जुन्या आठवणींना उजाळा - बगळ्या बगळ्या कवडी दे

हा लेख मी मायबोलीवर मार्च २००६ मध्ये लिहिला होता. त्यात थोडेफार बदल करून इथे देते आहे.

बगळ्या बगळ्या कवडी दे,
रांजणखोलची नवरी ने!

शेताला पाणी देताना साधारण संध्याकाळच्यावेळी बर्‍याचदा बगळ्यांचे थवेच्या थवे काळे शेत पांढरे करुन टाकत. लहान होते तेव्हा. हे ही कळायचे नाही कि, खरच बगळा पांढरी कवडी देणार आहे का माझ्या नखांवर. रांजणखोलची, आपल्याच तर मामच्या गावची नवरी देतोय आपण त्याला आणि एवढे बगळे आहेत म्हणजे एखादा तरी देईनच की असेच वाटायचे. बराच वेळ नखांवर नखं घासत कवडी मागत रहायचे. एखादी कवडी नखावर दिसली की किती आनंद व्हायचा. रांजणखोलला गेले की विचारायचे सुद्धा एखादा बगळा आला होता का नवरी न्यायला? की सगळे हसायचे.

शिक्षणासाठी मळ्यात (शेतातल्या घराजवळ) चांगल्या शाळेची व्यवस्था नव्हती म्हणून शाळेसाठी शेजारच्या साखरकारखान्याच्या गावी काकांकडेच राहायला होते. त्यावेळी शाळेतून मिळणार्‍या तिन्ही सुट्ट्या मामाच्याच गावी जायचे. दिवाळीच्या सुट्टीत आईसोबत भाऊबिजेच्या दिवशी जायचो. मग आई परत यायची आणि आम्ही भावंडे तिकडेच राहायचो. मला एकूण सहा मामा आणि दोन मावश्या. मामांची मुलं, मावशीची मुलं त्यात भर आमची, दोघं तिघं आमच्या वयाची तर बाकी लहान. वर्षा दोन वर्षात एकाचीतरी त्यात भर व्हायची. डझनाच्या वर संख्या होती आम्हा मुलांची. आम्ही सुट्टीला त्यांच्याकडॅ जाणार म्हणुन तेही त्यांच्या मामाच्या घरी जात नसत. सगळे भेटले की मस्तीला नुसते उधान यायचे.

आजी आणि मामी मिळून खुप मोठे फराळाचे बनववून ठेवायच्या, मग काय दिवसभर येता जाता लाडू, चिवडा, शेव, करंजी, सांजोर्‍याच्या पुर्‍या ह्यावरच ताव मारायचा. दिवसभर खुप खेळायचे. खेळता खेळता भांडायचे आणि भांडता भांडता परत खेळायचे.

तिथे सगळ्या मुलांना दुध प्यायची सवय होती मग जो तो सकाली आपला ग्लास घेऊन गॅसच्या बाजूला बसायचा. आम्हा तिघा भावंडांना मात्र चहाच हवा असायचा, तो ही कप बशीतच. प्रत्येकाला एक पाव मिळायचा, जोपर्यंत मामा बेकरीतून पाव आणत नाही तोवर आम्ही कोणीच स्वंपाकघारात जात नसू.

एक मामी चहाचा गॅस सांभाळायची तोवर दुसरी मामी चुल पेटवायची आणि भाकरी थापायला सुरुवात करायची तर तिसरी मामी मसाले काढायच्या तयारीला लागलेली असायची. मावशी किंवा एखादी मामी बच्चेकंपनीच्या आंघोळीचे काम पार पाडत असत.

आमची एकदा का आंघोळ झाली की मग ताटलीभर फराळ फस्त केला की हुंदडायला सुरुवात व्हायची. कधी मामासोबत शेतात जायचे तर कधी आंब्याच्या झाडांखाली खेळयचे नाही तर बुद्धिबळाचे डाव मांडायचे. मामाची वस्ती मोठी आहे मग काय चुलत मामांची, चुलत मावश्यांची मुलं आपापल्या वयाच्या मुलांशी मिळून खेळ सुरु करत.

मामींसोबत घास (जनावरांचा हिरवा चारा alfalfa) कापायला जायला मला आवडायचे. गोबरगॅसच्या टाकीत शेण कालवायला पण मजा यायची. शेतात मिरच्या तोडायला मदत करायलाही मला आवडायचे. आठवड्याच्या बाजारासाठी मिरच्या तोडायला रोजाने (रोजंदारीने) ४-५ बायका येत. १-२ मामा, मामी व त्या बायका असे सर्वजण मिळून मिरच्या तोडणीचे काम करत. मी ही त्यांना मदत करायचे. तोडताना एकदा असेच ठरले होते की ज्याने त्याने आपली पाटी शिग लावून भरायची मगच दुपारची सुट्टी घ्यायची. प्रत्येकाची पाटी शीग लावुन भरली माझी मात्र सपाटच. मी सगळ्यांना म्हटले की जर तुम्ही प्रत्येकी मला एक-एक ओंजळभर मिरच्या तोडायला मदत केली तर माझी पण पाटी भरेन. कोणिच मला मदत कराणार नाही असे वाटले त्याच क्षणी भरलेली पाटी मी शेतात पसरवून (ओतून) द्यायला सुरुवात केली. म्हटले गरज असेल तर करा गोळा आणि गेले पळून घरी. मग काय केल्या सगळ्यांनी मिळून गोळा. Whew

दिवस असाच निघून जायचा, संध्याकाळ झाली की मग सगळ्यांना आजोबा ज्यांना आम्ही दादा म्हणायचो ते हवे असायचे. संध्याकाळी दादा तुळशीच्या ओट्यावर बसायचे. आम्ही सगळे त्यांच्या आजुबाजूला.

दादा फटाकेSSSSS.. दादा फटाकेSSSSS.. द्या नाSSSSS.. असा पाढा सुरू व्हायचा. दादा मग मामाला सांगायचे की गायांचे दूध घ्या काढून म्हणजे पोरांना फटाके देतो. फटाक्यांच्या आवाजाने गाय पान्हा चोरते असे दादा सांगायचे.

दादा ऊठले की आम्ही त्यांच्या मागेच. सगळ्यांना त्यांच्या गोदरेजच्या कपाटातून वयानुसार वेगवेगळे फटाके मिळायचे. टिकल्या, सुरसुरी, नागगोळी, लवंगी, भुईनळा, भुईचक्र, लक्ष्मी, रॉकेट, सुतळी बॉंब अशी विभागनी वयानुसार व्हायची.

बाई म्हणजे आजी, दादा, सगळे मामा आम्ही फटाके वाजवेपर्यंत जवळच थांबायचे.

हात पाय धुऊन मग सर्वांची रवानगी स्वंयपाक घरात. पहिल्या पंगतीला नातवंडांसोबत दादा बसत. बाई पण येऊन बसायची कोणाला काय हवे नको ते पहायची. जेवायला सुरुवात करतानाच दादा न चुकता एक अट घालायचे. जो जास्त दुधभाकर खाईन तो झोपताना माझ्या उजव्या हाताला, ज्याचा नंबर दुसरा तो डाव्या हाताला बाकीचे शेजारच्या गाद्यांवर. मग काय शर्यतच लागयची. बाई किंवा मामी बाजरीची भाकर चुरुन द्यायची, गरम तापलेले दूध, हवी असल्यास साखर आणि मिरचीचा ठेचा तोंडी लावायला.

ज्याने त्याने आपली आपली जागा धरलेली असायची. तास दोन तास दादांची गोष्ट रंगायची. प्रत्येकाला पडलेल्या प्रश्नांचे दादा उत्तर द्यायचे. तेच तारे, तोच राजा, तीच राणी दुसर्‍या दिवशीच्या गोष्टीत नाव गाव बदलून यायचे. बर्‍याच राजांना दोन राण्या असायच्या, एक आवडती तर दुसरी नावडती. दादा गोष्टीतल्या पर्‍या अक्षरशः अंगणात उतरवायचे. तीच परी आता तुम्हाला झोपी लावणार म्हटले की नातवंडं डोळे मिटायचे ते दुसर्‍या दिवशी सकाळपर्यंत.

तुळशीच्या लग्नाच्या दिवशी जास्त फटाके मिळायचे. आम्ही वस्तीवर सगळ्यांच्या घरी लग्न लावत फिरायचो. अशीच मजा करत दिवाळी संपायची. घरी परतायची वेळ यायची. हवे तसे नवीन कपडे मिळायचे. परत नाताळाच्या सुट्टीत भेटू म्हणून निरोप घेतला जायचा.

नाताळाच्या सुट्टीत तर १० दिवस आले तसे पटकन संपून जायचे. पुन्हा उन्हाळ्याच्या सुट्टीचा वायदा ठरायचा.

उन्हाळ्याच्या सुट्टीत तर सगळा वेळ सुरपारंब्या खेळण्यात घालवायला मजा यायची. बाई तिन-चार मडक्यात लोणचं घालायची. मामी प्रत्येकाला डब्यात त्या ताज्या ताज्या लोणच्याच्या फोडी आणि एक चपाती देणार हे ठरलेले. मग डबा घेऊन जायचो आणि आंब्याच्या झाडांखाली खेळायचो. दादा मागावून यायचे. आले की म्हणायचे आता प्रत्येकाने आपापले भुईमुगाचे झाडं उपटून आणा! प्रत्येकाचा ढिग वेगळा ठेवा! ऊन वाढायच्या आत सगळेजण पटापट भुईमूग उपटून आणायचो. मोठा बारदाणा आंथरुन ठेवलेला असायचा त्यावर शेंगा तोडुन टाकायला सांगायचे. दादा प्रत्येक झाडानुसार पैसे द्यायचे त्यामुळे सगळे मन लावुन शेंगा तोडायचो. मी आणि माझा मोठा भाऊ मिळून तोडायचो.

दुपारी घरी जाऊन जेवण करुन सगळे तासाभरात परत कामाला जुंपायचो. काम केले नाही केले तरी दादांना प्रत्येकाला खाऊ घ्यायला पैसे द्यायलाच लागायचे मग दादा आमच्याकाडून असे काम करवून घ्यायचे आणि सगळे जण ऊन्हात जाणार नाहीत, सावलीतच आपल्यासमोर रहातील हे पण साधून घ्यायचे.

मी दुपारी कुल्फीवाल्याचा आवाज ऐकला की दादा, पाचच मिनिटात परत आले म्हणू घरी पळायचे. जो मामा घरी असेल त्याच्याकडून एक, बाईकडून एक अश्या दोन कुल्फ्या हादडून यायचे. दादापण सगळ्यांना कुल्फी घेऊन द्यायचे तिच्यावर पण ताव मारायचे. ऊन कमी झाले की मग आम्ही खेळायला पळायचो. संध्याकाळी नेहमीप्रमाणेच दुधकाला खाऊन राजा राणीच्या गोष्टीत रमायचो.

लहानाचे मोठे होत गेलो. वर्षातुन एकदाच मामच्या घरी जाणे होऊ लागले. दादांचा तोच नित्यक्रम, आम्ही मोठे झालो असलो तरी बरीच नातवंडं लहान होती. दादांची गोष्ट मग ओट्याच्या पायरीवर बसुन ऐकु लागले.

शाळा संपवून कॉलेज मधे गेल्यावर होस्टेलवर रहावे लागल्याने मामाकडे जाणे आणखीच कमी झाले. नातींमधली मीच मोठी नात. दादा एखाद्या मामाला घेऊन मला भेटायला यायचे. प्रत्येक वेळी न विसरता जिलेबी आणायचे. माझी नात खूप हुशार म्हणून तोंडभरुन कौतुक करायचे. नेहमीच म्हणायचे कॉलेज मध्ये जर कोणी तुला पहीले तर कोणालातरी पटेल का माझी नात शेती करते, घरची सगळी कामं करते आणि गडीमाणसासरखं ऊसाला पाटपाणी देताना पाहिलं तर सांगून सुद्धा पटेल का कॉलेजात शिकते म्हणून.

लग्नानंतर त्यांना एकदा भेटायला गेले तर म्हणे मजेत आहेस ना? तर म्हटले की माझ्याकडे पाहून काय वाटते? दादा म्हणाले की पहिल्यापेक्षा जास्त खुष वाटते आहेस. त्यानंतर कधी असे मुक्कामाला रहाणेच झाले नाही. आता परत कधी एकदा परत जाईन आणि सगळ्यांना बघेन असे झालंय.

मागच्या महीन्यात खुपच अस्वस्थ वाटत होते. जय भारतात गेलाय म्हणून असे होत असावे असे वाटत होते. घरी फोन केला तर सगळे कुशल मंगल आहे हे कळाले. जयपण परत आला. त्याला विचारले जय रांजणखोलच्या दादांची तब्येत कशी आहे रे? त्यांची खुपच आठवण येतेय. जरा थांबुनच म्हटला, गेले! मी तर रडायलाच लागले. तर लागला हसायला, म्हणतो कसा? वेडाबाई जर खरच गेले तर किती रडशील. काय ही थट्टा म्हणून रागावले पण त्याच्यावर. मन मात्र मानत नाही, काहीतरी झालंय. जयला खुपदा विचारले, तो एकच म्हणतो, तू फोन कर आणि दादांशी प्रत्यक्ष बोल. काय करावे काहीच कळत नाही.

किती मुर्ख आपण? माझा दादा गेले हेच ऐकण्याचा अट्टाहास का? जय बोलतोय पण मग त्याचे डोळे त्याच्या बोलण्याला साथ का देत नाहीत?

शेवटी मामाकडे फोन केला. फोन एका मामीने घेतला, काय, कश्या? त्यांनी चौकशी करायला सुरुवात केली. मी त्यांना सांगितले की मला दादांशी बोलायचे त्यांना फोनवर बोलवा. तर त्यांनी मामाला आवाज दिला. मामाकडे दादांची चौकशी केली. ठिक आहेत ते, हेच मामाने सांगितले. मामा म्हणे तू लवकर ये बरं आम्हाला भेटायला. सगळेच खोटं बोलतायेत असंच वाटलं. मामाला स्पष्टच विचारले तर तो आलेला हुंदका लपवू पाहातोय हे जाणवले. जे कळायचे ते कलून चुकले. दादा गेले हे नक्की.. पण कधी?? हे सांगायला कोणीच तयार नाही.

मामाकडुन दुसर्‍या मामीने फोन घेतला. मामाला बोलताच येत नसेल ना? म्हणून मामीने फोन घेतला असेल. मामीला विचारले, मामी तुम्ही तरी सांगणार आहत का की दादा कधी वारले? तर मामी क्षणभर शांत राहुन म्हणाल्या ७ फेब्रुवारी. त्यानंतर एवढेच म्हणू शकले की बाईची काळजी घ्या.......

बाई, तुझी लाडकी नलुताई ह्यावेळी तुझ्यापासुन खूप दूर आहे. तू स्वत:ला सांभाळ एवढेच ती ह्या वेळी म्हणू शकते. तुझ्याशी बोलण्याचे धैर्य तिच्यात ह्या क्षणी नाही. तुझी आणि दादांची खुप खुप आठवण येतेय.

दादा, तुमच्या आत्म्यास शांती लाभो हि ईश्वरचरणी प्रार्थना.

दादांना जाऊन १० वर्ष लोटली. बाईपण गेली. त्यांच्याविणा आजोळ अगदी ओसाड, भकास वाटते. गेल्या कित्येक वर्षात तिथे मुक्कामच केलेला नाही. बाई गेली तेव्हा मी मामांकडून दादांचे ते कपाट मागून घेतले. माझे बाई, दादा नेहमीच माझ्यासोबत असण्यासाठी.

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle