी जी नाच-गाणी केली, त्याची शिक्षा म्हणून पाऊस पडत होता. हे लॉजिक अगदीच अशक्य होत! आपल्याला गैरसोयीच्या वेळेला पाऊस पडला की, ’ भगवान नाराज हो गये’ आणि सोयीच्या वेळेला झाला की, ’भोलेबाबाकी कृपा! ’ अरेच्या!

10-15.jpg

सगळे यात्री रेनकोट घालून पावसापासून वाचायचा प्रयत्न करत वाटचाल करत होते. आम्ही ह्याच भागातून काही दिवसांपूर्वी गेलो होतो, तेव्हाच्या आणि आताच्या निसर्गात फरक पडलेला दिसत होता. मध्यंतरीच्या काळात पाऊस भरपूर झाला होता. चालताना एका बाजूला रोरावत वाहणारी काली नदी, कालीच्या पलीकडच्या अंगाला असणाऱ्या नेपाळमधून अक्षरशः थव्याने कोसळणारे दुधाळ धबधबे, उंचचउंच आकाशाच्या पोटात शिरू पाहणारे हिरवेगार डोंगर, अनेक रंगांची बरसात करीत जाणारी विविधरंगी फुले हे पाहताना भान हरपत होत.

10-14.jpg

यात्रेची सहावी बॅच आज आम्हाला भेटली. त्याचं शंकासमाधान करत आणि त्यांच्या सुखरूप यात्रेसाठी शुभेच्छा देत आम्ही चालत होतो. दोन बॅचेसमुळे आजच्या बिकट रस्त्यावर वाढीव वर्दळ होती. आम्ही पन्नास यात्री, आमचे पोर्टर,पोनी-पोनीवाले, सामान वाहणारी खेचरे, असा लवाजमा. उलट्या दिशेने येणाऱ्या बॅचचीही तीच कथा. शिवाय गावकरी, इतर जाणारे-येणारे. त्यामुळे चालताना फार काळजी घ्यावी लागत होती. ‘सावधान, रास्ता खतरनाक है’ अशी लाल अक्षरे जागोजागी दिसत होती.

10-13.jpg

मालपा गावाच्या आधी रस्त्यात अनेक लहान-मोठे धबधबे लागतात. त्याचबरोबर लखनपूर, बिंद्राकोटी, छाता फॉल असे उरात धडकी भरवणारे महाप्रचंड धबधबे लागतात. ह्यांना मराठीतल्या ‘धबधबा’ ह्या शब्दापेक्षा ‘प्रपात’ हा संस्कृत शब्द जास्त शोभून दिसला असता. छाता फॉल म्हणजे एका विस्तीर्ण हिरव्यागार डोंगरातून अनेक ठिकाणी अंगाला हुडहुडी भरवणारे थंड पाणी कोसळत असते. जोरदार वारा असतोच. त्यामुळे छत्री उघडली तर तोल जाऊन कालीच्या प्रवाहात चिरनिद्रा ठरलेली. म्हणून शक्यतो भिंतीला चिकटून, धबधब्यातूनच चालावे लागते. हे संकट कमी म्हणून चव वाढवायला पुढून-मागून घोडे येत होते. सुरेशभाई जर क्षणोक्षणी मदतीला नसता, तर काय झालंअसत, ह्याचा मी विचारही करू शकत नाही.

10-11.jpg

10-12.jpg

ह्या टप्प्यात यात्री विरुद्ध पोनीवाले अशी भांडणे सुरू झाली. दगडी रस्त्यांवरून घोड्यांचे नाला मारलेले पाय घसरतात. त्यात आज पावसाने जोर धरला होता. घोड्यांनी नदीच्या कडेने चालायचं आणि पायी जाणाऱ्यांनी डोंगराच्या कडेने, असं ठरलेलं असत. घोड्यावरचे यात्री थोडे जरी हलले आणि घोडा नदीत पडला तर काय? ह्या भीतीने अवघड वाटेवर पोनीवले यात्रींना खाली उतरायला सांगतात. पण काही यात्री आपण घोडा तेवढ्या दिवसांसाठी विकतच घेतला आहे, अश्या थाटात बोलत होते. काही अपवाद असतीलही, पण साधारणपणे हे सगळे स्थानिक लोक प्रामाणिक, कष्टाळू असतात. ते कळवळून यात्रींना समजावत होते, ’ साब, मुझे भी बच्चे पालने है| घोडा गीर गया, तो मेरा राशनपानीही बंद हो जायेगा|’

10-10.jpg

हे सगळं चालू असताना मालपा गाव आणि आमची दुपारच्या जेवणाची जागा आली. जाडजूड रेनकोट घालूनही मी संपूर्ण भिजले होते. पाण्यातून चालून बूट-मोजे ओलेगच्च झाले होते. जेवणाच्या जागी शेकोटी पेटली होती. त्या धुराच्या वासाने सुद्धा उब वाटत होती. आता पुढे ४४४४ पायऱ्यांची अत्यंत अवघड चढण चढायची होती. त्या भीतीने जेवण थोडक्यात आटपून मी पुढे चालू लागले.

10-9.jpg

मी यात्रेच्या आधी ह्या पायऱ्यांचे वर्णन ऐकले होते. पण ते ‘उतरताना काय वाट लागली’ ह्या प्रकारातलं वर्णन होत. मला कळलं होत की परतीला वेगळा रस्ता असतो. पण दुर्दैवाने तसं काही नव्हत! त्या भयानक पायऱ्या आता चढायच्या होत्या. ज्या ज्या आठवतील त्या देवांची नावे घेऊन मी त्या पायऱ्या चढायला सुरवात केली. ‘कुछ नही दिदी, हौसला रखो| ‘ॐ नमः शिवाय बोलते रहो’ असा धीर सुरेशभाई आणि त्याचे सहकारी देत होते. प्रत्येक पायरी अक्षरशः तोलून मापून चढत असताना ना पावसाची रिमझीम जाणवत होती, ना आजूबाजूचे सृष्टीसौंदर्य लक्ष विचलित करत होते. मन आणि शरीराला संपूर्ण एकाग्र करणे, पायरी नीट चढण्यासाठी आवश्यक होत. चालताना बाकीचे कुठलेही विचार सुचत नव्हते. बरेच यात्री घोड्यावर स्वार होऊन पुढे जात होते.

10-8.jpg

आता काली नदी खोल दरीत चिमुकली दिसत होती. अचानक नेपाळच्या बाजूला मोठा आवाज होऊन दरड कोसळायला लागली. मी स्तिमित होऊन तो प्रकार बघतच राहिले. किती वेगाने आणि केवढे मोठमोठे दगड, माती, झाड सगळं कालीच्या प्रवाहात अदृश्य होत होत.

10-6.jpg

10-7.jpg

मध्ये एक विश्रांतीसाठी बांधलेली जागा आली. पण आता थांबायला नको वाटत होत. तशीच रेटून चालत होते. कितीही दूर असला, तरी शेवट दिसला की दाखवायला सुरेशला सांगून ठेवलं होत. पण रस्ता वळणा-वळणांचा, डोंगरांच्या कडेने जात असल्याने शेवट नजरेत येत नव्हता. अस दोन तास चालल्यावर (मला ती तेवढी वर्ष वाटली होती!!! ) ‘अभी दो टर्नके बाद सिडीया खतम’ हे शुभवर्तमान मिळाल! हा! मी स्वतःचीच पाठ थोपटून घेतली. आता अजून ट्रेक करायला हरकत नाही!!

10-5.jpg

कुमाऊँ निगमने पायऱ्या संपल्यावर लगेचच चहाची सोय केली होती. आता उंचावर आल्यावर पाऊस ओसरला होता. समोरच्या दरीत लहान लहान वस्त्या दिसत होत्या. शांतपणे बसून मी गरमागरम कॉफीचा आस्वाद घेतला. शरीराचा एक आणि एक स्नायू ठणकत होता. कॉफी पोटात गेल्यावर तरतरी आली. दिवसभर माझ्या चालीने चालून सुरेश कंटाळला असावा. पुढचा रस्ता सोपा-सरळ दिसत होता. तो एका हॉटेलात जेवायला थांबला.

10-04

आता फार तर तासभर चालायचं होत. मी एकटीच चालत होते. चालताना अचानक माझ्या लक्षात आलं, की ह्या स्वप्नवत प्रवासाचा शेवट आता फारच जवळ आला आहे. नारंग सरांच्या प्रयत्नांना यश आलं, तर आम्ही अजून दोन दिवसात दिल्लीत असू. तसा आजचा कँप शेवटचाच. उद्या धारचूलाच्या हॉटेलमध्ये मुक्काम असेल. मग कुठले हे डोंगर आणि दऱ्या, कुठे हा शांत-साधा दिनक्रम! पुन्हा त्या गर्दी, प्रदूषण, घाई-गडबडीच्या, धावणाऱ्या जगाच्या वेगाशी जुळवून घ्यायला लागणार.

10-03

फार दम लागला नाही, तरी मी पाच-पाच मिनिटानंतर थांबत होते. एखाद्या दगडावर बसून आसपासची शांतता पिऊन घेत होते. सगळं वातावरण नुकताच पाऊस झाल्याने टवटवीत होत, उन्हात दरीतल्या वस्त्या चमकत होत्या. सगळं दृश्य गंभीर स्तब्ध होत. घरी जायचा दिवस जवळ येत होता, त्याचा आनंद तर होता, पण हे सौंदर्य परत कधी बघायला मिळेल कोण जाणे?

10-02

थोड्याच वेळात कँप दिसायला लागला. कँपवर जाऊन पहिल्यांदा कोरडे कपडे घातले. ओल्या बूट-मोज्यांमध्ये पाय पांढरे पडून, सुरकुतले होते. त्यांना थोडा मसाज केला. काही जणांनी सगळे कपडे प्लास्टिक पिशव्यांमध्ये ठेवायची काळजी न घेतल्यामुळे त्यांचं सगळं सामान भिजून गेलं होत. मग काय, उन्हात कपडे वाळवायची एकच धांदल उडाली. नंदिनी, मी आणि असे इतर रिकामटेकडे लोक मजा पाहत होतो. नारंग सरही आमच्यात मजा करत होते. त्या दिवशी चतुर्थी होती. तो ‘चवथीचा चंद्र’ आणि चांदण्याने टिपूर भरलेलं आकाश कितीही वेळ पाहिलं, तरी मन भरत नव्हत. फार उशीर झाला, अशी तंबी मिळाल्यावर जड मनाने आडवे झालो.

10-01

Keywords: 

माझी कैलास-मानस सरोवराची यात्रा भाग-११ (गाला ते पुणे)

दिनांक ६ जुलै २०११ (गाला ते धारचुला)

1-DSC_4884.jpg

ठरलेल्या कार्यक्रमाप्रमाणे आमचा आजचा मुक्काम ‘सिरखा’ ह्या कँपला होता. पण नारंग सरांनी बरीच खटपट करून आजच धारचुलाला जायचं नक्की केलं होत. आमच्या सामानाची वाहतूक करणाऱ्या ठेकेदाराला ही कल्पना अजिबात आवडली नव्हती. त्याच्या म्हणण्याप्रमाणे जाताना जे अंतर आम्ही आठवड्यात पार केले होते, तेच अंतर आता आम्ही चार दिवसात पार करणार होतो. खेचरांचा तेवढा वेग नसतो, अशी कुरकूर चालू होती.

1-DSC_4846.jpg

1-DSC_4856.jpg

यात्रींना मात्र एक दिवस लवकर पोचता येईल तर चांगल होईल, असं वाटत होतं. आज चालण्याचा शेवटचा दिवस असल्याने परतीच्या प्रवासातला एक महत्त्वाचा टप्पा संपणार होता. धारचुला, जागेश्वर, दिल्ली असे तीन मुक्काम झाले, की सगळे आपापल्या घरची वाट पकडणार होते. यात्रा संपत आल्याची हुरहूर आणि घरी जायची वेळ जवळ आली, म्हणून आनंद अशा संमिश्र भावना मनात येत होत्या.

ह्या क्षणी मात्र ह्या विचारात रमण्यापेक्षा २० किलोमीटर चालण्याकडे लक्ष देणं भाग होत. आता पायाला आलेले फोड चांगले अक्राळविक्राळ झाले होते. चालताना नेमका तिथे दगड टोचला की मरणाच्या वेदना होत होत्या. पण मला साधारणपणे प्रत्येक ट्रेकला हा त्रास होतोच. त्यामुळे त्याबद्दलची मानसिक तयारी चांगली होती.

कँपवर चहा-पाणी उरकून आम्ही निघालो. थोडं अंतर चालत नाही, तर सर्वात पुढे चालणाऱ्या यात्रींच्या अगदी डोळ्यासमोर डोंगराचा काही भाग मोठा आवाज करत धाडकन कोसळला. सगळे जण हादरलेच. आपण घरी असताना ‘दरड कोसळली’ अश्या बातम्या ऐकत असतो. पण प्रत्यक्ष पहिल्याशिवाय त्यातली भयानकता समजत नाही. त्या ढिगाऱ्याच्या बाजूने हळूहळू आम्ही पुढे निघालो. अगदी अरुंद असा खडकाळ रस्ता उतरायचा होता. आदल्या दिवशी झालेल्या पावसामुळे तो रस्ता निसरडा झाला होता. एक-एक पाऊल मोजून-मापून टाकत तोल सांभाळून चालणे म्हणजे एक दिव्यच होते.

1-DSC_4824.jpg

1-DSC_4890.jpg
डाव्या बाजूला शुभ्रदुधाळ सिमखोला नदीचा प्रचंड खळखळाट करणारा प्रवाह दिसत होता. वीसेक दिवसांपूर्वी आम्ही ह्याच रस्त्यावरून गेलो होतो. तेव्हा ह्या नदीला जवळपास काहीच पाणी नव्हते. आम्ही प्रवाहातल्या खडकांवरून नदी आरामात पार केली होती. मध्यंतरीच्या काळात झालेल्या पावसाने ती दुथडी भरून वाहत होती. अरुंद आणि भितीदायक अश्या पुलावरून नदी पार करायची कसरत बूट ओले न होऊ देता तोल सावरत करायची होती. अवघडच होते! पाठोपाठ येणारा यात्रींचा जथ्था इथे येऊन अडकला. त्या गडबडीत सुरेशभाईने मला पटकन पुढे काढले आणि यशस्वीरीत्या तो डगमगता पूल पार करून आम्ही पुढची वाटचाल सुरू केली.

आता रुंगलिंग टॉपची चढण चढायची होती. माझ्या आठवणीप्रमाणे ही शेवटची मोठी चढाई होती. नंतरचा रस्ता तसा साधा-सरळ होता. अर्थात मला दमून थांबायला २०-२५ फुटांची चढणही पुष्कळ होते!! कुठल्यातरी दुष्ट माणसाने कुठलीतरी भयानक जादू करून ती चढाई आम्ही आलो, त्यापेक्षा दुप्पट करून ठेवली होती. भरीत भर म्हणून पावसाची भुरभूर चालू होती. मी खरोखर दमले होते. पाय, गुढघे, मांड्या सगळं ठणकत होत. पाठीवर ओझं नसलं तरी चालताना वाट लागत होती. पण घोड्यावर बसायचं नाही, हा निश्चय शेवटच्या दिवशी मोडायला जीवावर येत होतं. त्यामुळे तशीच जिद्दीने चालत राहिले. फार कठीण रस्ता आला, की सुरेशभाई न सांगता हात धरायचा. असं पाय ओढत, धापा टाकत जवळपास जगाच्या अंतापर्यंत चालल्यावर एकदाचा तो रुंगलिंग टॉप आला.

1-DSC_4852.jpg

1-DSC_4844.jpg

1-DSC_4860_0.jpg

पाच मिनिटे तिथे बसून राहिले. मी चढत असताना कितीतरी चालणारे किंवा घोड्यावरचे यात्री पुढे गेले होते. त्यांना गाठण्यासाठी वेग वाढवणे माझ्या शक्तीबाहेरच काम होत. जवळच पाणी पिऊन जरा हुशारी आल्यावर मी पुन्हा चालायला तयार झाले. आता प्राण कंठाशी येईपर्यंत चढल्यावर अर्थातच प्रचंड उतार होता. ट्रेकिंगमधला हा फार त्रासदायक भाग असतो. धाप लागेपर्यंत चढा आणि गुडघे दुखेपर्यंत उतरा. संपूर्ण परीक्षेत हे दोनच आणि तेही अनिवार्य प्रश्न असतात!!

आताचा उतार जोरदारच होता. सुरेशभाई माझा हात घट्ट पकडला, आणि आम्ही उतरायला लागलो. वाट अरुंद असल्याने तो बिचारा चिखलात पाय बरबटून घेत होता, आणि मी त्यातल्या त्यात बऱ्या रस्त्याने चालत होते. भराभर आम्ही खालच्या उंचीवर येत होतो. उतरता उतरता आमची नाश्त्याची जागा आली. छोले आणि पुरी ह्याचा समाचार घेऊन पंधरा मिनिटातच पुढे निघालो. पूर्ण यात्रेचा हिशोब केला, तर छोले-राजमा-बटाटे आणि पुऱ्या ह्यांचा पुढच्या कमीतकमी दहा वर्षांचा कोटा संपला होता!

1-DSC_4828_0.jpg

माझ्या चालण्याच्या शक्तीचा अंत होऊन त्यावर काही किलोमीटर झाले होते. छोटासा चढसुद्धा प्रचंड वाटत होता. सिरखा कँप काही अजून दृष्टिपथात येत नव्हता. आज मी सुरेशभाईला सगळ्यात जास्त वेळा ‘ अभी कितना चलना है?’ हा माझा अतिशय आवडता आणि जिव्हाळ्याचा प्रश्न विचारला असेल. तो शांतपणे ‘ अब थोडाही बच गया| आरामसे चलो|’ अशी समजूत घालत राहायचा! पहिल्या दिवशी अगदी ताठपणे तरातरा चालणारे बहुतेक सगळेच यात्री एव्हाना माझ्यासारखेच ढेपाळले होते.

असंच कसंबसं चालताना अचानक समोर कँप दिसला! माझा डोळ्यांवर विश्वासच बसेना. पाऊस नव्हता पण हवेत धुकं होत. त्या हवेत तो कँप मला आणखीनच स्वप्नवत वाटला. जेवण तयार होतं. सर्वांनी त्या गार हवेत गरमागरम जेवणावर ताव मारला. येताना आम्ही नारायण आश्रमापासून चालायला सुरवात केली होती. त्या रस्त्यावर दरड कोसळल्याने तो रस्ता बंद होता. ‘सोसा’ नावाच्या दुसऱ्या गावापासून जीपची सोय होऊ शकते, असा निरोप नारंग सरांना आला होता. पण त्याही रस्त्यावर काही अडचण आहे, अशी बातमी ‘पोर्टर टाइम्स’ मध्ये आली होती.

1-DSC_4765.jpg

1-DSC_4766.jpg

1-DSC_4773.jpg

1-DSC_4781.jpg

शेवटी सोसापर्यंत जाऊन बघू, नाहीच जमलं, तर परत सिरखा कँपला येऊन मुक्काम करू, असा सगळ्या बॅचने निर्णय घेतला. सगळे पुन्हा चालायला लागले. हवा चांगल्यापैकी सुधारली होती. माझा पोनीवाला रमेशभाई सिरखा गावातला होता. मी तशीही घोड्यावर बसणार नव्हते, मग त्याची वरात ‘सोसा’ पर्यंत कशाला, अश्या विचाराने मी त्याला तिथेच त्याचे पैसे, काही कपडे आणि त्याच्या मुलांसाठी खाऊ देऊन निरोप दिला. यात्रेतले एक-एक बंध आता संपत चालले, ह्या विचाराने डोळ्यात पाणी येत होत. ‘दिदी ठीकसे घर जाना, अगले टाइम बेटेको लेके आना’ असा आपुलकीचा निरोप घेऊन आणि त्याचा चहाचा प्रेमळ आग्रह कसाबसा नाकारून मी पुढे निघाले.

k1

तासभर चालल्यावर सोसा गाव दिसायला लागलं. ‘क्युबीस्ट’ पद्धतीच चित्र असावं, अस ते गाव दिसत होत. आमच्यातल्या बऱ्याच जणांना परत त्या कृत्रिम, धावपळीच्या जगात न जाता इथेच ह्या खेड्यात शांत-निरामय आयुष्य जगावं, असा मोह होत होता.एका जागेवरून आमचा जीप पॉईंट दिसायला लागला. चालण्याचा शेवट अगदी दृष्टिपथात आला. खरंच का मी इतका प्रवास केला? माझा माझ्यावर विश्वास बसेना. शारीरिक ताकद खरंतर केव्हाच संपली होती. मनाच्या ताकदीवर केवढातरी प्रवास झाला. उतारावरून भराभर उतरत लगेचच आम्ही सोसा गावात पोचलो. सगळे अगदी उत्साहात होते. काही यात्री जीपमध्ये बसून आधीच रवाना झाले होते. नारंग सर जश्या जीप येतील, तसे यात्री पुढे पाठवत होते.

k2

आता माझ्याबरोबर ‘जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालावीशी हाती धरोनिया’ अश्या सोबत्याचा, सुरेशभाईचा निरोप घेण्याची वेळ आली. त्यालाही पैसे, कपडे, खाऊ दिला. माझी यात्रा नीटपणे होण्यात त्याचा फार मोठा वाटा होता.

थोड्याच वेळात आमची जीप आली. वडाप पद्धतीने कोंबून दहाजण एका जीपमध्ये बसलो. आमचे पोर्टर टपावर स्वार झाले, त्यात सुरेशभाईही होता. जीपमध्ये बसल्यावर मी लगेच माझे चालायचे बूट ओरबाडून काढले आणि साध्या चपला घातल्या! पायांना इतकं बरं वाटलं की बस्स!

घाटातला वळणा-वळणांचा प्रवास होता. आता ही दृश्य मी डोळे भरून पाहत होते, एकीकडे डोळे भरूनही येत होते. रस्त्यात एक दरड कोसळली होती. तेवढा भाग चालत जाऊन पुढे दुसऱ्या जीपमध्ये बसायचं होत. आता पोर्टरांना वर बसता येणार नव्हत. ते तिथेच उतरले. पण तेवढ्यातही सुरेशभाईने माझी सॅक टपावर चढवून दिली. ‘ठीक है दिदी, ओम् नमः शिवाय’ अस म्हणून निरोप घेतला. आता तो मला भेटणार नव्हता. पण त्याची आठवण मात्र सदैव माझ्या मनात राहील.

k3

धारचूलाच्या यात्री निवासमध्ये पोचलो, तर आधी पोचलेले यात्री अंघोळ वगैरे करून तयार! चांगल्या-चुंगल्या कपड्यातले लोक ओळखायलाच येईनात. बहुधा अती ऑक्सिजनचा मारा झाल्याने सगळ्यांचे मेंदू गडबडले होते. सगळीकडून हास्याचे फवारे उडत होते. मोबाईल ह्या सोयीचा खूप दिवसांचा विरह झाला होता. आता मोबाईल सुरू झाले म्हटल्यावर मी दणादणा फोन करून गप्पा मारून घेतल्या. जाताना इथे जमा केलेलं सामान परत मिळाल. त्यातले स्वच्छ कपडे घातले. अशी शहराकडे जायची तयारी करू लागले. रात्री जेवताना नारंग सरांनी सगळ्यांचे त्यांच्या सहकार्याबद्दल आभार मानले. रूढ अर्थाने आमची यात्रा आता संपली होती. पुढचे दोन दिवस बसचा प्रवास. दिल्लीत पोचल्यावर लगेचच फाटाफूट होणार. काहीश्या जड मनानेच सगळे आपापल्या खोलीत गेले.

दिनांक ७ जुलै २०११ (धारचुला ते जागेश्वर)

k4

आज आमचा परतीचा बसचा प्रवास सुरू होणार होता. कालच्या रस्त्यात कोसळलेल्या दरडींमुळे आमचं मोठं सामान अजून पोचायचं होत. ते आज रात्री मिळेल अशी बातमी होती. धारचूलामधील एक पूल ओलांडला की आपण नेपाळमध्ये जाऊ शकतो. दिवसा कोणीही ये-जा करू शकतात. नेपाळमध्ये भारतापेक्षा कपडे स्वस्त असतात अशी माहिती सगळे सांगत होते. ‘सामान पण आलं नाहीये, तर अजून एक दिवस इथेच थांबूया, खरेदीही करता येईल,’ अशी कुरकूर आमच्यातल्या खरेदीप्रेमींनी करून बघितली. पण नारंग सरांनी काही दाद दिली नाही.

२७५ किलोमीटरचा लांबलचक प्रवास करायचा होता. त्यामुळे सकाळी भराभर आवरून आम्ही बसमध्ये बसलो. इतके दिवस चालून पायांची वाट लागली होती. त्या छोट्या बसमध्ये पाय नक्की कसे ठेवावेत हे समजत नव्हत. कसेही ठेवले तरी पाच मिनिटात रग लागायची.

धारचुला पासून जरा बाहेर पडतोय, तोवर दरड कोसळून रस्ता बंद झालेला होता! आम्ही लोक खाली उतरून बाजूला बसून राहिलो. तासाभराने तिथले सां.बा.खात्याचे लोक उगवले. मग मात्र त्यांनी अक्षरशः वीस मिनिटात रस्ता मोकळा केला. थोड्याच वेळात आम्ही आय.टी.बी.पी.च्या ‘मीरथी’ ह्या कँपला पोचलो. जाताना होता, तसाच थाट आताही होता. आम्ही काही युद्ध जिंकून आलो असल्यासारखे ते आमचं कौतुक करत होते. अल्पोपाहार आटोपल्यावर जाताना आमच्या ग्रुपचा जो फोटो काढला होता, त्याची प्रत प्रत्येकाला भेट दिली.

1-DSC_4695_0.jpg

1-DSC_4704.jpg

हा सगळा रस्ता छान झाडीतून जाणारा आणि निसर्गरम्य होता. उद्या दुपारपर्यंत आम्ही काठगोदामला आणि रात्री दिल्लीत पोचलो असतो. आता अगदी थोडाच वेळ ह्या सुरेख दृश्यांची सोबत होती. आमचा प्रवास ‘पाताळ भुवनेश्वर’ कडे चालू होता.

पाताळ भुवनेश्वर ह्या त्या भागातला एक विलक्षण प्रकार आहे. चुनखडीच्या (lime stone) खडकांमध्ये पाण्याच्या प्रवाहामुळे निरनिराळे आकृतिबंध तयार झाले आहेत. आत-बाहेर करायला एका भुयारातून घसरत जावं लागत. आत मात्र चालता येत. गणपती, श्रीशंकर आणि इतर ३३ कोटी देवांचे स्थान इथे आहे, अस म्हणतात. वनवासाच्या काळात पांडवांचे वास्तव्य ह्या गुहांमध्ये झाले होते, अशी श्रद्धा आहे.त्या गुहा वेगळ्याच आणि म्हणून लक्षात राहण्यासारख्या होत्या.

महाराष्ट्रात नाही, पण तिथल्या स्थानिक वर्तमानपत्रातून कैलास यात्रेला बरंच महत्त्व असत. त्यातल्याच एका वर्तमानपत्रात नंदिनीचा एक नदी पार करताना फोटो आला होता! मज्जा! बसमधला काही वेळ त्यावर चर्चा करण्यात छान गेला.

मग मात्र वेळ जाता जाईना. एक तर सगळा रस्ता वळणावळणाचा. त्यामुळे पु.लं.च्या ‘म्हैस’ सारखी, बसला एका अर्थाने लागणारी ‘वळण’ प्रवाशांना दुसऱ्या अर्थी लागत होती! प्रत्येकाला आपला पुढचा नंबर लागतोय की काय ही भीती वाटत होती. त्यामुळे तोंड उघडून दुसऱ्याशी बोलायची पण भीती वाटत होती. संध्याकाळ होऊन काळोख झाल्यावर तर बाहेर बघणंही अशक्य झालं. कधी एकदा ते जागेश्वर येईल अस झालं होत. भांडा-भांडी व्हायला अगदी आदर्श परिस्थिती होती. पण सगळे त्या प्रवासाने इतके गळून गेले होते, की भांडायलासुद्धा ताकद शिल्लक नव्हती.

अधून मधून डुलक्या घेताना ‘आपण घरी पोचलोय, आपल्या सवयीच्या बेडवर झोपलोय’ अशी स्वप्न पडत होती. यात्रेची मजा संपली, हिमालयाची संगत थोडाच वेळ राहिली, अश्या वेळेला घरची आठवण चरचरून येत होती. हॅरी पॉटरसारखी काही जादू येत असती, तर मी त्याच क्षणी घरी गेले असते.
बराच वेळ तो थकवणारा प्रवास करून आम्ही जागेश्वरला पोचलो. नको वाटत होत, तरी चार घास पोटात ढकलून लगेच सगळे गाढ झोपून गेले.

दिनांक ८ जुलै २०११ (जागेश्वर ते दिल्ली)

k5

k6

k7

k8

जागेश्वर इथे एक देवळांचे संकुल आहे. तिथले स्थानिक लोक ते बारा ज्योतिर्लिंगातले पहिले ज्योतिर्लिंग आहे, असे मानतात. ९व्या ते १३व्या शतकात बांधलेली सुरेख दगडी बांधणीची १२४ देवळे तिथे आहेत. दांडेश्वर, चंडिका, कुबेर, मृत्युंजय अशी निरनिराळी मंदिरे तिथे आहेत. आम्ही आर्किटेक्चरचे शिक्षण घेत असताना अश्या जागी स्केचिंगला जायचो, त्याची आठवण आली. अजून प्रवासाचा बराच पल्ला बाकी असल्याने भल्या पहाटे घाईघाईने तयार होऊन दर्शन घेऊन आलो.

पुन्हा एकदा बसप्रवास सुरू झाला. चालून पायांना त्रास झाला नव्हता, इतका त्रास कालपासूनच्या बसच्या प्रवासाने झाला होता. कधी एकदा हा प्रवास संपेल, असं झालं होतं. दुपारच्या जेवणाच्या वेळेपर्यंत आम्ही काठगोदामला पोचलो. हे हिमालयाच्या पायथ्याशी असलेलं गाव. हिमालयाचा निरोप घेऊन, पर्वतांची साथ सोडून शहरी भागाकडे जायचं होतं. काठगोदामच्या यात्रा समितीने आमचं जोरदार स्वागत करून आम्हाला उत्तम जेवण दिलं. नंतरच्या कार्यक्रमात यात्रा पूर्ण केलेल्यांना भारत सरकारची प्रमाणपत्रं दिली. कार्यक्रम आटोपल्यावर आरामदायी अश्या वोल्वो बसमध्ये बसून आमचा बस प्रवासाचा शेवटचा टप्पा सुरू झाला. कितीतरी दिवसांनी पायांना खूप जागा मिळाली. त्या भव्य लेगस्पेसच ‘काय करावं?’ हेच कळेना. बसमध्ये चक्क पाय हालवता येत होते! इतकं बरं वाटत होत!

1-DSC_4664.jpg

पुढचा प्रवास महामार्गावरून सुरु झाला. हिमालयाची शिखरे मागे पडली होती. गाड्यांचे कर्णकर्कश आवाज, गर्दी, अडकलेली वाहतूक, धूळ-धूर, निरनिराळ्या नेत्यांचे चेहरे दाखवणारी होर्डिंग्ज आपण शहराकडे चाललोय ह्याची जाणीव देत होती. आम्ही ठरल्यापेक्षा एक दिवस अगोदर दिल्लीत पोचणार होतो. माझं परतीच्या प्रवासाचं तिकीट १० तारखेच होत. ठरल्याप्रमाणे १० तारखेला जावं की जास्त पैसे भरून एक दिवस आधीचं, म्हणजे उद्याचंच तिकीट काढावं हा विचार दोन दिवस करत होते.

काठगोदामनंतर केव्हातरी मला अजून एक दिवस दिल्लीत राहण्याचा विचार नकोनको झाला. पुन्हा तो गुजराथ समाज, ती मळकी अंथरूण-पांघरूण, ती गजबज सगळंच. शनिवारी रात्री घरी पोचले, तर रविवारचा दिवस नवरा, मुलगा सगळ्यांबरोबर घालवता येईल, ह्या विचाराचा विजय झाला. शेवटी बरेच जास्तीचे पैसे घालून दुसऱ्या दिवशीच्या दुपारच्या फ्लाईटचं तिकीट काढलं. अजून चोवीस तासात आपण घरी पोचणार ह्या कल्पनेने जीवाला छान गार वाटत होत.

तीनेक तास प्रवास झाल्यावर गाझियाबाद आलं. इथून आमच्या बॅचची वजाबाकी सुरू झाली. गाझियाबाद आणि परिसरातली मंडळी सगळ्यांचा निरोप घेऊन उतरली. असे यात्री जागोजागी उतरवत उतरवत दिल्लीतल्या गुजराथ समाजला पोचायला जवळजवळ रात्रीचे बारा वाजले.

तिथे पोचलो तर अजून एक आश्चर्य आमची वाट बघत होत. यात्रा समितीचे, तसंच यात्रा सुखकर व्हावी म्हणून झटणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, दिल्लीतल्या यात्रींचे नातेवाईक सगळे एवढ्या रात्रीचे जातीने हजर होते. हर्षभरित नजरेने आमचे स्वागत करत होते. आम्हाला पुष्पहार घालून, मिठाई खायला घालत होते. आम्हाला नमस्कार करत होते. सगळ्यांचे नातेवाईक आम्ही जणू सगळेच त्यांचे नातेवाईक आहोत अश्या आपुलकीने आम्हाला मदत करत होते.

1-DSC_4622.jpg

हे सगळं पाहून सगळ्यांना मजा करायची हुक्की आली. मग काय, यात्री, त्यांचे नातेवाईक सगळ्यांनी नाच-गाणी करून आपल्या उत्साहाला वाट करून दिली. हसून-खिदळून झाल्यावर दिल्लीतले यात्री त्यांच्या घरी निघाले. बहुतेकांच्या डोळ्यात पाणी होत. पुन्हा भेटण्याची, संपर्क ठेवण्याची आश्वासन एकमेकांना देत जड पायाने ते लोक गाड्यांमध्ये जाऊन बसले. नारंग सरांच्या पत्नी त्यांना घ्यायला आल्या होत्या. आमच्या बरोबर मित्रासारख्या गप्पा मारणाऱ्या, खेळीमेळीने वागणाऱ्या सरांमुळे आमचे हे दिवस आनंदात गेले. त्यांचे आम्ही मनापासून आभार मानले.

उरलेले यात्री पुन्हा एकदा डॉर्मिटरीत गेलो. बरीच रात्र झाली होती. पण कोणालाच झोपायची इच्छा होईना. सगळे एकमेकांशी गप्पा मारत होते, हसत होते. महिन्याभराची उजळणी होत होती. आठव्या बॅचचे यात्री शेजारच्या डॉर्मिटरीत झोपले होते. त्यांना दुसऱ्या दिवशी मेडीकलसाठी जायचं होतं. त्यांची झोपमोड होऊन त्यांना त्रास होईल, हे लक्षात आल्यावर आम्ही आमच्या उत्साहाला कसाबसा आवर घालून झोपलो.

दिनांक ९ जुलै २०११ (दिल्ली ते पुणे)

काही झालं तरी आज लवकर उठायचं नाही, अस मी अगदी पक्कं ठरवलं होत. पण..... आमच्यापासून गेले चार दिवस दुरावलेले आमचं सामान पहाटे पाच वाजता येऊन पोचलं. ते बाहेर रस्त्यावरच आहे, असं कळल्यावर घाई-घाईने उठून सामान घ्यायला जावंच लागलं. सामान आणल्यावर पुन्हा एकदा सगळे सामानात डोकं खुपसून बसले. कोणाकडे जास्तीचे कपडे नाहीत, कोणाचा मोबाईल तर कोणाचा चार्जर मोठ्या सामानात ठेवला गेला होता. ते सगळं परत हातात आल्यामुळे सगळ्या यात्रींमध्ये उत्साहाची लाट आली.

पहाटेच ह्या सगळ्या गोंधळात झोपमोड झाली. राजस्थान, पंजाब अश्या शेजारच्या राज्यातून आलेले यात्री सामान हातात पडताच घरी रवाना होत होते. इतका विलक्षण अनुभव ज्यांच्या साथीने घेतला, त्यांचा निरोप घेताना जड जात होतं. डोळ्यात पाणी येत होतं. भारताच्या निरनिराळ्या राज्यातून आलेल्या ह्या मंडळींची पुन्हा कधी भेट होईल की नाही, हे सुद्धा सांगता येत नाही. रोजच्या जगण्याची धडपड काही चुकत नाही. पण आठवणींच्या सुंदर कप्प्यात हे सगळे जण कायमचे विराजमान असणार, हे नक्की!

मी अंघोळ उरकून सामान पुण्याला नेण्याच्या बेताने भरून टाकलं. आठव्या बॅचचे यात्री तिथे आलेले होते. ते आमच्याकडे आदराने बघत होते. त्याचं शंकासमाधान करण्याची जबाबदारी आमच्यातल्या काही उत्साही यात्रींनी आपण होऊन घेतली होती. ह्या सगळ्या गडबडीत दुपारपर्यंतच वेळ कसा गेला, ते कळलंही नाही. मी आणि पुण्यातले अजून दोन यात्री एकाच विमानाने येणार होतो. सकाळपासूनच मुलाचे सारखे फोन येत होते. ‘आता काय करते आहेस?, कधी निघणार आहेस? मी आणि बाबा तुला घ्यायला येतोय, एयरपोर्टमधून बाहेर पडलीस, की तिथेच थांब’ ह्या आणि अश्या सूचनांचा मारा चालू होता. मी मुलाला इतके दिवस सोडून कधी कुठे गेले नव्हते. आता कधी एकदा त्याला भेटते असं झालं होतं.

सगळ्यांचा निरोप घेतला. पत्ते-फोन नंबरची देवाण-घेवाण झाली. फोटो सारखे चालूच होते. सगळ्यांचे ऋणानुबंध एवढे घट्ट झाले होते, की सामान उचलून निघताना मन आणि डोळे भरून आले. आनंद असो नाहीतर दुःख, भावना पराकोटीची वा परमोच्च असली की तिचे मूर्त स्वरूप किती सारखे असते? दोघांना आधार असतो फक्त अश्रूंचा....

टॅक्सी, विमानतळ आणि विमान हे टप्पे भराभर संपले. बघता बघता मी पुण्यात पोचले सुद्धा!! बाहेर आले तर नवरा आणि मुलगा वाट बघत थांबलेच होते. मुलांचे चेहरे पाहून डोळे निवतात, असं ऐकलं होत. त्याचा प्रत्यय आला. घरी पोचल्यावर एवढी खडतर यात्रा संपवून नीटपणे परत आल्याबद्दल कृतज्ञतेने देवाला, आई-वडिलांना नमस्कार केला. आई-बाबा, नवरा-मुलगा सगळ्याचे चेहरे आनंदाने फुलले होते.

हे असे संपूर्ण आनंदाचे, समाधानी क्षण चिमटीत पकडून ठेवता आले, तर पुढचं सगळं आयुष्य म्हणजे कैलास यात्रेसारखी आनंददायी यात्रा होईल, नाही?

Keywords: 

माझी कैलास-मानस सरोवराची यात्रा भाग-१२ (समारोप)

k11

खरंच, मला का वाटलं असेल कैलास-मानसला यावं असं? मी तिथे असताना आणि परत आल्यावरही ह्यावर बराच विचार केला. मी तशी देव-धर्म, उपास-तापास करणाऱ्यातली नाही. पाप-पुण्य ह्या कल्पनांवर माझा विश्वास नाही. समाज नीट चालावा म्हणून परलोकातील सुखाचा मोह दाखवलेला आहे, असं मला वाटतं. म्हणजे कसं की, भुकेल्याला अन्न द्यावेसे वाटावे, म्हणून त्याला ‘पुण्यकर्म’ करून मृत्यूनंतरच्या फायद्याची लालूच. वाईट वागल्यास ‘पापाची’ भीती दाखवणे. भूतदया नक्कीच चांगली, पण त्याला ‘पुण्य’ मिळवण्याची झालर कशाला? असा माझा विचार. त्यामुळे धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे अनेक जन्मातील पापे धुवायचं आकर्षण वाटण्याच काही कारणच नाही. गिर्यारोहण किंवा प्रवासाची आवड म्हणावी तर, अनेक हिमालयातले ट्रेक किंवा परदेशातील प्रवास मी खर्च केलेल्या पैशात आरामात झाले असते. आजही यूथ हॉस्टेल किंवा तश्या संस्थांच्या ट्रेकला, दिल्ली पर्यंतचा विमानाचा खर्च पकडूनही, १२-१५ हजारापेक्षा जास्त खर्च येत नाही. ह्या यात्रेला १-१.२ लाखापर्यंत खर्च येतो. म्हणजे त्या खर्चात १० ट्रेक मी आरामात करू शकले असते.

मग का? जवळजवळ २० वर्ष मी हे स्वप्न का पाहिलं असेल? युरोप ट्रीपला जावे किंवा नायगारा फॉल बघावासा मलाही वाटतो. पण ह्या इच्छेची तीव्रता काहीच्या काहीच का होती? खरं सांगायचं तर ‘का जावंसं वाटलं?’ ह्याच उत्तर पूर्णपणे अजून मलाही मिळाल नाहीये! कर्मकांड बुद्धीला पटत नसली तरी हिंदू धर्माचा पगडा माझ्या अंतर्मनावर असेल का? अश्या वेळेला पु.ल.देशपांडे म्हणतात ते,’गड्या, तू वंशाचा दिवा नसून निव्वळ दुवा आहेस’, हे खरं वाटायला लागतं.

आमच्या बॅचच्या इतर यात्रींच्या बोलण्यातून मी ‘ते’ का आले असतील? ह्याचा अंदाज घेत होते. शेकडा ७०-७५ % यात्री हे पुण्यप्राप्तीचा स्पष्ट हेतू डोळ्यासमोर ठेवून आले होते. उरलेले लोक माझ्यासारखे कुंपणावर बसलेले होते. शारीरिक क्षमता वाढवणे, अप्रतिम सुंदर निसर्गाचा आस्वाद घेणे, मनाच्या ‘वस्तुनिष्ठपणा’ कडून ‘भक्तिमार्गाला’ जाण्याचा प्रयत्न अशी अनेकविध उत्तरे ह्या शोधातून मिळाली.

वयाने मोठं होऊन ह्या जगाच्या रुक्ष धकाधकीत तगून राहणे अवघडच असतं. त्या मोठं होण्याबरोबर अपरिहार्यपणे गळ्यात येणाऱ्या कर्तव्य -जबाबदाऱ्यांच्या जडशीळ माळा, यश-अपयशात होणारी रस्सीखेच, वेळोवेळी मनाला घालावी लागणारी मुरड हे सगळं बाजारात फेरफटका मारण्याइतकं सोपं असेल कसं? ह्या सगळ्यातून थोडं थांबून वेगळ्या वातावरणात जाणे, आपल्या मनाला ‘आपल्याला नक्की हवंय तरी काय?’ हा विचार करायला भाग पाडणे, असा काहीसा हेतू माझ्या मनात होता. शिक्षण, विवाह, अर्थाजन, अपत्य संगोपन हे ठराविक टप्पे घेताना जगण्याचा वेग प्रचंड वाढला. मध्येच अचानक वाटायचं, पण आपण का धावतोय इतकं? आणि कशासाठी? नक्की पोचायचंय तरी कुठे? आपलं नक्की ध्येय तरी काय आहे? हा शोध घेण्याइतकीही फुरसत मिळत नव्हती. गेली काही वर्षे ह्या कुतरओढीने मी अगदी गळून गेले होते. परिस्थितीने दिलेले काही घाव सांभाळत, कुरवाळत राहत होते. पूर्वी स्वभावात नसलेला एक कडूपणा आला होता. त्याचा त्रास व्हायचा.

मी आनंदी / सुखी/ समाधानी होण्यासाठी स्वतःकडे पाहण्याऐवजी मला बाह्य परिस्थितीकडे बोट दाखवणं सोपं वाटत होतं. मला अमुक इतके पैसे मिळाले की, माझ्या भोवतालचे लोक अश्या अश्या पद्धतीने बदलले की, समाज असा असा झाला की, मी समाजासाठी- कुटुंबासाठी ह्या गोष्टी केल्या की मग मला छान वाटेल, सगळे मला नक्की नावाजतील, अशी भावना मनात प्रबळ झाली होती. ह्या भावनेला धक्का बसला, की निराश वाटायचं.

ह्या सगळ्यातून बाहेर पडायला मला ह्या महिन्याची फार मदत झाली. आत्मशोधाच्या ह्या प्रक्रियेसाठी अत्यंत पोषक असं वातावरण ह्या यात्रेत मला मिळालं. एकतर संगणक, आंतरजाल, दूरध्वनी आणि कुटुंबीय ह्या सगळ्यापासून मी खूप दूर होते. इतर कुठल्याही ट्रेकपेक्षाही जास्त शारीरिक-मानसिक क्षमतेचा, अनिश्चितता झेलण्याचा तयारीचा कस ह्या यात्रेत रोजच्या रोज लागत होता.

रोजच्या चरितार्थासाठीच्या गडबडीत माझा माझ्यासोबतचा संवाद केवळ रोजचे अन्न-वस्त्र-निवाऱ्याच्या प्रश्नांपर्यंतच राहिला होता. ती तुटलेली साखळी जोडायला मला इथे वेळ आणि मोकळीक मिळाली. आपल्या स्वतःच्या मतांची चिरफाड करणे, म्हणजे एक शल्यकर्मच! ते काम मी नेहमीच मागे टाकत होते. आता मात्र ते आपोआपच होत होत. धार्मिकतेकडे माझा कल नव्हता, आणि आजही नाही. परंतु माझ्यातल्या आध्यात्मिकतेचा परिचय ह्या महिन्याभरात झाला. मात्र ती आध्यात्मिकता माझ्या स्वतःच्या आत्मिक प्रगतीसाठी असेल, बाह्य प्रदर्शनासाठी नाही.

ह्या यात्रेत ‘दिव्यत्वाची प्रचिती’ घेतल्यावर ‘कर माझे’ नक्कीच जुळले. पण मी नास्तिकतेकडून आस्तिकतेकडे गेले का? तर नाही. मी त्या बाबतीत होते तिथेच आहे. कैलास पर्वतावर किंवा मानस सरोवराच्या काठी कोणतेही देऊळ नाही. अर्थातच त्याबरोबर येणारा ‘देव’ नावाचा व्यवसाय नाही, धातूशोधक यंत्रे नाहीत, प्रसाद-माळांची दुकानेही नाहीत. ‘निर्गुण-निराकार’ असे ते रूप अनुभवून आल्यावर तर मला गर्दीने गजबजलेली, स्वतःची जाहिरात करणारी देवळे आणखीनच आवडेनाशी झाली.

पण कैलास-मानस च्या रौद्र अनुभूतीचा परिणाम माझ्या मनावर नक्कीच झाला.

मी काहीशी शांत झाले, अस मला वाटत. कपडे – दागिने हा माझा प्रांत पहिल्यापासून कधीच नव्हता. आता मी त्यापासून अजूनच लांब गेले. माझी विचार करायची पद्धत काहीशी सखोल झाली. आपल्या दिशेने येणारी काही वाक्य किंवा घटना मी थोड्या अलिप्तपणे पाहू लागले. वाद घालणे, शब्दाने शब्द वाढवणे हे टाळण्यासाठी विचारपूर्वक प्रयत्न करायला लागले. म्हणजे मी क्रोध, लोभ, मोह, माया सगळं जिंकलं का? नाही, अजिबात नाही. मी अजूनही एक माणूसच आहे, साधू- संन्यासी झाले नाही. पण तिथल्या अपूर्व अश्या शांतीचा अनुभव मन शांत करून गेला, हे मात्र खरं!!

कैलास यात्रेला येणाऱ्या यात्रींमध्ये भाविक, श्रद्धाळू लोक मोठ्या प्रमाणात असतात. संपूर्ण यात्रेत उपास करण्यापासून ते चालताना मौन पाळणारे लोक असतात. त्यांच्या मनोबलाची कमाल वाटते. पण हेच लोक लहान-सहान कारणावरून आपल्या सहयात्रींबरोबर किंवा पोर्टरबरोबर भांडताना, अद्वातद्वा बोलताना दिसले, की धक्काच बसतो. ह्या लोकांची ही व्रत-वैकल्य शरीरापर्यंतच राहतात, मनापर्यंत झिरपत नाहीत, ह्याची खंत वाटते.

पूर्वी लोकं काशीयात्रेला जात, ते घरादारावर तुळशीपत्र ठेवूनच. प्रवासाच्या, संपर्काच्या कोणत्याही सोयी नसताना ह्या यात्रेला जात असत. जाताना आपल्या घराचा, कुटुंबाचा शेवटचा निरोप घेण्याची मानसिक तयारी आपोआपच होत असेल. जगून-वाचून कोणी परत आला, तर तो त्याचा पुनर्जन्म मानला जात असे. त्या आलेल्या माणसाला आपला जीव ज्यात गुंतला आहे, त्या सगळ्याकडे साक्षी भावाने पाहणे शक्य होत असेल. ह्या सगळ्या पसाऱ्याचा केंद्रबिंदू ‘मी’ आहे, ही समजूत किती पोकळ आहे, ह्याची जाणीव होणे, हाच तीर्थयात्रांमागचा उद्देश असेल का?

महाविद्यालयात असल्यापासून मी ह्या यात्रेची स्वप्न बघितली होती. पुढे घर-संसार-व्यवसाय ह्या जबाबदाऱ्या महिनाभर बाजूला कशा टाकणार? असं वाटून खूप वर्षे ती इच्छा मी कोपऱ्यात सरकवली होती. पण प्रत्यक्षात मी नसतानाही सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालू राहिल्या. माझ्या परीने मी सगळी ओळ नीट लावायचा प्रयत्न केला होता. तरीही, मनाच्या एका कोपऱ्यात ‘माझ्या वाचून सगळ्यांचं खूप अडेल’ अशी एक भावना होती. पण तो एक अहंभाव होता, असं आता वाटतं. आपलं घर, व्यवसाय, कुटुंब ह्या सगळ्यात गुंतून पडलेल्या मनाला थोडं बाजूला जाण्याची संधी मिळाली. निसर्गाचे ते भयचकित करून टाकणारे ते रूप बघून माझ्या सुखरूप परत येण्यामागे थोडा योगायोग, थोडं नशीब, थोड्या सगळ्यांच्या सद्भावना आहेत ह्याची प्रखर जाणीव झाली.

हे लक्षात आल्यावर मनात असलेल्या, पण करायची हिंमत न केलेल्या असंख्य गोष्टी वर आल्या. मला चित्र काढायला शिकायची आहेत, भरपूर प्रवास करायचा आहे, नवीन भाषा शिकायच्या आहेत. जी गोष्ट खरंच मनापासून करावीशी वाटते, ती परिस्थितीचा फार बाऊ न करता करून टाकायचा एक आत्मविश्वास मला ह्या प्रवासातून मिळाला. आपल्या वागण्यातून जर हे काही करायची तेवढी असोशी दिसली, तर आपले कुटुंबीय सुद्धा भरपूर सहकार्य करतात, हे लक्षात आले.

आपल्या दिनक्रमाशिवाय वेगळी गोष्ट करायला, शिकायला ‘अत्यंत आदर्श’ अशी परिस्थिती कदाचित कधीच निर्माण होणार नाही. ‘आता दोन महिने मला ऑफिसला सुट्टी आहे, मुलगा आजीकडे गेलाय, खिशात भरपूर पैसे आहेत, घरच्या कोणत्याही जबाबदाऱ्या नाहीयेत, आता मी माझ्या मनातली ही गोष्ट करते/ शिकते’ असं व्हायची शक्यता जवळपास नाहीच!! आणि वर वर्णन केलेली आदर्श परिस्थिती नसताना काही ठरवलं, तर माझ्यावर विश्वास ठेवा, आभाळ कोसळत नाही’!! सगळं व्यवस्थित रांगेला लागतं! तेव्हा ‘त्यागमूर्ती’ होण्याची नशा सोडून ‘आनंदमूर्ती’ व्हायचा निश्चय मी करून टाकला आहे.

ही यात्रा मी स्वतः केली, हे जरी खरं आहे, तरी त्यामागे अनेकांचे सहकार्य असते. सासर- माहेरचे कुटुंबीय, मित्र-मैत्रिणी, सहकारी, सहयात्री तर असतातच. पण मी नसताना एकही दिवस सुट्टी न घेणाऱ्या आमच्या घरकामाच्या मावशी, ‘तिकडून फोन करा, मी तुमचा फोन इथून रिचार्ज करेन.’ अस म्हणणारा दुकानदार, न सांगता मला भरपूर सुट्टे पैसे आणून देणारी माझी रेल्वेत काम करणारी जिवलग मैत्रीण, असे असंख्य. किती जणांची नवे घेऊ? मी लहान असल्यापासून भरपूर वाचत आले. लिखाणाची हिंमत मात्र कधीच केली नव्हती. माझ्या मोठ्या भावाने मला हे अनुभव लिहिण्याचा खूप आग्रह केला. देवनागरी लिखाणासाठीचा फॉन्ट देण्यापासून ते मला लिहिता न आलेले काही शब्द इ-मेलने पाठवण्यापर्यंत सगळी मदत त्याने मला केली.

त्याच्यामुळेच ही लिखाणाची झिंग मला अनुभवता आली. माझेच अनुभव लिहिताना कितीतरी वेळा माझे डोळे भरून आले. यात्रा संपताना झालेली घालमेल लिहिताना मी परत तशीच अस्वस्थ झाले. पण मला नक्की काय वाटलं, तेव्हा नक्की काय विचार आले, ह्या सगळ्याचा माझ्या व्यक्तिमत्त्वावर काही परिणाम झाला का? ह्याची उत्तरे मला लिहितानाच मिळाली. प्रत्यक्ष प्रवासात असताना आपलं लक्ष ‘आपली तब्येत, आपलं सामान, ऊन/पाऊस/थंडी, उद्याच्या चढ/उताराची – चालण्याच्या अंतराची काळजी, घरची आठवण’ अश्या असंख्य ठिकाणी असत. घरी संगणकासमोर बसून शांतपणे टंकताना, हे कोणतेही ताण नव्हते. त्यामुळे स्वतःला तपासायला योग्य वेळ मिळाला. लिहील नसत, तर ह्या माझ्या ‘स्व’च्या शोधाला मी नक्कीच मुकले असते.

ह्या लिखाणाबरोबरची सर्व छायाचित्रे मी काढलेली नाहीत. मला यात्रेत गवसलेली माझी मैत्रीण नंदिनी, तसेच आमच्या बॅचचे कलाकार श्री.शरद तावडे ह्यांनी ती मला विनातक्रार, विनाअट दिली. त्यामुळे माझ्या लेखांची खुमारी खूप वाढली.

काळ-काम-वेगाची गणिते सोडवताना ज्यांच्याशी संपर्क कमी झाला होता, किंवा पार तुटलाच होता, अशा काही मित्र-मैत्रिणींशी किंवा नातेवाइकांशी मी ह्या निमित्ताने परत एकदा जोडली गेले. माझे लिखाण वाचून, ज्यांची माझी काहीही ओळख नाही, अशांनीही मला भरघोस प्रोत्साहन दिले. त्या सर्वांची मैत्री ही मला ह्या लिखाणाने दिलेली अपूर्व अशी भेट आहे.

शेवटी काय सांगू? आता शब्द अपुरे पडत आहेत. ह्या संपूर्ण यात्रेत निसर्ग सौंदर्याने, आव्हानाने, आश्चर्याने नटलेली धरतीमाता आपल्यासमोर असते. ह्या अलौकिक सौंदर्याचा अनुभव प्रत्येक भारतीयाला मिळावा, इथे प्रत्यक्ष जाऊन येण्याची ओढ निर्माण व्हावी, यासाठी आपण काहीतरी करावे, हा एक हेतू ह्या लिखाणामागे आहेच! इच्छुक आनंदयात्रींना हिमालयाचा यात्रिक होण्याचे भाग्य लाभलेल्या आमच्यासारख्या भाग्यवंताच्या हार्दिक शुभेच्छा!

ॐ नमः शिवाय......... ॐ नमः शिवाय.........

k12

ह्या मालिकेतील बाकीच्या भागांच्या लिंक्स