आता आमच्या दोघींचे काय? पण हरून बसेल ती आई कसली. शिलाई तर ती करतच होती तशातच कारखाना सुरू ठेवायचा निर्णय तिने घेतला. कच्चा माल शिल्लक होताच. ती कधीही घराबाहेर पडली नव्हती. तरी दादांना ती प्रत्येक गोष्ट विचारून घ्यायची. मला वाटते त्यामुळेच दादा गेल्यानंतर ती कारखाना चालवताना काही डगमगली नव्हती. शिल्लक होता त्या मालापासून तिने परत मिश्री च्या पुड्या तयार केल्या. आणि अण्णाला सांगितले दुकानदारांना पोहोच करायला. पुण्याला पण तिने माल पाठवला. कच्चा माल मागविण्यासाठी ड्राफ्ट वगैरे काढून कसा पाठवायचा ते विचारायला ती घरमालकांच्या आप्पांकडे गेली.