आसाममधील वीरांगना: कनकलता

वयच काय होतं तिचं! खेळण्या-बागडण्याचे दिवस होते तिचे! पण थोरामोठ्यांनी तोंडात बोट घालावं, असं तिने अभूतपूर्व साहस अजाणत्या वयात करुन दाखवलंय, व आज ती कित्येकांची प्रेरणास्थान बनली आहे. तिच्या धाडसाचं वर्णन भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरलं गेलंय.

kanaklata

ही घटना आहे १९४२ची! महात्मा गांधीजींच्या 'चले जाव' चळवळीने जोर धरला होता. लाखो लोक ह्या आंदोलनात सहभागी झाले होते. आसामातील जनताही ह्या चळवळीत सक्रीय सहभागी झाली होती. ठिकठिकाणी सभा, मोर्चे, सत्याग्रह होत होते.

ही घटना आहे दरंग जिल्ह्यातील शोनितपूरची. पोलिस चौकीवर कब्जा करायला सत्याग्रही निघाले होते व त्यात सर्वात पुढे होती अवघी १७ वर्षीय 'कनकलता'! हातात तिरंगा घेतलेली ही बाला जोशात व उत्साहात घोषणा देत मोर्चात सहभागी झाली होती. जणू रणचंडिकाच बनली होती!

जनसमुदाय चौकीवर आला. कनकलता बंदुकधारी पोलिसांना विदेशी सरकारची नोकरी सोडण्यास व पोलिस चौकी जनतेला स्वाधीन करण्याची विनंती करत होती. पण ते बधले नाहीत, हे बघून ती त्वेषाने ओरडून, लोकांना निडर बनून चौकीवर कब्जा करायला सांगू लागली. लोक झपाटलेली होती.

'मागे फिरा नाहीतर गोळी घालू', जमावाला पोलिस धमकावत होते. कनकलताच्या अंगात महिषासुरमर्दिनी संचारली होती. हातातल्या तिरंग्यासह न डगमगता, घोषणा देत, पुढे सरसावत असतानाच ठो-ठो आवाज करत गोळ्यांनी कनकलताचा ठाव घेतला. कुठल्याश्या हिंदी सिनेमात शोभावा असा मेलोड्रामा काही क्षणात रिटेकविना प्रत्यक्षात घडला. रक्तबंबाळ कनकलताच्या हातातील तिरंगा जमिनीवर पडणार तोच 'मुकुंद काकोटी' नामक साहसी तरुणाने पुढे सरसावून झेंडा हातात धरला; पण गोळ्यांनी त्याचाही वेध घेतला. या तरूणांसाठी 'करो या मरो', हे तोंडातून निघालेले बुडबुडे नव्हते! पोलीसांच्या निर्दयतेने झालेल्या त्या गोळीबारात पन्नास-साठजण मृत्युमुखी पडले.

sculpture_kanaklata_sacrifice
तेजपूर, आसाममधील कनकलता उद्यानातील (रॉक गार्डन) कनकलताच्या बलीदानाचे शिल्प!

आज आपण स्वातंत्र्य उपभोगतोय, ते अशा कित्येक काळाच्या पडद्याआड गेलेल्या निर्भय लोकांच्या बलीदानांमुळे!

क्रिश्नकांत व कनकेश्वरी बरुआंची ही स्वाली (मुलगी) - कनकलता! २० सप्टेंबर १९२४ साली जन्मली. ज्योतिप्रसाद अग्रवाल व बिष्णुप्रसादरावांची स्फुर्तीगीते व देशभक्ती गीते ऐकून तिच्या कोवळ्या ह्रदयात देशप्रेमाचं बीज अंकुरलं होतं पण अवघ्या १७व्या वर्षी तिने देशासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली.

आज आसामी भाषेत रचलेल्या काव्यांतून व गीतांमधून कनकलता अजरामर झाली आहे. ही गीते आजही भावभक्तीने गायली जातात. आज २० सप्टेंबर म्हणजे तिची जयंती! तिला भावपूर्ण विनम्र आदरांजली!

संदर्भ : https://en.wikipedia.org/wiki/Kanaklata_Barua

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle