अस काय होत तुझ्या माझ्यात?
कधी कोणता आव नाही
कधी ओढा ताण नाही
कसं अलगद जपलेलं
कातर हळवं नितळ स्वच्छ नातं.
इतक नकळत जपलेलं की
काय जपतोय हे ही न कळावं?
इतक घट्ट सामावलेलं
की तुझं दूर असणंही न जाणवावं!
आणि मग झालीच आपली भेट
तू होतासच माझ्यात
अन् मी ही तुझ्यात
न भेटता न बोलता सामावलेलं
अस्तीत्व आपलं एकमेकांत
ती आपली भेट
देऊन गेली भेट
तुझी मला नि माझी तुला!
उभी कधीची यमुनातीरी
मध्यान सरली, उन्हे उतरली
शाम वेळ अन शाम न सोबती
धीर न उरला मनी जराही
हूरहूर, काहूर मनी दाटली
अंधारुनि आली सृष्टी सारी
शाम सखी मी, शाम सखी
दाट धुक्याने वाट अंधुकली
शिरशिरी उठली यमुने वरती
सोबत तिच्या मी आसुसलेली
पाठराखणीस कदंब सावली
पुऱ्या मिसळलो आम्ही तिघी
एकच तू, नयनी - हृदयीही
शाम सखी मी, शाम सखी
अवनी सारी गंधीत झाली
त्यात मिसळली धुंद पावरी
घेऊन तुझिया चाहूल आली
अंतर्बाह्य पुलकित झाली
राहिले न मी, मी माझी
तूच तू, झाले मी सारी