पाऊस बरसुनी गेला अन आठवणींच्या सरी उलगडल्या,
सर मोत्याचा तुटुनी मोती सरसर गळावे, तश्या आठवणी मनभर ओघळल्या.
काहींनी मन झाले रेशीम रेशीम
हासू त्या गाली देऊन गेल्या,
काहींनी गिरवला त्या मोहकवेळा
जसा साजनच परत बिलगूनी गेला.
एखादा दिवस उगवतोच सुस्तावल्यागत.
का उगवतो?
का सुस्तावतो?
मनातच मळभ दाटलय तर
घसाघस अंग धुऊन काय व्हायचं?
का साचतय मनात हल्ली येवढं,
धुकं, धूर, गाळ, माती,
अश्रू, सल, पानं, फुलं, पक्षी?
सगळंच सांगावं वाटत नाही
काही लिहावं वाटत नाही
तरी पेन टेकला कागदावर की
शब्द झरत जातात
ओढ नसल्या झऱ्यासारखे
नि गढूळतात वाहणं विसरुन.
साचू नका बाबांनो
एकतर वाहत रहा जीथे मन मानेल
नाहीतर जिरून तरी जा मातीत
काय माहीत कोणत्या वेदनेचं मूळ
शेकडो मैल प्रवास करत
माती खाली शोधत असेल ओल.
एक झण्ण आहे माझ्या गाभ्यात.
तो बाहेरचं फार काही आत झिरपू देत नाही.
तो ग्लानी तुटू देत नाही.
आत येणारी कुठलीही संवेदना तो नाकारतो.
लिखित शब्द, चित्रित कथा
कशातही अडकू देत नाही.
'ते करायचंय ना? यात काय वेळ घालवतेस?'
ज्यात त्यात हेच टोकत राहतो तो.
मी कशातच अडकू शकत नाही.
मी कशातच थांबू शकत नाही.
मी थांबून काहीच करू शकत नाही.
मी गुंगीतच असते.
डोळ्यासमोर चालू असतात
माझ्या गाभ्याला स्पर्शही न करू शकणाऱ्या कहाण्या,
अविरत दळले जाणारे विनोद,
याच्या त्याच्या नावाची अवतरणे,
गुंगी तुटत नाही.
माझ्या आत काही झिरपत नाही.
त्याच्या तिच्या माझ्या दुःखाने
उन्मळून, कोसळून पडू देत नाही.