दिंडी चालली.. हर्णैला

मी इथल्या महाराष्ट्र मंडळाच्या अंकात हा लेख मागच्या वर्षी लिहिला होता. तो इथे आणत आहे.

IMG-20220320-WA0015.jpg

शाळेत असताना मार्च महिना आला की वार्षिक परीक्षेचे वेध लागायचे. पण परीक्षेच्या आधी शेवटची मज्जा करायचे दोन सणही मार्चमध्येच यायचे. एक म्हणजे अर्थातच होळी. दुसरा रूढार्थाने ’सण’ नव्हे, पण ’साधुसंत येती घरा, तोचि दिवाळी दसरा’ या न्यायाने आमच्या घरी संत एकनाथांच्या पादुकांचं आगमन व्हायचं, तो दिवस आम्हाला सणासारखाच वाटायचा.

होळी किंवा शिमगा हा कोकणातला मोठा उत्सव. आमच्या श्रीवर्धन भागात बर्‍याच गावांमध्ये चांगली दहा दिवस रोज होळी लावली जाते. होळी पौर्णिमेचा दिवस दहावा. त्या दिवशीची होळी सर्वात मोठी. होळी पौर्णिमेनंतरही गावातला सण लगेच संपत नाही. आठवडाभर खेळी, सोंगं, काही ना काही चालू असतंच. अशी मज्जा सुरू असताना आमच्या घरी होळी पौर्णिमेच्या दुसर्‍या दिवशीपासूनच एकनाथ महाराज पादुकांच्या पदयात्रेच्या आगमनाची तयारी सुरू होते.

होळीनंतरची षष्ठी म्हणजे एकनाथ षष्ठी. कोकणात हर्णै गावात संत एकनाथांचं मंदिर आहे आणि तिथे एकनाथ षष्ठीचा उत्सव पूर्वापार मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. मुंबई-डोंबिवली-ठाण्यात स्थायिक झालेल्या काही हर्णैकरांनी पुढाकार घेऊन या उत्सवाच्या निमित्ताने एक दिंडी/ पदयात्रा १९८६ साली सुरू केली. नाथांच्या पादुका घेऊन मुंबईतल्या भाऊच्या धक्क्यापासून या यात्रेला सुरुवात होते. बोटीने रेवसला येऊन , पुढे अलिबाग-मुरुड-दिवेआगर-हरिहरेश्वर-बाणकोट-केळशीमार्गे ही पदयात्रा एकनाथ षष्ठीच्या आदल्या दिवशी हर्णैला पोचते. एकूण सात-आठ दिवसांचा हा प्रवास असतो. त्यापैकी एका रात्रीचा मुक्काम आमच्या घरी असतो.

पदयात्रा मुक्कामाला येणार म्हणजे तयारी तशी बरीच असते. पदयात्रेत चाळीसपन्नास माणसं असतात. याव्यतिरिक्त घरची, पाहुणी, शिवाय कामाला बोलावलेली माणसं. त्यानुसार अंदाज घेऊन स्वैपाकाची तयारी, घराची साफसफाई, मागचं-पुढचं अंगण सारवून घेणं, सतरंज्या वगैरे उन्हात तापवून घेणं, पिण्याच्या आणि वापरण्याच्या पाण्याची पुरेशी सोय करणं अशी कामं सुरू होतात. मोठी पातेली, ताटंवाट्या यांची जमवाजमव केली जाते. एरवीही आंघोळीच्या पाण्यासाठी एक चुला असला, तरी आता एवढ्या माणसांचं आंघोळीचं पाणी तापवायला एक जास्तीचा चुला तयार करून ठेवला जातो. काही स्वैपाक घरात गॅसवर केला, तरी शिवाय बाहेर दगडाच्या चुली मांडल्या जातात. लहानपणी मला या सगळ्याची खूप मजा वाटायची.

पदयात्रेच्या दिवशी सकाळपासून घरात चांगलीच लगबग असते. अर्थात आता इतक्या वर्षांच्या सवयीमुळे हे सगळं अंगवळणी पडलं आहे, त्यामुळे गोंधळ-गडबड शक्यतो होत नाहीच. शिवाय मदतीसाठी आत्या, काका-काकू, मामा-मामी वगैरे आलेले असतातच. भाज्या चिरायला, इतर कामाला मदतनीस बायकाही बोलावलेल्या असतात. त्यामुळे कामं भराभर आटपली जातात.

संध्याकाळी पदयात्रा येऊन पोचते. आघाडीवर चालणार्‍यांच्या हातात ध्वज असतो. झांजांच्या तालावर भजनं म्हणतच ते येतात. आल्याआल्या आधी अंगणात फेर धरून भजनाच्या तालावर भोवरी नृत्य करतात. सुरात, दमदार आवाजात म्हटलेली ती भजनं आणि त्या तालावर केलेल्या नृत्याने एक वेगळीच वातावरणनिर्मिती होते. दिवसभराच्या चालीने सगळे दमलेले असतातच, कुणाकुणाच्या पायांना चालून चालून फोडही आलेले असतात. पण तरी हा उत्साह पाहण्यासारखा असतो. भोवरी नृत्य संपल्यावर मग हातपाय वगैरे धुवून चहापाणी होतं. सगळे जरा विसावतात. पदयात्रींपैकी बरेचजण वर्षानुवर्षं येणारे असतात, तर काहीजण नव्याने सामील झालेलेही असतात. सुरुवातीच्या वर्षांमध्ये पदयात्रेत फक्त पुरुष असायचे. नंतर महिलाही येऊ लागल्या. विविध ठिकाणचे, वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये नोकरी-व्यवसाय करणारे लोक इथे एकत्र आलेले असतात. त्यात जसे उच्चशिक्षित, उच्चपदावर काम करणारे असतात, तसेच सर्वसामान्यही असतात. पण कुठल्याही प्रकारचा भेदभाव कुणाच्याच मनात नसतो. पंढरपूरच्या वारीत सर्वांची जशी ’वारकरी’ ही एकच ओळख, अगदी तसाच भाव इथेही.

Screenshot_20230313-182815.png

तिन्हीसांजेला एकनाथ महाराजांच्या पादुकांची पूजा होते. संकष्ट चतुर्थी असेल तर यथाशक्ती अथर्वशीर्षाची आवर्तनं होतात. पदयात्रेचा दिवस तारखेने ठरलेला असला, तरी तिथीच्या क्षयामुळे त्या दिवशी कधी तृतीया, तर कधी चतुर्थी येते. मग आरती होते. पादुकांचं दर्शन घ्यायला आमच्या गावातले गावकरी येतात. संत एकनाथ हे वारकरी संप्रदायातले अतिशय महत्त्वाचे संत. त्यांनी ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण केलं. एकनाथी भागवत, भावार्थ रामायण असे ग्रंथ लिहिले. अभंग, भारुडं, गवळणी अशा रचना करून त्याद्वारे समाजात प्रबोधनाचा प्रयत्न केला. अस्पृश्यतेसारख्या समाजातल्या अनिष्ट प्रथांवर त्यांनी आपल्या उपदेशातून आणि आचरणातून हल्ला चढवला. एकनाथांचं गाव पैठण. मराठवाड्यातल्या पैठणपासून इतक्या दूर, कोकणात हर्णैला सुमारे दोन-अडीचशे वर्षांपूर्वी श्री. गैलाड नामक एका एकनाथभक्तांच्या श्रद्धेमुळे एका साध्याशा देवळात नाथांच्या पादुका स्थापन झाल्या. तेव्हापासूनच एकनाथ षष्ठीचा उत्सवही तिथे सुरू झाला. हर्णैच्या सुवर्णदुर्गावर कान्होजी आंग्र्यांचं ठाणं होतं. आंग्रे घराण्याच्या मदतीने एकनाथांचं पक्कं मंदिर मग बांधण्यात आलं. तेच मंदिर अजूनही आहे. माझ्या आजीचं माहेर हर्णैचं असल्यामुळे तिला साहजिकच या उत्सवाबद्दल जिव्हाळा होता. या पदयात्रेच्या निमित्ताने तिचंही उत्सवाशी असलेलं नातं अधिक दृढ झालं. गेली पस्तीस वर्षं पदयात्रींशी असलेला आमचा हा ऋणानुबंध वाढत गेला आहे. पहिल्यापासून पदयात्रेत येणार्‍यांची पुढची पिढीसुद्धा आता यात सामील होते. सुरुवातीच्या काळात पदयात्रींची तीसच्या दरम्यान असणारी संख्या वाढत जाऊन मध्यंतरीच्या काळात अगदी ऐंशी-शंभरला जाऊन पोचली होती. ती आता चाळीस-पन्नासवर स्थिरावली आहे.

खेडेगावातलं घर म्हटलं की समोर छान अंगण असतंच. त्यामुळे कितीही माणसं पाहुणी आली, तरी बसायला, जेवायला, झोपायला जागा कमी पडत नाही. पादुकांच्या दर्शनाचा कार्यक्रम आटपला, की थोड्या वेळातच अंगणात आणि ओटी-पडवीत पानं मांडून जेवणाची तयारी होते. घरच्या माणसांच्या बरोबरीने, खरं तर आमच्यापेक्षा जास्त काम पदयात्रीच भराभर आटपतात. काहीजण पहिल्या पंगतीत पदार्थ वाढण्याचंही काम करतात. पोळी-भाजी, चटणी, कोशिंबीर, आमटी-भात, प्रसादाचा शिरा असा साधाच, पण चवदार बेत असतो. दुसर्‍या पंगतीला मग उरलेल्या पदयात्रींबरोबर आम्ही घरची आणि कामाला बोलावलेली माणसं जेवायला बसतो. जेवणं उरकतात, मागची आवराआवरी, स्वच्छताही चटचट होते आणि कीर्तनासाठी अंगण मोकळं होतं.

रेवदंडा गावचे प्रसिद्ध कीर्तनकार श्री. केळकरबुवा वर्षानुवर्षे या पदयात्रेला यायचे. पदयात्रेचा एक मुक्काम त्यांच्याकडेही असतो. सुरुवातीला अनेक वर्षं ते चालतच यायचे. नंतर वयानुसार ते जमेनासं झाल्यावर चालत न येता गाडीने थेट आमच्याकडच्या मुक्कामाला यायचे, पण सुश्राव्य कीर्तन मात्र दरवर्षी नक्की करायचे. काही वर्षांपूर्वी त्यांचं दुःखद निधन झाल्यानंतर श्री. बाळ हे कीर्तनकार येतात. साथीसाठी पेटी-तबलावादक दिवेआगरहून येतात. घरची, गावातली माणसं, पदयात्री कीर्तन ऐकायला बसतात. ज्ञानदान, प्रबोधन आणि रंजन करणारी कीर्तन ही महाराष्ट्रातली वैशिष्ट्यपूर्ण पारंपरिक कला. शहरांमध्ये पूर्वीपासून विविध निमित्तांनी कीर्तनं आयोजित केली जातात. हल्ली टीव्हीवरही कीर्तन पहायला मिळणं सोपं झालं आहे. पण आमच्या ग्रामीण भागात पूर्वी कीर्तन पहायला-ऐकायला मिळणं ही तशी दुर्मिळ बाब होती. पदयात्रेमुळे ही संधी आमच्या गावाला मिळत असे.

रात्री बारा-साडेबारानंतर कीर्तन संपलं की लगेचच निजानीज होते. कारण पदयात्रींना पहाटे लवकर उठून परत चालायला सुरुवात करायची असते. पहाटे चार-साडेचारला उठून, चहा पिऊन, काकडआरती करून पदयात्री निघतातसुद्धा! अशा प्रकारे दरवर्षी येणारा, पण प्रत्येक वेळी नवा आनंद देणारा हा सण संपतो!

Attachmentमाप
Image icon IMG-20220320-WA0015.jpg224.99 KB
Image icon Screenshot_20230313-182815.png862.01 KB

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle