वरीचा उपमा

वरीचे तांदूळ कोरडेच खमंग भाजून घ्यायचे. गार झाले की धुवून चाळणीत ठेवायचे. ते कोरडे झाले (लगेच होतात १० मिनिटात) की तूप गरम करून जिरं आणि वाटलेल्या मिरच्या त्यात चांगल्या परतून घ्यायच्या. धुतलेले वर्‍याचे तांदूळ त्यात घालून परतायचे. मीठ साखर ओलं खोबरं घालून परतायचे. परतून परतून हे तांदूळ हलके झाले पाहिजेत. गॅस बारीकच ठेवायचा. हलके झाले की दाण्याचं कूट त्यात नीट मिक्स करून घ्यायचं आणि उकळीचं पाणी घालायचं. वरीतांदुळाच्या साधारण तिप्पट ते चौपट पाणी लागतं. नीट ढवळून झाकण ठेवून तांदूळ शिजू द्यायचे. वाफ मुरून तांदूळ छान फुलण्यासाठी कढई मोठी हवी. कणी चांगली शिजली वरून थोडं तूप सोडून गॅस बंद करायचा आणि झाकण ठेवून द्यायचं. वाफ निवली की उपमा खायला घ्यायचा. वरून खोबरं कोथिंबीर घालायची.
हा उपमा जरा निवल्यावर छान लागतो. गरम असताना खाल्ला तर गिच्च गोळा लागतो. आणि मिरच्या मीठ साखर ह्या सगळ्या चवी जरा पुढेच हव्यात, म्हणजे वरी शिजल्यावर उपमा एकदम चविष्ट लागतो.

पाककृती प्रकार: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle