चतुर हजारो , अक्षरशः डोळ्यासमोर, घराच्या खिडकीत बसून बघतेय. भाग्य !!! खरंच मुंबई सारख्या ठिकाणी अंधेरीला अस काही घराच्या खिडकीत बसून डोळ्यासमोर येईल अशी अपेक्षाच जिथे दूर तिथे हे घडताना बघतेय. कदाचित पहिल्यांदा, कदाचित ह्या करता की आधी अस शांत बसून बघणं झालं नसेल किंवा संख्या जाणवली नसेल किंवा नुसतीच भिरभिर वाटली असेल. कारण काही असो, आता जाणवत आहे ते काहीतरी सुंदर भव्य आणि दुर्मिळ.
किती वेळ झाला ते नुसतेच भिरभिरत आहेत. का करत असतील काहीतरी शास्त्रीय, नैसर्गिक कारण असेलच पण त्या पलीकडे आपल काम करत राहणं असेलच ना. पक्षी सकाळी खाऊन पिऊन ऊन घेऊन झालं की दिवसभर काय करतात? आपलं काम, पण म्हणजे काय? भिरभिरणं हे काम कसं असेल. पण आहे खरं. देवानं, निसर्गाने ठरवून दिलेलं? आत्ता टाळेबंदी मुळे खिडकीत बसून मुंग्या पण खूप पहिल्या, त्या पण दिवस रात्र लगबग करत असतात. थांबलेल्या दिसतच नाही कधी.
माणसाला मात्र सवय झाली आहे दिवसाचे, तासाचे भाग करायची आणि त्यात वेगवेगळ्या गोष्टी करण्याची आणि त्याच विभाजन करायची. काम, धंदा, आवड, गरज, लादलेलं, आराम, भूक सगळंच. आपण वाढलो, पुढे गेलो त्याचा परिपाक. उत्क्रांती, समाज जाणीव नेणिवांची. देणं आणि शाप दोन्ही. देणं ह्या साठी की नवीन शोध आणि कलानिर्मिती त्यातून होते आणि शाप ह्यासाठी की स्थैर्य नाही. पण तोही शाप नाहीच. नवनिर्मितीची आस /गरज शाप नाही असू शकत, पण दिवस रात्र तेच तेच करणं ह्यातही एक स्थैर्य आहे, जे हल्ली खिडकीत बसून दिसत आणि आपल्या स्थैर्याची जाणीव करून देत.
