नवजागर २०१७ : मनस्वीची कथा

ह्याआधी मायबोलीवर ही कथा मी प्रकाशित केली होती. त्यावर पुन्हा थोडे काम करून पुन्हा इथे प्रकाशित करते आहे.
==========================================================================

मनस्वी आज खूप खुशीत होती. तब्बल पाच वर्षांनी तिला भारतात यायला मिळाले होते. शिक्षण, नोकरी ह्या सगळ्या रगाड्यामध्ये भारतभेट दरवर्षी हुलकावण्या देत होती. पण ह्यावेळेस मात्र अगदी महिनाभर सुट्टी काढून मनस्वी आणि सौमित्र दोघेही पुण्यात आले होते. मनस्वी आणि सौमित्रचे लग्न होऊन जवळजवळ दहा वर्षे झाली होती तेव्हापासून मनस्वी भारताबाहेरच होती. सुरुवातीला दरवर्षी भारतभेटीस येणारी मनस्वी गेल्या पाच वर्षात एकदाही येऊ शकली नव्हती. आज पाच वर्षांनी तिला तिच्या कॉलेजमधील ग्रुप भेटणार होता. दीपांकर, निरंजन, सचिन, अनुप, ऋता, देविका आणि मनस्वी गेल्या १७-१८ वर्षांपासूनचे खूप जवळचे मित्रमैत्रिणी. अभ्यास करणे , सिनेमे पहाणे, पिकनिक्सला जाणे, ओव्हरनाईट कॅम्पिंग करणे, सगळ्या गोष्टी त्यांनी एकत्र केल्या होत्या. ऋता आणि मनस्वी परदेशी आपापल्या संसारात रमल्या होत्या. बाकीची गॅंग पुण्यातच स्थायिक झाली होती. आज ऋता नव्हती, पण बाकीचे सगळे लोकं आज भेटणार होते. आज खूप गप्पा मारायच्या होत्या, खूप आठवणी काढायच्या होत्या, भविष्याबद्दल चर्चा करायची होती, एकमेकांना परत खूप चिडवायचे होते…गेल्या १७-१८ वर्षांच्या मैत्रीला पुन्हा उजाळा द्यायचा होता. म्हणूनच सगळ्यांनी ठरवले की बायका, नवरे, मुले ह्यांना घरी ठेवून फक्त मित्र-मैत्रिणी भेटू!!!

एरवी एक टी-शर्ट आणि जीन्स चढवून मनस्वी बाहेर पडली असती . पण आज अगदी पंजाबी ड्रेस, मंगळसूत्र, बांगड्या असा सगळा थाट करून बाहेर पडली. सासू-सासरे थोड्या जुन्या वळणाचे होते म्हणून, त्यांचे मन जपायला इथे महिनाभर ते सांगतील तसे मनस्वी वागायची. हुशार, स्मार्ट, कर्तुत्ववान आणि स्वतंत्र विचारांची असलेली मनस्वी तेवढीच हळवी, लाघवी, प्रेमळ आणि समजूतदार होती. वर्षानुवर्षे आपण दूरच असतो मग महिन्याभरासाठी कशाला वादविवाद करा असा विचार करून सासू-सासऱ्यांचे मन राखायचा ती आटोकाट प्रयत्न करायची. अगदी कितीही कितीही पटत नसले तरीही. दहा वर्षात चुकूनसुद्धा त्यांना उलट उत्तर केल्याचे तिलाच काय पण तिच्या सासू-सासऱ्यांनाही आठवत नव्हते. तिच्या ह्या स्वभावामुळे सौमित्र तिच्यावर जीवापाड प्रेम करायचा. तिचे मन खूप जपायचा. सासू-सासरे सुद्धा स्वभावाने वाईट नव्हतेच पण जुन्या वळणाचे असल्याने तिच्या आणि त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये कमालीची तफावत होती. सौमित्र अनेक वर्षे भारताबाहेर राहिल्याने त्याला मनस्वीची मते तंतोतंत पटायची पण आई- वडिलांच्या संस्कारात वाढल्यामुळे त्यांच्या मनात काय असेल हेसुद्धा त्याला निश्चितपणे कळायचे. कधीकधी मनस्वी आणि आई-वडील ह्यांच्यामध्ये त्याची कात्री व्हायचीसुद्धा पण असे प्रसंग मनस्वी आपल्या समजूतदारपणाने अगदी व्यवस्थित निभावून न्यायची.

आज खुशीमध्ये गाणे गुणगुणत ती आरशासमोर उभी राहून आवरत होती. तेवढ्यात सौमित्र खोलीत आला.

"मनु आज अश्विनी भेटणार आहे मला. तू येतेस? तुलाही आवडेल तिला भेटायला. "

"सौमित्र, अश्विनी आज भेटणार आहे तुला? आणि हे तू मला आत्ता सांगतो आहेस? अरे आज आमच्या कॉलेजच्या गॅंगचं गेट- टूगेदर आहे. मी बोलले होते तुला."

"अरे बापरे. अग मी पार विसरून गेलो. पण मी अश्विनीला आजची वेळ दिली आहे. पोस्टपोन करू का??"

"नको रे. माझ्यासाठी कुठे पोस्टपोन करतोस! तुझी खूप जुनी आणि जवळची मैत्रीण आहे. त्यातून तीसुद्धा तुला खूप वर्षांनी भेटते आहे. आता आयत्या वेळेस कशाला चेंज करतोस. तसेही माझी तिच्याशी काहीच ओळख नाही. मी तिथे काय बोलणार? त्यापेक्षा तू एकटाच जाउन ये"

"बघ हं मनु असे नवऱ्याला त्याच्या मैत्रिणीबरोबर एकटाच पाठवते आहेस. " मिश्किल हसत सौमित्र म्हणाला.

"तुझ्यावर नसला म्हणून काय झालं माझा स्वत:वर विश्वास आहे बरंका" मनस्वीनेसुद्धा तेवढ्याच खेळकरपणे उत्तर दिले. "जोक्स अपार्ट, पण आज खरच तू एकटाच जाऊन ये. पुढच्या आठवड्यात जमलं तर आपण दोघेही जावून तिला भेटून येऊ. आणि माझ्यातर्फे तिला सॉरी म्हणायला विसरू नकोस!!"

"बरं मग गाडी तुला ठेवून जातो. मी जवळच जाणार आहे. रिक्षाने जाईन. "

"ओक्के. चल मग आता निघते मी. कदाचित उशीर होईल. काळजी करत बसू नकोस."

"चल बाय. जपून गाडी चालव गं" सौमित्र एवढे म्हणेपर्यंत मनस्वी सासू-सासऱ्यांच्या खोलीत त्यांचा निरोप घ्यायला गेली.

घरातून बाहेर पडत गाडीत बसणार तोच फोन वाजला

'आता कोणाचा फोन???' म्हणत तिने फोन हातात घेतला तर देविकाचा फोन होता. 'पोहोचली की काय ही एवढ्या लवकर??? आता मला फायरिंग मिळणार असं दिसतय'

"हॅलो. बोल ग देविका. पोहोचलीस का एवढ्या लवकर. मी निघतेच आहे अजून."

"अगं थोडा प्रॉब्लेम झालायं. मला ऑफिसचा महत्वाचा कॉल आला आहे. बहुतेक दिवसभर त्यातच जाईल. "

"ओह!! काय गं देविका….कसलं ग तुझं ऑफिस. एवढ्या वर्षांनी आपण भेटतो आहे आणि नेमका आजच तुझा कॉल यायचा होता"

"बघ न गं!! रियली सॉरी. खरंच. तू एवढ्या वर्षांनी आलीस आणि मी साधी तुला भेटायला येऊ शकत नाही. खरंच खूप वाईट वाटतं आहे गं. पण पुढच्या आठवड्यामध्ये मी घरी येउन भेटते तुला नक्की. खरंच गं खूप खूप सॉरी."

"अगं हो हो. किती वेळा सॉरी म्हणशील? मी गम्मत केली. इट्स ओके. काम महत्वाचं आहे. ते तर करायलाच हवं. आपण पुढच्या आठवड्यात भेटू की. पण तेव्हा तरी नक्की ये. नाहीतर तुझा परत एखादा कॉल यायचा."

"अगं नाही. काय वाट्टेल ते झालं तरी पुढच्या आठवड्यात मी तुला घरी येउन भेटून जाईन. आज तुम्ही लोक एन्जॉय करा."

"ओक्के मग. टेक केयर. " म्हणता म्हणता मनस्वीने गाडी स्टार्ट केली.

ठरलेल्या ठिकाणी सगळे जमले होते. दीपांकर, निरंजन, सचिन आणि अनुप.

"अरे देविकाचा फोन होता. ती येणार नाही. तिच्या ऑफसचा कसला तरी कॉल आहे आज दिवसभर. आपण आत जावून बसुयात". मनस्वीने जाहीर केले.

सर्वांना निवांत बसता यावे आणि भरपूर गप्पा मारता याव्यात म्हणून दीपांकरने एक शांत रेस्टॉरंट बुक करून ठेवले होते. पाचही जण आत जावून बसले.

"आज ऋताची आणि देविकाची कमी आहे" सचिनने आठवण काढली.

हळूहळू जुन्या आठवणी, सध्याचे आयुष्य, भविष्याचा विचार अशा गप्पा रंगत गेल्या. मग काय? राजकारण, क्रिकेट, परदेशातील जीवन, वेगवेगळ्या ठिकाणच्या ट्रिपचे वृत्तांत, कॉलेजचे शिक्षक, कोणताही विषय सुटला नाही गप्पांमधून. मधेच हास्यविनोद आणि एकमेकांना चिडवणे चालूच होते. संध्याकाळ व्हायला आली तरी गप्पा संपेनात मग पुढच्या आठवड्यात परत एकदा भेटायचे ठरवून, एकमेकांचा निरोप घेऊन सगळे आपापल्या घरी निघाले.

मनस्वी घरी आली ती एकदम खुशीतच. नवरा आणि सासू-सासरे बाहेरच्या बागेत चहा पीत तिचीच वाट पहात होते.

"कसं झालं गेट-टूगेदर? भेटले का सगळे?" सासुबाईंनी विचारलं.

"हो जेवढे पुण्यात आहेत तेवढे सगळे भेटले. एक मैत्रीण फक्त आली नव्हती. ती पुढच्या आठवड्यात घरी येऊन भेटेल." सौमित्रकडे पाहून मनस्वीने विचारलं "तुला भेटली अश्विनी?"

"हो भेटली ना!! म्हणत होती पुढच्या वेळेस बायकोला घेऊन ये नक्की. "

"जाऊ आपण पुढच्या आठवड्यात तिला भेटायला. "

"मनस्वी आजच्या गेट-टूगेदरचे फोटो काढले की नाही?? सासऱ्यांनी विचारले

"हो" असे म्हणत मोबाइलमधले फोटो तिने सगळ्यांना दाखवायला सुरुवात केली. उत्साहाच्या भरात सासू-सासऱ्यांचा पडलेला चेहेरा तिच्या लक्षातच आला नाही.

"हे काय गं? बाकीच्या मैत्रिणी कुठे आहेत?" सासऱ्यांनी विचारले.

"अहो ऋता अमेरिकेत असते. देविकाला आज येता आले नाही." उत्साहामध्ये मनस्वी बोलून गेली.

बराच वेळ कोणी काही बोललेच नाही. बागेत एक विचित्र शांतता पसरली. बऱ्याच वेळानी मनस्वीला त्या शांततेचा अर्थ लागला. वाद टाळण्यासाठी हळूच उठून ती घरात जाउ लागली. तेवढ्यात सासूबाई मागून म्हणाल्या "असं चार मुलं आणि एक मुलगी!!!! बरं दिसत नाही!!"

"आई काहीतरीच तुझं. इतकी जुनी मैत्री आहे त्यांची. बरं काय दिसत नाही? आणि मनस्वी लहान आहे का आता? तिची जबाबदारी तिला समजत नाही का?" सौमित्रने मनस्वीची बाजू घेतली.

"अरे पण कसं दिसतं हे" सासूबाई

"आई, काहीही वाईट दिसत नाही. जे काय चांगले वाईट आहे ते पहाणाऱ्याच्या नजरेत आहे" सौमित्र म्हटला.

"अरे हो. पण असं लोकांनी पाहिलं तर ते काय बोलतील" सासूबाई

इतका वेळ शांत राहिलेले मनस्वी उसळून बरंच काही बोलणार होती पण तिने एकच प्रश्न केला.

"तुमचा मुलगा एकटाच एका मुलीला भेटायला गेला तेव्हा त्याला तुम्ही हे बोललात का?"

दहा वर्षात पहिल्यांदा उलटून केलेल्या ह्या प्रश्नाचे उत्तर मात्र तिला अगदी अनपेक्षित असेच मिळाले.

"अगं एक मुलगा आणि एक मुलगी बघितले की लोकांना वाटतं असतील गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड!!!!"

ह्यापुढचे वाक्य तिच्या सासूबाई बोलल्या नाहीत. पण त्यांना काय बोलायचे असावे ते न कळण्याइतकी मनस्वी भोळीभाबडी निश्चितच नव्हती. तिच्या तळपायाची आग एकदम मस्तकात गेली. रागाने कानशिले तापून लाल झाली. एखादं मधमाशांचं पोळं फुटावं आणि हजारो मधमाशा अंगावर धावून जाव्यात तसे हजारो प्रश्न आणि विचार मनस्वीच्या डोक्यात घोंगावायला लागले, तिला डसायला लागले.

आपण केवळ स्त्री आहोत म्हणून अशा प्रकारची टीका आपल्याला सहन करायला लागते आहे का? पुरुष आणि स्त्री ह्यांची निखळ मैत्री असूच शकत नाही का? मुलाची मैत्रीण इतक्या सहजतेने स्वीकारणारी स्त्री, सुनेचे मित्र का स्वीकारू शकत नाही? हा माझा चारित्र्यावर घेतलेला संशय आहे की सासूसासऱ्यांचे केवळ जुनाट विचार आहेत ? ह्यापुढे लोकांना काय वाटेल ह्यावर मी माझ्या मित्रमैत्रिणींना भेटायला जायचे की नाही हे ठरवायचे का? इतकी वर्षे जुनाट वळणाच्या सासूसासऱ्यांची मने जपल्यानंतर त्या सगळ्यावर एका क्षणात पाणी फिरविले जावे? एक भलतीच मुलगी तुमच्या मुलाची गर्लफ्रेंड वाटली तरीही तुमची काहीच हरकत नसते? समजा तुमचा मुलगा चार मैत्रिणींबरोबर गेला असता तर तुम्हाला चालले असते का? तुमच्या मते एका मुलाला आणि मुलीला जेव्हा लोक एकत्र बघतात तेव्हा त्यांना ते गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड वाटतात? मग चार मुले आणि एक मुलगी असा ग्रूप असलेले आम्ही कोण वाटतो आहोत तुम्हाला?

मनस्वीला ह्या विचाराची एकदम शिसारी आली. अतिशय हताश झाल्याची आणि हरल्याची भावना एकीकडे आणि दुसरीकडे ज्वालामुखीसारखा उसळणारा संताप!! तरीही हे सगळे प्रश्न मनस्वी कधीच कोणालाच विचारणार नव्हती. प्रश्नांची उत्तरे तिला कधीच मिळणार नव्हती. हे प्रश्न आयुष्यभर सतत तिचा पिच्छा करतच राहाणार होते. कारण मनातला संताप, तिरस्कार आणि घृणा एका आवंढ्याबरोबर कसाबसे गिळून, भांडण नको आणि सौमित्रचं समर्थन मिळालं ह्या कारणांसाठी तिने पुन्हा एकदा शांतच रहायचा निर्णय घेतला होता

समाप्त

उपक्रम: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle