असं असं घडलं...४. मध्ययुग आणि महाराष्ट्र

आधीचा भाग

( डिसक्लेमर : शिवाजी इतका हृदयाच्या जवळचा आहे की त्याला अहोजाहो म्हणताच येत नाही. तेव्हा कोणाच्या भावना दुखावल्या वगैरे जाऊ नयेत हिच इच्छा!
आदरार्थी बहुवचन! मराठी भाषेचं हे वेगळेपण कधी कधी भयंकर त्रासाचं ठरतं. माझ्यापुरता मध्यम मार्ग मी सर्वच वैचारिक लिखाणांपुरता काढला. तो म्हणजे आधुनिक कालखंडातील प्रत्येकाला आदरार्थी बहुवचन लावेन. प्राचीन, मध्ययुगीन काळातली व्यक्ती कितीही आदरणीय असली तरी तो आदर मी लिखाणात केवळ आदरार्थी बहुवचन वापरून करण्याएेवजी त्या व्यक्तीचे मोठेपण मांडून व्यक्त करेन.
आधुनिक कालखंड हा जास्त जवळचा असल्याने ह्या कालखंडातल्या व्यक्ती, अगदी जिवंत असण्याचीही शक्यता अाहे. तेव्हा या कालखंडातील सर्व, अगदी सर्व व्यक्तींना मात्र मी हे आदरार्थी बहुवचन वापरेन. काहींना हे खटकण्याची खूप शक्यता आहे. पण यात केवळ एक सोय अभिप्रेत आहे.)
_________________________________________________

फाल्गुन वद्य तृतिया नुकतीच होऊन गेली. शिवजयंतीचा उत्सव पार पडला. मध्ययुगात होऊन गेलेला एक आगळावेगळा राजा! आज त्याच्या बद्दल बोलणार आहे.

लक्षात आलं ना मी का मध्ययुग निवडलं. शिवाजी म्हटलं प्रत्येक मराठी माणसाला भरून येतं, अभिमानाने मान ताठ होते. राजा असावा तर असा, अशी भावना मनात येते.
या शिवाजी बद्दल इतकं लिहिलं गेलय, जातय की मी नवीन काय सांगणार?

आजकाल व्हॉट्स अपच्या माध्यमातून तर महापूर लोटतो ज्ञानसागराचा. तिथे काही विरोध केला, पुरावे मागितले की लगेच मानभंग वगैरे होतात. त्यामुळे अशा कोणत्याच गोष्टींबद्दल मी बोलणार नाही.

मी बोलणार आहे ते फक्त आणि फक्त मध्ययुगातील एक वेगळी दृष्टी असणार्‍या , स्वत:चा वेगळा ठसा पाडणार्‍या, त्याकाळाची बंधने ओलांडून पुढे जाणार्‍या एक दूरदृष्टी असलेल्या , समंजस, सहृदय, कर्तव्यकठोर अशा शहाजी आणि शिवाजी या पितापुत्रांविषयी ! शहाजी, शिवाजी कसे घडले , कोणत्या परिस्थितीत घडले , त्यांचे वेगळेपण मांडण्याचा प्रयत्न करते. खूप मोठा विषय, पण थोडक्यात मांडणार आहे.

तर मध्ययुगात महाष्ट्रात यादवांचे राज्य मोडून बहामनी राज्य आलेलं. पण त्याचीही विभागून पाच वेगवेगळी शकलं झालेली. पैकी महाराष्ट्रात उत्तरेकडची मुघल सत्ता, अहमदनगरची निजामशाही आणि विजापूरची आदिलशाही आशा तीन वेगवेगळ्या सत्तांचे आलटून पालटून नियंत्रण होते. सतत कोणाचा न कोणाचा सत्ता संघर्ष , युद्ध चालत होती. शिवाय स्थानिक वतनदारांचे एकमेकांशी असणारे संघर्षही चालूच असत. जोडीने वेळोवेळी पडणारे दुष्काळ, कोणीच वाली नसल्याने न मिळणारी मदत, यामुळे महाराष्ट्रातील जनता अगदीच हवालदिल झाली होती. अनेक गावे ओस पडली होती. अनेक कुटुंबे आपली वहिवाटीची जमीन सोडून परागंदा झालेली. एकंदरच कोणाचाच पायपोस कोणाच्याच पायात नाही; अंदाधुंदी, कोणी वाली नाही, युद्ध, अस्थिरता, असा अतिशय असंतोषाचा काल महाराष्ट्र अनुभवत होता.
इतिहासातील गुप्त साम्राज्य, यादव राजवट, वाकाटक राजवट, विजयानगराचे साम्राज्य अशा अनेक उत्तम राजपदांचा अनुभव असल्यामुळे मध्ययुगातील जनतेला अन्याय, असुरक्षितता खूपच जास्त जाणवत होती.
या परिस्थितीत वेरुळच्या एका घराण्याने पुढाकार घेतला. मालोजी आणि विठोजी भोसले या भावंडांनी आपले लष्करी कर्तृत्व निजामशाही मध्ये राहून दाखवले. मालोजीचा पुत्र शहाजी यानेही आपले लष्करी कर्तृत्व सिद्ध केले.

शहाजीचा काळ तर अजूनच अंदाधुंदीचा होता. सतत कटकारस्थाने, युद्धे चालू होती. तत्कालिन सर्व राज्यकर्ते; मुघल सम्राट , निजामशहा, आदिलशहा हे आपापल्या वर्चस्वाखाली जास्तीत जास्त प्रदेश आणण्यासाठी कोणतेही विधीनिवेश पाळत नव्हते. स्वाभाविकच प्रत्येक सरदार, वतनदार सतत सत्ताबदल करत. शहाजीचीही परिस्थिती अशीच होती. कधी निजामशाही; तिथे दगाफटका झाला कि आदिलशाहीकडे . तिथे कमी महत्व मिळाले कि पुन्हा निजामशाही. तिथे कारस्थाने झाली कि मुघलांकडे. तिथे दगाफटका झाला कि पुन्हा आदिलशाही, तिथे अंदाधुंदी कि पुन्हा निजामशाही. अशी त्रिस्थळी यात्रा सतत सुरु होती.
या सगळ्यात शहाजीच्या काही गोष्टी लक्षात येऊ लागल्या.

१. मुगलांचा दक्षिणेत शिरकाव होता कामा नये.
२. स्वत:च्या अधिकारातला काही परगणा- प्रांत हवा.
३. स्थानिक लोकांचे राज्य असायला हवे.
४. त्यासाठी काही हुशार, जिवाला जीव देणार्‍या आणि निष्ठावान व्यक्ती शोधून त्यांना आपल्याशी जोडून घेतले पाहिजेत.

यादृष्टीने शहाजीने हालचाली सुरु केल्या.

१. पुणे, सुपे, चाकण येथील वतनदारी आपल्या नावावर करून घेतली. निजामशाही, आदिलशाही इतकेच नव्हे तर मुघलांकडूनही त्या वेगवेगळ्या वेळी मान्य करून घेतले.
२. महाराष्ट्रात निजामशाही वा आदिलशाही बलवान व्हावी यासाठी प्रयत्न केले.
३. शिवाजीची रवानगी पुण्याला केली.
४. शिवाजी बरोबर अत्यंत हुशार, निष्ठावान, विश्वासू अशा व्यक्तींचे "प्रधान मंडळ" सोबत दिले.
५. वेळोवेळी शिवाजीच्या आक्रमक हालचालींची पाठराखण निजामशाही-आदिलशाहीमधे केली.

शहाजीचा हा सगळा विचार, कृती निश्चितच मध्ययुगाचा विचार करता फार वेगळी होती. मध्ययुगातून महाराष्ट्राला वेगळी दिशा मिळालेली दिसते ती शहाजीच्या कारकिर्दीपासून! शहाजीने हे सगळे अतिशय विचारपूर्वक, नियोजनबद्ध केलेले दिसते. हीच दूरदृष्टी , नियोजन पुढे शिवाजीनेही दाखवलेले दिसते.

शिवाजीचा जन्म फाल्गुन वद्य तृतिया, शके १५५१; इंग्रजी कॅलेंडर नुसार स.न. १९ फेब्रुवारी १६३० . अत्यंत धामधुमीचा - मुघलांच्या आक्रमणाचा काल. सुरुवातीची, बालपणीची सहा वर्षे शिवाजी सह्याद्रीच्या गडकोटांवर होता. पुढे सहा वर्षे बंगळूरला शहाजीच्या बरोबर होता. १६४१ मध्ये वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी शिवाजीला शहाजीने जिजाबाई,दादोबा कोंडदेव यांच्या बरोबर पुण्याला पाठवले. पेशवे, मुजुमदार, डबीर, सबनीस असे स्वतंत्र अधिकारी; सोबत घोडदळ, पायदळ, पिढीजात विश्वासू अमात्य, अध्यापक, उंच ध्वज, विपुल द्रव्य असे सगळे सोबत पाठवले. शिवाय शहाजीने आपल्या मावळ वतनातील पोट मोकासा म्हणून ३६ गावेही शिवाजीच्या नावे केली.
एका अर्थाने स्वतंत्र, स्वायत्त असा छोटा राजा म्हणूनच शिवाजीची पाठवणी शहाजीने केली. पुढे आपल्या दोन सरदारांना "राजश्री शिवाजी पुणे येथे आहेत, तिथे इमाने सेवा करा" असेही सांगितले. या सर्वातून शहाजीने नियोजनबद्ध, परिस्थितीचा साधकबाधक विचार करून प्रत्येक कृती, प्रत्येक हालचाल केलेली दिसते.

शिवाजीला या सर्वाची खूप लहानपणापासून जाणीव असावी. पहिल्या बारा वर्षात वडिलांची धडपड, मते, कर्तृत्व आणि त्यांनी पाहिलेले स्वायत्त-स्वराज्याचे स्वप्न निश्चितच शिवाजीला माहिती होते. याचेच पडसाद आपल्याला शिवाजीच्या कारकिर्दीत दिसतात. पुण्यात आल्या नंतर पहिल्या चार वर्षातच आसपासच्या परिसरात - बारा मावळ प्रांतात आपला दबदबा शिवाजीने निर्माण केला. १६४२-४७ या काळात शिवाजी, दादोबा कोंडदेव, आणि सहकार्यांनी एक फार मोठे कार्य केले. कौल देऊन गावं वसवण्याचे. अनेक वर्षांच्या अंदाधुंदी मुळे जमीन, गावं उजाड झाली होती. ही जमीन लागवडी खाली आणणे, गावं वसवणे, ती स्थिर करणे, लोकांना अभय देणे-आश्वस्थ करणे, जमीन लागवाडीसाठी हत्यारे-पैसा-बीबियाणं पुरवणं. पेरणीपासून धान्य हाती येईपर्यंतचा ६-७ महिन्यांच्या काळात युद्ध-नासाडी होणार नाही याचे विश्वास देणे आणि टिकवणे. भावी काळात या सर्वातून निर्माण झालेल्या धनधान्यावर कर लावून तो वसूल करणं. ही सगळी व्यवस्था या पहिल्या ४-५ वर्षाय मावळ प्रांतात शिवाजी आणि सहकार्यांनी प्रत्यक्षात आणली. जनतेचा विश्वास संपादन केला. जनतेचे जीवन सुरक्षित, मूळपदावर आणले. त्यासाठी वेळप्रसंगी स्थानिक बलवान वतनदारांना दंड - शासन केले.

हे सर्व करत असताना शिवाजीने सर्वात जास्त कमावला तो म्हणजे " लोकांचा विश्वास" ! या कालखंडा मध्येच त्याने आपले अतिशय निष्ठावान सहकारी मिळवले. येसाजी कंक, बाजी पालसकर, बाजी प्रभू देशपांडे , मोरोपंत पिंगळे, अण्णाजी दत्तो, तानाजी मालुसरे, हंबीरराव असे अनेक सच्चे, कर्तृत्ववान, आणि आपापल्या क्षेत्रातले श्रेष्ठ सहकारी शिवाजीने मिळवले.
पुढे जावळीच्या चंद्रराव मोरेंपासून अफजलखान, शाहिस्तेखान, आग्राभेट, दक्षिण मोहिम, राज्याभिषेक पर्यंतचे सगळे तपशील सर्वांना माहितीच आहेत. अगदी शालेय पातळीवर याचा अभ्यास आपण केलाय. तेव्हा, मध्ययुगाचा विचार करताना शिवाजीचे जाणवलेले वेगळेपण फक्त मांडायचा प्रयत्न आता करणार आहे. ( मागचा लेख डोळ्यासमोर ठेवलात तर हे वेगळेपण जास्त ठळक होईल)

शिवाजीने आपल्या अधिपत्याखाली अनेक छोट्या- मोठ्या वतनदारांना एकत्र आणले. बारा मावळ, जावळी, महाराष्ट्रातील अनेक वतनदार, या सर्वांना एकत्र आणून स्वराज्य उभे केले. चाळीस हजार होन इतक्या वतनापासून एक कोटी होन वतनापर्यंत हे राज्य वाढवले.

राजकीय स्तरावर मुघलांचा दक्षिण शिरकाव शिवाजीने थोपवून ठेवला. इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज अशा परकीय आक्रमकांना महाराष्ट्रापासून दूर ठेवण्याचे कामही शिवाजीने केले. महाराष्ट्राची सीमा थेट कर्नाटका पर्यंत वाढवली.

हे स्वराज्य उभे करत असतानी वडील शहाजी यांचे पूर्ण मार्गदर्शन आणि पाठिंबा शिवाजीला होता. किंबहुना शहाजीने तयार केलेल्या पार्श्वभूमीवरच शिवाजीने स्वराज्य उभे केले. आणि वेळोवेळी शहाजीचा सल्ला, पाठिंबा त्याने मिळवला. तसेच आपल्या मुलाला- संभाजीलाही त्याच दृष्टीने घडवले. अगदी गरज भासली तेव्हा संघर्षापेक्षा समन्वय आणि सामंजस्याने प्रश्न सोडवला.

कोणत्याही वर्चस्वाखाली न जाता स्वत:चे राज्य उभे केल्यामुळे शिवाजीने "सतत बाजू बदलणे" हे मध्ययुगाचे धोरणही स्वीकारले नाही. उलट आपल्या राज्यात आलेल्या प्रत्येक वतनदार, सैनिक, अधिकारी , जनता यांच्या मध्ये त्याने निष्ठा निर्माण केली. शिवाजी बद्दलचा आदर, विश्वास वाढीस लागला. आणि त्याचे कर्तृत्व पाहून मध्ययुगात हरवत चाललेली निष्ठा पुन्हा प्रस्थापित झाली.

आर्थिक बाबतीत शिवाजीने अनेक नवीन पावलं उचलली. शेतीचे मोजमाप योग्य करण्यासाठी, त्यात सारखेपण आणण्यासाठी शिवकाठी वापरली जाऊ लागली. जमिनीची प्रतवारी ठरवली गेली. त्यानुसार कर आखणी , आकारणी सुरु झाली. करव्यवस्थेत समानता आली. सततच्या युद्धांपासून सुटका झाल्यामुळे आणि संरक्षणामुळे शेतीची घडी बसू लागली. त्यातून उत्पन्न आणि त्यातून ठराविक कर राज्याकडे जमा होऊ लागला. या राज्याकडे येणाऱ्या कराचा अतिशय काटेकोर हिशोब ठेवला जाऊ लागला. स्वाभाविकच राज्याची आर्थिक बाजू बळकट होऊ लागली. याचा उपयोग व्यापार, सैन्य, आरमार आणि किल्ले उभारणीसाठी झाला.

लष्कराची बाजूही शिवाजीने बळकट केली. राज्याच्या रक्षणासाठी लष्कर किती महत्वाचे आहे हे त्याने जाणले. त्यानुसार लष्कराची बांधणी केली. त्यांना योग्य आणि पुरेसा दारुगोळा, हत्यारं मिळतील अशी व्यवस्था केली. कमी सैनिकांमध्ये मोहिम यशस्वी करण्यासाठी गनिमी कावा ही पद्धती विकसित केली. सैनिकांशी अतिशय चांगले संबंध आणि युद्धातील प्रत्यक्ष सहभाग यातून शिवाजी बद्दलचा आदर, त्याच्या प्रति असणाऱ्या निष्ठा वाढीस लागल्या. यातून शिवाजीचे मावळे हे एक अभूतपूर्व रसायन बनले. जिवाला जीव देणारे सैनिक, अधिकारी याची उदाहरणे म्हणून बाजी प्रभू देशपांडे आणि जीवा महाला ही नावे पुरावीत.

शिवाजीने महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केले. या राज्याला बाह्य आक्रमणांपासून सतत सुरक्षित केले. आदिलशाही, निजामशाही, मुघल इतकेच नव्हे तर पाश्चात्य सत्तांनाही योग्य ते बंध घातले. मध्ययुगीन त्रस्त जनतेला आश्वस्त केले.

राज्यांतर्गत सुरक्षितता, स्वास्थ्य आणले. जनतेचा मनातली भीती, असुरक्षितता पूर्णत: दूर केली. तत्कालिन राजांचे जनतेप्रति असणारे दुर्लक्ष ही परिस्थिती शिवाजीने बदलली. तो लोककल्याणकारी राजा बनला. सामान्य, स्थानिक लोकांचे हित जपणारा राजा, एक उत्तम शासनकर्ता म्हणून शिवाजी मध्ययुगात वेगळा उठून दिसतो. शासनासमोर सर्व सारखे ही आधुनिक काळातली संकल्पना शिवाजीने काही अंशी मध्ययुगातच स्वीकारलेली दिसते.स्त्रियांना मानाची वागणूक ही देखिल तत्कालिन परिस्थितील वेगळी उठून दिसणारी.

राज्यकारभाराच्या स्तरावर योग्य, अनुभवी व्यक्तींची अतिशय नेमकी पारख शिवाजीने केली. करवसूली, हिशोब तपासणी आणि विनियोगावरील योग्य पकड, यातून मराठी राज्याची आर्थिक परिस्थिती उत्तम केली. शेतजमिनीची प्रतवार मोजणी, योग्य कर आकारणी, वसुली आणि अतिशय स्वच्छ , पारदर्शी अर्थव्यवस्था शिवाजीने निर्माण केली. जोडीने न्यायव्यवस्थेतील निरपेक्षपणाही जपला . जात, धर्म, नातेवाईक कसलाही भेदभाव या न्यायव्यवस्थेत ठेवला नाही.

एकुणातच मध्ययुगातील सर्व अंधःकारमय बाजू दूर करणारी अशी ही शिवाजीची कारकिर्द! आणि म्हणूनच वेगळी, मानाची, अभिमानाची !

आज या निमित्ताने शहाजी आणि शिवाजीला एक कडक सलाम ____/\____
___

पुढील भाग

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle