चाला वाही देस

गेले काही दिवस मी एक समांतर आयुष्य जगतेय असं वाटतंय. हा माझा एकटीचा प्रवास आहे. अर्थात त्यात काही समानधर्मींशी अधूनमधून टचबेस करतेय पण मी यात एकटीच आहे. लतादीदींच्या जाण्याने माझ्या मनात जी काही उलथापालथ झाली ती झालीच. त्यांची मी खूप मोठी फॅन होते का तर लौकिकार्थाने कदाचित नाही . पण माझं त्यांच्याशी एक नातं आहे हे निश्चित - रूहानियत का रिश्ता. त्यांच्या गाण्यांनी माझ्या आत्म्याला तृप्ती मिळते. आणि या नात्याने लतादीदींशी बांधले गेलेले करोडो लोक आहेत. मुझसे बेहतर सुननेवाले हैं|
सहा फेब्रुवारी नंतर दिदींच्या अनेक आठवणी, गाणी या साऱ्याबद्दल अनेक जण बोलले, अनेक लेख आले. ते सारं ऐकताना, वाचताना मला जाणवलं की लतादीदी किती मोठा खजिना ठेवून गेल्या आहेत. अनंत हस्ते कमलावराने (इथे दिदींच्या गात्या गळ्याने) देता किती घेशील दो कराने अशी सांगीतिक संपन्नता दिदी सोडून गेलेल्या असताना आपली झोळी मात्र तशी रिकामीच आहे! मग आपोआप या वाटेने प्रवासाला सुरुवात झाली. लतादीदींच्या मी न ऐकलेल्या किंवा काहीशा विस्मृतीत गेलेल्या गाण्यांचा शोध घेणे. जरासा मोकळा वेळ मिळाला की मी या जादुई दुनियेत शिरते. ही गाणी माझे अक्षय आनंदाचे निधान आहे!
आधी मी वाहत्या पानावर लिहीणार होते पण विचार बदलून याचा लेख करते आहे. जी गाणी मला नव्याने कळली ती इतरांना ऐकवून त्यांनाही आनंद मिळावा म्हणून आणि मलाही काही गाणी नव्याने सापडावीत असा दुहेरी हेतू आहे!
जसा वेळ मिळेल तशी लेखात भर घालत राहीन. माझ्या सारख्या यःकश्चित रसिकाची दिदींना हीच श्रद्धांजली __/\__ बाकी ऋणाची फेड शक्य नाही.

हे सारे माझ्या मनाचे खेळ असतील कदाचित पण दिदी गेल्यावर जगातला कर्कश्शपणा (cacophony) वाढल्या सारखा वाटायला लागला आहे. Some harmony vanished after she passed away. अशात या गाण्यांच्या माध्यमातून एका वेगळ्या काळात/विश्वात जाणे हा मी माझ्यापुरता शोधलेला उपाय आहे. मीरेला अपेक्षित असलेला देस थोडा वेगळा आहे पण हा ही देस फार सुंदर आहे! म्हणून हे शीर्षक - चाला वाही देस!

१. चाला वाही देस - हे काही अप्रसिद्ध गाणं नाही. पण मी या आधी फार ऐकलं नव्हतं. दिदींनी गायलेली आणि पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी संगीतबद्ध केलेली मीरेची सगळी भजनं सुंदरच आहेत! यातली केनु संग खेलू होरी, करम की गती न्यारी आणि माई माई कैसे जीऊँ री ही माझी आवडती होतीच पण पहील्यांदा ऐकले तेव्हा चाला वाही देस तितके भिडले नाही का कोण जाणे! पण आत्ता पुन्हा ऐकले तेव्हा पासून ते खोलवर जात चालले आहे! Only she can pull this off! हे लाईव्ह आहे हे लक्षात घेतले की हात जोडण्याशिवाय पर्याय उरत नाही. I know she has left for this Des!
चाला वाही देस
कहो कुसुंबी साडी रंगावा
कहो तो भगवा वेस
चाला वाही देस!
रच्याकने, इतक्यात जर मुंबई पुणे गाडीने प्रवास केला असेल तर घाटात सर्वत्र कुसुंबीची नवीन पालवी दिसली असेल. तोच हा कुसुंबी रंग - लाल आणि भगवा याच्या मधला - वैराग्याचा रंग! गुगलून बघा नक्की! असं हे गाणं अंतर्बाह्य व्यापते आहे.

२. सावन के झुले पडे - आता दिदींच्या गाण्याचे चाहते म्हणतील, "तू कसली फॅन? हे गाणं माहिती नव्हतं तुला?" मान्य आहे! हे गाणं ऐकलं आणि मलाही हाच प्रश्न पडला? इतके दिवस कुठे होतं हे गाणं! सिनेमा - जुर्माना, पडद्यावर राखी आणि अमिताभ. संगीत आर डी बर्मन - one of the few songs that don't have a RD signature ensemble music orchestra. सारा थेट सुरांचा खेळ आहे. सुरांनी आणि शब्दांनी उभा केलेला romance राखीने तितक्याच नजाकतीने पडद्यावर दाखवला आहे! याचच एक सॅड व्हर्जन पण आहे. पण मला हेच फार आवडले!

३. तुज स्वप्नी पाहिले रे गोपाळा - हे गाणं अर्थात महेश एलकुंचवार यांच्या लेखात सापडलं! दत्ता डावजेकरांचे शब्द आणि संगीत - काय अप्रतिम शब्द, चाल आणि अर्थातच गायकी! एलकुंचवार म्हणाले तसं "अंजिरि पडदा महिवरि धरीला" ही ओळ पुन्हा पुन्हा ऐकली तरी मन भरत नाही! लतादीदी त्या वेळी विशीच्या आसपास असतील पण या गाण्यात जो स्वर लागला आहे तो एका अत्यंत mature आणि तयारीच्या गायिकेचा आहे. बावनकशी सोन्याला वय थोडीच असतं!

२२ मार्च २०२२

प्रत्येक पिढीचं संगीत असतं आणि ते वय वर्षे १२ ते २४ या काळात असलेल्या संगीतावर आधारित असतं असं माझं मत आहे. या व्याख्येनुसार माझ्या पिढीच्या संगीतात १९९४ ते २००७ अशी (काही वर्षे मागे पुढे) वर्षे येतात. अर्थात मोठे झाल्यावर प्रत्येकजण आपल्या नव्या वाटा शोधून काढतोच. हे सांगायचं कारण असं की त्या काळात लता मंगेशकर हे नाव अधूनमधून दिसायचं - त्यांनी गाणी गाणं पूर्ण बंद केलं नव्हतं पण आता त्यांच्या आवाजातून वय डोकावतंय ही जाणीव होऊ लागली होती. आणि ते नैसर्गिकच होतं - १९९९ साली दिदी ७० वर्षांच्या होत्या. या काळातलं “जिया जले” गाणं दिदींच वय विसरायला लावणारं. पण त्याच बरोबरीने फारसा उल्लेख न होणारं पण माझं फार आवडतं गाणं म्हणजे वन टू का फोर मधलं “खामोशीयां गुनगुनाने लगी” (संगीत रेहमान). तनहाईयां मुस्कुराने लगी या दुसऱ्याच ओळीत लतादीदीनीं “मुस्कुराने” हा शब्द जसा गायलाय ना तो खास लता टच आहे! तो ऐकाच! वो मुस्कुराके गाया है! दिदींच्या गळ्यातून शब्दाचं सोनं होतं असं का म्हणतात याची जाणीव मला हे गाणं ऐकताना नेहमी होते.
आता पुन्हा नव्याने सापडलेली जुनी गाणी. एका सिनेमातलं एखादं गाणं सुपर हिट होतं पण बाकीची गाणी देखील सुरेखच असतात तर अशी इतक्यात ऐकलेली काही गाणी -
१. बेकस पे करम किजीये - आपल्याकडे जसे भक्तिसंगीतात गवळण, भूपाळी, विरहिणी असे प्रकार आहेत तसे इस्लामी/सुफी संगीतात देखील आहेत. हे गाणं म्हणजे प्रेषित मुहम्मदाची केलेली आळवणी आहे. या प्रकाराला नात (म्हणताना नाथ - थ हलकासा) म्हणतात. मुघल ए आझम मधली ही नाथ मला फार आवडते. यातले उर्दू उच्चार खासच. मुघल ए आझम ची सगळीच गाणी ग्रेट आहेत पण दुसरं यातलं मला आवडणारं गाणं - “ए इश्क ये सब दुनियावाले” अर्थात हे गाणं मला शब्दांसाठी जास्ती आवडतं.

२. मेरे मन के दिये - परख मधलं “ओ सजना बरखा बहार आयी” जितकं फेमस आहे तितकं हे गाणं नाही. अत्यंत नाजूक, जवळपास कुजबुजत्या आवाजात असं हे गाणं आहे. सलिलदांनी यात पाश्चिमात्य संगीतातल्या choir चा उपयोग केला आहे. याचं पडद्यावरचं कृष्णधवल चित्रीकरण सुरेख आहे आणि साधना फार गोड दिसली आहे. एकूण काय सगळ्या रकान्यात १० पैकी १० गुण आहेत!

३. ठुमक चलत रामचंद्र - जितकं “पायो जी मैंने राम रतन धन पायो” लोकप्रिय आहे तितकं हे तुलसीदासांचे भजन ऐकलं जात नाही. पण हे फार गोड गाणं आहे. नुकताच चालू लागलेला छोटा राम आणि त्याची पहिली पावलं पडताना कौतुकाने बघणारी कौसल्या.

२४ मार्च २०२२

हृदयनाथांचा एक कार्यक्रम ऐकत होते. त्यात त्यांनी के महावीर यांच्याविषयी सांगितले. के महावीर हे एक मोठे गायक, वादक (पेटी आणि तबला) आणि संगीतकार होते. शिवाय ते उत्तम नर्तक होते - नावातल्या के अक्षर हे कथ्थक या आडनावाचं आद्याक्षर आहे!
तर या के महावीर यांनी संगीत दिलेली गाणी आणि गझला ज्या दिदींनी गायल्या आहेत त्या केवळ अप्रतिम आहेत!
त्यातील ४ खाली देते आहे; जरूर ऐका! या गाण्यांसाठी सहाय्यक म्हणून हृदयनाथ यांनी काम केलं होतं.
या चाली इतक्या सुंदर आणि वेगळ्याच आहेत. अवघडही आहेत. मला खरं सांगायचं तर शब्द सापडत नाहीयेत प्रत्येक गाण्याचं वेगळं वर्णन करायला. अर्थात हा माझा दोष आहे. तीन साडेतीन मिनिटांची ही गाणी पण एक एक गाणं आपला अख्खा दिवस खाऊ शकतं! इतकी या गाण्यांची ताकद आहे.
या इतक्या सकस गाण्यांवर जर तुमचा कान पोसला गेला असेल तर आजची गाणी तुम्हाला आवडणं किती अवघड आहे हे आता मला कळायला लागलं आहे.

१. आज की रात न जा - तुम्ही हे गाणं एकदाच ऐकू शकणार नाही - फारच सुंदर चाल आणि शब्द! आणि किती गोड आवाज! मी या गाण्याची पारायणं केली आहेत!

२. एहदे गम में भी मुस्कुराता है कोई - ही गझल फार सुंदर आहे. Very typical yet very intriguing.

३. आंख से आंख मिलाता है कोई - ही गझल तशी प्रसिद्ध आहे. दिदींच्या आवाजात टिपिकल गझल ऐकायला मजा येते.

४. सांझ भयी घर आजा रे - मारवा या रागात बांधलेलं हे गाणं आहे. मला राग वगैरे कळत नाही पण मारवा संध्याकाळचा, हुरहूर लावणारा राग आहे आणि गाण्याचे शब्द ऐकले की ही चाल किती सुयोग्य आहे हे कळून येते.

या लेखासाठी शोध घेत असताना मला के. महावीर यांचं उषा मंगेशकर यांनी गायलेलं एक गाणं सापडलं - तुम्हारी याद के सागर में दिल डूबोते हुए. लेख दिदींबद्दल असला तरी सर्वच मंगेशकर भावंडे ही प्रतिभावंत कलाकार आहेत. त्यामुळे इथे हे गाणं देणं अस्थानी नाही.

३० मार्च २०२२

तर माझ्या वडिलांच्या आवडीच्या, अत्यंत अवीट गोडीच्या “गृहदेवता” या सिनेमातल्या ३ गाण्यांबद्दल दोन ओळी मी या भागात लिहिणार आहे. वसंत प्रभू, पी. सावळाराम आणि लता मंगेशकर यांचा हा सिनेमा. या त्रयीने आपल्याला अनेक अजरामर गाणी दिली - चाफा बोलेना, आली हासत पहिली रात, कल्पवृक्ष कन्येसाठी आणि अनेक. कल्पवृक्ष कन्येसाठी या गाण्याचे रेकॉर्डिंग झाले तेव्हा शेवटचा टेक झाल्यावर लतादिदी माईकसमोरच भावनातिरेकाने कोसळल्या होत्या. हे वाचले तेव्हा माझ्या मनात अनेक वर्षं असलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले - लतादिदींनी हे गाणे कसे गायले असेल?
कोणत्याही मुलींसाठी तिचे बाबा खासच असतात. लतादिदी याला अपवाद कशा असणार! ही घटना स्वतः लतादिदींनी सांगितली आहे. १९४२ साली दीनानाथ मंगेशकर गेले. जेव्हा ४३ साली वडिलांची प्रथम पुण्यतिथी आली तेव्हा लतादिदी केवळ १४ वर्षांच्या होत्या. आर्थिक परिस्थिती अशी नव्हती की जागा भाड्याने घेऊन काही कार्यक्रम करता येईल. नेमका त्या दिवशी मा. विनायक यांच्या कंपनीच्या नाटकाचा प्रयोग होता. दिदींनी विनायकरावांना विनंती केली की मध्यांतरात पडदा पडून काही वेळ त्यांना द्यावा. त्या १४ वर्षांच्या मुलीने त्या वेळेत आपल्या वडिलांचा फोटो रंगमंचावर ठेवला, त्याला हार घातला आणि श्रद्धांजली म्हणून दीनानाथांची काही गाणी गायली. इतर काही जणांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. अशाप्रकारे त्या स्वाभिमानी मुलीने आपल्या वडिलांची पहिली पुण्यतिथी साजरी केली. ही गाणी ऐकून दुसऱ्या दिवशी पु. लं. देशपांडे दिदींना भेटायला घरी आले आणि आशीर्वाद देऊन गेले! त्यानंतर दिवस पालटले.आजपर्यंत दरवर्षी २४ एप्रिल ला सर्व मंगेशकर भावंडे दीनानाथ मंगेशकर स्मृती महोत्सव आयोजित करतात. दीनानाथांच्या नावे पुरस्कारही दिला जातो. पण ही पहिल्या स्मृतिदिनाची आठवण मला फार विशेष वाटते. जेमतेम १३ वर्षे वडिलांचा सहवास लाभला पण त्यातूनही वडिलांची शिकवण इतकी घट्ट रुजली की तो ठेवा आयुष्यभर पुरला.
दिदी गेल्यावर जेव्हा मी ही गाणी पुन्हा ऐकली तेव्हा मला बाबांची खूप आठवण आली Sad त्यांनी अशी एक कमी प्रसिद्ध पण सुरेख हिंदी आणि मराठी गाण्यांची प्लेलिस्ट तयार करून घेतली होती जी ते कायम ऐकायचे.
त्या १४ वर्षाच्या मुलीने जसा आपल्या वडिलांचा वसा जपला, पुढे नेला तशी माझ्या बाबांच्या आवडीच्या गोष्टी पुढे नेण्याची ताकद देव मला देवो!

१. सांग धावत्या जळा - झुळझुळ वाहणाऱ्या झऱ्याप्रमाणे प्रसन्न आणि हसरी चाल आणि शब्द. आणि किती तो गोड आवाज!

२. गोड तुझ्या त्या स्वप्नामधली - या गाण्याची सिनेमातली सिच्युएशन कशी आहे माहिती नाही पण आईच्या प्रेमाचे वर्णन करणारे हे गाणे ऐकले की माझ्या बाबांचे डोळे आजीच्या आठवणीने भरून येत. माझेही येतात कधी तरी.

३. नीज गुणीले नीज लवलाही - दिदींनी गायलेली प्रसिद्ध अंगाईगीतं म्हणजे नीज माझ्या नंदलाला किंवा गुणी बाळ असा जागसि का रे वाया. पण हे म्हणजे अगदी प्रॉपर अंगाई गीत आहे. गुणगुणता येईल अशी चाल आणि सुंदर शब्द. हे गाणं खूप जुनं आहे म्हणून केवळ इतकं ऐकलं जात नाही बहुतेक.

१३ एप्रिल २०२२

माझ्या एका आत्याच्या जुन्या घरी लतादीदींचा तरुणपणीचा एक छान फोटो होता. का तर लतादिदींची तरुण असताना गायलेली गाणी ही आत्या आणि काका यांना फार आवडतात म्हणून! त्यांच्या तोंडी लता, आशा, रफी, किशोर असे उल्लेख असतात. बरोबरच आहे - मला नाही वाटत मी श्रेयाला कधी श्रेया घोषालजी म्हणेन! पण लतादिदींना आदरार्थी बहुवचनी संबोधन सोडून लता असं एकेरी संबोधित करणं मला जमायचं नाही. आपली लायकी नाही असं वाटायचं! पण दिदी गेल्या त्या दिवशी मला whatsapp वर १९६७ साली त्यांच्या चित्रपट संगीताच्या कारकीर्दीच्या रौप्य महोत्सवानिमित्त प्रकाशित झालेली एक स्मरणिका मिळाली. हिची संकल्पना होती पु. लं.ची आणि संपादन केलं होतं शांता शेळके यांनी. मी ती पीडीएफ अधाश्यासारखी वाचून काढली आणि आयुष्यात पहिल्यांदा मला लता असं एकेरी संबोधावसं वाटलं! कारण त्या पुस्तकात एका जवळपास माझ्या वयाच्या, ३८ व्या वर्षी हिंदी चित्रपट संगीत सृष्टीची अनभिषिक्त सम्राज्ञी असलेल्या मुलीविषयी अनेकांनी फार आपुलकीने लिहिलं होतं.
तिने कमी वयात प्रचंड यश मिळवलं होतं. भारतासारख्या बहुरंगी, बहुभाषिक देशात सर्व सामाजिक स्तरात लोकप्रियता मिळवली होती - तिचं गाणं धर्म, भाषा, देश, प्रांत याच्या पलीकडे जात होतं. आणि हेच स्थान त्या मुलीने पुढची ५० वर्षे अबाधित राखलं नव्हे पक्कं केलं. ते पुस्तक वाचलं आणि या तिशीतल्या तरुण लताच्या नव्याने प्रेमात पडले!! गळ्यातल्या गंधाराव्यतिरिक्त इतर अनेक गुण तिच्याकडे होते - विनोदबुद्धी, दुसऱ्यांसाठी हौसमौज, भेटवस्तू घेणे, स्वयंपाक, खाण्याची, क्रिकेटची, perfumes ची आवड आणि बरंच काही! त्यावेळी जर कोणी लताची अवांतर (संगीत विषय सोडून) मुलाखत घेतली असती तर मी त्यात एक प्रश्न नक्की विचारला असता - तुझे इतके छान केस तू कशी सांभाळतेस?! हे सारे स्वप्नरंजन ज्या पुस्तकामुळे घडले ते तुमच्या हाती लागले तर नक्की वाचा!
आजची जराशी eclectic गाणी - त्यातला समान धागा शोधायचा तर सगळी रोमँटिक किंवा आनंदी/उडत्या चालीची आहेत असं म्हणता येईल.

१. दुनिया हमारे प्यार की - चित्रपट: लाहोर, संगीतकार - श्याम सुंदर, गीतकार - राजेंद्र कृष्ण
हे करण दिवाण यांच्या बरोबर गायलेलं युगुल गीत आहे. अति प्रचंड गोड गाणं आहे - ‘“तुझे जीवन की डोर से” किंवा जीवन में पिया किंवा वो चांद खिला यांच्या पंक्तीत बसणारं. लताचा आवाज या गाण्यात एकदम सानुनासिक लागलाय इतका की ओळखू येत नाही पटकन. गाणं संथ लयीत आहे पण तुमच्या डोक्यात लूप वर चालेल याची गॅरेंटी मी घेते! ऐकाच!

२. अहा रिमझीम के ये प्यारे प्यारे - चित्रपट: उसने कहा था, संगीतकार - सलील चौधरी, गीतकार - शैलेंद्र
हे तलत मेहमूद यांच्याबरोबर गायलेलं युगुल गीत आहे. अख्ख्या गाण्यात पावसाच्या सरी भरून राहील्या आहेत. हे गाणं तसं लोकप्रिय आहे पण तरी अनेकांना माहिती नसतं.

३. मचलती आरजू खडी बाहें पसारे - उसने कहा था मधलं हे गाणं इतकं ऐकलं जात नाही. मी तर हे इतक्यातच पहिल्यांदा ऐकलं. पण काय गायलंय! वेगळाच ठेका आहे आणि गाण्यात काही ओळींच्या शेवटी जो "ओय" येतो तो इतका गोड आहे की त्यासाठी गाणं पुन्हा ऐकावं!

३. मेरे मन का बावरा पंछी - चित्रपट: अमर दीप , संगीतकार - सी. रामचंद्र, गीतकार - राजेंद्र कृष्ण
हे पण तसं कमी प्रसिद्ध उडत्या चालीचं गाणं आहे. उडती चाल असली तरी सोपी बिलकुल नाही! त्या आवाजाच्या हरकती आणि कसरती केवळ लताच्याच गळ्यातून निघू शकतात!

४. सुरमई रात है (सुभह का इंतजार) - चित्रपट: जोरू का भाई, संगीतकार - जयदेव, गीतकार - साहिर लुधियानवी
आता हे गाणं तलत मेहमूद यांनी आणि लतादिदी दोघांनी वेगवेगळं गायलं आहे. शब्दही वेगळे आहेत. नायकाचं गाणं उदास मूडचं आहे आणि नायिकेचं रोमँटिक! दोन्ही आपापल्या जागी फार सुरेख renditions आहेत. तलत मेहमूद यांच्या आवाजाला मखमली हे विशेषण का लावतात हे आपल्याला हे गाणं ऐकलं की नीटच समजेल! आणि या गाण्यातला लताचा आवाज म्हणजे मधाळ या विशेषणाचा मान वाढवणारा!

५. तेरे प्यार में दिलदार - चित्रपट: मेरे मेहबूब, संगीतकार - नौशाद, गीतकार - शकील बदायुनी
मेरे मेहबूबची गाणी म्हटली की रफी साहेबच आठवतात! पण त्यातलं हे लता दिदींचं गाणं मला फार आवडतं. दिवसभर डोक्यात वाजत राहिलं तरी कंटाळा येणार नाही हे नक्की!

अपूर्ण... (भरपूर गाणी आणि किस्से आहेत. जमेल तेव्हा लिहीत राहीन)

Keywords: 

ImageUpload: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle