भारतवारी मे-जून २०२२

फार म्हणजेच फारच उशीराने, मे-जून मध्ये केलेल्या भारताच्या ट्रिप बद्दल आता पाच महिने होऊन गेल्यावर अखेरीस त्याबद्दल पोस्ट करायला सुरुवात करते आहे.

ही बरीचशी दैनंदिनी आहे, थोडं प्रवास वर्णन आहे, भारतातल्या तीन चार आठवड्यांच्या वास्तव्यात दिसणारे, जाणवणारे बदल, येणारे अनुभव, त्याबद्दलचे जरा विचार असं सगळंच आहे. अनेक वर्ष भारता बाहेर राहून प्रत्येक भारतवारी वेळी अनेक बदल दिसतात, कळत नकळत दोन्हीकडची तुलना पण होत असते. काही व्यक्तिगत बाबी तर काही माझ्यासारख्या अनेकांना अश्या वेळी जाणवत असतील अश्या गोष्टी.

Keywords: 

लेख: 

भारतवारी मे-जून २०२२ - भाग १

फार म्हणजेच फारच उशीराने, मे-जून मध्ये केलेल्या भारताच्या ट्रिप बद्दल आता पाच महिने होऊन गेल्यावर अखेरीस त्याबद्दल पोस्ट करायला सुरुवात करते आहे.

ही बरीचशी दैनंदिनी आहे, थोडं प्रवास वर्णन आहे, भारतातल्या तीन चार आठवड्यांच्या वास्तव्यात दिसणारे, जाणवणारे बदल, येणारे अनुभव, त्याबद्दलचे जरा विचार असं सगळंच आहे. अनेक वर्ष भारता बाहेर राहून प्रत्येक भारतवारी वेळी अनेक बदल दिसतात, कळत नकळत दोन्हीकडची तुलना पण होत असते. काही व्यक्तिगत बाबी तर काही माझ्यासारख्या अनेकांना अश्या वेळी जाणवत असतील अश्या गोष्टी.

तर..घरापासून निघाल्यापासून एकूण सव्वीस तासांचा प्रवास करून रात्री सव्वा अकरा ला घरी पोचलो. Almost अडीच वर्षांनी. प्रचंड उत्सुकता होती सृजनच्या मनात. दर वेळी प्रवास काही ना काही कारणाने असतोच विशेष. यावेळी आम्ही निघणार त्याच दिवशी दुपारी जर्मनीत कोवॅक्सिन बद्दलचे नियम बदलले ही बातमी आली. या कारणाने आई बाबा इकडे येऊ शकत नव्हते, म्हणून एकदम आनंदी आनंद झाला. बॅग विशेष काही पॅक करायच्या नव्हत्या, निवडक कपडे आणि बाकी तिकडे सगळ्यांना द्यायची gifts. ऐन उन्हाळ्यात जात असल्यामुळे यावेळी चॉकलेट न्यायचे नाहीत असं ठरवलं होतं. तसंही भारतात मिळतातच आता त्यातले बरेच प्रकार, बुलढाण्यात सहज मिळत नाहीत, शिवाय मी इकडून आणले याचं कौतुक असतं, पण Frankfurt ते दिल्ली, दिल्ली ते औरंगाबाद आणि मग औरंगाबाद ते बुलढाणा असा उन्हाळ्यात प्रवास बघता ते कॅन्सल केले.

इकडे घरातील सामानाची संपवा संपवी झाली. पहिल्यांदाच इथल्या शेजाऱ्यांशी खूप चांगली ओळख झाली आहे नवीन घरात, आम्ही चार आठवडे नसू हे त्यांच्याशी बोलणं झालं होतं, त्यांना किल्ली नेऊन दिली. घरातली काही झाडं दिली. उरलेल्या भाज्या जवळच्या भारतीय शेजार्यांना दिल्या. शेजारच्या आजीने हात हातात घेऊन फार प्रेमाने 'परत या, मी वाट बघते आहे तुमची' असं सांगितलं तेव्हा माझ्याच डोळ्यात पाणी आलं. तिची मैत्रीण पण तिच्या सोबत 'हो आता गार्डन मध्ये तुम्ही दिसणार नाही, आठवण येईल तुमची' असं म्हणाली. इथेही कुणी आपली वाट बघतं ही भावना कदाचित पहिल्यांदाच एवढी प्रकर्षाने वाटली. सगळी दारं खिडक्या बंद आहेत का चेक करणे, पासपोर्ट पैसे इत्यादी अति महत्वाच्या गोष्टी घेतल्या का हे चेक करणे असं करत असतानाच टॅक्सी आली आणि घराला बाय म्हणून निघालो.

विमानतळावर पोचून चेक इन आणि बॅग द्यायला भली मोठी रांग. PCR टेस्ट बघितली, मग सोबत लहान मुलगा आहे म्हणून त्यांनीच आम्हाला पुढे नेलं. आम्ही ज्या काऊंटर वर थांबलो तिथला माणूस आम्हाला काहीही न सांगता सरळ उठून गेला. मी पाच मिनिटात येतो, बंद होतंय, दुसरं कुणी येईल, नाही येणार का ही च बोलला नाही, आम्हाला कळेना की आम्ही आता दुसरीकडे जायचं की वाट बघायची. मग शेवटी तिथेच दुसरी मुलगी आली. तिच्या मते आमची नावं फार कठीण होती, यावर आम्हाला हसावे की रडावे कळेना. लांबच लांब रंग दिसत असून एक काउंटर बंद करू, एवढे कश्याला हवेत असंही ती म्हणत होती. दोन काउंटर वाढवले तरी चालतील अशी गर्दी असताना हे यांचे अजबच प्लॅन होते. त्यातून त्यांच्या सिस्टीमने आम्हाला तिघांना तीन वेगवेगळ्या सीट दिल्या होत्या. एक पाच वर्षांचा मुलगा असताना तो स्वतंत्र कसा बसेल हा प्रश्न बोर्डिंग पास देतानाही तिला पडला नाही, वेब चेक इन चा पर्याय नव्हताच. एसटी रेल्वे सगळीकडे सीट अलोकेट होताना या गोष्टी विचारात घेतल्या जातात आणि विमानात नाही, पहिल्यांदाच असं अनुभवत होतो. मग शेवटी तिने कश्या तरी दोन सीट मिळवून दिल्या एकत्र. बॅग गेल्या, आणि आम्ही गेट वर पोचलो तर बोर्डिंग झालेच चालू. सगळ्यात शेवटच्या दोन सीट आणि मग त्याच रांगेत पलीकडच्या खिडकी जवळ सुमेध. सामान ठेवलं. सृजनच्या दोन टोकांना चाललेल्या गप्पा बघता आम्ही एकत्र आहोत हे समजून आमच्याच रांगेतल्या दुसऱ्या एकाने स्वतःहून त्याची सीट ऑफर केली आणि आम्ही त्यातल्या त्यात सोबत आलो. आमच्या समोरची एकही एंटरटेनमेंट सिस्टिम चालत नव्हती. एक तास उशीरा का असेना पण एकदाचे निघालो, नशीबाने सृजन झोपला, आम्ही झोप-जेवण-झोप- ब्रेकफास्ट असा झोपमोडीचा खेळ खेळत दिल्लीला उतरलो. दिल्लीला दहा तास ब्रेक म्हणून तिथलेच हॉटेल बुक केलं होतं.

दिल्ली विमानतळावर फार चालावं लागतं, पण इमिग्रेशन होऊन बॅग आल्या आणि आम्ही बुक केलेल्या हॉटेल साठी त्यांच्या डेस्क जवळ थांबलो. इथला मागच्या वेळचा माझा एक किस्सा होता हा डेस्क न दिसण्याचा. यावेळी अनुभवातून लगेच सापडले. थोड्या वेळात त्यांचा माणूस आला, तो म्हणाला पुढच्या फ्लाईट साठी बॅग देऊन द्या आताच. मग ते झाल्यावर त्या हॉटेल वाल्या मुला सोबत आधी केबिन बॅग स्कॅन करायला, मग त्यावर स्टिकर, कुठे रजिस्टर मध्ये नोंदी..असा एकेक टप्पा पार पाडून शेवटी हॉटेल वर पोचलो. आंघोळ झाल्यावर जरा फ्रेश वाटलं. तिथेच जेवून दोन तास झोपू म्हणून तसे अलार्म लावून झोप काढली, आणि लगेच मग उठून आवरून निघालो. सिक्युरिटीचे सोपस्कार झाले, चहा किंवा कॉफीची गरज होती म्हणून सीसीडी मध्ये गेलो. आता काही तिथली कॉफी तेवढी आवडली नाही. पण तरी जुन्या सीसीडी आठवणीना उजाळा देत प्यायली, जरा तरतरी आली. विमानतळावर पाण्याची बाटली व्हेंडींग मशीन मध्ये चक्क दहा रुपयात मिळाली. याआधी मुंबई विमानतळावर बाहेर येऊन जेव्हा जेव्हा पाणी विकत घेतलं ते महाग होतं, त्यामानाने ही किंमत अगदीच कमी होती. औरंगाबादला जाणाऱ्या या विमानात सीटचे पुन्हा गोंधळ होतेच. तिघांना तीन टोकाच्या सीट. लहान पाच वर्षाचा मुलगा असताना सीट अश्या दिल्या आहेत ही अडचण सांगितली तर सरळ आम्ही काही करू शकत नाही, तुम्ही अड्जस्ट करून घ्या असं उत्तर आलं. मग शेवटी बघू आत जाऊन असा विचार केला. माझ्या शेजारच्या माणसाला मग सांगितलं की मला आणि सृजन ला सोबत बसू द्या, तर तो नाईलाजाने तयार झाला. मग आता विंडो सीट नाही म्हणून सृजन रडायला लागला, एरवी तो ही ऐकतो पण आधीच भरपूर प्रवास झाला होता, त्यामुळे त्यावेळी त्याला ऐकायचं नव्हतं. मग त्या खिडकीतल्या बाईला पण विचारले, तिने पण तोंड वाकडं करून शेवटी हो म्हणाली. ही क्रू चेच कपडे घालून होती, पण प्रवासी म्हणून. विमान वेळेत उडाले, अगदी शेवट पर्यंत ही क्रु मेंबर स्वतः मोबाईल वर बोलत होती, दहा वेळा बंद करा सांगून सुद्धा. Sad मग खायला आलं, ज्यूस मिळाला आणि सँडविच मनापासून आवडलं. तरी एक सँडविच आम्ही खाल्लं नव्हतं, ज्यूस पण प्यायला नाही, पाण्याच्या चुकून त्यांनी चार बाटल्या दिल्या त्यातल्या पण दोन तश्याच होत्या. म्हणून मी लँडिंग आधीच क्रू ला सांगितलं की हे जास्तीच घेऊन जा, मला नको आहे, मी हातही लावलेला नाही. तर हो म्हणून कुणी नंतर आलंच नाही. मग एव्हढा वेळ झोपलेली शेजारची बाई, 'परत देऊ नका घेऊन जा' असा आग्रह करायला लागली. मी तिला म्हणले की मी उघडलं पण नाही काही, हे मी पुढे खाणार नाही, पाणी पण already आहे. मी ते पॅकेट उघडलंच नाही, उष्टं केलं नाही, बाटल्या पण तश्याच मग उगाच मला नको असताना मी ते न्यायला नको असं माझं मत, शिवाय आता घरी जाऊन घरच्या जेवणाचे वेध लागले होते, आई गाडीत खायला सुद्धा खाऊ पाठवणार होती, त्यापुढे मला हे बाकी नको होतं पण ते उगाच फेकून द्यावे लागू नये ही मनापासून इच्छा होती. पण ती मात्र मला 'घरी जाऊन खा, उद्या खा, घरच्यांना द्या, शेजार्यांना द्या' इथवर आली. मी तिलाच विचारलं, तुम्हाला हवं का? तर म्हणे मला नको. मग शेवटी ते घेऊन निघालो तसेच, कारण तसंही कुणीच आलं नाही न्यायला.

पोचल्यावर पाच मिनिटात बाहेर आलो, बॅग आल्या, हे एक मला औरंगाबाद सारख्या लहान विमानतळांचं फार आवडतं, विशेष चालावं लागत नाही. बाहेर येऊन बाबा भेटले, सृजनने पळत जाऊन त्यांना मिठी मारली आणि आम्ही बॅगा गाडीत टाकून निघालो. बाहेर एकदम भट्टीत आल्या सारखं वाटलं. रात्री आठ वाजता असं, तर दिवसभर काय होत असेल माहीत नाही. गाडीत बसून एसी लावला तेव्हा जरा बरं वाटलं.

सृजन मागच्या सीट वर आडवा झोपला आणि आम्ही निघालो. त्याला कार सीट शिवाय असं मोकळं बसता झोपता येतं याचं अप्रूप, त्यामुळे तो त्यातच खुश होता आणि क्षणात झोपला सुद्धा. लग्नांच्या वराती, band चे आवाज, लायटिंग, झगमग रोषणाई, फटाके वाजत आहेत, बेधुंद होऊन लोक नाचत आहेत, दुकानांमध्ये चिप्सची पाकिटं लटकवलेली आहेत, चहाच्या टपरीवर एल्युमिनियमच्या पातेल्यात चहा उकळला जातोय, तिथे गर्दी पण आहे, प्रत्येक गाडीचे हॉर्न वाजत आहेत, गायी रस्त्यावर आहेत असं सगळं चित्र दिसत होतं. या सगळ्या गोष्टी आम्हाला कितीही सवयीच्या असल्या, तरी हे बघून सृजनचे काय प्रश्न असू शकतात हेही मनात आलं. बराच रस्ता चांगला होता, काही ठिकाणी मात्र रस्ताच नव्हता. स्वच्छ भारत लिहिलेली गाडी कचऱ्यातच उभी होती. अकरा वाजले तरी बरीच वर्दळ होती. रात्रीच्या वेळी इतकी वर्दळ हे आता आम्हाला अजिबात सवयीचं नसल्यामुळे वेगळं वाटत होतं. बुलढाणा जवळ आलं, ओळखीच्या काही खुणा दिसल्या, हे किती बदललं, हे तर लक्षातच नाही आलं असे दर वेळी नव्याने दिसणारे फरक पुन्हा जाणवले. आपल्या गावात आलो ही भावना उफाळून आली आणि गाडी घरापाशी थांबली. फायनली, मोठ्ठा प्रवास पूर्ण सुफळ संपूर्ण झाला होता.

Keywords: 

लेख: 

भारतवारी मे-जून २०२२ - भाग २

कधी जायचं भारतात यासाठी सृजन रोज Countdown करत होता, त्यालाही खूप दिवसांनी विमानात बसायला मिळणार होतं. आईची जय्यत तयारी चालू होती. तुम्ही आले की हे करायचं, ते करायचं याच्या याद्या वाढत होत्या. त्या आधीपासून बाबा म्हणत होते की घराला रंग देऊ, आई म्हणत होती आता कशाला? नको एवढ्यात. पण मग मी येणार हे ठरल्यावर बाबा जिंकले आणि रंगाचे काम झाले, त्यामुळे घर पण सगळं सजून धजून होतं. मधल्या काळात घरात नवीन सोफा आला, गार्डन मधल्या फरश्या बदलल्या, नवीन पडदे लागले असे बरेच बदल होते. घरातलं आंब्याचा झाड वाढलं आहे, त्याला कैऱ्या आल्यात त्या बघायच्या होत्या. शक्य त्या सगळ्यांना भेटायचं होतं. घरी पोचल्याचा आनंद ओसंडून वाहत होता.

सृजनने घराच्या आत येता क्षणी सगळ्या घरात चक्कर मारुन मग पहिला प्रश्न विचारला की आर्य दादा कुठे आहे? हा म्हणजे आमचा शेजारी, मागच्या सहा वर्षातले शेजारी पण अगदी घरगुती संबंध. काही विशेष भेटी गाठी नाहीत आमच्या, फोन वगैरे पण नाही, आई बाबांकडून ऐकून सगळं माहिती आहे एवढंच. पण त्या दोघांना एकमेकांची अति ओढ आहे. रात्रीचे बारा वाजले होते त्यामुळे अर्थात तो झोपला होता. मग सृजनने हात पाय धुवून आपली बॅग उघडली आणि डायरेक्ट कपाटात स्वतःचे कपडे लावले, खेळणी ठेवली आणि आता ही माझी खोली असं जाहीर करून टाकलं. मग गप्पा मारत जेवण झालं, आणि शेवटी दीड पावणे दोनला झोपलो सगळे. आम्ही पण प्रचंड थकलो होतो त्यामुळे झोपेची नितांत गरज होती.

सकाळी उशीरा उठलो तर सृजन आधीच उठून दात घासून स्वयंपाकघरात गप्पा मारत होता. एरवी तो उठला की आम्हाला उठावंच लागतं त्याच्यासोबत. घरी येता क्षणी बहुतेक आमच्या मेंदूने आता तुम्ही निवांत आराम करा हे समजून घेतलं, नाहीतर तो उठला आणि मला माहीत नाही असं क्वचित होतं. पोळ्या करायला रीटा आली होती तर हा गरम पोळी आणि तूप खात होता. भरपूर गप्पा मारत होता. तेवढ्यात आर्य आलाच, त्या क्षणापासून सृजन पूर्ण वेळ आर्य दादा सोबत होता, तीन वर्षांपूर्वी अगदी थोडा वेळ भेटलेले हे दोघं, तो सृजन पेक्षा वयाने सुद्धा मोठा, दोन देशात राहणारे, पण हे ऋणानुबंध असतील, ते आपण रोज भेटतो अश्या पद्धतीने सोबत खेळायला लागले. आईनी चहा केला, आम्हाला आवडतो तसा. तरी दुधाची चव बदलली की तसा चवीत पण थोडा फरक वाटतोच. आंघोळ केली तरी थकवा, अर्धवट झोप हे फिलिंग होतंच. शेजारच्या आनंद दादाने तोवर रसगुल्ले पाठवले आणि त्याचा फोन आलाच की उसाचा रस प्यायला कधी येताय? त्याच्या कडे उसाचा रस मिळतो, सिझन संपला होता फक्त त्याने खास माझ्या साठी म्हणून थोडे बाजूला काढून ठेवले होते. मग संध्याकाळी गेलो रस प्यायला, तर अजून एका ग्रुपला आमच्या सोबत रस मिळाला. सृजनला आश्चर्य वाटत होतं की एरवी विकतचे ज्यूस अजिबात पिऊ न देणारी आई, इथे स्वतः हून ज्यूस प्यायला सांगते आहे. अनेक वर्षांनी उसाचा रस पिऊन तृप्त झाले. सृजन मराठी अगदी नीट बोलतो, पण तिथे आजूबाजूला बरेच जण विदर्भातली बोली भाषेत बोलतात, लहेजा बदलतो. मग सृजनला एखाद दोन शब्द समजायचे नाहीत, पण तरी त्याच्या सगळ्यांसोबत गप्पा चालू होत्या. अनेक वेळा हा परदेशातून आला म्हणून त्याच्याशी लोक इंग्लिश मध्ये दोन चार शब्द बोलण्याचा प्रयत्न करतात. मग सृजन मराठीच बोलतो, कन्फ्युज होतो की अचानक इंग्लिश का बोलतात, एकूण गमतीशीर असतात असे प्रसंग. सृजनला प्रश्न पडतो आहे की इथे दुकानात चप्पल का काढाव्या लागतात? आहे तशी पद्धत बऱ्याच ठिकाणी की चप्पल काढून दुकानात जावं लागतं. असे सगळे मजेशीर प्रश्न येत राहतात, आम्ही मग एकेक विचार करून उत्तरं देतो, त्यातून आम्हालाच अजून नवीन प्रश्न पडतात . त्याच्या sandal घालण्या काढण्यासाठी त्याला प्रत्येक वेळी मग कुठेतरी बसावं लागायचं आणि ते त्याला नको वाटायचं. सतत काढा-घालायला सोपी अशी त्याच्यासाठी नवीन स्लीपर घेऊ असं ठरवलं. बाहेर पडलो म्हणून कोरडी हवा, वाढलेला ट्रॅफिक, हॉर्नचे भयंकर आवाज, धूळ हे खूप जाणवले. अर्धे बुलढाणा शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने बाहेर आहे असं वाटतं, तरी इतकी गर्दी वाढली आहे. ज्या रस्त्यावर एक दुकान नव्हतं तिथे आता प्रत्येक प्रकारची चार दुकानं आहेत. ज्याचा फायदा होतोच, पायीच्या अंतरावर सगळी कामं होतात, पण त्या प्रमाणात रस्ते अजूनही लहान, सगळ्यांकडे आपापल्या गाड्या आहेत, त्यातून ट्रॅफिक वाढणार हे ही होतंच. रस पिऊन आल्यावर जेवण करून आता झोपू म्हटलं तर झोप येईना. सृजन दिवसभर इतका दमला होता, टीव्ही, फोन वगैरेचे नाव पण काढले नव्हते. त्यामुळे तो पटकन झोपला. मग पुस्तकांचं कपाट उघडून एक पुस्तक शोधून वाचत बसले. यातली कोणती पुस्तकं यावेळी मी नेऊ तिकडे हाही विचार केला.

दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा उशीरा उठून निवांत चहा नाश्ता झाला. नवीन गाडीचे शेजारून ताजे पेढे आले. या लहान सहान गोष्टी विस्मरणात जातात, असे छान ताजे पेढे, तेही कुणाच्या नवीन खरेदीच्या आनंदाचे, त्यामुळे एकदम मस्त वाटलं. गरम पोळ्या खाऊन सृजन पुन्हा आर्य सोबत सृजन खेळायला गेला. आर्य आमच्या घरी म्हणून त्याच्या बहिणीला अभ्यासाला शांतता आणि त्याच्या आईच्या डोक्याला शांतता होती. आता दोन दिवस झाल्यामुळे जरा नॉर्मल वाटत होतं. एटीएम मध्ये जाऊन आलो, मग जरा गच्चीवर जाऊन मनसोक्त सगळी झाडं बघितली. पूर्वी खूप गुलाब होते तेवढे आता नाहीत, पण वेगळी बरीच झाडं आहेत. कोरफड, अळू, कढीपत्ता, मोगरा, कुंदा आणि अजून बरीच झाडं भेटली. कैर्‍या लागलेलं आमचं झाड पाहिलं. उन्हाळ्यात जायचं ठरलं तेव्हाच आंबे खाता येतील याचे मनात खायली पुलाव रचले होते. त्यातून आम्हाला दोघांना हापूस व्यतीरीक्तचे प्रकार खायचे होते, कारण हापूस मिळतो आता इकडे, पण बाकी प्रकार सहज नाही मिळत. दशहरी आंब्याचा रस खाऊन जीव सुखावला. आंबे चोखून पण खाल्ले.

एक दिवस दुपारी सगळे जुने फोटो काढले. माझा एक अपघात झाला होता अकरावीत, तेव्हाचा प्लास्टर मधला हात कसा दिसायचा हा एकमेव फोटो बघण्यात सृजनला मुख्य रस होता, कारण त्याची गोष्ट त्याने ऐकली होती. गंमत अशी की तीन वर्षांपूर्वी त्याने रस्ता क्रॉस करताना हात सोडायचा नाही हे समजावून सांगताना एकदा मी आईचा हात सोडून पळाले आणि लागलं अशी थोडी ट्विस्ट करून ती सांगितली होती. आता कॉलेज मधली मी बघून, ही हात धरून चालण्याच्या वयाची नाही हे तो ओळखेलच, मग त्याला खरा अपघात कसा झाला होता हेही सांगितलं. लहानपणचे माझे फोटो दाखवून सृजनला ओळखायला सांगितलं. काही फोटोंचे फोटो काढून ते मित्र मैत्रिणींना पाठवले. बरेच जुने फोटो बघून हे का काढले असावेत हा प्रश्न आता पडतो, आणि काही बघून खूप छान वाटतं. शिवाय कितीतरी वेळचे फोटो नाहीतच, नुसत्या आठवणी आहेत हेही मग गप्पांमधून लक्षात आलं. संध्याकाळी गच्चीवर जाऊन बसलो. जरा गार वाटावं म्हणून गच्चीवर पाणी टाकून झालं. त्या निमित्ताने मग आपसूकच लहानपणच्या उन्हाळ्याच्या आठवणी, डेझर्ट कुलर, वाळवणं, गच्चीत झोपणे या सगळ्या आठवणींना पण उजाळा मिळाला.

दुसऱ्या दिवशी दुपारी आईच्या दोघी विद्यार्थिनी, ज्या आता स्वतः शिक्षिका आहेत, त्या आईला भेटायला आल्या. अजूनही इतक्या वर्षानंतर तिच्या अनेक विद्यार्थिनी तिला फोन करतात, भेटायला येतात. मधल्या काळात शाळेतले काही शिक्षक गेले, आता जुने कोणतेच शिक्षक नाहीत, ती शाळेबद्दलची ओढ आता वाटत नाही वगैरे गप्पा झाल्या. सृजनने आल्यावर त्यांना छान चित्र काढून दाखवलं आणि शाब्बासकी मिळवली, काहीच ओळख नाही आणि शिवाय मराठीतून बोलला, त्यांनी सृजनला जाताना पैसे दिले तर सृजनला समजेना की पैसे का देत आहेत? मग पुन्हा त्यांनी मला पैसे का दिले हा प्रश्न आला. वाढदिवसाला जसे गिफ्ट्स मिळतात, तसेच इथे यातून तू काहीतरी घेऊ शकतो हे त्याला सांगितलं, तर त्याला मजा वाटत होती, आणि नवल पण वाटत होतं.

एक दिवस शेजारच्यांसोबत हॉटेल मध्ये जेवायला गेलो, म्हणजे आताचे रेस्टॉरंट. आता अनेक कॉलेजेस झालीत त्यामुळे तरुण मुला मुलींचे अनेक ग्रुप्स दिसले. तिथे हात धुवायला गरम पाण्याचे बाउल मिळतात हे पुन्हा सृजन साठी आठवं आश्चर्य होतं. मध्यमवर्गीय लोकांसाठी हॉटेलिंग नवीन होतं तेव्हा हा प्रकार अनेकांना नवीन होता, ते हात धुवायला नसून प्यायला आहे असं समजून ते कुणी प्यायलं होतं हे विनोद असायचे, बाहेर देशात सुद्धा असं काही नसतं, त्यामुळेआता पुन्हा तीच परिस्थिती, सृजनने मग त्यात हात धुणे हे फारच आवडीने केलं. येताना मुद्दाम पायीच आलो. ठिकठिकाणी नवीन मोठ्या इमारती झालेल्या दिसल्या. काही रस्ते नवीनच झाले होते, काहींचं काम चालू होतं. बरेच दवाखाने पण झालेले दिसले. रात्री येताना भटकी कुत्री रस्त्यात असतील हे लक्षातच नव्हतं आलं, नशीबाने कुणी भुंकत आले नाही पण तरी भीती वाटलीच. गल्ली गल्लीतून चालताना निशाणी डावा अंगठा या आवडत्या सिनेमाची पदोपदी आठवण येत होती, पुन्हा एकदा तो बघायला हवं असं वाटलं.

एक दिवस आनंद दादाने घोळ आणि हिरवी वांगी आणून दिली. घोळ ही खास विदर्भातली उन्हाळ्यातली भाजी. रीताने भाकरी केल्या आणि मस्त भाकरी, आईच्या हातचे कैरिकांदा, पालकाची पातळ भाजी आणि नंतर आमरस असं जेवण झालं. इकडे ज्या भाज्या नेहमी खातो त्या आणायच्याच नाहीत असं आम्ही सांगून ठेवलेलं असतं. त्या प्रमाणेच रोजचे बेत ठरायचे. संध्याकाळी आजी आणि नातू मिळून चप्पल आणायला गेले आणि येताना चार टीशर्ट घेऊन आले. त्या दुकानदारानेएक पँट पण दाखवली सृजन साठी, ती पण घेतली. घरात घालायच्या ७/८ टाईप पँट म्हणजे लोअर म्हणतात हे आम्हाला नवीनच समजलं. आम्ही त्यावर फार हसलो. औषधांच्या दुकानात गेलो तेव्हा एक किस्साच झाला. उन्हाळा आहे तर ORS घेऊन जाऊ सृजन साठी असा विचार केला. मी आणि सुमेध पायीच गेलो. ORS साठीचा जर्मन शब्दच डोक्यात, मूळ ORS आठवेचना. तर सुमेध म्हणे ओरल बी औषध. ती दुकानदार कन्फ्युज की हे काय सांगत आहेत. तिने टुथ ब्रश दाखवले, हा पण आहे तो पण आहे. एकदम काय गडबड झाली ते लक्षात येऊन आम्ही हसायला लागलो, पण तरी शब्द आठवेना पटकन, काय आपण इतकं साधं येत नाही असं वाटत होतं. मग आम्ही कश्याबद्दल बोलतोय हे सविस्तर सांगितलं तेव्हा त्यांनीच ORS म्हणताय हे ओळखलं. मराठी इंग्रजी जर्मन अश्या तीन्ही भाषांची सरमिसळ होते अशी ऐन वेळी आणि फजिती होते. हे दुकानदार आई बाबांच्या अगदी ओळखीचे, त्यांचे लेक जावई, एवढे बाहेरच्या देशात राहतात आणि हे माहीत नाही असं त्यांना नक्कीच वाटलं असेल.

आणि पहिल्याच काही दिवसात भारतात ठळक पणे जाणवणारी एक गोष्ट म्हणजे डिजिटलायझेशन. हे अगदी पदोपदी जाणवलं. आता भारतात युपीआय, पर्यायाने सगळ्यांकडे जीपे सारखे अनेक पर्याय आलेत. हेच इकडे जर्मनीत अजून काहीच नाही, त्यामुळे आम्ही या सगळ्यात एकदम अज्ञानी आहोत असं वाटायचं. ऑनलाईन ऑर्डर दिल्या कपडे आणि पुस्तकांच्या. तेव्हा आईने मला तिच्या मोबाईल वरून मला जीपे करून दिले. मी आईला शिकवायचं नवीन तंत्रज्ञान की आईने मला हे गमतीशीर वाटलं. भारतातल्या आमच्या खात्याला कार्डला युपीआय जोडता येत नाही, आमच्या फोन वर काही ऍप्स पण चालत नाहीत. भारतातले डेबिट कार्ड आहे पण आता गेल्या दोन वर्षात अनेकांनी कार्ड स्वीकारणे बंद करून फक्त जीपे सारखेच पर्याय ठेवलेत, नाहीतर कॅश. मग आम्ही बहुतांशी कॅश घेऊन फिरायचो. एकदा सृजनच्या चप्पल घ्यायला गेलो तर बाबा त्यांच्या फोन वरून पेमेंट करत होते. ते सगळं बघून मी एकदम इम्प्रेस झाले आणि किती भारी असं त्यांच्याशी बोलले. मग दुकानदाराने कुठे असता ताई तुम्ही असा प्रश्न केला, बाहेरच्या देशात एवढंच मी सांगितलं, तर तो मला तिकडं QR कोड नाही का असं म्हणाला. त्याला बहुतेक असं कसं असू शकतं, ताई बाहेरच्या देशात राहतात आणि हे एवढं माहीत नाही असं वाटलं. जर्मनीत डिजिटल पेमेंट या क्षेत्रात अजून तेवढी प्रगती झालेली नाही. या बाबतीत भारतातल्या खेडोपाडी पोचलेल्या या गोष्टींचे आणि ते सहज स्वीकारणाऱ्या ज्येष्ठ नागरिक असो की फारसे न शिकलेले रस्त्यावरचे दुकानदार, या सगळ्या भारतीयांचे प्रचंड कौतुक वाटते. फक्त हे असे बदल ज्या गतीने होतात, त्यातून आमच्या सारख्यांना कधी हे असे वर दिले तश्या प्रसंगांना सामोरं जावं लागतं, एवढंच.

दर वेळी भारतात आलो की रोज वर्तमान पत्र येणं आणि ते वाचणं हा एक दिनक्रम होतो. पूर्वी इ वर्तमानपत्र वाचायचो, आता तेही रोज होत नाही, काही बातम्या नकोश्या वाटतात, शिवाय व्हॉट्सअ‍ॅप फेसबुक कृपेने काही घडामोडी कळतात. पण हातात रोज मराठी वर्तमानपत्र घेऊन एकूण एक बातमी वाचणे हे मनापासून आवडतं, त्यातलं शब्दकोडं सोडवायला आवडतं. बरेच शब्द सहज आठवत नाहीत आता, मग बाबा मदतीला येतात. सकाळी सकाळीच रद्दी वाला, भंगार वाला यांचा आवाज येतो. गाड्यांचे हॉर्न तर असतातच. घरापाशी रोज अनेक गायी येतात. मग घरातला काहीतरी खाऊ, कधी शिळी पोळी असेल, शिवाय भाजीपाल्याचा होणारा कचरा हे सगळं गायीला देणे हे सृजनला खूप आवडतं. तो आणि आर्य दोघंही गाय कधी येते यावर लक्ष ठेवूनच असतात. गाद्या, उश्या वेगळ्या वाटतात पहिले दोन दिवस, मग कधी थोडी पाठ दुखते सुरूवातीला, दोन तीन दिवसांनी मग सवय होते. हेच पूर्वी उलट व्हायचं. या खोलीतून त्या खोलीत जाताना पंखे बंद करायचे असतात हे लक्षात ठेवावं लागतं, कारण सिलिंग फॅन नाहीत इकडे. शिवाय इकडे नुसतं चार्जर लावून काम होतं प्लग मध्ये, त्याला अजून एक बटन नसतं. चार्जर लावताना त्याच्या शेजारीच असलेलबटण पण चालू करावं लागतं, हे समजायला दोन तीन वेळा ते चालू न केल्यामुळे फोन चार्ज झालाच नाही हे जेव्हा होतं, त्यानंतर मग लक्षात ठेवून हे केलं जातं. जसं सुरुवातीला इकडच्या अनेक गोष्टींचं अप्रूप असतं, तसंच आता भारतात पण साध्या काही गोष्टींचं अप्रूप वाटतं.

जाण्यापूर्वी बरेचदा मी सृजनशी बुलढाण्यात पाण्याचा कसा दुष्काळ असतो याबद्दल बोलायचे. पाणी जपून वापरायला सांगायचे. तर तिथे आजोबांनी खास सृजन साठी म्हणून बाथरूम मध्ये hand shower बसवून घेतला होता, पण सृजनला उलट बादलीने आंघोळच आवडली. तरी जेवढं पाणी दिसत होतं, त्यावरून सृजनने मात्र तू काहीही सांगतेस का ममा, आहे की इथे पाणी असं मलाच ऐकवलं. आता एवढा दुष्काळ नाही, पण तरी पाणी कमी हे नेमकं सांगणंही अवघड आहे आणि त्याला समजणंही.

सृजनचे काही कपडे घेऊ म्हणून गावात गेलो तर बाबांना ओळखीचे चार लोक भेटले. सृजनला गाडीत पुढे बसता येण्याचा आनंद होता. गाढव दिसलं रस्त्यात तर तो जोरात ओरडून ममा, हे बघ मला घोडा दिसला म्हणाला. त्याला गाढव चित्रातून माहीत आहे, पण प्रत्यक्ष कमी पाहिलं आहे, त्यातून असं रस्त्यात, बिचारा कन्फ्यूज झाला असेल, पण इतकं निरागस होतं हे आणि हसू आवरेना. मग अरे हो हे गाढव आहे असं म्हणून स्वतः पण हसायला लागला. रोज रात्री आजोबांसोबत अ‍ॅक्टिव्हा वर चक्कर मारायची आणि मगच झोपायचं असा एक नियम सृजन स्वतःच ठरवला. आजोबांसोबत जाऊन बॅट आणि बॉल पण घेऊन आला, आणि मग गच्चीत क्रिकेट खेळणं सुरू झालं. त्याने काही मॅचेस बघितलेल्या नाहीत खूप, पण त्याला क्रिकेट खेळायला मनापासून आवडलं, तो लहान म्हणून तो म्हणेल तेव्हा बॅटिंग बॉलिंग त्याला मिळायची. त्याला घेऊन खास रिक्षात पण फिरवून आणलं.

म्हणता म्हणता आठ दहा दिवस गेले आणि उन्हाच्या झळा कमी होत गेल्या. पावसाळ्याची चाहूल लागली. पहिला पाऊस अनेक वर्षांनी अनुभवता येईल असं वाटत होतं आणि तसं झालंही. त्याबद्दल आणि इतर गमती जमती बद्दल पुढच्या भागात.

लेख: 

Taxonomy upgrade extras: 

भारतवारी मे-जून २०२२ - भाग ३

एक तारीख आली की लगेच आई बाबा सगळ्या कामवाल्या बायकांचे पैसे काढून ठेवतात, कुणालाही पगारासाठी वाट बघावी लागू नये, वेळच्या वेळी दिलेच गेले पाहिजेत ही शिस्त. मी आले म्हणून एक कामवाली खास दोन वेळा येते, त्याचे जास्तीचे पैसे पण देतात. या सगळ्या जणी आमच्या कुटुंबाचाच भाग आहेत. पोळ्यावाली रीता म्हणजे आईची मानसकन्याच. एक दिवस तिनी आम्हाला आग्रहाने जेवायला बोलावलं होतं. मी सृजन आणि आई गेलो. तिनी अत्यंत चविष्ट अश्या कचोर्‍या, चाट आणि शिवाय सृजनला आवडतात म्हणून रंगीत पापड कुरड्या असा बेत केला होता. आग्रह करून ती वाढत होती. सृजनला तिच्या घराच्या गच्चीत फार आवडलं. म्हणून तो मला घेऊन गेला. मी वर सृजन सोबत बोलत असताना खाली पाहिलं आणि मला वाटलं की ही तर माझी शाळेतली मैत्रीण. मी विचारच करतेय तोवर तिनेच आनंदाने मला हाक मारली अनेक वर्षात आमचा संपर्क फेसबुक पुरताच, ती दुसर्‍या एका गावात होती हे माहीत होतं, ती पुन्हा बुलढाण्यात शिफ्ट झाली. खूप वर्षांनी अशी अचानक भेट झाल्यामुळे दोघीही खुश झालो, थोडा वेळ गप्पा झाल्या, थोरात मामाच्या आठवणी निघाल्या. रीताने सृजनला रंगवायचं पुस्तक दिलं. वंदना आहे ती तर आता आमच्याकडे काम पण नाही करत, पण मी आली की येतेच प्रेमाने भेटायला. बाई कस वं करमत का तुला तिकडं? असं विचारत माझ्या आता कापलेल्या केसांवरून हात फिरवला आणि किती मोठाले केस व्हते अशी आठवण काढली. किती पैसे मिळतात तुले तिकडे असं विचारलं तेव्हा तिच्या निरागसपणाचं हसू आलं आणि मी पण लई भेटत्यात असं सांगून मोकळी झाले. हा विषय मग आमच्या सख्ह्या जुन्या शेजार्‍यांशी बोलताना पुन्हा आम्ही हसलो. आमच्या फार जुन्या सरूबाई एक दिवस आल्या, त्यांनी अनेक वर्ष काम केलं पूर्वी, म्हणून आई बाबा त्यांना दर महिन्याला अजूनही थोडे पैसे देतात. एक दिवस आमची बाबी आली आणि चकल्या करून दिल्या. गरमागरम चकल्या खाल्ल्या. अशीच एक भाजीवाली बाई, कधी भाजी आणते कधी आंबे. ती मोठं टोपलीत डोक्यावर आंबे घेऊन यायची, सृजन तिला बघून oh my god, बघ ती कशी ते डोक्यावर घेऊन येते आहे, कसं जमतं तिला असं अगदी अवाक झाला होता. का ती एवढं उचलते असाही प्रश्न पडला होता. आईने त्या बाईला थोडी अक्षरओळख शिकवली होती, तिला मला भेटायचं होतं. मग तिच्याकडून आंबे घेतले, ती मग प्रत्येक वेळी दिसली की सृजन कुतूहलाने तिचं ते जड टोपलं बघायला यायचा. समोरची लताबाई सृजनसाठी म्हणून दोन अंडी तशीच देते, पैसे नको म्हणते. कष्टाचे पैसे असतात सगळ्यांच्या, त्यातून घास काढून कुणी देतं ते मौल्यवान असतं.

माझ्या जन्मदाखल्याचं एक काम होतं, म्हणून नगरपालिकेत गेलो. पहिल्यांदाच गेले मी सुद्धा तिथे. बाबांच्या ओळखीचे एक जण होते म्हणून त्यांनी येऊन सगळं ओफिस दाखवलं, जिथे काम होतं तिथे स्वतः घेऊन गेले. त्या ऑफिस मध्ये अर्ज दिला, तेव्हा एक जण दुरून बाबांकडे बघत होते आणि मग हळूच तुम्ही बल्लू देशपांडे का, क्रिकेटवाले असं विचारलं. त्यांनी बाबांना क्रिकेट खेळताना पाहिलं होतं त्याला तीस एक वर्ष झाली असतील, त्यानंतर आता इथे भेटले, मला फार छान वाटलं. अर्ज देऊन मी तीन प्रति हव्यात असं सांगितलं आणि बाहेर आलो. ऊन असलं तरी ते जुनं ब्रिटिशकालीन ऑफिस, तिथे आत छान वाटत होतं. आणि बाहेर अशोकाची झाडं, एक मोठा पिंपळ त्यामुळे छान वारा होता, आम्ही दोघं बाहेरच बसलो. मी आधी चेक करते मी कंप्युटरवरच, मगच प्रिंट करा म्हणजे कागद वाया जाणार नाहीत असं म्हणाले होते पण तरी प्रिंटच हातात आल्या, एक चूक होती म्हणून मग पुन्हा नव्याने प्रिंट घ्यावी लागली. मी काही एकही कागद वाया घालवतच नाही असंही नाही, मात्र काळजीपूर्वक प्रिंट काढण्याचा प्रयत्न असतो, आधी तपासून मगच प्रिंट करायला हवं ही सवय आता झाली आहे. पण काम अगदी पटकन झालं.

एरवी रोजच्या गडबडीत मैत्रिणींशी गप्पा होत नाहीत. घरी आल्यावर वेळ असतो आणि वेळा पण जुळतात. मग रोज एकेका मैत्रिणीशी गप्पा, सगळ्यांचे अपडेट घेणं, कोण काय करतं, कुणाची मुलं कुठे अश्या गप्पा झाल्या. गावातल्या अनेक स्नेह्यांकडे गेलो, कुणी मला भेटायला आले. सृजनच्या नवीन ओळखी झाल्या. आमचं जुनं घर आता बंद असलं, तरी तिथल्या शेजार्‍यांकडे नेहमी जाणं होतंच. तिथे गेलो तेव्हा मी सृजन एवढी होते तेव्हा या घरात राहायचे हे त्याला सांगितलं. काही अगदी जवळचे जे लोक मधल्या काळात गेले, त्यांच्या घरी जाणं अवघड होतं, पण त्याही भेटी झाल्या. मामा मामी, मामेभाऊ मामेबहीण असे सगळे सहकुटुंब आले, तेव्हा भरपूर हसणं खिदळणं झालं. मामीने खास माझ्यासाठी आणलेले अनारसे खाल्ले. पत्ते खेळलो. सृजनला तर मावशीसोबत पुण्यालाच जायचं होतं, बॅग पण भरली होती त्याने. पण प्रवास नको वाटत होता, म्हणून त्यालाही थांबवलं. पुढच्या वेळी तो पुण्यातच येणार असं त्याने नंतर तिथल्या सगळ्याच गोतावळ्याला सांगितलं.

जेवायला बाहेर गेलो तेव्हा काही भाज्या जहाल तिखट होत्या, अगदी वैदर्भीय पद्धतीच्या. एरवीही खात नाही खूप तिखट, आता तर अजून कमी झालं आहे. पण मसाला पापड आणि जरा वेगळ्या चवी, ज्या इथल्या भारतीय रेस्टॉरंट मध्ये अजिबात मिळत नाहीत ते खाऊन बरंही वाटलं. केशर पिस्ता आइसक्रीम, कुल्फी हे सगळे प्रकार खाल्ले. शेगाव कचोरी खाल्ली. मुख्य म्हणजे घरचे आंबे खाल्ले. हे काही ठरवून लावलेलं झाड नाही, आपोआप आलं, मग आई बाबांनी नीट काळजीपूर्वक वाढवलं. यावर्षीच कैर्‍या आल्या आणि योगायोगाने आम्ही त्याच वर्षी जाणार, म्हणून आईला समाधान वाटत होतं. एका माणसाला बोलावून मग ते आंबे काढून घेतले, ते पिकवायला ठेवले आणि मग पिकल्यावर खाल्ले. ही सगळी प्रोसेस सृजनने काय, मी पण पहिल्यांदाच बघितली. झाडाला बेलफळ आलं म्हणून आनंददादाने ते आणून दिलं, कुणी जिलब्या, कुणी अजून काही, चवीने आणि प्रेमाने खास आणून देणार्‍या लोकांमुळे पोट जास्तच भरलं.

गावाबाहेर एक मंदिर झालं आहे बालाजीचं, तिथे जाताना सुमेधने गाडी चालवली. पूर्ण रस्त्यात त्याने एकदाही हॉर्न वाजवला नाही, एक दोन वेळा अगदी प्रयत्नपूर्वक कंट्रोल केला, पण तरीही आजूबाजूला अनेक जण गरज नसताना सुद्धा सतत हॉर्न देतात, तेवढं अजिबात गरजेचं नाही हे स्वतः चालवून अजूनच लक्षात आलं. त्या मंदिराजवळच एक डायनो पार्क झाला आहे. एक दिवस तिथे गेलो सृजन आणि आर्यला घेऊन. तिथे काही खेळ होते, त्यात अनेक मोठे लोकही जात होते, आम्ही दोघं नाही म्हणालो तर तिथल्या माणसाने 'ताई घाबरायचं काय नाय त्यात' असं सांगितलं. आम्ही काही घाबरत नव्हतो पण त्यात बसण्यात आम्हाला अजिबात रस नव्ह्ता. असे प्रसंग काहीसे मजेशीर असतात, एकाच वेळी मनात बरेच विचार असतात. यापेक्षा बर्‍याच मोठ्या राइड्स आम्ही केलेल्या आहेत, यात कुणाला कमी लेखण्याचा उद्देश नव्हता, जे लोक आनंदाने तिथे जात होते, ते आम्ही समजून घेऊ शकतो, सृजनलाही ते सगळं खूप आवडलं, ते आम्हाला बाहेरून बघायला आवडलं. तिथे एक ३डी शो होता तो आम्ही सगळ्यांनी एन्जॉय केला. या पार्कची जागा छान आहे, इथून पुढे घाट आहे त्यामुळे तो वळणावळणाचा रस्ता दिसतो, खालच्या गाड्या दिसतात, मारुतीचं मंदिर दिसतं. स्वच्छता पण चांगली आहे, तरी शेजारी कचरापेटी असून लोक बाहेरच आइसक्रीमचं रॅपर टाकतात हेही नजरेतून सुटत नाही. तिथलं मंदिर सुरेख आहे. असे पार्क्स झाल्यामुळे गावातल्या अनेकांना जर थोडा विरंगुळा होणार असेल, तर ते चांगलं आहे.

सुमेध नाशिकला जाणार म्हणून आम्ही मलकापूर रेल्वे स्टेशन वर त्याला सोडायला गेलो. घाटावर बुलढाणा आणि घाट उतरून खाली मलकापूर, तिथे इतकं उकडत होतं की सृजनने तिथे उतरता क्षणीच, घरी परत चला असा धोषा लावला. प्लॅटफॉर्म वर गेलो तेव्हा तर त्याचा पेशन्स संप्लाच, एकाच ठिकाणी उंच सिलींग फॅन, भयंकर गर्दी, बोचके घेऊन प्रवासाला निघालेले लोक, स्टेशनवर भटकणारी रोगट कुत्री हेही बघायला मिळालं. आम्हीही मग लगेच निघालोच. बुलढाणा हे थंड हवेचं ठिकाण होतं म्हणून म्हणे इंग्रजांच्या काळात ते उन्हाळ्यात राहायचे. आता तिथेही तापमान वाढतंच आहे दर वर्षी, पण तेही कमी आहे हे घाट उतरलो की जाणवतं. परत येताना घाटावर आलो की मग गार वारा लागतो आणि एकदम बरं वाटतं.

जूनचा पहिला आठवडा आणि पाऊस हे पूर्वी अगदी हमखास असायचं. आता सध्याचे हवामान बदल बघता पाऊस वेळेत हजेरी लावेल याची खात्री नव्हती. पण मान्सून यायचा होताच, विजांचा कडकडाट, भरून आलेलं आभाळ, पावसाचे टपोरे थेंब, टिनावर पावसाचा पडणारा आवाज आणि गंधाळलेली जमीन याचा आनंद अवर्णनीय होता. गच्ची धुतली गेली, मुसळधार या शब्दाला जागणारा पाऊस इथे जर्मनीत क्वचित होतो. तो यावेळी बुलढाण्यात पुन्हा पाहिला. गच्चीत जाऊन भिजलो, सृजनने तर उन्हाळ्यात रोज गच्चीवरच आंघोळ केली आणि मग पावसात पण भिजला. पुढच्या आठवडाभरात चार पाच वेळा पाऊस झाला, त्यासोबत तरारणारी झाडं दिसली. रस्त्यावरचा चिखल पाहून आम्ही शाळेत असताना सायकल मध्ये कसा चिखल अडकायचा, काय काय उद्योग करून ते रेनकोट घालून शाळेत जायचो या आठवणी पण सृजनला सांगितल्या. अजूनही तो रस्ता झालेला नाहीच म्हणून वाइट वाटलं. (जो आता या सप्टेंबर मध्ये फायनली झाला) पाऊस आला की लाइट जायला हवेतच, तसं झालंही. सुरूवातीला काही वेळा झालं तेव्हा सृजनला त्यात काही वाटलं नाही, उलट गंमत वाटली आणि ठीक आहे, वाट बघायची आता एवढंच म्हणाला. पण नेमकं इन्व्हर्टर नाही घरी सध्या आणि पंख्याशिवाय झोप अशक्य होती. सलग काही वेळा हे विजेचे खेळ चालले, तेव्हा एकदा वैतागून मी जातो परत म्हणाला. नशीबाने प्रत्येक वेळी थोड्या वेळात लाइट आले आणि खूप पंचाइत झाली नाही. त्यातही एकदा तर बाबांच्या फोन वर या या कारणाने गेलेली वीज साधारण या वेळेपर्यंत परत येईल असा मेसेज आला, त्याप्रमाणे खरंच झालं सुद्धा. हे बघून मी फारच प्रभावित झाले होते. पाऊस आला की किडे आणि सरपटणार्‍या प्राण्यांची भीती असतेच. रोज गाद्या खाली टाकून झोपायचो. एक दिवस सकाळी गादी आवरतानाच सापाचं पिल्लू दिसलं. त्यामुळे घाबरून मग माळ्यावर कुठे काही ना, कुठे कोपर्यात नाही ना अजून हे सगळं बघून झालंच, शिवाय मी खाली झोपण्याची हिम्मत केलीच नाही.

घरातल्या सगळ्या दरवाज्यांच्या कड्या हेही सृजन साठी नवलाचं होतं. त्याच्या नजरेनी बरोबर वेगळेपण हेरलं म्हणून मग मी तेही फोटो काढून ठेवले. सृजनचे केस कापायला शेजारीच दुकान आहे, ते काका घरीच आले आणि केस कापून दिले. आई कपडे शिवते हे सृजन ऐकून आहे आणि त्याला त्याचं प्रचंड अप्रूप आहे, मग आईने त्याला यावेळी शिलाई मशीन उघडून त्यावर कशी शिलाई मारली जाते ते दाखवलं, ते बघताना मग त्याने उत्सुकतेने बरेच प्रश्न पण विचारले. तिने रांगोळी काढायला पण शिकवली.

हळूहळू आता परतीचे वेध लागले होते. मध्ये नाशिक मुक्काम आणि मग जर्मनीत परत, त्याबद्दल आता पुढच्या शेवटच्या भागात.

लेख: 

Taxonomy upgrade extras: 

भारतवारी मे-जून २०२२ - भाग ४

भाग ३

इकडून जाताना कुणासाठी काय न्यायचं याची एक यादी असते. एक यादी असते भारतात आईला करायला सांगायचे पदार्थ, बँकेची किंवा काही कागदपत्रांची कामं असतील तर ती एक यादी, एक शॉपिंगची यादी, ज्यात इकडे येताना आणायचं सामान, कपडे, भांडी असं काय काय असतं. मग गेल्यावर याद्या एकेक करत टिक मार्क होत जातात.

आता ऑनलाइन शॉपिंग मुळे काही गोष्टी आधीच ऑर्डर करून ठेवता येतात, याआधी मी क्वचितच भारतात ऑनलाईन शॉपिंग केलं होतं, यावेळी मात्र आधीच वेळेत बघून कपडे, वस्तू ऑर्डर केल्या होत्या. त्या एका मागोमाग एक आल्या की मग लगेच साईज चेक करा, गरज पडल्यास रिटर्न करा हे सगळं ओघाने आलं. मी मुळातच या ऑनलाईन शॉपिंग ची तशी फॅन नाही, रिटर्न करणे हा प्रकार शक्यतोवर नको असा प्रयत्न असतो, पण तरी काही वेळा नाईलाज झाला. आई बाबांची काहीच ऑनलाईन खरेदी नसते, मी गेले आणि तो माणूस अल्मोस्ट रोज यायचा काही ना काही द्यायला किंवा परत घेऊन जायला. अचानक लॉटरी लागल्या सारखी काय खरेदी चालली आहे असं वाटावं अशी आमची भारतात खरेदी होते. मुख्य भर इकडे न मिळणारे पदार्थ, भारतीय कपडे, इकडे कुणासाठी गिफ्ट्स वगैरे. गेल्या काही वर्षात बरेच भारतीय, मुख्य महाराष्ट्रीय पदार्थ इकडे मिळायला लागले तेव्हापासून त्या गोष्टी कमी झाल्या आहेत, तरी बुलढाण्यातली डाळ, तांदूळ, स्टीलची भांडी आणि उरलेली कपडे आणि खाऊ खरेदी नाशिकला केली जाते. तरी पुण्यात जाणं शक्य नव्हतं, नाहीतर लक्ष्मी रोड, तुळशीबाग इथेही एकदा जायला आवडतं, बऱ्याच जणांची भेटही होऊ शकते पण दर वेळी भारत वारीत पुण्याला जायचा बेत जमवणं अवघड होतं. 

बर्‍याच आप्तांच्या भेटी झाल्या होत्या. बुलढाण्यातून खास घ्यायचे असे सगळे पदार्थ खरेदी करून बॅग मध्ये भरले गेले. सृजनची खास इच्छा होती की एकदा गच्चीत जेवायचं, पाऊस थांबल्यावर एक दिवस मग ती अंगत पंगत पण केली. बॅगांची वजनं करून काही बॅग पॅक झाल्या. सासरच्या वाटेवर कुचुकचु काटे टोचतात आणि माहेरच्या वाटेवरचे दगड पण मऊ लागतात अशी एक म्हण आहे. पण दिशा कोणतीही असो, बुलढाणा नाशिक की नाशिक बुलढाणा, हा प्रवास कंटाळवाणाच वाटतो. समृद्धी महामार्ग होईल होईल म्हणत तो थोडा झालाही, पण पुढच्या वेळीच तो योग असावा, कारण या आमच्या मार्गातला भाग तेव्हा चालू झाला नव्हता. दर वेळी हा प्रवास कसा करायचा ही एक मोठी चर्चाच असते. आधी ट्रेनचा प्रवास केला आहे, पण त्यातही ट्रेनच्या वेळा, रिझर्व्हेशन खूप आधीपासून करा, शिवाय मलकापूरला जा आणि आमच्या मोठ्या बॅग बघता तो पर्याय बादच केला जातो. बस पण सोयीच्या नाहीत. एकदा तर मी, सृजन आणि आई बुलढाण्याहून निघालो आणि सुमेध नाशिकहुन. एकूण सात आठ तासांचा प्रवास, मधल्या एका ठिकाणी भेटलो आणि आई परत गेली, मी पुढे नाशिकला. हे इतकं नाट्यमय घडलं होतं की एकाच वेळी आमच्या दोन गाड्यांनी त्या पेट्रोल पंपावर दोन बाजूंनी एंट्री घेतली. सिनेमात दाखवलं असतं तर काहीही काय असं वाटलं असतं, पण प्रत्यक्षात झालं. आणि मग मी आणि सृजन ने या गाडीतून त्या गाडीत बस्तान हलवून आम्ही पुढे आणि आई परत गेली. यावेळी मी, आई आणि सृजन असे जाऊ आणि नाशिकला जाताना औरंगाबादला जाताना एका मावशीची भेट घेऊ असं ठरलं. 

शिक्षणा निमित्त घराबाहेर पडून आता वीस वर्ष होतील. तरी प्रत्येक वेळी निघताना वाईट वाटतंच. आता दुरून सहज ठरवलं आणि आई बाबांकडे गेले असं होत नाही, त्यामुळे पुढची ट्रिप होई पर्यंत किंवा आई बाबा इकडे येई पर्यंत भेटी होत नाहीत. हे सगळं सोपं नसलं तरी हेही तेवढंच खरं की पुढे जाणं क्रमप्राप्त असतंच. आम्ही सगळेच आवर्जून फोटो घ्यायला हवेत हे आता आता शिकतोय. ठरवून मग एक आमचा फोटो आणि घराचे बागेचे असे फोटो काढून ठेवले. ट्रिप समाधानाने पार पडली होती, अनेकांच्या भेटी झाल्या, उन्हाळ्यातली मजा, लहान गावातलं पूर्ण वेगळं वातावरण असं सृजनचं आजोळ त्याला अनुभवायला मिळालं. निघताना सगळे शेजारी मला सोडायला आले. काळजी करू नकोस, आम्ही आहोत असं आश्वासक आपुलकीचं बोलले. जुने शेजारी जे आता दुसरी कडे आहेत त्या सगळ्यांची आठवण काढली जातेच, आणि गाडी रस्त्याला लागली. 

आम्ही निघालो त्या दिवशी पाऊस होता. ही आईची खास मैत्रीण, तिच्याकडे तिनी खास आणून ठेवलेली स्टफ भाकरी होती, रावण पिठलं भरून केलेली. ती खाल्ली, अजून बराच खाऊ घेतला आणि तसे वेळेत नाशिकला पोचलो. त्यामानाने रस्त्याचा त्रास जाणवला नाही. 

तिथे आलेली पार्सल चेक करून झाली. सृजनची पणजी आजी आणि पणजोबांची भेट झाली. अजूनही नातलग भेटी, मित्रांच्या भेटी झाल्या. तिथे एकेक आवडीचे पदार्थ खाणे आणि एकीकडे प्रत्यक्षात दुकानात जाऊन करायची अशी खरेदी झाली. दर वर्षी पेक्षा मॉल मधली गर्दी यावेळी प्रकर्षाने कमी जाणवली. मधल्या करोना काळात ऑनलाईन पर्याय लोकांना जास्त सवयीचे झाले असतील, त्यामुळे असेल कदाचित. भोसला मिल्ट्री स्कुल मधलं राम मंदिर आणि तिथला परिसर फार छान आहे , म्हणून तिथे जाऊन आलो. ओला उबर, स्वीगी झोमॅटो या प्रकारांची गाठ नाशिक मध्ये होते, याही गोष्टी इथे जर्मनीत अजून तेवढ्या रुळलेल्या नाहीत, मग ट्रॅफिक मधून जायला नको वाटलं तर हे सगळे पर्याय वापरून हौस भागवून घेतली.

नाशिकची मिसळ फार आवडते, यावेळी आवडत्या ठिकाणी जाणं जमलं नाही, ते आता पुढच्या वेळी बघू. शेवटच्या दिवशी अगदी निघताना दाबेली बोलावली. कॉलेज रोडची पाणी पुरी असं सगळं खाऊन झालं. आता नाशिक मधले बदल मला जाणवतात एवढं ते ओळखीचं झालं आहे. खाण्यासाठी इतके नवीन रेस्टॉरंट्स, चहाचे कॅफे आणि कॉलेजच्या लोकांना आवडतील असे बरेच फास्ट फूड जॉइंट्स यांनी रस्तेच्या रस्ते भरलेले आहेत. आम्हाला साधं एक काहीतरी खेळणं हवं होतं द्यायला तर तशी दुकानं आतल्या गल्ल्यांमध्ये, मोठ्या रस्त्यांवर सहज सापडेल असं नाहीच. नाशिक मधल्या रेस्टॉरंट्सची नावं हा एक वेगळाच विषय आहे. दर वेळी नवीन विनोदी नावांची भर पडते, यावेळी हॉटेल गुदगुल्या हे आजवर पाहिलेल्या नावांना मागे टाकणारं हॉटेल (दुरून) बघितलं. सगळी कामं करत परतीचा दिवस उजाडला सुद्धा. पुन्हा डोळे भरून, लवकर भेटू म्हणून निरोप घेतले गेले. 

बरेचदा आमच्या डोळ्यासमोर आम्ही निघालो तेव्हाची परिस्थिती असते आणि मग पुढच्या ट्रिप पर्यंत झपाट्याने गोष्टी बदललेल्या असतात. आम्हाला ज्या गोष्टींचं कौतुक वाटतं, त्या बाकीच्यांसाठी नॉर्मल असतात. वाढलेली महागाई दिसते, मोठमोठ्या इमारती दिसतात. काही गोष्टींचं खूप कौतुक वाटतं, काहींचा त्रास होतो. दोन तीन आठवडे झाले की सृजनला पण त्याची शाळा, मित्र यांची आठवण येते. इथे रोजचं रुटीन असतं त्यामुळे तिथे सगळी मजा असली तरी थोडा कंटाळा सुद्धा येतो. आत्ता त्याला जेवढं कुतूहल आहे, तेवढं कदाचित मोठा होत गेला की राहणार नाही, ते स्वाभाविक आहेच. तो मोठा होईल तसं त्याचं अनुभव विश्व विस्तारत जाईल, पण त्याच्या आठवणीत आपल्या देशाचा, माणसांचा जिव्हाळा हे नक्की असेल, असं हे सगळं बघताना वाटतं, निदान तसे प्रयत्न आपण करायला हवेत, करूच हे ठरवलं जातं. आम्हालाही घराची ओढ लागलेली असतेच. नोकरी, शाळा, झाडं ठीक असतील का, इथल्या मित्र मैत्रिणींच्या भेटी, शेजारी हे सगळं पुन्हा आठवायला लागतं. 

नाशिक मुंबई रस्त्यावर गर्दी असतेच, पण यावेळी त्या पूर्ण घाटात जशी गाडी चालली होती की मी एक मिनिट झोपू शकले नाही. एक ट्रक डाव्या बाजूला तर एक उजव्या बाजूला, त्यांना ओव्हर टेक करत निघालेली आमची गाडी आणि घाटाचा रस्ता. मुंबई विमानतळावर अगदी वेळेत पोचलो, पुन्हा सीटचे गोंधळ निस्तरले, बॅगा आत गेल्या. विमानतळावर एक खाण्याचा राउंड झाला. दिल्लीत पोचून पुन्हा थोडा वेळ थांबलो आणि विमान फ्रांकफुर्ट कडे उडालं. विमान आकाशात उडतं तेव्हा पुन्हा भारताचा पुन्हा भेटू असा निरोप घेतला, मागचा महिना पूर्ण डोळ्यासमोरून गेला. इथे उतरलो की पुन्हा सवयीने बाहेर पुन्हा इथल्या भाषेतले संवाद आपोआप सुरु होतात. ठरलेला एक जण टॅक्सी घेऊन घ्यायला आलेला होताच. घरी येऊन आजूबाजूची कोणती झाडं किती वाढली, गवत वाळलं म्हणजे पाऊस कमी झाला, आता काळजी घेऊ पुन्हा असं म्हणत बॅग आत घेतल्या. दुसऱ्या दिवशी शेजारची आजी भेटली आणि पुन्हा हात हातात घेऊन खूप बरं वाटलं तुम्हाला परत पाहून म्हणत तिने जवळ घेतलं. आपल्या घराला सुद्धा पुन्हा बघून भेटून बरं वाटलं. आम्ही शेजार्यांकडे दिलेल्या झाडांची काळजी नव्हती, ती पुन्हा घरी आणली. त्यांना काजू कतली आणि त्यांच्यासाठी आणलेल्या भेटी दिल्या. पुढची भारताची ट्रिप कधी करायची याचे बेत मनातल्या मनात चालू झाले आणि भारतवारी सुफळ संपूर्ण होऊन ब्लॉगवर सुद्धा आली. 

समाप्त

Keywords: 

लेख: