आत्याच्या घरची उन्हाळी सुट्टी म्हणजे चंगळच. किती ते हुंदडणं, आंबे, फणस, चापणं, आजुबाजुची मुले जमवून समुद्रकिनारी वाळूत किल्ले करणं आणि या सर्वांवर कडी म्हणजे आत्याचे लाड करणं. तिच्या हातचे मऊ लुसलुशीत तांदळाचे घावणे, नारळाच्या रसातल्या शेवया, उकडीचे मोदक आणि ताज्या मासळीचं आंबट - तिखट कालवण.... अहाहा स्वर्गसुख ! सुमीतच्या तोंडाला या आठवणीनेच पाणी सुटलं. आता मनसोक्त लाड करुन घ्यायचे आत्याकडून.....आत्या...तिची मायेने ओथंबलेली नजर आजही तशीच डोळ्यांसमोर येते सुमीतच्या. आत्याला रागावलेली तर नाहीच पाहिलं कधी पण तिचा कधी आवज चढलेलाही सुमीतला आठवत नाही. शांत स्वभावाची, हसतमुख आणि प्रसन्न व्यक्तिमत्वाची आत्या, साधी राहणी, नेसणं साधं, कधी कोणाबद्द्ल उणाअधिक शब्द हिच्या मनात तरी आला असेल का? याची शंका यावी इतकं आत्मीयतेनं वागणं-बोलणं. या शांत चेहर्यामागे भावभावनांची किती स्थित्यंतरं लपली होती हे त्या लहान वयात सुमीतला कळण्यासारखं नव्हतंच. नाही म्हणायला एक कारण होतं आत्याला विचलित झालेलं बघायला आणि ते म्हणजे गावाबाहेरचा ‘देसाई वाडा’. त्या वाड्याचं नाव जरी आत्याच्या समोर कोणाच्या तोंडून निघालं तरी तिच्या जीवाची घालमेल होई.
